Thursday, March 10, 2022

"रक्तरंजीत वढू - तुळापूर"

 



लेखक : आण्णासाहेब चव्हाण

प्रकाशक : मावळा प्रकाशन

पृष्ठे- १५२, मूूल्य- २२० रुपये                                                                           


२३ नोव्हेंबर २०१३, या तारखेला मी पहिल्यांदा तुळापूरला जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. त्यानंतरही आजतागायत बऱ्याच वेळा महाराजांच्या समाधी दर्शनाचा योग आला पण पहिल्या वेळच्या दर्शनाचा हा दिवस माझ्या आजही अगदी लख्खपणे आठवणीत असण्याचं कारण म्हणजे त्यावेळी झालेली माझी अवस्था! शिवाजी सावंत यांची संभाजी महाराजांवर लिहिलेली "छावा" ही अजरामर कादंबरी नुकतीच मी वाचून पूर्ण केली होती त्यामुळे तुळापूरमधे पाय ठेवताच कादंबरीतील बरेच प्रसंग डोळ्यासमोर यायला लागले, खासकरून संभाजी महाराजांचे औरंगजेबाच्या छावणीतील तुळापूर मधील ते शेवटचे भयानक दिवस! जगाच्या इतिहासात असा एकमेव राजा असेल ज्याने आपल्या पित्याचं स्वप्न पुढं नेण्यासाठी इतका भयानक मृत्यू स्वीकारला! डोक्यात घुमत असलेल्या याच विचारात जेव्हा समाधीला स्पर्श करून मी हात जोडले तेव्हा एकाचवेळी अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणि उरात प्रचंड अभिमान अशी माझी अवस्था झाली होती. आयुष्यात पहिल्यांदाच आलेल्या या अशा अनुभवाने तो दिवस कायमचाच माझ्या मनात कोरला गेला. तुळापूरला जाऊन आल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो लोकांप्रमाणे मलाही काही प्रश्न सतत अस्वस्थ करत होते ते म्हणजे मुकर्रबखानाने संभाजी महाराजांना रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या ठिकाणी पकडल्यानंतर तिथून जवळपास ३०० किलोमीटर दूरवर असणाऱ्या तुळापूरलाच का आणि कसं आणलं असावं? तेही आजूबाजूला मराठयांचं राज्य असताना! संगमेश्वरमधून अटक करून महाराजांना प्रथम बहादूरगड आणि तिथून नंतर ११० किलोमीटरचा प्रवास करून तुळापूरला आणलं गेलं. असं का? औरंगजेबासारख्या अतिशय धूर्त माणसाने संभाजी महाराजांची हत्या करण्यासाठी वढू-तुळापूर या गावाचीच निवड का केली असावी? वास्तविक तुळापूर म्हणजे भिमा-भामा-इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावरील हिंदूंचे एक पवित्र तीर्थक्षेत्र, मुसलमानी साम्राज्याच्या कोणत्याही खाणा-खुणा नसलेलं, कोणताही गड किंवा किल्ला आसपास नसलेलं ठिकाण. मराठ्यांच्या राजाला मारण्यासाठी औरंगजेबाने याच जागेची निवड का केली असावी? संभाजी महाराजांना तुळापूर सारख्या ठिकाणी अशी क्रूर शिक्षा देण्यामागे औरंगजेबाचा आणखीही काही हेतू असावा का? संभाजी महाराजांना पकडून देण्यात स्वराज्यातील आणखी कोण कोण सामील होते? त्याकाळी तुळापूरचं स्वराज्यात काय स्थान होतं? तुळापूरचा इतिहास काय असावा? या सर्व प्रश्नांसोबतच छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्यासाठी केलेल्या बलिदानाच्या अनुषंगाने जे काही इतरही अनेक प्रश्न आपल्या मनात असतील त्याची उत्तरे आण्णासाहेब चव्हाण यांच्या "रक्तरंजीत वढू-तुळापूर" या पुस्तकातून आपल्याला मिळू शकतील. एकूण ३० प्रकरणे आणि १५८ पानांच्या "रक्तरंजीत वढू-तुळापूर" या पुस्तकातून आण्णासाहेब चव्हाण यांनी अगदी मुद्देसूदपणे वढू-तुळापूरचा रक्तरंजीत इतिहास वाचकासमोर मांडला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या अकाली जाण्याने पोरकं झालेलं स्वराज्य आपण सहज जिंकून घेऊ म्हणून मोठ्या दिमाखात दख्खनेत उतरलेल्या दिल्लीपती बादशाहला तब्बल ८ वर्षांपेक्षा जास्त काळ झुंजवत ठेऊन एकही किल्ला हाती लागू न देणारा सिंहाचा छावा जेव्हा मोगलांनी फंदफितुरीने पकडला तेव्हा औरंगजेबाला जणू आकाशच ठेंगणं झालं असणार हे नक्की. परंतु खरं तर हीच औरंजेबाच्या आणि मोगलाईच्या शेवटाची सुरुवात होती. स्वराज्यहितासाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यास तयार नसलेल्या छत्रपती संभाजी महाराजांची औरंगजेबाने ज्या पद्धतीने हत्या केली त्यातूनच उडालेल्या ठिणगीने पुढच्या २७ वर्षांत असं रौद्र रूप धारण केलं ज्यामधे आख्खी मोगलाई जळून खाक झाली. जे दख्खन घ्यायचं स्वप्न उराशी घेऊन औरंजेब दक्षिणेत आला होता त्याच स्वप्नासह तो या जमिनीत गाडला गेला. म्हणूनच कोणत्याही नेतृत्वाशिवाय मराठ्यांनी दिलेला हा लढा इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला. मराठ्यांच्या या देदीप्यमान लढ्याची ठिणगी ज्या जागी पडली ती दोन गावं म्हणजे "वढू-तुळापूर"! 'फाल्गुन वद्य अमावस्या ११ मार्च १६८९, हिंदू नववर्ष पाडव्याची पूर्वसंध्या' हाच तो स्वराज्याच्या इतिहासातील काळा दिवस जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांची "वढू-तुळापूर"मधे हत्या केली. पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक महत्व असलेल्या तुळापूरमधील भीमा-भामा-इंद्रायणीचा त्रिवेणी संगम हा या क्रूर हत्येचा साक्षीदार ठरला. याच नदीच्या काठावर वसलेल्या वढू बु. या गावात संभाजी महाराज आणि कवी कलश या दोघांनाही नंतर अग्नी देण्यात आला. आण्णासाहेब चव्हाणांच्या या पुस्तकाची सुरुवात होते "वढू-तुळापूर"च्या प्राचीन इतिहासाने. पुढे एक-एक प्रकारणांमधून त्यांनी संभाजी महाराजांच्या तुळापूरातील हत्येपूर्वी आणि त्यानंतरही घडलेल्या बऱ्याच घटनांचा अगदी मुद्देसूद मागोवा घेतला आहे. तुळापूरचं हिंदू संस्कृतीमधील ऐतिहासिक महत्त्व सांगत असतानाच पंडित मुरारी जगदेवचं मोगलांना सामील असणं, शहाजी राजांचा इतिहास आणि त्यांचं तुळापूरशी असणारं नातं, निजामशाहीचा शेवट, शिवाजी महाराजांचा दरारा, कवी कलश आणि संभाजी महाराजांचं नातं, गणोजी शिर्के आणि त्याने मोगलांना स्वराज्याविरोधात केलेली मदत, पकडल्यानंतर महाराज आणि कवी कलशांची काढलेली धिंड, बहादूरगडावरून वढू-तुळापूरला जाण्याचा निर्णय घेण्यापूर्वी औरंगजेबाने फितूर मराठा सरदारांशी केलेली चर्चा, हत्येनंतर मोगलांकडून संभाजी महाराजांच्या प्रेताची केलेली चेष्टा, वढू-तुळापूरच्या गावकऱ्यांनी संभाजी महाराज आणि कवी कलशांना मृत्यूनंतर दिलेला अग्नी, त्यानंतर पेटून उठलेल्या मराठयांनी उघडलेल्या अनेक आघाड्या, संताजींची मोगलांवर पसरलेली दहशद आणि त्यांनी थेट औरंगजेबाच्या छावणीवर केलेला हल्ला, संभाजी महाराजांचे पुत्र छत्रपती शाहू महाराज यांच्याकडून तुळापूरला येऊन आपल्या वडिलांच्या समाधीची केली गेलेली बांधणी, होळकर घरण्याकडून तुळापूरातील शिवमंदिरांचा झालेला जीर्णोद्धार, संभाजी महाराजांच्या समाधीखालील ताम्रपत्रांचा अनुवाद, क्रूरकर्मा औरंगजेबाविषयी थोडक्यात माहिती आणि शेवटी शंभुवंदना यांसारख्या अनेक विषयांना स्पर्श करत आण्णासाहेब चव्हाण यांनी अतिशय वाचनीय पुस्तक आपल्यासमोर आणलं आहे.

प्रत्येकाने एकवेळ अवश्य वाचावं असं पुस्तक "रक्तरंजीत वढू तुळापूर"!





संदीप प्रकाश जाधव

No comments:

Post a Comment

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये