लेखक : दुर्गा भागवत
प्रकाशक : मौज प्रकाशन
पृष्ठे- १११, मूूल्य- १५० रुपये
वाल्मिकींचं "रामायण" आणि व्यासांचं "महाभारत" ही भारतीय संस्कृतीतील महाकाव्येच! या दोन्हींकडे भारतीय इतिहास म्हणून बघा अथवा महाकाव्य, जितक्या वेळा यांचा अभ्यास केला जातो त्या प्रत्येक वेळी यांतून नवीन काहीतरी बोध होतोच. इरावती कर्वे यांचं "युगान्त" हे आधुनिक काळात झालेल्या संशोधनाच्या आधारे महाभारतातील पात्रांची नव्याने ओळख करून देणारं पुस्तक मी काही दिवसांपूर्वी वाचलं होतं. इरावती कर्वे यांनी कोणत्याही प्रकारचं देवपण न देता स्वतःच्या नजरेतून विश्लेषण करून प्रत्येक पात्राचं एक नवीनच रूप आपल्यासमोर उभं केलं आहे, जे वाचकाला विचारात पाडतं. आज बऱ्याच दिवसांनी पुन्हा एकदा महाभारतातील पात्रांवरच लिहिलं गेलेलं "व्यासपर्व" हे दुर्गा भागवत यांचं पुस्तक वाचण्याचा योग आला. "युगान्त" आणि "व्यासपर्व" यांतील फरक सांगायचं म्हटलं तर "युगान्त"मधे कर्वे यांच्या नजरेतून महाभारतातील पात्रांची आपल्याला ओळख होते तर "व्यासपर्व" ही महर्षी व्यासांनी त्यांचं हे महाकाव्य लिहिण्यापूर्वी त्यातील पात्रांबद्दल काय विचार करून ती पात्रे या काव्यात उतरवली असतील हे भागवत यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारतातील पात्रांची असणारी पारंपारिक ओळख पुसून टाकणारा वेध त्यांनी या पुस्तकातून घेतला आहे. हे करत असताना दुर्गा भागवत यांनी महाभारतातील १० महत्वाच्या पात्रांना डोळ्यासमोर ठेऊन लिहिलेलं आहे. तसं पाहिलं तर महाभारतातील कोणत्याही पात्राकडे पाहिलं तर आपल्याला त्याच्याभोवती नेहमी एक वेगळंच वलय जाणवत राहतं. व्यासांनी त्यांच्या काव्यात प्रत्येक पात्राचा समावेश जणू काही खास कारणासाठीच केला आहे असं वाटावं इतकी ही सर्व पात्रे एकमेकांत गुंतलेली आहेत आणि हाच धागा पकडून दुर्गा भागवत यांनी काही ठराविक पात्रांच्या आयुष्यावर प्रकाश टाकला आहे. कृष्ण, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, दुर्योधन, कर्ण, अर्जुन, युधिष्ठिर, भीष्म, विदुर आणि द्रौपदी या पात्रांची नव्याने ओळख करून देत असतानाच सोबत इतरही काही पात्रे जशी धृतराष्ट्र, नकुल, सहदेव यांचाही या काव्यातील समावेश कशासाठी असू शकतो हेदेखील थोडक्यात सांगितलं आहे. पुस्तकातील बरेचसे शब्द सामान्य वाचकांना प्रथमच वाचनात किंवा ऐकण्यात येणारे असले तरी वाचक भागवत यांच्या सोबत शेवटपर्यंत टिकून राहतो हे त्यांनी केलेल्या विश्लेषणाचं सर्वांत मोठं यश आहे. आणि त्यामुळेच की काय पुस्तक वाचून झाल्यानंतर महाभारतातील या पात्रांसोबतच इतरही पात्रांविषयी आणखी जाणून घेण्याची आपली इच्छा होत राहते.
पहिलं प्रकरण आहे महाभारतातील अतिशय गूढ आणि केंद्रस्थानी असणारं व्यक्तिमत्व अर्थातच कृष्णाचं! "पूर्णपुरुष कृष्ण" या प्रकरणात भागवत यांनी कृष्णाच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक घटनेची, अवस्थेची आणि कृष्णाने घेतलेल्या बऱ्याच निर्णयांची संगत मांडली आहे. आयुष्यातील एक अवस्था अथवा घटना घडून गेल्यानंतर वास्तवाचे भान ठेवून त्या होऊन गेलेल्या गोष्टींकडे कधीही मागे न वळून पाहणाऱ्या कृष्णामुळेच खरंतर महाभारताचं कथानक वेगाने पुढं सरकतं. कृष्णाच्या प्रत्येक कृतीतून भागवत यांनी मानवी जीवनाचे सत्य मांडलं आहे. पुढे "मोहरीतील ठिणगी" या प्रकरणातून द्रोणाचार्यांचं एक वेगळंच रूप आपल्यासमोर येतं. गुरुदक्षिणेच्या नावाखाली एकलव्यासारख्या अर्जुनापेक्षा सरस धनुर्धराचे पंख छाटणारे द्रोण, अर्जुन आणि इतर शिष्यांपासून लपवून आपल्या मुलाला अधिकचं शिक्षण देणारे द्रोण आपल्याला विचार करायला लावतात. या प्रकरणातून द्रोणाचार्यांच्या मनात निपजलेला हिनतेचा एक वेगळाच पैलू आपल्या समोर येतो. द्रुपदाकडून झालेला अपमान, आपला लहान मुलगा अश्वत्थाम्याचं दुधासाठी होणारं हाल अशा आपल्यासोबत घडलेल्या काही घटनांतून द्रोणाचार्यांच्या स्वभावात होणारं परिवर्तन मानवी आयुष्यालासुद्धा तंतोतंत लागू होतं. द्रोणाचार्यांच्या या स्वभावामुळे जे दु:ख एकलव्याच्या वाट्याला आलं, जी भळभळती जखम घेऊन आजही अश्वत्थामा वणवण भटकतोय त्याला जबाबदार असणारे द्रोणाचार्य आयुष्यात कधीच सफल होत नाहीत. एक गुरू किंवा पिता म्हणून ते नेहमीच कुठे ना कुठे कमी पडतात. द्रोणाचार्यांचं हेच अतिशय किचकट असं पात्र भागवत यांनी थोड्या वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने वाचकांसमोर आणलं आहे. द्रोणाचार्यांच्या अशा स्वभावाचा अश्वत्थाम्याच्या आयुष्यावर होणारा परिणाम "कोंडलेले क्षितिज" या तिसऱ्या प्रकरणात दिसतो. अतिशय पराक्रमी असूनही अश्वत्थामा महाभारतात एकप्रकारे चोहोबाजूंनी कोंडलेलं आयुष्यच जगला. स्वतःमध्ये असणाऱ्या शक्तीचा अंदाज नसणारा, आपली बुद्धी नेहमी अयोग्य मार्गानेच चालवणारा, पराक्रमी असूनही नेहमी वाईट गोष्टींमध्येच ज्याच्या नावाचा उल्लेख होतो, अंध मातापित्यांच्या लाडात वाढलेला दुर्योधन "व्यक्तिरेखा हरवलेला माणुस" या प्रकरणातून स्वतःची एक वेगळी ओळख घेऊन येतो. दुर्योधनाचा परममित्र, सर्व असूनही सर्वांत एकाकी असणाऱ्या, कुंतेय असूनही सुतपुत्र म्हणवणाऱ्या कर्णाच्या जीवनाचा आढावा भागवत यांनी "एकाकी" या चौथ्या प्रकरणातून घेतला आहे. कर्ण आपल्यासमोर आणत असताना कर्णाने केलेल्या चुका आणि त्या चुकांचा त्याच्या आयुष्यावर झालेला परिणाम वाचकाला खूप काही शिकवून जातो. परंतु अशा चुकांसोबतच कर्णाची दुसरी बाजूही भागवत सांगायला विसरत नाहीत. कृष्णाने अगदी द्रौपदीचा मोह दाखविला तरी तो दुर्योधनाशी असलेल्या आपल्या मैत्रीच्या वचनाला जागतो. तर दुसऱ्या बाजूला स्वतःचे संरक्षण करणारी कवचकुंडले दान करून स्वतःचा दानशूरपणा सिद्ध करतो. कवचकुंडलांशिवाय आपल्यासोबतच आपल्या परममित्राचा पराभव होणं अटळ आहे हे माहीत असूनही कर्ण मागे हटत नाही. अस्सल हिऱ्याची लकाकी असणारा कर्ण शेवटपर्यंत "एकाकीच" राहतो. "परिकथेतून वास्तवाकडे" या प्रकरणातून भागवतांनी अर्जुनाचे व्यक्तिमत्व मांडलं आहे. कुंतिचा पुत्र, पांडवातला उत्कृष्ट धनुर्धर, द्रौपदीचा प्रियकर, कृष्णाचा प्राणसखा अशा अर्जुनाच्या पारंपरिक व्यक्तीमत्वाला छेद देणारं हे या प्रकरणातील विश्लेषण! पांडवांचा जेष्ठ बंधू, वचनाला जागणाऱ्या, धर्माने आणि न्यायाने वागणाऱ्या युधिष्ठिराची प्रतिमा व्यासांनी महाभारतात ज्या पद्धतीने रंगवली आहे त्या प्रतिमेला छेद देणारं विश्लेषण भागवत यांनी केलं आहे "मुक्त पथिक" मधून. पूर्णत्वाचा भोक्ता असणारा युधिष्ठिर पांडवांच्या प्रत्येक क्रियेमागे जाणवतो. कधी तो प्रोत्साहक म्हणून तर कधी न पटणाऱ्या गोष्टींचा विरोधक म्हणून. कौरव आणि पांडव या दोघांनाही आदरणीय असणारं महाभारतातील एक भारदार व्यक्तिमत्त्व म्हणजे 'भीष्म'! "अश्रु हरवल्यावर" या प्रकरणात भीष्माबद्दलचं विश्लेषण केलेलं आहे. या प्रकरणातून इतर पात्रांपेक्षा असणारी भीष्माची उंची सतत जाणवत राहते. भीष्मासोबतच महाभारतातील आणखी एक दुर्लक्षित पात्र विदुर, भागवतांनी ज्याचं विश्लेषण केलं आहे "माणसांत विरलेला माणूस" या प्रकरणात. एकाच पित्याची संतान असुनही दासीपुत्र म्हणूनच आयुष्य काढणाऱ्या विदुराने सत्याची कास शेवटपर्यंत सोडली नाही. पुस्तकातील शेवटचं प्रकरण आहे द्रौपदीचं! खरंतर "कामिनी" या नावावरून सुरुवातीला काहीच बोध न होणाऱ्या या प्रकरणातून भागवतांनी द्रौपदीची कथा आणि व्यथा दोन्ही मांडण्याचा प्रयत्न केला आहे. द्रौपदी हे महाभारतातील एक असं पात्र आहे की जिचे दु:ख कधीच कळूनही मांडता येत नाही. सर्वकाही मिळुनही शेवटी रिकामी झोळी घेऊन जिवंतपणीच जळत रहाणारी जणू ही एक शापित स्त्रीच!
महाभारतावर लिहिलेल्या बऱ्याच चिंतनपर पुस्तकांपैकी आवर्जून वाचावं असं एक पुस्तक "व्यासपर्व"!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment