Sunday, March 27, 2022

"हसरे दुःख"

 


लेखक : भा. द. खेर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- ५१४, मूूल्य- ५०० रुपये

                                                                           

'प्रत्येक हसऱ्या चेहऱ्यामागे एक दुःख लपलेलं असतं', हे आपण कितीतरी वेळा ऐकून-वाचून गुळगुळीत झालेलं वाक्य! या वाक्याचा आज मला खरा प्रत्यय आला भा. द. खेर यांनी लिहिलेली 'चार्ली चॅप्लिन' यांची चरित्रात्मक कादंबरी वाचत असताना. 'चार्ली चॅप्लिन' नाव ऐकताच डोक्यावर हॅट, हातात काठी, ढगळी पॅन्ट, लांब कोट आणि मोठाले बूट घालून तुरुतुरु धावणारी एक आकृती डोळ्यासमोर येते. अनेक पिढ्यांना केवळ आपल्या देहबोलीतून विनोद निर्मिती करून हसवणारा हा कलाकार इतक्या वर्षांनंतर आजही जगातील सर्वश्रेष्ठ विनोदवीर म्हणूनच ओळखला जातो. मनोरंजनाचे शेकडो पर्याय समोर असूनही आजची पिढी ५ मिनिटे देखील त्याचा आनंद घेऊ शकत नाही पण एक काळ असा होता जिथे पडद्यावर येणारा चार्ली चॅप्लिन काहीही न बोलता लोकांना आपली दुःखे विसरायला लावायचा, पडद्यावर चालणारी त्याची ती विनोदांची उधळण थांबूच नये असं वाटायचं. परंतु लोकांना मनमुराद हसवणाऱ्या या अवलियाने किती प्रतिकूल परिस्थितीशी झगडून आपलं स्वतःचं स्थान निर्माण केलंय ते या कादंबरीत वाचताना वाचक अतिशय भावनिक होऊन जातो. चार्ली चॅप्लिनचा हा प्रवास अतिशय प्रेरणादायी आहे, जो आपल्याला प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची ताकद देतो. एका गायनाच्या कार्यक्रमात अचानकपणे आपल्या आईचा आवाज गेल्याने वयाच्या अवघ्या ५व्या वर्षी चार्लीने रंगमंचावर प्रवेश करून तो कार्यक्रम पुढे पूर्ण केला आणि इथूनच त्याचं रंगमंचाशी नातं जोडलं गेलं ते अगदी शेवटच्या श्वासापर्यंत! भा. द. खेर यांनी चार्लीचा हाच प्रवास या कादंबरीतून आपल्यासमोर आणला आहे. भा. द. खेर यांनी इतक्या ओघवत्या आणि हृदयस्पर्शी भाषेत चार्लीचं हे चरित्र मांडलं आहे की वाचताना अनेक ठिकाणी डोळ्यांत पाणी आल्याशिवाय रहात नाही. स्वतःचे आयुष्य एक शोकांतिका असूनही जगाला केवळ आपल्या मूक अभिनयाने हसवणारा हा अभिनयसम्राट केवळ प्रेरणादायीच नाही तर अतिशय वंदनीय आहे हे पानापानावर आपल्याला जाणवत राहते. लोकांना नेहमी त्याच्या चेहऱ्यावरचे बालिशपण, निरागसता दिसली पण त्यामागचे दुःख कोणालाच दिसले नाही. चार्लीने त्याच्या आयुष्यात घडलेल्या बऱ्याच घटना, गोष्टी पडद्यावर विनोदीरूपाने सादर केल्या आणि प्रेक्षकांनी त्याला डोक्यावर घेतले पण विनोद निर्मिती करून लोकांना हसवणारे त्याच्या आयुष्यातील असे प्रसंग प्रत्यक्ष अनुभवनारा चार्ली किती महान होता याची जाणीव भा. द. खेर यांनी आपल्याला करून दिली आहे. उदाहरणार्थ, चार्लीच्या बेकरीतून पाव घेऊन पळण्याला लोकांनी हसून हसून दाद दिली पण त्या पावाच्या तुकड्यासाठी त्याने आपल्या खऱ्या आयुष्यात किती संघर्ष केलाय याची पुसटशी कल्पनाही अशा हसणाऱ्या लोकांना नाही. खेर यांची ही चार्लीची चरित्रात्मक कादंबरी वाचून जेव्हा आपण तुरुतुरु पळणाऱ्या चार्लीला डोळ्यासमोर आणतो तेव्हा एक वेगळाच चार्ली आपल्यासमोर उभा राहतो ज्याच्यासमोर आपण मनोमन नतमस्तक होऊन जातो. अविरत कष्ट करणारी आणि मधूनच वेडाचे झटके येणारी आई, त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा त्याचा सावत्र भाऊ यांच्या पाठिंब्यावरच चार्ली उभा राहिला. गरिबीतही त्यांच्या आईने दोन्ही मुलांवर योग्य संस्कार केले, त्यांना माणूस म्हणून जगायला शिकवले. प्रसिद्ध माणसे आपल्याला बरीच मिळतील पण अजरामर फारच कमी होतात, त्यांपैकीच एक "चार्ली चॅप्लिन"!

"हसरे दुःख" हे भा. द. खेर यांनी या कादंबरीला दिलेलं नावच आपल्याला खूप काही सांगून जातं. ही कहाणी आहे जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅप्लिनच्या आयुष्यातील संघर्षाची. अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून चार्लीच्या आयुष्याचा हा प्रवास सुरु होतो. चार्लीचे वडील चार्ल्स चॅप्लिन हे एक उत्कृष्ट नट होते तर चार्लीची आई हॅना एक उत्कृष्ट नटी, गाणं आणि नृत्य करणारी स्टेज आर्टिस्ट होती. पण चार्ल्सच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून हॅनाने चार्ल्सकडून घटस्फोट घेतल्यानंतर चार्लीचा मोठाभाऊ सिडने आणि चार्ली यांचा एकटीने सांभाळ केला पण दुर्दैवानं अचानकच तिच्या गळ्याने साथ सोडली आणि चॅप्लिन कुटुंबाच्या आयुष्याला उतरती कळा लागली. त्यांना अगदी दोन वेळचं अन्न मिळणेही कठीण झालं. लंडनमधल्या 'तीन पावनेल टेरेस' या पत्त्यावर राहणाऱ्या या कुटुंबाचं जगणं दिवसेंदिवस खूपच हलाखीचं होत गेलं. गरिबी, उपासमार आणि तुटपुंज्या मिळकतीसाठी पडणारे प्रचंड कष्ट यामुळे हे कुटुंब अक्षरशः गांजून गेलं होतं. दोन वेळच्या खाण्यासाठीही पैसे मिळत नसल्याने चॅप्लिन कुटुंबाला काही काळ वर्कहाऊसमध्ये राहावं लागलं त्यात गरीब मुलांचे होणारे हाल पाहून आधीच हळवा आणि प्रत्येक गोष्ट मनाला लावून घेणारा चार्ली अधिकच दुःखी बनला. हे दुःख त्याने ना कधी कोणाला सांगितलं ना कधी त्याचं प्रदर्शन केलं. मुलांची काळजी, वर्कहाऊस मध्ये होणारा त्रास, सततचा मानसिक ताण यामुळे हॅनाला वेडाचा झटका आला ज्यामुळे सिडने आणि चार्लीचं आयुष्य आणखीनच वेदनामय झालं. याकाळात काहीकाळ आपल्या वडिलांकडे सावत्र आईसोबत राहणारा चार्ली तिथे होणाऱ्या त्रासाने जास्तच संवेदनशील बनला. कधी सावत्र आईचा जुलूम, कधी वर्कहाऊस मधील जगणे तर कधी अन्नासाठी धडपड अशा प्रसंगात प्रचंड मोठे दुःख सहन करत चार्ली घडत गेला. या संघर्षमय आयुष्याच्या प्रत्येक पावलावर आई हॅना चॅप्लिनने त्याला कायम ईश्वरावर विश्वास ठेवायला शिकवले. प्रत्येक कठीण प्रसंगात सिडने त्याच्या पाठीशी उभा राहिला. एकेकाळच्या वैभवातून अचानक गरिबीत ढकललं गेलेल्या या छोट्याशा कुटुंबाची कठीण परिस्थितीत टिकून राहण्याची इच्छा वाचकाला थक्क करते. चार्ली लहान असताना लोकांचे कपडे शिवून कुटुंब सांभाळणारी हॅना आणि पेपर विकून, बोटीवर कामे करून कुटुंबाला हातभार लावणारा चार्लीचा मोठा सावत्र भाऊ सिडने या दोन व्यक्तींमुळेच खरं तर चार्ली घडला असं म्हटलं तरी चालेल. चार्लीच्या या कठीण दिवसातल्या प्रसंगांचा त्याच्या कलेवर, सिनेमांवर आणि एकूणच त्याच्या व्यक्तिमत्त्वावर खोल प्रभाव कायमच राहिला. फ्रेड कार्नोच्या नाटक कंपनीतून त्याने आपल्या अभिनयाची सुरुवात केली. मग पुढे तो अमेरिकेत गेला. तिथे 'किस्टोन कंपनीत' कॉमेडी सिनेमे केले. तिथेच तो दिग्दर्शन शिकला. 'कीडस् ऑटो रेसेस ऑफ व्हेनिस' या सिनेमात त्याला 'ट्रॅम्प' या त्याच्या अजरामर भूमिकेचा शोधही लागला. नाकाखाली छोटीशी मिशी असणारा, डोक्यावर काळी हॅट घालणारा, ढगळी पॅन्ट कमरेला करकचून बांधणारा आणि दोन्ही टाचा एकमेकांना टेकवून हातातली काठी फिरवत चालणाऱ्या या मिश्किल ट्रॅम्पने नंतर जगभर धुमाकूळ उडवून दिला. चार्लीनं आपल्या केलेने अमेरिकेसह संपूर्ण जगाला वेडं केलं. कधीकाळी अन्नानदशा असलेलं चॅप्लिन कुटुंब प्रसिद्धी आणि श्रीमंतीच्या परमोच्च शिखरावर आलं पण त्याचा चार्लीला कधी अभिमान किंवा गर्व नव्हता. चित्रपट सृष्टीत यशाची कारकीर्द गाजवणारा चार्ली संसारात मात्र दुःखीच राहिला, त्याची चार लग्नं झाली पण पहिली ३ अल्पावधीतच मोडली. चौथं लग्न ऊना ओनिल हिच्या सोबत झालं ते त्याला शेवट पर्यंत साथ देणारं ठरलं. दुसऱ्या महायुध्याचा काळात चार्लीला अमेरिकेत बराच त्रास झाला. हिटलरच्या विरोधात कणखरपणे उभं राहून चार्लीने 'द डिक्टेटर' हा सिनेमा काढला! या सिनेमातून चार्लीने जगभरातल्या हुकूमशाहीवर टीका केली. चार्ली स्वतःच्या सिनेमाचे संगीत स्वतःच द्यायचा. त्याला संगीतातील मोठी जाण होती. चित्रपटाची कथा, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय, निर्मिती, संपादन अशी सगळी कामे तो स्वतःच करायचा. त्याला परिपूर्णतेचा ध्यास होता. एखादा चित्रपट त्याच्या मनाप्रमाणे तयार होण्यासाठी तो खूप कष्ट करायचा. कोर्ट कचेऱ्यांमुळे आणि अफवांमुळे त्याचे मीडियामधले आयुष्य नेहमी वादळीच राहिले. अमेरिकन सरकारने त्याला कम्युनिस्ट ठरवून त्याच्यावर निर्बंध लादायचा सारखा प्रयत्न केला. त्याच्यावर काहीकाळ अमेरिकेत प्रवेशाला बंदी घालण्यात आली. ज्या अमेरिकेने त्याला भरभराट दिली तिनेच मानसिक त्रास दिला. आयुष्याच्या शेवटी अमेरिका सोडून चार्ली स्वित्झर्लंडमध्ये राहायला गेला. स्वित्झर्लंडमधेच त्याने वयाच्या ८८ व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.

परिस्थितीशी दोन हात करून स्वतःला सिद्ध करणाऱ्या, आपल्या हसर्‍या मुखवट्यातून जीवनाच्या वेदनेचा सूक्ष्म वेध घेणार्‍या मनस्वी कलावंताच्या आयुष्याची प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी प्रेरणादायी कहाणी "हसरे दुःख"!





संदीप प्रकाश जाधव

Saturday, March 19, 2022

"व्यासपर्व"

 



लेखक : दुर्गा भागवत

प्रकाशक : मौज प्रकाशन

पृष्ठे- १११, मूूल्य- १५० रुपये                                                                           

 

वाल्मिकींचं "रामायण" आणि व्यासांचं "महाभारत" ही भारतीय संस्कृतीतील महाकाव्येच! या दोन्हींकडे भारतीय इतिहास म्हणून बघा अथवा महाकाव्य, जितक्या वेळा यांचा अभ्यास केला जातो त्या प्रत्येक वेळी यांतून नवीन काहीतरी बोध होतोच. इरावती कर्वे यांचं "युगान्त" हे आधुनिक काळात झालेल्या संशोधनाच्या आधारे महाभारतातील पात्रांची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं. इरावती कर्वे यांनी कोणत्याही प्रकारचं देवपण न देता स्वतःच्या नजरेतून विश्लेषण करून प्रत्येक पात्राचं एक नवीनच रूप आपल्यासमोर उभं केलं आहे, जे वाचकाला विचारात पाडतं. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा महाभारतातील पात्रांवरच लिहिलं गेलेलं "व्यासपर्व" हे दुर्गा भागवत यांचं पुस्तक वाचण्याचा योग आला. "युगान्त" आणि "व्यासपर्व" यांतील फरक सांगायचं म्हटलं तर "युगान्त"मधे कर्वे यांच्या नजरेतून महाभारतातील पात्रांची आपल्याला ओळख होते तर "व्यासपर्व" ही महर्षी व्यासांनी त्यांचं हे महाकाव्य लिहिण्यापूर्वी त्यातील पात्रांबद्दल काय विचार करून ती पात्रे या काव्यात उतरवली असतील हे भागवत यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारतातील पात्रांची असणारी पारंपारिक ओळख पुसून टाकणारा वेध त्यांनी या पुस्तकातून घेतला आहे. हे करत असताना दुर्गा भागवत यांनी महाभारतातील १० महत्वाच्या पात्रांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेलं आहे. तसं पाहिलं तर महाभारतातील कोणत्याही पात्राकडे पाहिलं तर आपल्याला त्याच्याभोवती नेहमी एक वेगळंच वलय जाणवत राहतं. व्यासांनी त्यांच्या काव्यात प्रत्येक पात्राचा समावेश जणू काही खास कारणासाठीच केला आहे असं वाटावं इतकी ही सर्व पात्रे एकमेकांत गुंतलेली आहेत आणि हाच धागा पकडून दुर्गा भागवत यांनी काही ठराविक पात्रांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. कृष्ण,  द्रोणाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, कर्ण, अर्जुन, युधिष्ठिर, भीष्म, विदुर आणि द्रौपदी या पात्रांची नव्याने ओळख करून देत असतानाच सोबत इतरही काही पात्रे जशी धृतराष्ट्र, नकुल, सहदेव यांचाही या काव्यातील समावेश कशासाठी असू शकतो हेदेखील थोडक्यात सांगितलं आहे. पुस्तकातील बरेचसे शब्द सामान्य वाचकांना प्रथमच वाचनात किंवा ऐकण्यात येणारे असले तरी वाचक भागवत यांच्या सोबत शेवटपर्यंत टिकून राहतो हे त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं सर्वांत मोठं यश आहे. आणि त्यामुळेच की काय पुस्तक वाचून झाल्यानंतर महाभारतातील या पात्रांसोबतच इतरही पात्रांविषयी आणखी जाणून घेण्याची आपली इच्छा होत राहते.

पहिलं प्रकरण आहे महाभारतातील अतिशय गूढ आणि केंद्रस्थानी असणारं व्यक्तिमत्व अर्थातच कृष्णाचं! "पूर्णपुरुष कृष्ण" या प्रकरणात भागवत यांनी कृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेची, अवस्थेची आणि कृष्णाने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांची संगत मांडली आहे. आयुष्यातील एक अवस्था अथवा घटना घडून गेल्यानंतर वास्तवाचे भान ठेवून त्या होऊन गेलेल्या गोष्टींकडे कधीही मागे न वळून पाहणाऱ्या कृष्णामुळेच खरंतर महाभारताचं कथानक वेगाने पुढं सरकतं. कृष्णाच्या प्रत्येक कृतीतून भागवत यांनी मानवी जीवनाचे सत्य मांडलं आहे. पुढे "मोहरीतील ठिणगी" या प्रकरणातून द्रोणाचार्यांचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर येतं. गुरुदक्षिणेच्या नावाखाली एकलव्यासारख्या अर्जुनापेक्षा सरस धनुर्धराचे पंख छाटणारे द्रोण, अर्जुन आणि इतर शिष्यांपासून लपवून आपल्या मुलाला अधिकचं शिक्षण देणारे द्रोण आपल्याला विचार करायला लावतात. या प्रकरणातून द्रोणाचार्यांच्या मनात निपजलेला हिनतेचा एक वेगळाच पैलू आपल्या समोर येतो. द्रुपदाकडून झालेला अपमान, आपला लहान मुलगा अश्वत्थाम्याचं दुधासाठी होणारं हाल अशा आपल्यासोबत घडलेल्या काही घटनांतून द्रोणाचार्यांच्या स्वभावात होणारं परिवर्तन मानवी आयुष्यालासुद्धा तंतोतंत लागू होतं. द्रोणाचार्यांच्या या स्वभावामुळे जे दु:ख एकलव्याच्या वाट्याला आलं, जी भळभळती जखम घेऊन आजही अश्वत्थामा वणवण भटकतोय त्याला जबाबदार असणारे द्रोणाचार्य आयुष्यात कधीच सफल होत नाहीत. एक गुरू किंवा पिता म्हणून ते नेहमीच कुठे ना कुठे कमी पडतात. द्रोणाचार्यांचं हेच अतिशय किचकट असं पात्र भागवत यांनी थोड्या वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने वाचकांसमोर आणलं आहे. द्रोणाचार्यांच्या अशा स्वभावाचा अश्वत्थाम्याच्या आयुष्यावर होणारा परिणाम "कोंडलेले क्षितिज" या तिसऱ्या प्रकरणात दिसतो. अतिशय पराक्रमी असूनही अश्वत्थामा महाभारतात एकप्रकारे चोहोबाजूंनी कोंडलेलं आयुष्यच जगला. स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा अंदाज नसणारा, आपली बुद्धी नेहमी अयोग्य मार्गानेच चालवणारा, पराक्रमी असूनही नेहमी वाईट गोष्टींमध्येच ज्याच्या नावाचा उल्लेख होतो, अंध मातापित्यांच्या लाडात वाढलेला दुर्योधन "व्यक्तिरेखा हरवलेला माणुस" या प्रकरणातून स्वतःची एक वेगळी ओळख घेऊन येतो. दुर्योधनाचा परममित्र, सर्व असूनही सर्वांत एकाकी असणाऱ्या, कुंतेय असूनही सुतपुत्र म्हणवणाऱ्या कर्णाच्या जीवनाचा आढावा भागवत यांनी "एकाकी" या चौथ्या प्रकरणातून घेतला आहे. कर्ण आपल्यासमोर आणत असताना कर्णाने केलेल्या चुका आणि त्या चुकांचा त्याच्या आयुष्यावर झालेला परिणाम वाचकाला खूप काही शिकवून जातो. परंतु अशा चुकांसोबतच कर्णाची दुसरी बाजूही भागवत सांगायला विसरत नाहीत. कृष्णाने अगदी द्रौपदीचा मोह दाखविला तरी तो दुर्योधनाशी असलेल्या आपल्या मैत्रीच्या वचनाला जागतो. तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे संरक्षण करणारी कवचकुंडले दान करून स्वतःचा दानशूरपणा सिद्ध करतो. कवचकुंडलांशिवाय आपल्यासोबतच आपल्या परममित्राचा पराभव होणं अटळ आहे हे माहीत असूनही कर्ण मागे हटत नाही. अस्सल हिऱ्याची लकाकी असणारा कर्ण शेवटपर्यंत "एकाकीच" राहतो. "परिकथेतून वास्तवाकडे" या प्रकरणातून भागवतांनी अर्जुनाचे व्यक्तिमत्व मांडलं आहे. कुंतिचा पुत्र, पांडवातला उत्कृष्ट धनुर्धर, द्रौपदीचा प्रियकर, कृष्णाचा प्राणसखा अशा अर्जुनाच्या पारंपरिक व्यक्तीमत्वाला छेद देणारं हे या प्रकरणातील विश्लेषण! पांडवांचा जेष्ठ बंधू, वचनाला जागणाऱ्या, धर्माने आणि न्यायाने वागणाऱ्या युधिष्ठिराची प्रतिमा व्यासांनी महाभारतात ज्या पद्धतीने रंगवली आहे त्या प्रतिमेला छेद देणारं विश्लेषण भागवत यांनी केलं आहे "मुक्त पथिक" मधून. पूर्णत्वाचा भोक्ता असणारा युधिष्ठिर पांडवांच्या प्रत्येक क्रियेमागे जाणवतो. कधी तो प्रोत्साहक म्हणून तर कधी न पटणाऱ्या गोष्टींचा विरोधक म्हणून. कौरव आणि पांडव या दोघांनाही आदरणीय असणारं महाभारतातील एक भारदार व्यक्तिमत्त्व म्हणजे 'भीष्म'! "अश्रु हरवल्यावर" या प्रकरणात भीष्माबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. या प्रकरणातून इतर पात्रांपेक्षा असणारी भीष्माची उंची सतत जाणवत राहते. भीष्मासोबतच महाभारतातील आणखी एक दुर्लक्षित पात्र विदुर, भागवतांनी ज्याचं विश्लेषण केलं आहे "माणसांत विरलेला माणूस" या प्रकरणात. एकाच पित्याची संतान असुनही दासीपुत्र म्हणूनच आयुष्य काढणाऱ्या विदुराने सत्याची कास शेवटपर्यंत सोडली नाही. पुस्तकातील शेवटचं प्रकरण आहे द्रौपदीचं! खरंतर "कामिनी" या नावावरून सुरुवातीला काहीच बोध न होणाऱ्या या प्रकरणातून भागवतांनी द्रौपदीची कथा आणि व्यथा दोन्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. द्रौपदी हे महाभारतातील एक असं पात्र आहे की जिचे दु:ख कधीच कळूनही मांडता येत नाही. सर्वकाही मिळुनही शेवटी रिकामी झोळी घेऊन जिवंतपणीच जळत रहाणारी जणू ही एक शापित स्त्रीच!

महाभारतावर लिहिलेल्या बऱ्याच चिंतनपर पुस्तकांपैकी आवर्जून वाचावं असं एक पुस्तक "व्यासपर्व"!





संदीप प्रकाश जाधव

Thursday, March 10, 2022

"रक्तरंजीत वढू - तुळापूर"

 



लेखक : आण्णासाहेब चव्हाण

प्रकाशक : मावळा प्रकाशन

पृष्ठे- १५२, मूूल्य- २२० रुपये                                                                           


२३ नोव्हेंबर २०१३, या तारखेला मी पहिल्यांदा तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतरही आजतागायत बऱ्याच वेळा महाराजांच्या समाधी दर्शनाचा योग आला पण पहिल्या वेळच्या दर्शनाचा हा दिवस माझ्या आजही अगदी लख्खपणे आठवणीत असण्याचं कारण म्हणजे त्यावेळी झालेली माझी अवस्था! शिवाजी सावंत यांची संभाजी महाराजांवर लिहिलेली "छावा" ही अजरामर कादंबरी नुकतीच मी वाचून पूर्ण केली होती त्यामुळे तुळापूरमधे पाय ठेवताच कादंबरीतील बरेच प्रसंग डोळ्यासमोर यायला लागले, खासकरून संभाजी महाराजांचे औरंगजेबाच्या छावणीतील तुळापूर मधील ते शेवटचे भयानक दिवस! जगाच्या इतिहासात असा एकमेव राजा असेल ज्याने आपल्या पित्याचं स्वप्न पुढं नेण्यासाठी इतका भयानक मृत्यू स्वीकारला! डोक्यात घुमत असलेल्या याच विचारात जेव्हा समाधीला स्पर्श करून मी हात जोडले तेव्हा एकाचवेळी अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणि उरात प्रचंड अभिमान अशी माझी अवस्था झाली होती. आयुष्यात पहिल्यांदाच आलेल्या या अशा अनुभवाने तो दिवस कायमचाच माझ्या मनात कोरला गेला. तुळापूरला जाऊन आल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो लोकांप्रमाणे मलाही काही प्रश्न सतत अस्वस्थ करत होते ते म्हणजे मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी पकडल्यानंतर तिथून जवळपास ३०० किलोमीटर दूरवर असणाऱ्या तुळापूरलाच का आणि कसं आणलं असावं? तेही आजूबाजूला मराठयांचं राज्य असताना! संगमेश्वरमधून अटक करून महाराजांना प्रथम बहादूरगड आणि तिथून नंतर ११० किलोमीटरचा प्रवास करून तुळापूरला आणलं गेलं. असं का? औरंगजेबासारख्या अतिशय धूर्त माणसाने संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी वढू-तुळापूर या गावाचीच निवड का केली असावी? वास्तविक तुळापूर म्हणजे भिमा-भामा-इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र, मुसलमानी साम्राज्याच्या कोणत्याही खाणा-खुणा नसलेलं, कोणताही गड किंवा किल्ला आसपास नसलेलं ठिकाण. मराठ्यांच्या राजाला मारण्यासाठी औरंगजेबाने याच जागेची निवड का केली असावी? संभाजी महाराजांना तुळापूर सारख्या ठिकाणी अशी क्रूर शिक्षा देण्यामागे औरंगजेबाचा आणखीही काही हेतू असावा का? संभाजी महाराजांना पकडून देण्यात स्वराज्यातील आणखी कोण कोण सामील होते? त्याकाळी तुळापूरचं स्वराज्यात काय स्थान होतं? तुळापूरचा इतिहास काय असावा? या सर्व प्रश्नांसोबतच छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानाच्या अनुषंगाने जे काही इतरही अनेक प्रश्न आपल्या मनात असतील त्याची उत्तरे आण्णासाहेब चव्हाण यांच्या "रक्तरंजीत वढू-तुळापूर" या पुस्तकातून आपल्याला मिळू शकतील. एकूण ३० प्रकरणे आणि १५८ पानांच्या "रक्तरंजीत वढू-तुळापूर" या पुस्तकातून आण्णासाहेब चव्हाण यांनी अगदी मुद्देसूदपणे वढू-तुळापूरचा रक्तरंजीत इतिहास वाचकासमोर मांडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने पोरकं झालेलं स्वराज्य आपण सहज जिंकून घेऊ म्हणून मोठ्या दिमाखात दख्खनेत उतरलेल्या दिल्लीपती बादशाहला तब्बल ८ वर्षांपेक्षा जास्त काळ झुंजवत ठेऊन एकही किल्ला हाती लागू न देणारा सिंहाचा छावा जेव्हा मोगलांनी फंदफितुरीने पकडला तेव्हा औरंगजेबाला जणू आकाशच ठेंगणं झालं असणार हे नक्की. परंतु खरं तर हीच औरंजेबाच्या आणि मोगलाईच्या शेवटाची सुरुवात होती. स्वराज्यहितासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने ज्या पद्धतीने हत्या केली त्यातूनच उडालेल्या ठिणगीने पुढच्या २७ वर्षांत असं रौद्र रूप धारण केलं ज्यामधे आख्खी मोगलाई जळून खाक झाली. जे दख्खन घ्यायचं स्वप्न उराशी घेऊन औरंजेब दक्षिणेत आला होता त्याच स्वप्नासह तो या जमिनीत गाडला गेला. म्हणूनच कोणत्याही नेतृत्वाशिवाय मराठ्यांनी दिलेला हा लढा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. मराठ्यांच्या या देदीप्यमान लढ्याची ठिणगी ज्या जागी पडली ती दोन गावं म्हणजे "वढू-तुळापूर"! 'फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च १६८९, हिंदू नववर्ष पाडव्याची पूर्वसंध्या' हाच तो स्वराज्याच्या इतिहासातील काळा दिवस जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांची "वढू-तुळापूर"मधे हत्या केली. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या तुळापूरमधील भीमा-भामा-इंद्रायणीचा त्रिवेणी संगम हा या क्रूर हत्येचा साक्षीदार ठरला. याच नदीच्या काठावर वसलेल्या वढू बु. या गावात संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांनाही नंतर अग्नी देण्यात आला. आण्णासाहेब चव्हाणांच्या या पुस्तकाची सुरुवात होते "वढू-तुळापूर"च्या प्राचीन इतिहासाने. पुढे एक-एक प्रकारणांमधून त्यांनी संभाजी महाराजांच्या तुळापूरातील हत्येपूर्वी आणि त्यानंतरही घडलेल्या बऱ्याच घटनांचा अगदी मुद्देसूद मागोवा घेतला आहे. तुळापूरचं हिंदू संस्कृतीमधील ऐतिहासिक महत्त्व सांगत असतानाच पंडित मुरारी जगदेवचं मोगलांना सामील असणं, शहाजी राजांचा इतिहास आणि त्यांचं तुळापूरशी असणारं नातं, निजामशाहीचा शेवट, शिवाजी महाराजांचा दरारा, कवी कलश आणि संभाजी महाराजांचं नातं, गणोजी शिर्के आणि त्याने मोगलांना स्वराज्याविरोधात केलेली मदत, पकडल्यानंतर महाराज आणि कवी कलशांची काढलेली धिंड, बहादूरगडावरून वढू-तुळापूरला जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी औरंगजेबाने फितूर मराठा सरदारांशी केलेली चर्चा, हत्येनंतर मोगलांकडून संभाजी महाराजांच्या प्रेताची केलेली चेष्टा, वढू-तुळापूरच्या गावकऱ्यांनी संभाजी महाराज आणि कवी कलशांना मृत्यूनंतर दिलेला अग्नी, त्यानंतर पेटून उठलेल्या मराठयांनी उघडलेल्या अनेक आघाड्या, संताजींची मोगलांवर पसरलेली दहशद आणि त्यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवर केलेला हल्ला, संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून तुळापूरला येऊन आपल्या वडिलांच्या समाधीची केली गेलेली बांधणी, होळकर घरण्याकडून तुळापूरातील शिवमंदिरांचा झालेला जीर्णोद्धार, संभाजी महाराजांच्या समाधीखालील ताम्रपत्रांचा अनुवाद, क्रूरकर्मा औरंगजेबाविषयी थोडक्यात माहिती आणि शेवटी शंभुवंदना यांसारख्या अनेक विषयांना स्पर्श करत आण्णासाहेब चव्हाण यांनी अतिशय वाचनीय पुस्तक आपल्यासमोर आणलं आहे.

प्रत्येकाने एकवेळ अवश्य वाचावं असं पुस्तक "रक्तरंजीत वढू तुळापूर"!





संदीप प्रकाश जाधव

Sunday, March 6, 2022

"द अल्केमिस्ट"

 



लेखक : पाउलो कोएलो

प्रकाशक : पद्मगंधा प्रकाशन

मराठी अनुवाद :नितीन कोत्तापल्ले

पृष्ठे- १६०, मूूल्य- १३० रुपये


पाउलो कोएलो यांची प्रचंड खपली गेलेली, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमधे नोंद असणारी ही अजरामर कादंबरी वाचनात आलेल्या लाखो वाचकांप्रमाणेच या कादंबरीसाठी माझीही पहिली प्रतिक्रिया एकच असेल ती म्हणजे "एक अतिशय अप्रतिम कादंबरी"!

"द अल्केमिस्ट" या नावाचा मराठी अर्थ "किमयागार"!

स्वप्ने तर सगळेच पाहतात पण त्यांचा पाठलाग करून ती पूर्णत्त्वास नेणारे मोजकेच असतात. याचं कारण म्हणजे त्या स्वप्नांचा जास्त विचार न करता ती तशीच सोडून दिली जातात. बऱ्याच वेळा आपल्याला त्या स्वप्नांच्या जवळ जाण्याचे मार्ग समोर असूनही दिसत नाहीत आणि आपलं भविष्य सुधारण्याची संधी आपण गमावून बसतो. कधी कधी जी गोष्ट आपल्याला खूप लांब आहे असं वाटतं ती प्रत्यक्षात आपल्या खूप जवळ असते, गरज असते ती फक्त तिला ओळखण्याची. "कोणत्याही खजिन्याचा शोध हा बाहेर नाही तर स्वतःमधेच घेतला पाहिजे", "स्वतःमधील खजिन्याचा शोध घेत असताना, वेळोवेळी समोर येणारी प्रतीकं आणि शकुन-अपशकुन यांचं भान ठेवून आपली स्वप्ने साकार करण्यासाठी आपण सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे" असा अतिशय सुंदर संदेश देणारी ही कादंबरी आहे. मूळ पोर्तुगीज भाषेत लिहिल्या गेलेल्या या कादंबरीचे ५५ पेक्षा अधिक भाषांमधे अनुवाद झालेले आहेत आणि त्यातीलच नितीन कोत्तापल्ले यांनी केलेल्या मराठी अनुवादित कादंबरीचा हा थोडक्यात परिचय! 

कथेचा नायक आहे स्पेनमधील 'सॅंतियागो' नावाचा एक मेंढपाळ! शिकलेला असूनही भटकंतीच्या माध्यमातून जग पाहता यावं, निरनिराळे अनुभव घेता यावेत म्हणून घरच्यांचा विरोध झुगारून रानोमाळ भटकणाऱ्या मेंढपाळाचा पेशा स्वीकारणारा असा हा सॅंतियागो. रानोमाळ भटकत असला तरी नव-नवीन पुस्तके घेऊन आपल्या पुस्तक वाचनाची हौस जपणारा हा कथेचा नायक. असेच एकदा भटकंतीदरम्यान पडक्या चर्चमधील त्याच्या एका मुक्कामात या कथेची सुरुवात होते. चर्चमधील उगवणारी ती पहाट त्याच्या आयुष्यातील पुढच्या संघर्षाची चाहूल घेऊन येते. पहाटे उठल्यानंतर त्याच्या एक गोष्ट लक्षात येते की काही दिवसांपासून आपल्याला एकाच प्रकारचं, एका खजिन्याबद्दलचं स्वप्न सतत पडत आहे. वारंवार पडणाऱ्या या स्वप्नाचा अर्थ जाणून घेण्यासाठी तरीफा नावाच्या गावातील एका वृद्ध स्त्रीला भेटण्याचा निर्णय तो घेतो. त्या वृद्ध स्त्रीकडून त्याला त्याच्या स्वप्नात दिसणारा खजिना इजिप्तमधे पिरॅमिडजवळ मिळेल असं सांगितलं जातं. इथून सुरुवात होते त्याच्या खजिन्याच्या दिशेने होणाऱ्या प्रवासाची! ज्या प्रवासातून नायकासोबतच वाचकही खूप काही शिकत जातो. आता इजिप्तला कसं जायचं? त्यासाठी लागणाऱ्या पैशांची जुळणा कशी करायची? या विचारात असतानाच त्याची एका वृद्ध माणसासोबत भेट होते, जो खरंतर वेषांतर करुन फिरणारा सालेमचा राजा असतो. राजासोबत चर्चा करत असताना, त्याच्याकडून मिळालेल्या तत्त्वज्ञानाने सॅंतियागोची आपल्या स्वप्नाचा पाठलाग करण्याची इच्छा आणखीनच प्रबळ होते. राजाकडून त्याला इजिप्तला जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते. नंतर इजिप्तला जायचा रस्ता आणि नायकाला निर्णय घेण्यात मदत करू शकतील अशा दोन रत्नांच्या बदल्यात सॅंतियागोच्या मेंढ्यांच्या कळपाचा १० वा हिस्सा राजा ठेऊन घेतो. उरलेल्या मेंढ्या आपल्या मित्राला विकून आलेल्या पैशातून सॅंतियागोची इजिप्तच्या दिशेने वाटचाल चालू होते.

इजिप्तच्या वाटेवरील सॅंतियागोचा पहिला टप्पा असतो आफ्रिकेतील टॅंजिअर, जिथे तो होडीने पोहचतो! इथे नायकाच्या प्रवासाची सुरुवातच त्याला मिळणाऱ्या एका धक्क्याने होते जेव्हा त्याला मदत करण्याचे खोटे आमिष दाखवून एकजण त्याच्याकडील सर्व रक्कम घेऊन पळून जातो. आपल्या स्वप्नाचा पाठलाग करताना मिळालेल्या या पहिल्याच धक्क्याने खचून न जाता सॅंतियागो आफ्रिकेतच एका काचसामानाच्या दुकानात नोकरीस लागतो. स्वतःच्या हुशारीने दुकानातल्या वस्तूंचा खप वाढवतो, आपल्या कामाने दुकानदाराचे मन जिंकून एका वर्षातच इजिप्तच्या प्रवासापुरते पैसे कमवून तो पुन्हा आपल्या स्वप्नाचा पाठलाग चालू करायचं ठरवतो. इजिप्तला जाणारा रस्ता आफ्रिकेच्या वाळवंटातून जात असल्याने काचसामानाचे व्यापारी तांडे जे वाळवंटातून प्रवास करत असतात त्यांच्याबरोबर जायचं तो नक्की करतो. दुसऱ्या टप्प्यात वाळवंटातील या जीवघेण्या प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी त्याची भेट होते किमयागाराच्या शोधासाठी अल फय्यूम मरुद्यानाकडे निघालेल्या रसायनशास्त्राचा अभ्यासक असणाऱ्या एका इंग्लिश माणसासोबत. वाळवंटातील दीर्घ प्रवासात नायकाची त्या इंग्लिश माणसासोबत विविध गोष्टींवर  होणारी चर्चा वाचत असताना वाचकसुद्धा कधी त्यांच्या प्रवासाचा भाग होऊन जातो हे त्याचं त्यालाही नाही समजत. वाळवंटातल्या प्रवासात सँतियागो वाळवंटाची आणि उंटांची भाषा तसेच शकुन-अपशकुन ओळखायला शिकतो. वाळवंटातील दोन जमातींमधे चाललेल्या युद्धात लपत-छपत हा तांडा मरुद्यानात पोहचतो जिथे युद्ध वर्ज्य असते. मरुद्यानात किमयागाराचा पत्ता शोधता असताना सँतियागोची भेट फातिमा नावाच्या तरुणीशी होते. फातिमाच्या प्रेमात आपलं स्वप्न विसरणाऱ्या नायकाला फातिमाच पुन्हा एकदा खजिना शोधण्याच्या त्याच्या स्वप्नाचा पाठलाग करण्यासाठी प्रोत्साहित करते आणि तो परत येईपर्यंत त्याची वाट पाहण्याचं वचन देते. मरुद्यानातील सँतियागोच्या वास्तव्यादरम्यान घडलेल्या काही थरारक घटनांनंतर त्याची शेवटी किमयागारासोबत भेट होते. सँतियागोच्या हुशारीचा, धाडसाचा आणि विश्वाच्या अंतरात्म्याशी एकरुप होणा-या त्याच्या ह्रदयाचा प्रत्यय आल्यानंतर खुश होऊन किमयागार त्याला खजिन्याचा रस्ता दाखवण्याचे कबूल करतो आणि नायकसोबत प्रवास चालू करतो. प्रवासातील या तिसऱ्या टप्प्यात किमयागाराकडून त्याला जीवनाविषयक अनेक तत्वज्ञान शिकायला मिळतात आणि शेवटी सँतियागो जेव्हा त्याच्या ध्येयाच्या जवळ पोहचतो तेव्हा किमयागार त्याचा निरोप घेतो. प्रवासाचा हा अंतिम टप्पा सँतियागोला एकट्यानेच, स्वत:च्या ह्रदयावर विश्वास ठेऊन, शकुन-अपशकुन ओळखून पार करायचा असतो. तो पिरॅमिडपर्यंत पोहचतो का? तिथे पोहोचण्यासाठी त्याला आणखी कोण-कोणत्या गोष्टींचा सामना करावा लागतो? पिरॅमिडजवळ त्याला त्याच्या स्वप्नात दिसणारा खजिना सापडतो का? परत तो त्याच्या मायदेशी येतो की मरुद्यानात फातिमासोबतच राहतो? या व अशा इतरही प्रश्नांची उत्तरे आपल्याला कादंबरीच्या शेवटी मिळतील आणि त्यासाठी या कादंबरीचा अतिशय रंजक प्रवास आपल्याला वाचायला लागेल.

कादंबरीचा शेवट आपल्याला ‘तुझं आहे तुजपाशी, परी तू जागा चुकलासी’ या तुकोबांच्या अभंगातील ओळीची आठवण करून देतो. जीवनाला एक वेगळी दृष्टी देणारी आणि अंतर्मुख करणारी आवर्जून वाचावी अशी कादंबरी "द अल्केमिस्ट"!





संदीप प्रकाश जाधव




"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये