Sunday, February 27, 2022

"रारंग ढांग"



 लेखक : प्रभाकर पेंढारकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- १६६, मूूल्य- २०० रुपये                                                                           


साधारणपणे ४५ वर्षांपूर्वी, आंध्रप्रदेशच्या सागरकिनाऱ्यावर घोंगावत आलेल्या एका राक्षसी चक्रीवादळाच्या तडाख्यात उडालेल्या हाहाकाराची विदारक कहाणी सांगणारी "चक्रीवादळ" ही प्रभाकर पेंढारकरकरांची कादंबरी काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात आली होती. "चक्रीवादळ"च्या माझ्या पुस्तक परिचयानंतर बऱ्याच लोकांनी पेंढारकरांची "रारंग ढांग" ही कादंबरी आवर्जून वाचण्यासाठी सुचवली. मधील काळात माझ्या 'To Read' च्या रांगेतील काही पुस्तके वाचून झाल्यानंतर शेवटी आज मधेच "रारंग ढांग" हातात घेतलं. १६६ पानांची आणि साधारण १ किंवा २ बैठकींतच वाचून पूर्ण होणारी, एका अतिशय वेगळ्या विषयावर बेतलेली ही कादंबरी वाचकाला ज्या जगात घेऊन जाते तिथून वाचक परत येतो तोच मुळी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी बॉर्डरवर प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या जवनांप्रती अत्युच्च अभिमानान घेऊन! खरंतर पेंढारकरांनी वाचकाला या कादंबरीच्या माध्यमातून ज्या वातावरणात घेऊन गेलं आहे तिथून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी वाचकाला बराच वेळ लागतो इतका तो या कथेसोबत एकरूप होऊन जातो. "रारंग ढांग" या नावातच असणारं वेगळेपण कादंबरीच्या विषयातदेखील आहे. 'रारंग' हे भारताच्या ईशान्येकडील सीमेजवळ असलेलं एक गाव आहे आणि 'ढांग' म्हणजे तेथील स्थानिक भाषेत अतिशय उंच अशा डोंगराची कडा. या कादंबरीची कथा आहे अशाच हिमालयाच्या 'ढांगातील'! हिमालयातील पर्वतांच्या एवढ्या उंचीवर रस्ते बनवणारा जगात भारत हा असा बहुधा एकमेव देश असावा. रस्ते बनवण्याचं हे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (Border Road Organization BRO) ही संस्था भारतीय सैन्याच्या अधिकाराखाली करते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून बांधण्यात येणाऱ्या अशाच एका उंच 'ढांगातील' रस्त्याच्या उभारणीचा अतिशय खडतर प्रवास पेंढारकरांनी आपल्यासमोर आणला आहे. एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग तर दुस-या बाजूला वेगवेगळी स्वभाव-वैशिष्ट्ये असलेली अनेक माणसं. मात्र ही सगळी माणसं एकाच जिद्दीची. निसर्गात आणि माणसांत रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच असतो. या कादंबरीत निसर्गासोबत संघर्ष करणाऱ्या अशाच माणसांची कथा गुंफली आहे. "रारंग ढांग"च्या कथेचा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे जेव्हा भारतात विविध पायाभूत सुविधा निर्माणाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले होते. त्यामुळे आताच्या काळाशी जर तुलना केली तर त्याकाळी हिमालयातील अशा उंच ठिकाणी रस्ते बांधण्यातील आव्हानाचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. हिमालयाची ही उंची आणि हे काम माणसांनाच काय पण त्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांनासुद्धा थकवते. कमी कमी होत जाणारा ऑक्सिजन, प्रचंड थंडी, लहरी निसर्ग, अचानक होणारे लँडस्लाईड एवढंच काय तर हिवाळ्यात रस्त्यांवर साठणारे बर्फ ह्या साऱ्या आव्हानांचा सामना करत चालणारं हे रस्तेबांधणीचं काम म्हणूनच अलौकिक असंच आहे. "ह्या प्रवासाला रिटर्न तिकीटच नाही, मग कसले निरोप समारंभ आणि कशाला ती सेंटीमेंट्सची ओझी खांद्यावरून वहायची?”, ”दोस्त इथे ८ दिवसांची रजा मिळणे मुश्किल. पण कायमची सुट्टी कधीच मंजूर झालेली असते”. "आदमी मरता है तो क्या रह जाता है?", राहते ती फक्त "यादगारी", "आठवण"! असे काही संवाद बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधे काम करणारे जवान आणि त्यांच्यासोबतीला राबणारे 'लोकल लेबर' कोणत्या परिस्थितीत हे देशहिताचे काम करतात याची जाणीव करून देतात. मनाला भिडणाऱ्या कथेमुळे १९८१ साली प्रकाशित झालेल्या "रारंग ढांग"ची जादू आजही कायम आहे.

पेंढारकरांच्या या कथेचा नायक आहे विश्वनाथ मेहेंदळे. विश्वनाथसोबतच मेजर बंबा, कॅप्टन बहल, कॅप्टन नायर, कॅप्टन मिनू, कामगारांचा सरदार बहादूर, विश्वनाथला मुंबईत असताना आर्ट गॅलरीत भेटलेली तरुणी उमा, या सर्वच पात्रांनी कथेला रंग आणला आहे. तर, विश्वनाथ एक असा अभियंता जो मुंबईतील युनायटेड कन्स्ट्रक्शन या नावाजलेल्या कंपनीतील आपली अतिशय सुखासीन खासगी नोकरी सोडून हिमालयातील दुर्गम, सीमा भागातील रस्ते बांधणीच्या प्रकल्पासाठी सरकारी नोकरीवर रुजू होतो. हिमालयातील हे रस्ते प्रामुख्याने भारतीय सैन्याच्या दळणवळणाकरिता, सीमेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याने भारतीय सैन्यअधिकाऱ्यांचे या कामावर लक्ष आणि नियंत्रण असते. विश्वनाथ हा त्या प्रकापातील एक सिव्हिलियन अभियंता असल्याने बॉर्डरवरील लष्करी शिस्त बऱ्याच वेळा त्याच्या प्रामाणिक कामाआढ येते. प्रत्येक गोष्टीकडे फक्त लष्करी शिस्तीच्या भिंगातून न पाहता त्या गोष्टींना असणाऱ्या दुसऱ्या बाजूचा भावनिकदृष्ट्या विचार करून निर्णय घेणाऱ्या विश्वनाथचे लष्करी अधिकाऱ्यांसोबत वरचेवर खटके उडायला चालू होतात. आपण बांधत असलेल्या रस्त्यावर आपल्याच लोकांची स्मारके बांधायला लागू नयेत ही माफक अपेक्षा असणारा विश्वनाथ काही ठिकाणी लष्करी शिस्तीच्या विरोधात जाऊन काम करतो. याची दोन उदाहरणे म्हणजे त्याने सर्जेराव गायकवाड या जवानाच्या सुट्टीसाठी प्रसंगी मोठ्या अधिकाऱ्यांच्या मनाविरुद्ध केलेली धडपड आणि दुसरे उदाहरण 'ढांगातील' रस्ता जवळपास पूर्ण झाल्यानंतर, त्याची चाचणी चालू असताना अचानकच एक कडा कोसळून झालेल्या अपघातात सर्जेराव आणि काही कामगारांचा त्याखाली गाडून मृत्यू होतो, त्या धक्क्यानंतर विश्वनाथने घेतलेला एक अतिशय भावनिक निर्णय! विश्वनाथचा हा निर्णय एक माणूस म्हणून अगदी योग्य असला तरी लष्कराच्या शिस्तीत बसणारा नव्हता त्यामुळे त्याच्या या निर्णयामुळे त्याला लष्करी कारवाईला(कोर्ट मार्शल) सामोरं जावं लगतं. कोर्ट मार्शल दरम्यानच्या चौकशीत विश्वनाथ आपल्यावरील आरोप तर फेटाळतोच शिवाय 'ढांगातील' कडा कोसळल्यानंतर आपण असा लष्कराच्या शिस्तीत न बसणारा निर्णय का घेतला याचंही कारण कोर्टाला सांगतो. अशी कडा कोसळण्याची त्या जागेवर शक्यता आहे आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे आधीच वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊनही केवळ ते लष्करी शिस्तीत बसत नसल्याचं कारण देऊन त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे कोर्टात सांगत असताना मानवी प्रयत्न आणि लष्कराची शिस्त यातील भेदही तो स्पष्ट शब्दात परखडपणे मांडतो. दोन्ही बाजू ऐकून कोर्ट प्रत्यक्ष अपघात झालेल्या जागी विश्वनाथने नव्याने केलेल्या बांधकामाची पाहणी करते आणि एक चकीत करणारा निकाल देते. नंतर त्याची त्या अन्यायकारक आरोपांतून मुक्तता होते, पण त्याची लष्कराची सेवा संपुष्टात येते, त्याचा करार रद्द होतो आणि त्याला अतिशय खंत मनाने बॉर्डर वरील त्या गावातून बाहेर पडावं लागतं. कादंबरीच्या शेवटी रस्त्यात मृत्यू पावलेल्या जवानांच्या स्मृतिस्थळाला फुले वाहून परतीच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या विश्‍वनाथची प्रतिमा वाचकांच्या नजरेसमोर बराच वेळ तरळत राहते. ही इतकी सहज-सुंदर वाटणारी कादंबरीची कथा वाचताना खरंतर आपण त्यात हरवून जातो. बऱ्याच घटना अंगावर शहारे आणतात तर कधी डोळ्यांत पाणी. पेंढारकरांनी या कथेतून उभा केलेला माणूस विरुद्ध निसर्ग, माणूस विरुद्ध माणूस आणि माणूस विरुद्ध तो स्वतः हा संघर्ष आपल्याला खूप काही शिकवून जातो. हिमालयाच्या कड्यांवर चालणारा हा संघर्ष वाचून झाल्यानंतर आपल्यासाठी बॉर्डरवर पहारा देणाऱ्या सैनिकांना वाचक मनोमन सलाम करतो यातच या कादंबरीचं खरं यश आहे म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये.

प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावी आणि आवर्जून वाचावी अशी कादंबरी "रारंग ढांग"!





संदीप प्रकाश जाधव



Sunday, February 13, 2022

"अभयारण्य"


 

लेखक : जयंत नारळीकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- ९६, मूूल्य- १५० रुपये                                                                           

 

"यक्षांची देणगी" आणि "प्रेषित" नंतर बऱ्याच वर्षांनी जयंत नारळीकरांचं एखादं पुस्तक वाचायचा योग आला. नारळीकरांच्या वैज्ञानिक कादंबऱ्या नेहमीच वाचकाला एका वेगळ्या जगात घेऊन जातात आणि शेवटी वाचकाला विचारात पाडून नकळत भविष्यात येऊ घातलेल्या धोक्याचा इशाराही देतात. त्यांच्या प्रत्येक कादंबरीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कादंबरीतील विषयांमधे जाणवणारी त्यांची दूरदृष्टी! इतक्या वर्षांपूर्वी लिहिलेल्या त्यांच्या कादंबरीतील कथा आज वाचताना आपल्याला भविष्यात १००-२०० वर्षें पुढे घेऊन जातात. भविष्यातील त्या वातावरणात गेल्यानंतर वाचक बऱ्याच वेळा स्थब्ध होऊन जातो याचं कारण म्हणजे नारळीकरांनी कादंबरी लिहील्यापासून ते आज वर्तमानकाळात आपण वाचत असताना मधल्या काळात मानवाने जी प्रगती केली आहे त्या टप्प्यातील बऱ्याच घटना, माणसाच्या आयुष्यात झालेले बरेच बदल हे अगदी त्या कथांमधील घटनांशी साम्य दाखवतात. वाचत असताना अनेक वेळा आपण कथेतील घटना आज वर्तमानकाळाशी रिलेट करत राहतो. कथेत घडणाऱ्या इतरही घटनांप्रमाणे जर खरंच भविष्यात पृथ्वीवर काही घडलं तर काय? या विचाराने वाचकाच्या अंगावर नकळत शहारे येतात. नारळीकरांची "अभयारण्य" सुद्धा याच पठडीतील एक विज्ञान कादंबरी! "अभयारण्य" चा शब्दशः अर्थ जर पहायचा झाला तर तो म्हणजे एक असं ठिकाण जिथं राहणाऱ्या प्रत्येक प्राणिमात्राला 'अभय' असेल, त्यांच्या जीवाला कोणत्याच प्रकारचा धोका नसेल, प्रत्येक प्राणी जिथे मुक्त संचार करू शकेल आणि नेहमी एक संरक्षक कवच त्यांच्या भोवती राहिल. तर, पृथ्वी म्हणजे मनुष्यप्राण्यासाठी परग्रहवासीयांकडून निर्माण केलेलं एक "अभयारण्य"च समजून नारळीकरांनी लिहिलेली ही एक भन्नाट विज्ञान कादंबरी! अतिशय प्रगत परग्रहवासीयांकडून मानवाची उत्क्रांती कशी झाली याचा अभ्यास करण्यासाठी घातलेला हा पृथ्वीवरील अभयारण्याचा घाट. संपूर्ण मानवजातीवर नजर ठेवून तटस्थपणे मानवी उत्क्रांतीचा अभ्यास करत असताना जिथे जिथे गरज भासेल तिथे मानवाच्या नकळत त्याला मदत करणारे या कादंबरीतील परग्रहवासी! परंतु मानवी उत्क्रांतीच्या या प्रवासात एक वळण असं येतं जिथं प्रगतीच्या गोंडस नावाखाली माणसाने बनवलेली अण्वस्त्रेच पृथ्वीला विनाशाच्या टप्प्यावर घेऊन जातात. अशा वेळी तटस्थ राहणारे परग्रहवासी काय भूमिका घेतात? मानवी आयुष्यात सहसा कोणताच हस्तक्षेप न करणारे हे परग्रहवासी पृथ्वीला अर्थातच त्यांनी बनवलेल्या या "अभयारण्याला" वाचवण्यासाठी काय करतात? अण्वस्त्रांच्या या जीवघेण्या स्पर्धेचा शेवट काय? माणसाच्या प्रगतीला अंत आहे की नाही? या सर्वांची मनोरंजनात्मक पण तितकीच आपल्याला एक माणूस म्हणून विचार करायला लावणारी उत्तरे नारळीकरांच्या या "अभयारण्यातून" आपल्याला मिळतील. पृथ्वीवरील मानवी संस्कृती, पृथ्वीवर आपली वसाहत स्थापन करण्यासाठी प्रयत्न करणारा आणखी एक परग्रह 'चटम-४' वरील परग्रहवासी आणि पृथ्वी या आपल्या "अभयारण्याचे" रक्षण करणारे परग्रहवासी यांच्यामधे झालेला छोटासा संघर्ष, अग्नीचा शोध लावणारा गुहामानव टंबू, दुसरे महायुध्द संपण्याच्या काळातील अमेरिका, व्हिक्टोरियन काळातील इंग्लंड, इ.स.पू. ४३० मधील विद्याकलांची समृध्द नगरी अथेन्स, अथेन्सचा प्लेग, कृषिसंस्कृतीचा उदय आणि विस्तार, विसाव्या शतकात जिवशास्त्राने मारलेली मुसंडी, रशियाने स्फुटनिक हा उपग्रह अवकाशात सोडल्यानंतर चालू झालेलं अंतराळयुग, वाढत्या स्पर्धेत संहारक शस्त्रांबरोबर वाढलेली माणसाची हिंसक सत्तालालसा या सर्वांना स्पर्शून नारळीकरांनी हे अतिशय भन्नाट असं "अभयारण्य" साकारलं आहे.

एक पृथ्वीवासी म्हणून जयंत नारळीकर आपल्याला या कादंबरीतून अस्वस्थ, अंतर्मुख करतात. शिवाय विश्वाच्या या अफाट पसार्‍यात पृथ्वी एक नगण्य बिंदू असली तरीही माणसाच्या हाती असलेल्या आतापर्यंतच्या खगोलशास्त्रीय पुराव्यानुसार पृथ्वीच हे एकमेव असं स्थान आहे जिथे सध्या जीवसृष्टी नांदत आहे आणि त्यामुळे या एकमेवाद्वितीय अशा आपल्या पृथ्वीचे रक्षण करण्याची जबाबदारी, पृथ्वीवरील जीवसृष्टी टिकवून ठेवण्याची जबाबदारी माणसाचीच आहे हेसुद्धा आपल्याला पटवून देण्यात नारळीकर यशस्वी झाले आहेत.

प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी एक दर्जेदार विज्ञान कादंबरी  "अभयारण्य".





संदीप प्रकाश जाधव

Monday, February 7, 2022

"युद्धखोर अमेरिका"

 


लेखक : अतुल कहाते

प्रकाशक : रोहन प्रकाशन

पृष्ठे- ३३३, मूूल्य- ३४० रुपये                                                                           

 

अतुल कहाते यांच्या "अणुबॉम्ब" आणि "पॅलेस्टाईन - इस्रायल : एका अस्तित्वाचा संघर्ष" या दोन पुस्तकांनंतर त्यांचं आणखी एक दर्जेदार पुस्तक "युद्धखोर अमेरिका" आज वाचून काढलं. अतुल कहातेंच्या या तीनही पुस्तकांचं वैशिष्ट्य म्हणजे खोलात जाऊन त्यांनी या अतिशय किचकट विषयांवर केलेलं संशोधन आणि तितक्याच ओघवत्या भाषेत, वाचकाला सहजपणे समजेल अशा पद्धतीने पुस्तकात केलेली मांडणी! एक अतिशय प्रगत देश, जागतिक महासत्ता आणि लोकशाहीचा सर्वांत मोठा पुरस्कर्ता असा टेंभा मिरवणाऱ्या अमेरिकेचा खरा चेहरा "युद्धखोर अमेरिका" मधून आपल्या समोर येतो. अतुल कहातेंनी त्यांच्या या पुस्तकातील एकूण १६ प्रकरणांमधून अमेरिकेचा उदारमतवादीपणाचा बुरखा फाडून आपल्याला खऱ्या अमेरिकेची नव्याने ओळख करून दिली आहे. लोकशाहीवादी, खुल्या विचारांचा, संपन्न व समृद्ध देश अशी अमेरिकेची आपल्या मनात तयार आणारी प्रतिमा बदलायला अतुल कहातेंचं हे अभ्यासपूर्ण पुस्तक भाग पाडतं. स्वतःची प्रगती करण्यात गैर काहीच नाही पण ही प्रगती जर दुसऱ्याच्या पोटावर पाय देऊ होत असेल तर ती कवडीमोलाची ठरते. अमेरिकेचा हा प्रगतीचा डोलारा कसा लाखो लोकांच्या पोटावर पाय देऊन उभा राहिला आहे हे जाणून घ्यायचं असेल तर अतुल कहातेंचं हे पुस्तक "युद्धखोर अमेरिका" त्याला उत्तम पर्याय ठरू शकेल. आज युद्धखोर देश कोणता असा प्रश्न जर एखाद्याला विचारला तर एका क्षणाचाही उशीर न होता आपल्याला नावे मिळतील ती इराण, इराक, अफगाणिस्तान, उत्तर कोरिया, चीन या देशांची! पण जगातील सर्वांत युद्धखोर देश जर अमेरिका आहे असं कोणी बोललं तर आपला त्यावर चटकन विश्वास बसणं कठीणच, अमेरिकेसारखा देश युद्धखोर कसा असू शकतो? हा एकच प्रश्न आपल्या डोक्यात फेर धरून नाचू लागेल. अतुल कहातेंच्या "युद्धखोर अमेरिका" पुस्तकात आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळू शकेल. स्वतःच्या देशाची साखरेची गरज भागवण्यासाठी उद्ध्वस्त केलेली हवाई बेटे. एका खासगी कंपनीमार्फत गिळंकृत केलेला हाँडुरस देश. आपल्या स्वार्थासाठी दहशतवाद्यांना पुरवलेली शस्त्रास्त्रं आणि बेचिराख केलेला अफगाणिस्तान. तेलाच्या राजकारणात देशोधडीला लावलेला इराण. व्हीएतनाममध्ये केलेला नरसंहार. विनाकारण घुसून सद्दामचा काढलेला काटा आणि त्यामधे उध्वस्त झालेला इराक. अशी अनेक उदाहरणे देता येतील जिथे आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेने ढवळाढवळ केली. कधी त्यांनी तिथली सरकारं उलथवून लावली तर कधी बंडखोरांना शस्त्रास्त्रसाठा पुरवला तर कधी थेट आक्रमणंच केली. या सर्वांतून अमेरिकेने अशा अनेक देशांत आपलं वर्चस्व नक्कीच प्रस्थापित केलं असेल पण या वर्चस्ववादात अशा प्रत्येक देशातील लाखो निरपराध सामान्य लोकांचा बळी गेला, लाखो कुटुंबे कायमची रस्त्यावर आली, स्वतःच्याच देशात लोकांना निर्वासित आयुष्य जगायला भाग पडलं, प्रगतीच्या वाटेवर असणारे काही देश पुन्हा एकदा काही दशके मागे निघून गेली. अशा एकूण १६ 'अमेरिकापीडित' देशांचा 'केस स्टडी' म्हणजे हे अतुल कहाते यांचं पुस्तक "युद्धखोर अमेरिका"!

या पुस्तकातील पहिले प्रकरण आहे 'हवाई बेटांचं"! बाहेरच्या जगाशी कोणताच संपर्क नसलेल्या या हवाई बेटांचा शोध लागला साधारपणे १७७८ मधे. या बेटांच्या शोधानंतर अमेरिकेने ही बेटे आपल्याच वर्चस्वाखाली ठेऊन या बेटांवरून व्यापार चालू केला. बेटावरील मूळ लोकांच्या भावनांचा कोणताच विचार न करता तेथील जमिनीचा आपल्याला हवा तसा वापर चालू करून, प्रगतीकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या देशाची भविष्यातील साखरेची गरज ओळखून ही बेटे अक्षरशः उध्वस्त करण्याचं काम अमेरिकेने केलं. त्यानंतर "क्यूबा", "पोर्तो रिको", "फिलिपिन्स", "निकारागुआ", "हाँडुरस" अशा एकामागून एक देशांत अमेरिकेने ढवळाढवळ करून तेथील लोकांचं आयुष्य उध्वस्त करून टाकलं. त्यासाठी अमेरिकेकडून खेळले गेलेले राजकारणाचे वेगवेगळे डावपेच पुस्तकात वाचत असताना अमेरिकेबद्दल चीड निर्माण करतात. प्रत्येक ठिकाणी होणाऱ्या अमेरिकेच्या अशा हस्तक्षेपापूर्वीची पार्श्वभूमी अतुल कहातेंनी अतिशय विस्तारत सांगितली आहे ज्यामुळे वाचकाला एका वेगळ्याच आंतरराष्ट्रीय राजकारणाची सफर घडून येते. नव्वदच्या दशकात अमेरिकेची जागतिक पातळीवरील इतर देशांतील ढवळाढवळ मोठ्या प्रमाणात आणि उघडपणे सर्वांना जाणवायला लागली. त्याचं मुख्य कारण संपूर्ण जगाला आवश्यक असणारं खनिज तेल ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे अशा आखाती देशांत तेलाभोवती चालू झालेलं राजकारण! शिवाय अमेरिकेला आव्हान देऊ शकेल अशा सोव्हिएत युनियनचे देखील केव्हाच तुकडे पडले होते! याच तेलाच्या राजकारणादरम्यान इस्लामी दहशतवादाच्या कथा लोकांच्या मनावर अतिशय नियोजनबद्धपणे बिंबवल्या गेल्या. दहशतवादाला आपला विरोध आहे, आपण लोकशाहीचे समर्थक आहोत असं म्हणणारी अमेरिकाच खरे तर या दहशतवादाला पडद्याआडून कसं खतपाणी घालत आलेय हे इथून पुढच्या प्रकरणांतून आपल्या लक्षात येते. पडद्याआडून दहशतवादी वृत्तीला पोसताना या आखाती देशांचं झालेलं खच्चीकरण आपल्या मनाला पीळ पाडतं. इराणमध्ये महमंद रझा शाहची सत्ता जाऊन आयातुल्ला खेमनीसारख्या कट्टरवादी माणसाची सत्ता आणण्यात अमेरिकेचाच हातभार होता हे इराणचे प्रकरण वाचत असताना समजते. शिवाय अमेरिकेच्या दुटप्पीपणाचे एक उदाहरणसुद्धा याच प्रकरणात वाचायला मिळेल. ते म्हणजे आपण कट्टरवादाच्या विरोधात आहोत हे जगाला दाखवून देण्यासाठी कोणत्याही देशाने इराणला शस्त्रास्त्रे विकू नये असं म्हणणारी अमेरिकाच इस्त्रायलच्या मदतीने इराणला शस्त्रास्त्रे विकत होती. दुसरे अशाच प्रकारचे उदाहरण म्हणजे इराण-इराक यांच्या युद्धाचं देता येईल. तेलाच्या राजकारणात चालू झालेल्या इराण-इराकच्या युद्धात अमेरिका एका बाजूला इराणला मदत करत राहिली आणि त्याच वेळी इराक या युद्धात हरणार नाही याचीही काळजी घेत राहिली. यादरम्यान अमेरिकेला आव्हान देणाऱ्या सद्दाम हुसेनचा खात्मा करण्यासाठी इराककडे अस्तित्वातच नसणाऱ्या आण्विक अस्त्रांचं कारण पुढे करून जगासाठी इराक धोकादायक आहे असं सांगत अमेरिकेने इराकला बेचिराख करून टाकलं ज्यातून इराक आजही उभा राहू शकला नाही. पुढे इतर मुस्लिम देशांसोबातच रशियावर आपलं वर्चस्व राखण्यासाठी अमेरिकेने जे राजकारण खेळले त्यातून अफगाणिस्तानात ओसामा बिन लादेनच्या अल-कायदाचा जन्म झाला. ज्याला पोसणं नंतर अमेरिकेच्याच कसं अंगाशी आलं हे ९/११ ला संपूर्ण जगाने पाहिलं. आपणच पोसलेला दहशतवाद जेव्हा स्वतःवरच उलटला तेव्हा अमेरिकेला थोडीफार जाग आली खरी पण आज हाच दहशतवाद संपूर्ण जगाची डोकेदुखी ठरतोय हे वास्तव आहे. अल-कायदाला संपवण्यासाठी अफगाणिस्तानात अमेरिकेने छेडलेल्या युद्धाने त्या देशाला इराकप्रमाणेच पुरतं उध्वस्त करून टाकलं. युद्धानंतर अमेरिकेने तिथून काढता पाय घेतल्यानंतर अफगाणिस्तानात सामान्य लोकांचं झालेलं हाल संपूर्ण जगाने टेलिव्हिजनवर पाहिले. परंतु प्रत्येक ठिकाणी जसे अपवाद असतात त्याप्रमाणे अमेरिकेच्या या अन्यायकारक आणि अमानवी कारवायांच्या इतिहासालादेखील एक अपवाद आहे. १६ विविध देशांत अमेरिकेने चालवलेल्या वर्चस्ववादी आणि दुटप्पी राजकारणात बहुतांशी देशांनी अमेरिकेपुढे गुडघे टेकले असले तरी क्युबाचा फिडेल कॅस्ट्रो अमेरिकेला पुरून उरला. क्युबा गिळंकृत करण्याचे अमेरिकेचे सर्व प्रयत्न कॅस्ट्रोने रशियाच्या मदतीने हाणून पाडले. अमेरिकेच्या वर्चस्ववादात भरडणाऱ्या आणि त्याला विरोध करण्याची इच्छा असणाऱ्या देशांसाठी क्युबाचा हा लढा प्रेरणादायी आहे. अतुल कहातेंनी ज्याप्रमाणे क्युबाचा हा लढा आपल्यासमोर आणला आहे तो वाचत असताना आपल्याला क्युबासारख्या या छोट्याशा देशाचा अभिमान वाटल्यावाचून राहत नाही.

अख्या जगात लोकशाही आणि शांतता प्रस्थापित करायचा मक्ता फक्त आपणच घेतला आहे अशा अविर्भावात वावरणाऱ्या अमेरिकेचं पडद्यामागचं राजकारण नेमकं याच्या विरोधी आहे. अमेरिकेच्या तोंडावरील हा बुरखा अतुल कहाते यांनी त्यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून फाडला आहे आणि नाण्याची दुसरी बाजू, जी अमेरिकेला जगातील सर्वांत युद्धखोर देश सिद्ध करते ती आपल्या पुढे आणली आहे.

आवर्जून वाचण्यासारखं अतुल कहातेंचं एक दर्जेदार पुस्तक "युद्धखोर अमेरिका"!





संदीप प्रकाश जाधव


"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये