Thursday, April 28, 2022

"पडछाया"

 



लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन

पृष्ठे- २४६, मूूल्य- ३०० रुपये


"अघटित" हा नारायण धारपांचा मी वाचलेला पहिला भयकथासंग्रह! भयकथा असोत की गूढकथा त्यांची परिणामकारकता लेखकाच्या कल्पनाशक्तीवर तसेच कथांच्या मंडणीवरच अवलंबून असते आणि या दोन्हीही बाबतीत नारायण धारप यांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल इतक्या त्यांच्या भयकथा-कादंबऱ्या परिणामकारक असतात. विषय साधेच पण प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर अशा विषयांची कथेत केलेली मांडणी वाचकाला त्यांच्या लेखनाच्या प्रेमात न पाडते तरच नवल. एखाद्या व्यक्तीला ठराविक साहित्य वाचनाचीदेखील 'चटक' लागू शकते याचा प्रत्यय मला खरंतर धारप आणि मतकरी यांच्या पुस्तक वाचनातून आला. माझ्या नेहमीच्या वाचनातून थोडासा बदल म्हणून जर मी कोणती पुस्तके वाचत असेल तर ती धारप आणि मतकरींचीच! "अघटित"नंतर धरपांची पुस्तके शोधून संग्रही घेण्याचा मी सपाटाच लावला आहे. आज नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांची जवळपास २०हून अधिक पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि हा आकडा अजून वाढत जाईल यात शंकाच नाही. तर "अघटित"पासून धारपांसोबत चालू झालेल्या या माझ्या प्रवासात पुढे त्यांची "चेटकीण", "लुचाई", "वेडा विश्वनाथ", "स्वाहा", "देवाज्ञा", "ग्रहण" अशी एकाहून एक दर्जेदार पुस्तके मी वाचून काढली. प्रत्येकवेळी आलेला अनुभव खासच! या सर्व पुस्तकांच्या पंक्तीत आज आणखी एका उत्कृष्ठ कथा संग्रहाची भर पडली आणि तो म्हणजे "पडछाया"! "पडछाया" चा शब्दशः अर्थ "प्रतिबिंब"! १० वेगवेगळ्या कथांचा हा संग्रह आणि प्रत्येक कथेचा विषय वाचकाला खिळवून ठेवणारा असा आहे. आपल्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर धारपांनी प्रत्येक कथेमधून जी "पडछाया" वाचकांसमोर आणली आहे ती वाचकाला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. कथा साध्याच पण जबरदस्त परिणामकारक! वाचत असताना धारपांच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. पुस्तकातील पहिलीच कथा आहे "पडछाया" जी फिरते वामन या नायकाभोवती. पुण्यातील आपल्या वाड्यातून पळून गेलेला किशोरवयीन वामन जेव्हा जवळपास १८ वर्षांनी पुण्यात परत येतो त्यानंतर सुरुवात होते या कथेची. वामनच्या परत येण्याची १८ वर्षें वाट बघणारी त्याची मैत्रीण उर्मिला हे या कथेतील आणखी एक पात्र. १८ वर्षांपूर्वीच्या वामनची त्याच्या वाड्यात वावरणारी "पडछाया" आणि आज वर्तमानकाळात जगणारा वामन यांच्या संघर्षाची ही कथा जी प्रत्यक्ष वाचताना अंगावर शहारे आणते. दुसरी कथा आहे "मुक्ती"! खरंतर नावावरूनच वाचकाला कथेचा थोडाफार अंदाज येतो. या कथेचा नायक आहे नारायण आणि ही कथा आहे नायकाची बालमैत्रिण कमलच्या मृत्यूनंतरच्या "मुक्ती"ची! रस्तारुंदीकरणात आपला जुना वाडा पाडला जाणार म्हणून जवळपास ३० वर्षांनी वाड्याला शेवटची भेट देण्यासाठी म्हणून आलेल्या नारायणला त्या वाड्यात जाणवणारी कमलची "पडछाया" आणि फ्लॅशबॅकमधे कमलच्या मृत्यूचा होणारा उलगडा, नंतर नारायणकडून कमलला मिळणाऱ्या "मुक्ती"ने होणारा कथेचा शेवट. "तो कोण होता?" ही थोड्या वेगळ्या अंदाजाने सुरुवात होणारी या संग्रहातील तिसरी कथा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करणारा एक लेखक आणि त्याची पत्नी विमल ही या कथेतील महत्वाची पात्रे. आपल्या पत्नीच्या "पडछाये"सोबत राहणारा आणि शेवटी स्वतःचेच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणारा हा नायक कथेच्या शेवटी वाचकालादेखील संभ्रमात टाकतो. "मन मोहाचे घर" ही चौथी कथा आहे शेखरची. एक मेल प्रॉस्टिट्यूट होऊन चैनीत आयुष्य जगणाऱ्या शेखरचं आयुष्य त्याच्या लग्नानंतर अचानक वादळी होतं आणि त्यातूनच त्याच्या हातून त्याच्या पत्नीचा खून होतो. पुढे त्याच्या पत्नीच्या "पडछाये"कडून घेतल्या गेलेल्या सूडाने या कथेचा शेवट होतो. धारपांनी या कथेतून निर्माण केलेली वातावरण निर्मिती अफलातून आहे. यानंतरची कथा आहे "तितू"! चित्रा ही या कथेची नायिका आणि प्रभाकर हा नायक. आपल्या सावत्र आईकडून  फसवून प्रभाकरसोबत लग्न लावून दिलेल्या चित्राचा प्रभाकरला दिसणाऱ्या "तितू"नामक "पडछाये"सोबत होणारा संघर्ष म्हणजे ही कथा. हे "तितू" काय प्रकरण आहे आणि त्याचा उद्देश काय आहे याचा उलगडा कथेच्या शेवटी प्रभाकरच्या मृत्यूनंतर होतो, तोदेखील फक्त चित्रापुरताच! लोकांच्या नजरेत वेड्याच्या इस्पितळात दाखल झालेला प्रभाकर हा खरंतर आता जिवंतच नाहीये याची चित्राला होणारी जाणीव आणि इथेच वाचकाला विचारात पाडून होणारा कथेचा शेवट. एका नवकवीच्या संघर्षाची ६वी कथा आहे "मोहन किरपेकर - एक शोकांतिका". चेटूक करून आपल्याच पतीचा जीव घेणाऱ्या बेबीची कथा आहे "चेटकिण". स्वतःच्या आईची मावशी म्हणून जगाला ओळख सांगणाऱ्या बेबीच्या बऱ्याच वर्षांनी आपल्या बालमैत्रिण सुमनसोबत अचानक होणाऱ्या भेटीने या कथेची सुरुवात होते. पुढे फ्लॅशबॅकमध्ये लहानपणी बेबीकडून घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून लेखकांनी वाचकाला बेबीबद्दल विचार करायला भाग पाडलं आहे. या संग्रहातील इतरही कथा "बळी", "चौरस्ता", "अनाहूत" अतिशय दर्जेदार आहेत. प्रत्येक कथेत असणारं वेगळेपण आणि तरीही या सर्व कथांमध्ये असणारा सामाईक धागा "पडछाया" वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतात. या संग्रहातील ८वी कथा "बळी" ही अलीकडेच येऊन गेलेला चित्रपट "तुंबाड" ची आठवण करून देते. जवळपास याच कथानकावर बेतलेला हा चित्रपट जर आपण पहिला असेल तर धारपांनी लिहिलेल्या कथांचा आणि त्यांच्या जबरदस्त कल्पनाशक्तीचा आपण अंदाज लावू शकतो.

कथानकात पुढे काय होईल याची उत्सुकता कायम ठेवत, वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवत त्याला त्या वतावरणाचाच एक भाग बनवणाऱ्या नारायण धारप यांचा एक वाचनीय कथासंग्रह "पडछाया"!




संदीप प्रकाश जाधव

                                                                           

Wednesday, April 20, 2022

"अधर्मयुध्द"

 


लेखक : गिरीश कुबेर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- २४४, मूूल्य- ३०० रुपये                                                              



गिरीश कुबेर यांच्या लेखनाबद्दल बरंच ऐकलं होतं आणि त्याच उत्सुकतेतून त्यांची काही पुस्तकेही खरेदी केली. त्यातीलच आज वाचून पूर्ण झालेलं एक उत्कृष्ट पुस्तक "अधर्मयुद्ध"! खरंतर त्यांचं "अधर्मयुद्ध" हे पुस्तक मी फक्त नाव आणि मुखपृष्ठ पाहूनच निवडलं होतं. गिरीश कुबेरांच्या या पुस्तकाने मला माझी निवड न चुकल्याचा आनंद आणि एक वेगळं तसंच आपल्या ज्ञानात भर घालणारं काहीतरी वाचायला मिळाल्याचं समाधान मिळवून दिलं. पुस्तकाचं नाव जरी "अधर्मयुद्ध" असलं तरी 'धर्म-अधर्माचा" कोणताही बाऊ न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष आपल्यासमोर आणणारी ही एक शोधकथा किंवा रहस्यकथा म्हटले तरी चालेल. ही कथा जितकी वाचकाला चीड आणते तितकीच ती अस्वस्थही करते. गिरीश कुबेरांनी एक अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचा विषय तितक्याच सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणला आहे. आज सारं जग त्यांना धर्मांध, माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठ्या लष्करी मोहिमा आखल्या जातात. त्यांच्या हातातलं इस्लामचं निशाण पाहून किंवा त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे, समज-गैरसमज पसरवले जातात. भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणार्‍या अशा दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळ्यांप्रमाणे नाचवणार्‍या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच! गिरीश कुबेर यांचं हे पुस्तक म्हणजे या इस्लामी दहशतवादाचा इतिहास आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. आज जगभर ज्या इस्लामी दहशतवादाने थैमान घातलं आहे तो नेमका कधी, कसा, कुणी जन्माला घालून वाढवला याचं अतिशय विस्तृत वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. आखाती देशात जन्माला आलेल्या आणि हळूहळू जगभर आपले हातपाय पसरलेल्या या इस्लामिक दहशतवादाचा मागोवा घेत असताना काही धर्मांध व्यक्तींनी शांतताप्रिय अशा इस्लामचा स्वतःच्या फायद्यासाठी हवा तसा अर्थ लावून त्याचं रूपांतर दहशतवादाच्या अधर्मयुद्धात कस केलं याचीच ही कहाणी "अधर्मयुद्ध"! जेव्हा धर्मकारण हेच राजकारण आहे असे विचार लोकांच्या मनावर वर्षानुवर्षे बिंबवले जातात आणि एखाद्या देशाच्या, समाजाच्या राजकारणाचा गाडा धर्मकारण खेचू लागते तेव्हा सुरु होणारं "अधर्मयुद्ध" म्हणजेच दहशतवाद हे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न गिरीश कुबेर यांनी या पुस्तकातून केला आहे जो नक्कीच प्रशंसनीय आहे. अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर सध्या अफगाणिस्तानवर वेगाने कब्जा मिळवत असलेलं 'तालिबान', काही महिन्यांपूर्वी इस्राईलवर हजारो रॉकेट्सचा मारा करणारं 'हमास' या सगळ्या इस्लामिक दहशतवादी संघटनांविषयी ऐकलं तर आपल्या मनात प्रश्न येतात की या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली असावी? इस्लामची विचारधारा जरी सुरुवातीपासून आक्रमक व असहिष्णु असली तरी आधुनिक काळातील 'जिहादी' इस्लामच्या विचारधारेची सुरुवात कशी झाली? अशा अनेक प्रश्नांच्या खोलात जात असताना लेखकांनी अगदी इतिहासातून म्हणजे वहाबी आणि इब्न सौद यांची युती होऊन एक संपूर्ण देश कसा तयार झाला इथून पुस्तकाची सुरवात केली आहे. ज्यामधे पुढे ब्रदरहूडची स्थापना, ऑटोमन साम्राज्याचा झालेला ऱ्हास आणि त्यातून आपल्या ताटात काहीतरी पडावे म्हणून इंग्लड व इतर युरोपातील राष्ट्रांची चाललेली धडपड, विस्तारवादी भूमिकांमुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी चालणारं जागतिक पातळीवरील राजकारण अशा विषयांवरदेखील आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. आजही जगातील जवळपास सर्व दहशतवादी संघटनांची नाळ कुठे ना कुठे या ब्रदरहूड संघटनेशी जुळते यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की या संघटनेची व्याप्ती किती मोठी आहे. इजिप्तची क्रांती, अमेरिकेची दुट्टपी भूमिका त्यातून त्यांना स्वतःला बसलेल्या झळा, आजची गाझा पट्टी म्हणजे जगातील सर्वात असुरक्षित आणि संवेदनशील जागा कशी झाली, शीतयुद्धाच्या अफगाणिस्तानला बसलेल्या झळा आणि त्यातून आजअखेर उभारी घेऊ न शकलेला हा देश, दहशवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवणारी अफूची शेती या सर्व विषयांचं अतिशय मुद्देसूद विवेचन गिरीश कुबेर यांनी केलेलं आहे. आपल्या स्वार्थासाठी जागतिक राजकारणात अमेरिकेने वेळोवेळी विविध दहशतवादी संघटनांना मदत केली, त्यांना पाठीशी घातलं आणि आज हाच दहशतवाद अख्ख्या जगाला धोकादायक ठरतो आहे ज्यातून खुद्द अमेरिकासुद्धा नाही सुटू शकली. स्वतःच पेरलेल्या कडू फळाची चव आज अमेरिकाही घेते आहे. एकेकाळी दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना व्हाईट हाऊसवर चर्चेला बोलावणारी, ओसामाला व अल् कायदाला प्रोत्साहन देणारी अमेरिका ९ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याने खडबडून जागी झाली. इस्लामी देशांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला. याचं सर्वांत चांगलं उदाहरण इराकचं देता येईल. स्वतःला 'लोकशाहीचा पुरस्कर्ता' म्हणवणाऱ्या अमेरिकेने 'कोणालातरी धडा शिकवायचाच' या हेतूने खोटे पुरावे दाखवून खोट्या आरोपांखाली तुलनेनं धर्मनिरपेक्ष अशा इराकच्या सद्दाम हुसेनच्या राजवटीचा घोट घेतानाही मागेपुढे पाहिले नाही. यातून इराकमध्ये जी अस्थिरता निर्माण झाली त्यातून तो देश आजतागायत सावरू शकला नाही. असंच उदाहरण म्हणून अफगाणिस्तानकडेही पाहता येईल. सद्दामनंतर इराकमध्ये 'आयसिस'चा उदय झाला तर अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी राजवट चालू झाली. ज्यांच्या क्रूरतेच्या कहाण्या ऐकून वाईट वाटतं. गिरीश कुबेर यांनी अमेरिकेच्या या बोटचेपी आणि दुटप्पी भूमिकेवरदेखील या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे जे वाचत असताना या तथाकथित जागतिक महासत्तेबद्दल आपल्या मनात चीड निर्माण होते. यासर्वांसोबतच आखाती देशात चालू झालेल्या तेलाच्या राजकारणावरसुद्धा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. लेखकांनी पुस्तकात केलेली इस्लामी जगातील दहशतवादाची अनेक वर्णनं वाचकांना थक्क करून सोडतात. 'धर्म ही अफूची गोळी आहे' या कार्ल मार्क्सच्या वाक्याला सप्रमाण सिद्ध करणारं हे एक उत्कृष्ट पुस्तक "अधर्मयुद्ध"!

धर्माचा वापर करून, धर्माला अधर्माच्या वाटेवर घेऊन जाणारं हे "अधर्मयुद्ध" कशाप्रकारे सुरू झालं, याचा सुरुवातीपासूनचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आवर्जून वाचावं असं गिरीश कुबेर यांचं हे पुस्तक "अधर्मयुद्ध"!






संदीप प्रकाश जाधव


Tuesday, April 12, 2022

"भाऊ परतौनी आला"

 


लेखक : संजय सोनवणी

प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन

पृष्ठे- १२४, मूूल्य- १६० रुपये                                                                         


खरंतर इतिहासाला आपण कधीच आव्हान नाही देऊ शकत, एका ठराविक वेळेनंतर जे घडलंय ते असंच घडलं असेल किंवा घडलं असू शकेल अस मान्य करूनच त्या घटनांकडे पहावं लागतं. परंतु असं असलं तरी आज इतिहासात डोकावताना अशा बऱ्याच घटना आपल्या समोर येतील जिथे अजूनही आपले विचार थांबतात, आपण एका ठाम मताला पोहचूच शकत नाही. याचं सर्वांत मोठं आणि भल्याभल्यांची मती गुंग करणारं उदाहरण म्हणून शिवाजी महाराजांनी आग्ऱ्याहून औरंगजेबाच्या कैदेतून संभाजी महाराज आणि आपल्या इतर साथीदारांसोबत केलेलं यशस्वी पलायन या घटनेकडे पाहता येईल. आज तब्बल ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ लोटून गेला तरीही आपण एका ठाम मताला नाही पोहचू शकलो की आग्ऱ्यातून महाराज नक्की कसे निसटले. आग्ऱ्यातील या वादळी घटनेनंतर जवळपास ९५ वर्षांनी आणखी अशी एक घटना इतिहास घडली ज्याबद्दल अजूनही संभ्रम आहे. आणि ती घटना म्हणजे पानिपतात अब्दालीसोबतच्या महासंग्रामात सदाशिवराव पेशवा अर्थातच भाऊसाहेब पेशवा यांचं रणभूमीवरुन नाहीसं होणं आणि तब्बल १३ वर्षांनी दख्खनेत पुन्हा प्रकट होणं. सदाशिवरावांच्या अशा इतक्या वर्षांनी अचानक प्रकटल्याने त्यावेळच्या राजकारणात उडालेला धुरळा आणि आपल्याच लोकांकडून तोतया ठरवून त्यांना दिलेल्या देहदंडाच्या शिक्षेने झालेला या सर्वाचा शेवट. पण खरंच ही घटना इतकी साधी आणि सहज बाजूला ठेऊन पुढे जाण्यासारखी आहे का? मातृभूमीच्या संरक्षणासाठी अब्दालीसोबत लढलेले पानिपतचे युद्ध म्हणजे मराठा साम्राज्याच्या डोक्यावरची भळभळती जखमच. पेशव्यांच्या काळात अटकेपार गेलेल्या मराठा साम्राज्यास पानिपतच्या युद्धातील पराभवानंतर उतरती कळा लागली. पेशव्यांच्या गादीचे उत्तराधिकारी असलेले विश्वासराव युद्धात धारातीर्थी पडले. पानिपतावर सैन्याचे सेनापती म्हणून गेलेले सदाशिवराव भाऊ युद्धाच्या धामधूमीत कुठे गायब झाले हे कोणालाच समजले नाही. नानासाहेब पेशव्यांना काशीराजकडून आलेल्या पत्रात विश्वासराव आणि सदाशिवभाऊ यांच्यावर अंत्यसंस्कार झाल्याचे कळवण्यात आले होते. बऱ्याच लोकांचा आणि साक्षात भाऊंच्या पत्नी पार्वतीबाईंचा असा विश्वास होता की भाऊ अजूनही जिवंत आहेत त्यामुळे अनेक ठिकाणी सदाशिवराव भाऊंचे तोतया प्रकटले होते. यातील एखादा तोतया खरेच सदाशिवराव भाऊ नसेल कशावरून? राघोबादादांसोबत एकाहून एक पराक्रम करत अटकेपार गेलेले भाऊ खरंच पानिपतात कामी आले असतील की ते खरंच परत आले असतील? त्यांच्या अनुपस्थितीत १३ वर्षांमधे बदलेल्या राजकारणाचा ते कशावरून बळी ठरले नसतील? कशावरून त्यांना तोतया ठरवून परस्पर शिक्षा नसेल दिली? जर खरंच परत आलेली व्यक्ती तोतया होती तर पानिपतच्या युद्धानंतर भाऊ गेले असं समजून त्यांचं श्राद्ध घातल्यानंतरसुद्धा आपल्या कपाळी कुंकू लावून त्यांची वाट पाहणाऱ्या पार्वतीबाईंसमोर त्यांना का नाही उभं केलं गेलं? का नाही पार्वतीबाईंसमोर त्या तोतयाची शहानिशा केली गेली? ती व्यक्ती जर खरंच तोतया होती तर कोकणातून पुण्यावर स्वारी करताना इतकं मोठं सैन्य त्याच्या सोबत का उभं राहिलं? असे एक ना अनेक प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. पानिपतच्या युद्धात सदाशिवराव भाऊ वाचले होते याचा खरंतर कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही पण 'तोतयाचे बंड' हे प्रकरण पेशवेकाळात खूप गाजले होते. सुखलाल नावाचा कनोजी ब्राह्मण माधवराव पेशव्यांच्या काळात सदाशिवराव भाऊंचा तोतया म्हणून प्रकट झाला होता आणि काही कारस्थानी लोकांच्या मदतीने त्याने पेशवाई विरुद्ध बंड पुकारले होते याचे ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत, तोच धागा पकडून संजय सोनवणी यांनी  ऐतिहासिक घटनेला कल्पनेची जोड देऊन लिहिलेली ही कादंबरी आपल्याला विचारात नक्कीच पाडते. कथा काल्पनिक असली तरी बरेचसे ऐतिहासिक संदर्भ लेखकांनी यामधे दिलेले आहेत. संजय सोनवणी यांची १२४ पानांची, एकाच बैठकीत वाचून पूर्ण होणारी "भाऊ परतौनी आला" ही छोटेखानी कादंबरी ज्या वादग्रस्त 'तोतया प्रकरणावर' बेतली आहे तो सदाशिवराव भाऊंचा पानिपत पासून पुण्यापर्यंतचा एक काल्पनिक प्रवास आहे! हा प्रवास इतिहास म्हणून न पाहता एक कलाकृती म्हणून पहिला तर वाचकाला नक्कीच एक वेगळी सफर घडवून आणतो.

संजय सोनवणी यांची एक वाचनीय कलाकृती "भाऊ परतौनी आला"!





संदीप प्रकाश जाधव



Tuesday, April 5, 2022

"शहीद"

 



लेखक : कुलदीप नय्यर

प्रकाशक : रोहन प्रकाशन

मराठी अनुवाद : भगवान दातार

पृष्ठे- २१४, मूूल्य- ३०० रुपये




सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है|

देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है|

वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ|

हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है|

 

अवघ्या २३ वर्षांच्या आयुष्यात देशासाठी हसत हसत फासावर चढलेल्या आणि इतक्या कमी वेळात अख्या ब्रिटिश साम्राज्याला हादरे देऊन स्वतःची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या भगतसिंगांसारख्या व्यक्तीचं चरित्र खरं तर २१४ पानांमध्ये मांडणं अशक्यच! पण तरीही कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या "शहीद" मधून ज्या पद्धतीने भगतसिंग यांचं चरित्र आपल्यासमोर मांडलं आहे त्याला तोड नाही. भगवान दातार यांनीही तितक्याच ताकदीने याचं मराठी अनुवादन केलं आहे. खरं तर दोन व्यक्तींची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही पण तरीही "शहीद" वाचत असताना राहून राहून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर येत होती आणि नकळत दोघांनी दिलेल्या बलिदानांचे विचार डोक्यात नाचू लागले. या दोन्ही बलिदानांची तुलना जरी होऊ शकत नसली तरी उद्देश मात्र एकच होता तो म्हणजे स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन लोकांच्या मनातील स्वातंत्र्याच्या, क्रांतीच्या ठिणगीचे वणव्यात रूपांतर करणे. एक छोटीशी माघार कदाचित त्यांचं आयुष्य वाचवू शकली असती पण परकीय सत्तेविरुद्ध लोकभावना तयार होण्यासाठी हसत हसत मृत्यूला सामोरे जाणं त्यांनी पसंत केलं. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेला वेळ भलेही कमी असेल पण त्यांच्या बलिदानाने जो क्रांतीचा वणवा देशभर पेटला त्यामुळे पुढच्या अवघ्या १६ वर्षांत इंग्रजांनी भारतातून काढता पाय घेतला. २३ मार्च १९३१ रोजी या तीन तरुणांनी अख्या जगाला दाखवून दिलं देशभक्ती म्हणजे काय असते. भगतसिंग आणि त्यांच्या क्रांतिकारक सहकाऱ्यांच्या कामांची काही लोक दहशतवादी कारवायांसोबत तुलना करत. अशा लोकांना भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी जेलमधे असताना ६३ दिवस उपवास करून दाखवून दिलं की स्वातंत्र्यासाठी कोणत्याही प्रकारची लढाई लढण्याची तयारी या क्रांतीकारकांमधे आहे. भगतसिंग यांनी तर तब्बल ११६ दिवस आपलं उपोषण चालू ठेवलं जो एकप्रकारे विश्वविक्रमच आहे. खरंतर फाळणीनंतर बरीचशी ऐतिहासिक कागदपत्रे पाकिस्तानच्या सरकारी दफ्तरी जमा असल्याने भगत सिंगांबद्दल, त्यांनी केलेल्या कामांबद्दल माहिती मिळवणं खूप मुश्किलीचं काम होतं पण कुलदीप नय्यर यांनी अतिशय सखोल संशोधन करून, गरज असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन अभ्यास करून आणि प्रसंगी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या नातेवाईकांना भेटून हे अतिशय उत्कृष्ट पुस्तक वाचकांच्या भेटीला आणलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करून आणि काही प्रकाशात न आलेल्या कागदपत्रांचा शोध घेऊन कुलदीप नय्यर यांनी हे चरित्र लिहिलं आहे. भगतसिंग यांच्यावर असलेला मार्क्स, लेनिन आदी क्रांतिकारक विचारवंताचा प्रभाव, त्यांच्याबद्दलची त्यांची मतं, आणि त्यांनी पाहिलेलं समाजवादी-धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न आदी गोष्टींचं नय्यर यांनी अगदी अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात केलं आहे. भगतसिंग यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्याचं तपशीलवार वर्णन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल तसंच हंसराज व्होरा यांच्या माफीचे साक्षीदार राहण्याबाबतचे तपशीलही प्रथमच प्रकाशात आलेले आहेत. या सर्वांसोबतच या पुस्तकात महात्मा गांधींच्या अहिंसात्मक तत्त्वज्ञानाबद्दलचे भगतसिंग यांचे विचारही मांडण्यात आले आहेत. भगत सिंग यांची फाशी टाळण्यासाठी महात्मा गांधींनी कोणते प्रयत्न केले हेही कुलदीप नय्यर यांनी यात यष्ट केलं आहे. "व्यक्ती मेला तरी त्याचे विचार कायम राहतात" याचं सर्वांत चांगलं उदाहरण म्हणून भगत सिंगांच्या फाशीकडे बघता येईल. आपल्या शेवटच्या लाहोर तुरुंगवासात मृत्यू समोर दिसत असताना भगतसिंग अखंडपणे वाचन करत होते, टिपणं काढत होते, नोंदी ठेवत होते. तुरुंगातील त्यांच्या नोंदवहीत एकूण १०७ लेखकांची नावे आणि अवतरणे आढळतात. या नोंदींचाच आकार १४० छापील पानांइतका आहे. यावरून भगतसिंगांनी वाचलेल्या ग्रंथांची आपण कल्पना करू शकतो. आज दुर्दैवाने भगतसिंग म्हटलं की राजगुरू आणि सुखदेव यांच्यासमवेत त्यांचं फासावर जाणं हेच ठळकपणे आपल्यासमोर येतं. परंतु कुलदीप नय्यर यांच्या "शहीद" मधून आपल्यासमोर येणारं भागातसिंगांचं रूप खूप वेगळं आहे. त्याला अनेक छटा आहेत ज्या एकामागून एक उलगडत जातात. या छटांमधून एक भारतीय म्हणून आपल्याला विचारात पाडणारा क्रांतिकारक, आपल्या चौफेर ज्ञानाने आपल्या विचारांना दिशा देणारा, एक कुशल संघटक, मार्गदर्शक, देशासाठी बलिदान देण्यात सर्वांत पुढे असणारा तरुण, प्रचंड बुद्धिमान, जहाल क्रांतिकारक, दूरदृष्टी असणारा, आपल्या कार्याची दिशा पक्की ठाऊक असलेला, जगातल्या सगळ्या दु:ख-दैन्याबाबत मनात करुणा बाळगणारा, आपल्या अखेरच्या तुरुंगवासात फाशीच्या कोठडीत असंख्य पुस्तके वाचून टिपणे काढणारा व्यासंगी, भारतीय तसेच जागतिक साहित्याची सूक्ष्म जाण असलेला समीक्षक, अतिशय प्रगल्भ असा विचारवंत आणि तरीही स्वप्नाळू, कविमनाचा उमदा तरुण अशी एक ना अनेक रूपे आपल्या समोर येतात. भागतसिंगांचं हे सारं कर्तृत्व आहे अवघ्या २३ वर्षें ५ महिन्यांच्या अल्पायुष्यातलं! जे खरंतर आपल्या मनाला चटका लावून जातं. पुस्तक वाचून झाल्यानंतर राहून राहून वाटत राहतं की असा नेता स्वतंत्र भारतात असता तर आज भारताची जागतिक ओळख किती वेगळी असती!

प्रत्येक भारतीयाने संग्रही घेऊन आवर्जून वाचावं असं पुस्तक "शहीद"!






संदीप प्रकाश जाधव


"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये