Saturday, December 25, 2021

"तिसरा डुळा"

 


लेखक : किरण येले

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन

                                                                           पृष्ठे- १९२, मूूल्य- २५० रुपये.

माणूस आणि प्राण्यांमध्ये निसर्गाने जर सर्वांत मोठा फरक कोणता ठेवला असेल तर तो म्हणजे माणसाची विचार करण्याची ताकद! "Survival of the Fittest” हा सृष्टीचा नियम आहे. जो बलवान आहे, प्रतिकूल परिस्थितीत तग धरु शकतो, त्यालाच या जगात जगण्याचा अधिकार आहे असे हा नियम सांगतो. आपण पाहतो की प्राण्यांमधे बलवान नर म्हाताऱ्या नराला पळवून कळपाचा ताबा घेतो. जनावरांचे कळप नव्याने जन्मलेल्या पिल्लांना मध्यभागी ठेवतात आणि म्हाताऱ्या तसेच आजारी प्राण्यांना मागे ठेवत प्रवास करतात. हेतू हा असतो की एखाद्या हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला तर या नको असलेल्या प्राण्यांचा आधी बळी जावा. असे प्राणी मागे राहिले तर कळप त्यांना टाकून पुढे निघून जातो. माणसाचे वेगळेपण इथेच आहे! थकलेल्या, आजारी, कमकुवत माणसांना मध्यभागी ठेवत त्यांना तगवण्याचा, जगवण्याचा प्रयत्न करतो तो `माणूस’ अशी खरेतर माणूसपणाची व्याख्या आहे. पण हजारो वर्षांपासून समाजप्रिय म्हणून राहणाऱ्या या मानवरूपी प्राण्याची आजची वैचारिक पातळीच त्याने बनवलेल्या या समाजव्यवस्थेची आज सर्वांत मोठी शत्रू झाली आहे हे अगदी प्रकर्षाने जाणवले किरण येले यांचा "तिसरा डुळा" हा कथासंग्रह वाचत असताना! बऱ्याच दिवसांनंतर डोकं आणि मन सुन्न करणारं काहीतरी दर्जेदार साहित्य वाचनात आलं. आजच्या भावनाशून्य जगात माणसाला आपल्या आसपास घडणाऱ्या बऱ्याच घटना बघण्यासाठी आणि आपल्या खालावत जाणाऱ्या वैचारिक पातळीला पुन्हा एकदा सावरण्यासाठी आवश्यक असणारा 'तिसरा डोळा' उघडण्याची ताकद किरण येले यांच्या "तिसरा डुळा" या कथासंग्रहात आहे. या कथासंग्रहात असणारी प्रत्येक व्यक्तिरेखा कधी ना कधी आपल्या सर्वांच्या अनुभवात येऊन गेली आहे. आपल्या आसपासच्या जगात वावरणाऱ्या या व्यक्तिरेखा कितीही परिचयाच्या वाटल्या तरी अशा लोकांचं जग आणि त्यांचं जगणं यांच्याशी कधीही आपल्याला देणं-घेणं नसतं. त्यामुळंच त्यांचं सुख, दुःख, वेदना, हसणं आणि हसत हसत आयुष्याशी लढणं आपल्याला कधी माहीत होत नाही. फोटो फ्रेमचं दुकान असलेला हारुन, रोजंदारीवर काम करणारा जमील, साई मंदिराच्या दारात भीक मागून जगणारा धनकू, कचरा वेचणारी रखमा, मुसलमान असूनही हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साक आणि जत्रेत रस्त्यावर महादेवाचं चित्र काढून स्वतःच्या कुटुंबाचं पोट भरणारा जगल्या अशा या कथासंग्रहातील प्रत्येक व्यक्तिरेखा वाचकाला अस्वस्थ करतात. किरण येले यांनी वाचकांपुढे उभी केलेली या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिरेखा म्हणजे आपल्या समाजव्यवस्थेवर मारलेली एक चपराकच आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी असो वा स्वतःचं वेगळेपण सिद्ध करण्यासाठी असो गरीब तसेच परिस्तिथीने पिचलेल्या आपल्याच समाजबांधवांना पायाखाली घेण्याची काही लोकांची वृत्ती आपल्या मनात बरेच प्रश्नदेखील उपस्थित करते ज्यांची उत्तरं देण्याचं बळ आजतरी आपल्याजवळ नाही. समाजाचाच एक भाग असूनही समाजापासून अलिप्त राहणाऱ्या लोकांना वाचक या "तिसऱ्या डुळ्याने" अनुभवत राहतो आणि शेवटी न संपणाऱ्या विचारचक्रात हरवून जातो.

किरण येले यांनी अतिशय उत्तम पद्धतीने सर्व कथांची मांडणी केली आहे. संग्रहातील काही कथांना हिंदू-मुस्लिम दंगलीची पार्श्वभूमी दिली आहे, ज्यामधे धर्माच्या नावाखाली चालणारं चीड आणणारं राजकारण आपल्या डोळ्यासमोर येतं. या कथा वाचत असताना नकळत आपण आजच्या परिस्थिसोबत कथेतील पात्रांची तुलना करू लागतो आणि त्या पात्रांच्या रूपातील आपल्या आसपासचे चेहरे डोळ्यासमोर आणण्याचा एक केविलवाणा प्रयत्न करू लागतो. 'हारुन फ्रेम वर्क्स' मधे या दंगलीचं लोण हारुनच्या दुकानापर्यंत, घरापर्यंत  पोहोचतं आणि नंतर त्याचं अस्तित्वच गिळून टाकतं, उरते ती फक्त राख! 'ईस्साक पक्का हिंदू होता' कथेतला हनुमान चालीसा म्हणणारा ईस्साकही धर्माच्या या चक्रात भरडला जातो. 'जावेद जिवंत आहे' या कथेत नूर हॉटेलचा मालक नूर, जमील, जमीलशी निकाह करून मुसलमान झालेली रखमा, उस्मान, नवीनभाई अशा व्यक्तिरेखांमधून पुढे सरकत शेवटी जेव्हा जावेद कोण हे वाचकाला समजते तेव्हा एक अनामिक भीती वाचकाला स्पर्शून जाते. 'झुंबर' कथेत भेटतात धनकू, दगडूशेठ, शेठच्या मुलाची ती लग्नाची वरात. लग्नाच्या या वरातीमध्ये धनकूच्या डोक्यावर आहे लखलखतं झुंबर; दारिद्र्याचं! मिरवणुकीत धनुकच्या डोक्यावरील हे 'झुंबर' कोसळतं ते धनकूला घेऊनच. 'प्रॉपर्टी एक्झिबिशन' या कथेत बंद पडलेल्या फॅक्टरीचे सांगाडे, त्यांना चिकटलेलं कामगारांचं रक्त, घाम आणि तिथं उभी राहणारी टॉवर संस्कृती वाचकाला अस्वस्थ करते. या कथासंग्रहातील शेवटची कथा आहे 'तिसरा डुळा'. जत्रेत डोंबारी खेळ करणारी मंगळी आणि रस्त्यावर शंकराचं चित्र काढणाऱ्या जगल्याचा मुलगा यांची ही कथा. जगल्या मेल्यावर मंगळीवर उपासमारीची वेळ येते आणि तेव्हाच तिला जो मार्ग सापडतो त्यातून जन्माला येणारी ही शेवटची कथा. शंकरासारखं डमरू वाजवणाऱ्या, तांडव करणाऱ्या, शंकराची गाणी पाठ असणाऱ्या म्हादूला शंकराचं सोंग बनवून पैसे कमवण्याचा विचार मंगळीच्या डोक्यात येतो आणि त्यानंतर शंकरावर प्रचंड भक्ती असलेल्या आपल्या मुलाला, म्हादूला शंकर बनवून जत्रेत फिरवायला चालू केल्यानंतर जे होतं ते म्हणजे "तिसरा डुळा".

आवर्जून वाचावा असा कथासंग्रह "तिसरा डुळा"!




संदीप प्रकाश जाधव


Tuesday, December 14, 2021

"महानायक"

 



लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

                                                                           पृष्ठे- ६९३, मूूल्य- ५२५ रुपये.


"पानिपत" या आपल्या पहिल्या कादंबरीच्या माध्यमातून घराघरात पोहचलेल्या विश्वास पाटील या नावाला तसं स्वतंत्र परिचयाची गरज नाही. फक्त मराठीतच नाही तर इतरही भाषांमधील त्यांचं अनुवादित साहित्य लोकांनी डोक्यावर घेतलं. 'पानिपत' नंतर 'झाडाझडती' आणि 'पांगिरा' या त्यांच्या कादंबऱ्यादेखील मी वाचल्या. मराठ्यांच्या शौर्याची गाथा सांगणारी 'पानिपत', धरणग्रस्तांच्या उध्वस्त जीवनाचा जवळून परिचय करून देणारी 'झाडाझडती' आणि पाण्यासारख्या ज्वलंत विषयावर लिहिलेली, दुष्काळाचं विदारक चित्रण करणारी 'पांगिरा' या तीनही कादंबऱ्यांतून त्यांनी वाचकाच्या मनाला हात घातला. कादंबरीच्या माध्यमातून तो काळ किंवा त्या व्यक्तिरेखा वाचकांच्या समोर उभं करण्याचं सामर्थ्य असणाऱ्या मोजक्याच लेखकांची यादी विश्वास पाटील या नावाशिवाय पूर्णच नाही होऊ शकणार. "महानायक" ही नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर बेतलेली विश्वास पाटील यांची चरित्रात्मक कादंबरी मी बऱ्याच महिन्यांपूर्वी घेऊन ठेवली होती पण तिचा आवाका पाहूनच ठरवलं की ही निवांत वेळ काढूनच वाचली पाहिजे. खरंतर लहानपणापासूनच मला नेताजींबद्दल प्रचंड कुतूहल होतं, प्रत्येक सार्वजनिक किंवा शाळेतील एखाद्या कार्यक्रमात फोटोपूजनाच्या वेळी 'गांधीजी' आणि 'शिवाजी महाराजांसोबत' पुजल्या जाणाऱ्या तिसऱ्या फ्रेममधील पोलीसी वेशातील त्या गुटगुटीत हसऱ्या चेहऱ्याबद्दल नेहमीच एक कमालीचं आकर्षण वाटायचं. पण इतर असंख्य दुर्दैवी भारतीयांप्रमाणेच या थोर व्यक्तीबद्दल खूपच कमी माहिती असणाऱ्यांपैकी मी एक होतो. नेताजींबद्दल पसरणाऱ्या ऐकीव कथा आणि अफवांतून ते भारताच्या स्वातंत्र्यसंग्रामातील एक गूढ पात्र बनून गेले. स्वातंत्र्याच्या इतिहासात जितकं इतर स्वातंत्र्य सैनिकांवर लिहिलं गेलं तितकं कधी नेताजींबद्दल लोकांपर्यंत पोहचलच नाही त्यामुळेच असेल कदाचित की या थोर देशभक्ताबद्दल माहिती नसणारे असंख्य भारतीय आजही सापडतील. विश्वास पाटील यांनी "महानायक" च्या माध्यमातून नेताजींचा अतिशय प्रेरणादायी जीवनप्रवास लोकांसमोर आणला आहे. भारताच्या अखेरच्या स्वातंत्र्यसंग्रामात कर्तृत्व गाजविणाऱ्या एका महानायकाच्या व्यक्तिमत्त्वाचा आणि जीवनाचा वेध घेण्याचा प्रयत्न त्यांनी या कादंबरीतून केला आहे. नेताजींच्या आयुष्यातील बऱ्याच प्रसंगांचं अतिशय बारीक वर्णन या कादंबरीत आपल्याला वाचायला मिळेल. सुभाषचंद्र बोस यांच्या नाट्यमय आणि संघर्षपूर्ण जीवनावर आधारलेल्या या कादंबरीत महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांचे परस्पर संबंध, नेताजींचे गुरू देशबंधू चित्तरंजनदास आणि सुभाषचंद्र बोस यांचं नातं, नेताजींच्या प्रत्येक कार्यात त्यांचे वाडीलबंधू शरदचंद्र यांचा असणारा पाठिंबा, तब्बल ११ वेळा नेताजींना झालेला तुरुंगवास, नेताजींचं आजारपण, अवघ्या ८ महिन्यांच्या तयारीतून ISS ची परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास वन दर्जाची ब्रिटिशांची नोकरी लाथाडणारे नेताजी, गांधींसारख्या मोठ्या आणि देशव्यापी नेत्यासमोर स्वतःची वेगळी प्रतिमा तयार करून त्यांना पर्याय म्हणून समोर येणारे नेताजी, सुभाषचंद्र बोस हे ब्रिटिश साम्राज्याचे क्रमांक एकचे शत्रू आहेत असं ठरवून त्यांना झालेली नजरकैद, आपल्या मातृभूमीला गुलामगिरीतून सोडवण्यासाठी नजरकैदेतून निसटून देशाबाहेर जाण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास, बाह्यजगाकडून मदत मिळवण्यासाठी नेताजींनी केलेली प्रचंड धडपड, हुकूमशाह हिटलरसोबतची भेट, आझाद हिंद सेनेची स्थापना, नेताजींचं वैवाहिक जीवन, त्या वेळेची राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिस्थिती, भारतीय स्वातंत्र्य लढा, आझाद हिंद सेनेतील नेताजींच्या सहकार्‍यांनी केलेला त्याग, तत्कालीन वास्तवाला असलेले विविध आयाम, नेताजींची मानसिक, भावनिक आणि वैचारिक आंदोलने आणि शेवटी झालेला त्यांचा दारुण अंत या सर्वांचे अगदी तपशीलवार वर्णन आहे ज्यातून विश्वास पाटील यांनी घेतलेली प्रचंड मेहनत लक्षात येते. आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून मुक्त करायचा एकच ध्यास घेऊन अर्ध जग पालथं घालणाऱ्या या 'महानायकाचा' त्यांच्या शालेय जीवनापासून ते त्यांच्या अपघाती मृत्यूपर्यंतचा धगधगता आणि तितकाच प्रेरणादायी प्रवास म्हणजे ही कादंबरी "महानायक"! अडतीस कोटी देशबांधवांची गुलामगिरीतून मुक्तता या ध्येयासाठी एका कडव्या आणि लढवय्या देशभक्ताने अर्ध्या जगात मारलेली गरुडभरारी म्हणजे ही कादंबरी "महानायक"! आयुष्यभर स्वकीयांशी आणि ब्रिटिश साम्राज्यासारख्या परकियांशी संघर्ष करणाऱ्या नेताजींना एक व्यक्ती न मानता एक राष्ट्र म्हणून भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी जर्मनी-जपान ने केलेल्या मदतीनंतर इंफाळ-कोहिमा- ब्रम्हदेशच्या अरण्यात जुंपलेला घनघोर रणसंग्राम म्हणजे ही कादंबरी "महानायक"! खरंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांची झळाळती कारकीर्द ७०४ पानांपुरती मर्यादित नक्कीच नाही पण तरीही विश्वास पाटील यांची ही कादंबरी वाचल्यानंतर वाचक नेताजींना मनोमन वंदन केल्याशिवाय राहणार नाही हे नक्की.

देशोदेशींच्या दफ्तरखान्यात आजवर अडकून पडलेल्या दुर्मिळ दस्तावेजांचा, नव्याने संशोधन केलेल्या कागदपत्रांचा अभ्यास करून आणि आझाद हिंद सेनेने तुडवलेल्या त्या 'रणवाटां'वरून भ्रमण करून विश्वास पाटील यांनी चितारलेली, प्रत्येकाने आवर्जून वाचलीच पाहिजे अशी नेताजींची अपरिचित जीवनकहाणी "महानायक"!!!






संदीप प्रकाश जाधव

Tuesday, December 7, 2021

"ग्रहण"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २२३, मूूल्य- २५० रुपये.


भयकथा असोत की गूढकथा नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी या दोन नावांचा विचार डोक्यात आल्याशिवाय मराठी वाचक पुढे जाऊच शकत नाही! मराठी साहित्यविश्वात गूढकथा आणि भयकथा हा साहित्य प्रकार खऱ्या अर्थाने समृद्ध केला असेल तर तो या दोन व्यक्तींनीच! या दोन दिग्गजांची तुलना करणं तसं चुकीचंच होईल कारण दोघांचीही वाचकाला गुंतवून ठेवण्याची शैली वेगळी आहे पण दोघांमध्ये समान धागा जर कोणता असेल तर तो त्यांची प्रचंड कल्पनाशक्ती! दोघांनीही त्यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर लिहिलेले एकाहून एक कथासंग्रह, कादंबऱ्या आजही वाचकाला भुरळ घालतात. तरीही मला जास्त आकर्षित करतात ती धारपांचीच पुस्तके. आपल्या खास लेखनशैलीने वाचकाला रहस्यकथेचाच एक भाग बनवून टाकण्याची त्यांची जादू खासच! पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक त्या कथेसोबतच जोडला राहतो. धारपांची जवळपास ६-७ पुस्तके आजपर्यंत मी वाचली आणि आणखीन बरीच संग्रहीदेखील घेऊन ठेवली आहेत पुढच्या 'मेजवानीसाठी'. याच पुस्तकांच्या पंक्तीमधील वाचून हातावेगळी केलेली एक भन्नाट रहस्य कादंबरी "ग्रहण"! एखाद्या गूढ चित्रपटाला लाजवेल असं कथानक! कादंबरीच्या चौथ्याच पानावर धारपांनी वाचकाला असा काही जबरदस्त धक्का दिला आहे की कादंबरी पूर्ण वाचल्याशिवाय ती बाजूलाच नाही ठेवता येणार. जवळपास निम्म्याहून अधिक कथा पुढे गेल्यानंतरही वाचक या धक्क्यातून बाहेर नाही येत. अगदी नेहमीप्रमाणे होणारी या कथेची सुरुवात. आपला नवरा अरविंद आणि दोन मुलांसोबत स्वतःच्या प्रशस्त वाड्यात आनंदाने राहणाऱ्या मिसेस पोतदार यांच्याभोवती फिरणारी या कादंबरीची गूढकथा. एके संध्याकाळी मुलांसाठी आईस्क्रीम आणण्याच्या निमित्ताने वाड्यातून बाहेर पडलेल्या मिसेस पोतदारांच्या आयुष्यात वाड्यापासून अवघ्या १०० पावलांवरील दुकानातून परतत असताना असा काही प्रकार घडतो की त्यांच्या पुढच्या आयुष्यालाच कलाटणी मिळते आणि या घटनेने धारपांनी ज्या पद्धतीने वाचकाला सुरुवातीलाच सुन्न करून सोडलं आहे त्याला तोड नाही. ही कथा पुढे हळूहळू उलगडत जाताना कथेत होणारा इतर पात्रांचा प्रवेश जसे सारंग आणि त्याचं कुटुंब सोबतच डॉ. शेखर आणि त्याचं कुटुंब शिवाय मिसेस पोतदारांच्या दोन समांतर आयुष्यातील इतर पात्रे या सर्वांत वाचक असा काही अडकून जातो की नकळत वाचकाच्या डोक्यातही एक विचारचक्र चालू होते ज्यात मिसेस पोतदार नेमक्या कोण आहेत? त्या कुठून आल्या आहेत? त्यांच्यासोबत पुढे काय होईल? त्यांचं कोणतं आयुष्य नेमकं खरं असेल? आईस्क्रीम आणायला जाण्यापूर्वीचं की ते घेऊन परत येताना समोर आलेलं नवीन आयुष्य? त्यांच्या आयुष्यातील कोणत्या व्यक्ती खरेच अस्तित्वात असतील? हेच विचार नाचत राहतात. मिसेस पोतदारांची ही कथा पुढे सरकत असताना इतरही अनेक ठिकाणी धारपांनी वाचकांची मती गुंग केली आहे जसे मिसेस पोतदारांच्या आधीच्या आयुष्यात आईचे होणारे निधन आणि या नवीन आयुष्यात त्यांच्या वडिलांचं अस्तित्वात नसणं, बँकेत अचानकच अरविंदचं तिच्या समोर येणं, नंतर अरविंदच्या वेगळ्या आयुष्याची होणारी ओळख, पूर्वायुष्यातील आपल्या घरी शहानिशा करण्यासाठी गेल्यानंतर तिच्या आईनेच तिला नाकारणे परंतु टायगर या त्यांच्या घरातील कुत्र्याकडून होणारं विचित्र वर्तन या सर्व गोष्टी कथेतील रहस्य आणखीनच वाढवतात. एक अतिशय गूढ रहस्य आपल्या डोळ्यासमोरून उलगडत जात असल्याचा अनुभव धारपांनी त्यांच्या खास शैलीतून वाचकांना करून दिला आहे.

गूढकथा - रहस्यकथा वाचनाची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "ग्रहण".





संदीप प्रकाश जाधव



"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये