Sunday, February 27, 2022

"रारंग ढांग"



 लेखक : प्रभाकर पेंढारकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- १६६, मूूल्य- २०० रुपये                                                                           


साधारणपणे ४५ वर्षांपूर्वी, आंध्रप्रदेशच्या सागरकिनाऱ्यावर घोंगावत आलेल्या एका राक्षसी चक्रीवादळाच्या तडाख्यात उडालेल्या हाहाकाराची विदारक कहाणी सांगणारी "चक्रीवादळ" ही प्रभाकर पेंढारकरकरांची कादंबरी काही दिवसांपूर्वी माझ्या वाचनात आली होती. "चक्रीवादळ"च्या माझ्या पुस्तक परिचयानंतर बऱ्याच लोकांनी पेंढारकरांची "रारंग ढांग" ही कादंबरी आवर्जून वाचण्यासाठी सुचवली. मधील काळात माझ्या 'To Read' च्या रांगेतील काही पुस्तके वाचून झाल्यानंतर शेवटी आज मधेच "रारंग ढांग" हातात घेतलं. १६६ पानांची आणि साधारण १ किंवा २ बैठकींतच वाचून पूर्ण होणारी, एका अतिशय वेगळ्या विषयावर बेतलेली ही कादंबरी वाचकाला ज्या जगात घेऊन जाते तिथून वाचक परत येतो तोच मुळी आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी बॉर्डरवर प्रतिकूल परिस्थितीत राहणाऱ्या जवनांप्रती अत्युच्च अभिमानान घेऊन! खरंतर पेंढारकरांनी वाचकाला या कादंबरीच्या माध्यमातून ज्या वातावरणात घेऊन गेलं आहे तिथून मानसिकदृष्ट्या बाहेर येण्यासाठी वाचकाला बराच वेळ लागतो इतका तो या कथेसोबत एकरूप होऊन जातो. "रारंग ढांग" या नावातच असणारं वेगळेपण कादंबरीच्या विषयातदेखील आहे. 'रारंग' हे भारताच्या ईशान्येकडील सीमेजवळ असलेलं एक गाव आहे आणि 'ढांग' म्हणजे तेथील स्थानिक भाषेत अतिशय उंच अशा डोंगराची कडा. या कादंबरीची कथा आहे अशाच हिमालयाच्या 'ढांगातील'! हिमालयातील पर्वतांच्या एवढ्या उंचीवर रस्ते बनवणारा जगात भारत हा असा बहुधा एकमेव देश असावा. रस्ते बनवण्याचं हे काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (Border Road Organization BRO) ही संस्था भारतीय सैन्याच्या अधिकाराखाली करते. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनकडून बांधण्यात येणाऱ्या अशाच एका उंच 'ढांगातील' रस्त्याच्या उभारणीचा अतिशय खडतर प्रवास पेंढारकरांनी आपल्यासमोर आणला आहे. एका बाजूला हिमालय आणि लहरी निसर्ग तर दुस-या बाजूला वेगवेगळी स्वभाव-वैशिष्ट्ये असलेली अनेक माणसं. मात्र ही सगळी माणसं एकाच जिद्दीची. निसर्गात आणि माणसांत रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच असतो. या कादंबरीत निसर्गासोबत संघर्ष करणाऱ्या अशाच माणसांची कथा गुंफली आहे. "रारंग ढांग"च्या कथेचा काळ स्वातंत्र्यानंतरचा आहे जेव्हा भारतात विविध पायाभूत सुविधा निर्माणाचे प्रकल्प मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आले होते. त्यामुळे आताच्या काळाशी जर तुलना केली तर त्याकाळी हिमालयातील अशा उंच ठिकाणी रस्ते बांधण्यातील आव्हानाचा आपण सहज अंदाज बांधू शकतो. हिमालयाची ही उंची आणि हे काम माणसांनाच काय पण त्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रांनासुद्धा थकवते. कमी कमी होत जाणारा ऑक्सिजन, प्रचंड थंडी, लहरी निसर्ग, अचानक होणारे लँडस्लाईड एवढंच काय तर हिवाळ्यात रस्त्यांवर साठणारे बर्फ ह्या साऱ्या आव्हानांचा सामना करत चालणारं हे रस्तेबांधणीचं काम म्हणूनच अलौकिक असंच आहे. "ह्या प्रवासाला रिटर्न तिकीटच नाही, मग कसले निरोप समारंभ आणि कशाला ती सेंटीमेंट्सची ओझी खांद्यावरून वहायची?”, ”दोस्त इथे ८ दिवसांची रजा मिळणे मुश्किल. पण कायमची सुट्टी कधीच मंजूर झालेली असते”. "आदमी मरता है तो क्या रह जाता है?", राहते ती फक्त "यादगारी", "आठवण"! असे काही संवाद बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमधे काम करणारे जवान आणि त्यांच्यासोबतीला राबणारे 'लोकल लेबर' कोणत्या परिस्थितीत हे देशहिताचे काम करतात याची जाणीव करून देतात. मनाला भिडणाऱ्या कथेमुळे १९८१ साली प्रकाशित झालेल्या "रारंग ढांग"ची जादू आजही कायम आहे.

पेंढारकरांच्या या कथेचा नायक आहे विश्वनाथ मेहेंदळे. विश्वनाथसोबतच मेजर बंबा, कॅप्टन बहल, कॅप्टन नायर, कॅप्टन मिनू, कामगारांचा सरदार बहादूर, विश्वनाथला मुंबईत असताना आर्ट गॅलरीत भेटलेली तरुणी उमा, या सर्वच पात्रांनी कथेला रंग आणला आहे. तर, विश्वनाथ एक असा अभियंता जो मुंबईतील युनायटेड कन्स्ट्रक्शन या नावाजलेल्या कंपनीतील आपली अतिशय सुखासीन खासगी नोकरी सोडून हिमालयातील दुर्गम, सीमा भागातील रस्ते बांधणीच्या प्रकल्पासाठी सरकारी नोकरीवर रुजू होतो. हिमालयातील हे रस्ते प्रामुख्याने भारतीय सैन्याच्या दळणवळणाकरिता, सीमेच्या सुरक्षेसाठी आवश्यक असल्याने भारतीय सैन्यअधिकाऱ्यांचे या कामावर लक्ष आणि नियंत्रण असते. विश्वनाथ हा त्या प्रकापातील एक सिव्हिलियन अभियंता असल्याने बॉर्डरवरील लष्करी शिस्त बऱ्याच वेळा त्याच्या प्रामाणिक कामाआढ येते. प्रत्येक गोष्टीकडे फक्त लष्करी शिस्तीच्या भिंगातून न पाहता त्या गोष्टींना असणाऱ्या दुसऱ्या बाजूचा भावनिकदृष्ट्या विचार करून निर्णय घेणाऱ्या विश्वनाथचे लष्करी अधिकाऱ्यांसोबत वरचेवर खटके उडायला चालू होतात. आपण बांधत असलेल्या रस्त्यावर आपल्याच लोकांची स्मारके बांधायला लागू नयेत ही माफक अपेक्षा असणारा विश्वनाथ काही ठिकाणी लष्करी शिस्तीच्या विरोधात जाऊन काम करतो. याची दोन उदाहरणे म्हणजे त्याने सर्जेराव गायकवाड या जवानाच्या सुट्टीसाठी प्रसंगी मोठ्या अधिकाऱ्यांच्या मनाविरुद्ध केलेली धडपड आणि दुसरे उदाहरण 'ढांगातील' रस्ता जवळपास पूर्ण झाल्यानंतर, त्याची चाचणी चालू असताना अचानकच एक कडा कोसळून झालेल्या अपघातात सर्जेराव आणि काही कामगारांचा त्याखाली गाडून मृत्यू होतो, त्या धक्क्यानंतर विश्वनाथने घेतलेला एक अतिशय भावनिक निर्णय! विश्वनाथचा हा निर्णय एक माणूस म्हणून अगदी योग्य असला तरी लष्कराच्या शिस्तीत बसणारा नव्हता त्यामुळे त्याच्या या निर्णयामुळे त्याला लष्करी कारवाईला(कोर्ट मार्शल) सामोरं जावं लगतं. कोर्ट मार्शल दरम्यानच्या चौकशीत विश्वनाथ आपल्यावरील आरोप तर फेटाळतोच शिवाय 'ढांगातील' कडा कोसळल्यानंतर आपण असा लष्कराच्या शिस्तीत न बसणारा निर्णय का घेतला याचंही कारण कोर्टाला सांगतो. अशी कडा कोसळण्याची त्या जागेवर शक्यता आहे आणि त्यासाठी काय काळजी घेतली पाहिजे हे आधीच वरिष्ठांच्या लक्षात आणून देऊनही केवळ ते लष्करी शिस्तीत बसत नसल्याचं कारण देऊन त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं हे कोर्टात सांगत असताना मानवी प्रयत्न आणि लष्कराची शिस्त यातील भेदही तो स्पष्ट शब्दात परखडपणे मांडतो. दोन्ही बाजू ऐकून कोर्ट प्रत्यक्ष अपघात झालेल्या जागी विश्वनाथने नव्याने केलेल्या बांधकामाची पाहणी करते आणि एक चकीत करणारा निकाल देते. नंतर त्याची त्या अन्यायकारक आरोपांतून मुक्तता होते, पण त्याची लष्कराची सेवा संपुष्टात येते, त्याचा करार रद्द होतो आणि त्याला अतिशय खंत मनाने बॉर्डर वरील त्या गावातून बाहेर पडावं लागतं. कादंबरीच्या शेवटी रस्त्यात मृत्यू पावलेल्या जवानांच्या स्मृतिस्थळाला फुले वाहून परतीच्या वाटेवर प्रवास करणाऱ्या विश्‍वनाथची प्रतिमा वाचकांच्या नजरेसमोर बराच वेळ तरळत राहते. ही इतकी सहज-सुंदर वाटणारी कादंबरीची कथा वाचताना खरंतर आपण त्यात हरवून जातो. बऱ्याच घटना अंगावर शहारे आणतात तर कधी डोळ्यांत पाणी. पेंढारकरांनी या कथेतून उभा केलेला माणूस विरुद्ध निसर्ग, माणूस विरुद्ध माणूस आणि माणूस विरुद्ध तो स्वतः हा संघर्ष आपल्याला खूप काही शिकवून जातो. हिमालयाच्या कड्यांवर चालणारा हा संघर्ष वाचून झाल्यानंतर आपल्यासाठी बॉर्डरवर पहारा देणाऱ्या सैनिकांना वाचक मनोमन सलाम करतो यातच या कादंबरीचं खरं यश आहे म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये.

प्रत्येक वाचकाच्या संग्रही असावी आणि आवर्जून वाचावी अशी कादंबरी "रारंग ढांग"!





संदीप प्रकाश जाधव



No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये