लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठे- २४४, मूूल्य- ३०० रुपये
गिरीश कुबेर यांच्या लेखनाबद्दल बरंच ऐकलं होतं आणि त्याच उत्सुकतेतून त्यांची काही पुस्तकेही खरेदी केली. त्यातीलच आज वाचून पूर्ण झालेलं एक उत्कृष्ट पुस्तक "अधर्मयुद्ध"! खरंतर त्यांचं "अधर्मयुद्ध" हे पुस्तक मी फक्त नाव आणि मुखपृष्ठ पाहूनच निवडलं होतं. गिरीश कुबेरांच्या या पुस्तकाने मला माझी निवड न चुकल्याचा आनंद आणि एक वेगळं तसंच आपल्या ज्ञानात भर घालणारं काहीतरी वाचायला मिळाल्याचं समाधान मिळवून दिलं. पुस्तकाचं नाव जरी "अधर्मयुद्ध" असलं तरी 'धर्म-अधर्माचा" कोणताही बाऊ न करता प्रत्यक्ष व्यवहारातील संघर्ष आपल्यासमोर आणणारी ही एक शोधकथा किंवा रहस्यकथा म्हटले तरी चालेल. ही कथा जितकी वाचकाला चीड आणते तितकीच ती अस्वस्थही करते. गिरीश कुबेरांनी एक अतिशय किचकट आणि गुंतागुंतीचा विषय तितक्याच सोप्या भाषेत या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्यासमोर आणला आहे. आज सारं जग त्यांना धर्मांध, माथेफिरू म्हणून ओळखतं. अनेकदा त्यांचा धिक्कार केला जातो, तर कित्येकदा त्यांना चिरडण्यासाठी मोठमोठ्या लष्करी मोहिमा आखल्या जातात. त्यांच्या हातातलं इस्लामचं निशाण पाहून किंवा त्यांच्या तोंडची जिहादची भाषा ऐकून त्यांच्या धर्माबद्दलचे भलेबुरे, समज-गैरसमज पसरवले जातात. भस्मासुरासारखं अक्राळविक्राळ रूप धारण करणार्या अशा दहशतवाद्यांच्या मूळ प्रेरणा कोणत्या आणि स्वार्थासाठी त्यांना कठपुतळ्यांप्रमाणे नाचवणार्या साम्राज्यवादी सूत्रधारांचे मनसुबे कोणते, याचा नावनिशीवार केलेला हा पंचनामा म्हणजे वाचकांचे लक्ष खिळवून ठेवणारी एक रहस्यकथाच! गिरीश कुबेर यांचं हे पुस्तक म्हणजे या इस्लामी दहशतवादाचा इतिहास आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. आज जगभर ज्या इस्लामी दहशतवादाने थैमान घातलं आहे तो नेमका कधी, कसा, कुणी जन्माला घालून वाढवला याचं अतिशय विस्तृत वर्णन या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतं. आखाती देशात जन्माला आलेल्या आणि हळूहळू जगभर आपले हातपाय पसरलेल्या या इस्लामिक दहशतवादाचा मागोवा घेत असताना काही धर्मांध व्यक्तींनी शांतताप्रिय अशा इस्लामचा स्वतःच्या फायद्यासाठी हवा तसा अर्थ लावून त्याचं रूपांतर दहशतवादाच्या अधर्मयुद्धात कस केलं याचीच ही कहाणी "अधर्मयुद्ध"! जेव्हा धर्मकारण हेच राजकारण आहे असे विचार लोकांच्या मनावर वर्षानुवर्षे बिंबवले जातात आणि एखाद्या देशाच्या, समाजाच्या राजकारणाचा गाडा धर्मकारण खेचू लागते तेव्हा सुरु होणारं "अधर्मयुद्ध" म्हणजेच दहशतवाद हे सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न गिरीश कुबेर यांनी या पुस्तकातून केला आहे जो नक्कीच प्रशंसनीय आहे. अमेरिकेने काढता पाय घेतल्यानंतर सध्या अफगाणिस्तानवर वेगाने कब्जा मिळवत असलेलं 'तालिबान', काही महिन्यांपूर्वी इस्राईलवर हजारो रॉकेट्सचा मारा करणारं 'हमास' या सगळ्या इस्लामिक दहशतवादी संघटनांविषयी ऐकलं तर आपल्या मनात प्रश्न येतात की या सगळ्याची सुरुवात नेमकी कुठून झाली असावी? इस्लामची विचारधारा जरी सुरुवातीपासून आक्रमक व असहिष्णु असली तरी आधुनिक काळातील 'जिहादी' इस्लामच्या विचारधारेची सुरुवात कशी झाली? अशा अनेक प्रश्नांच्या खोलात जात असताना लेखकांनी अगदी इतिहासातून म्हणजे वहाबी आणि इब्न सौद यांची युती होऊन एक संपूर्ण देश कसा तयार झाला इथून पुस्तकाची सुरवात केली आहे. ज्यामधे पुढे ब्रदरहूडची स्थापना, ऑटोमन साम्राज्याचा झालेला ऱ्हास आणि त्यातून आपल्या ताटात काहीतरी पडावे म्हणून इंग्लड व इतर युरोपातील राष्ट्रांची चाललेली धडपड, विस्तारवादी भूमिकांमुळे एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी चालणारं जागतिक पातळीवरील राजकारण अशा विषयांवरदेखील आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळते. आजही जगातील जवळपास सर्व दहशतवादी संघटनांची नाळ कुठे ना कुठे या ब्रदरहूड संघटनेशी जुळते यावरूनच आपण अंदाज लावू शकतो की या संघटनेची व्याप्ती किती मोठी आहे. इजिप्तची क्रांती, अमेरिकेची दुट्टपी भूमिका त्यातून त्यांना स्वतःला बसलेल्या झळा, आजची गाझा पट्टी म्हणजे जगातील सर्वात असुरक्षित आणि संवेदनशील जागा कशी झाली, शीतयुद्धाच्या अफगाणिस्तानला बसलेल्या झळा आणि त्यातून आजअखेर उभारी घेऊ न शकलेला हा देश, दहशवादी संघटनांना आर्थिक रसद पुरवणारी अफूची शेती या सर्व विषयांचं अतिशय मुद्देसूद विवेचन गिरीश कुबेर यांनी केलेलं आहे. आपल्या स्वार्थासाठी जागतिक राजकारणात अमेरिकेने वेळोवेळी विविध दहशतवादी संघटनांना मदत केली, त्यांना पाठीशी घातलं आणि आज हाच दहशतवाद अख्ख्या जगाला धोकादायक ठरतो आहे ज्यातून खुद्द अमेरिकासुद्धा नाही सुटू शकली. स्वतःच पेरलेल्या कडू फळाची चव आज अमेरिकाही घेते आहे. एकेकाळी दहशतवादी संघटनांच्या प्रमुखांना व्हाईट हाऊसवर चर्चेला बोलावणारी, ओसामाला व अल् कायदाला प्रोत्साहन देणारी अमेरिका ९ सप्टेंबर २००१ च्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ल्याने खडबडून जागी झाली. इस्लामी देशांबद्दलचा त्यांचा दृष्टिकोनच बदलला. याचं सर्वांत चांगलं उदाहरण इराकचं देता येईल. स्वतःला 'लोकशाहीचा पुरस्कर्ता' म्हणवणाऱ्या अमेरिकेने 'कोणालातरी धडा शिकवायचाच' या हेतूने खोटे पुरावे दाखवून खोट्या आरोपांखाली तुलनेनं धर्मनिरपेक्ष अशा इराकच्या सद्दाम हुसेनच्या राजवटीचा घोट घेतानाही मागेपुढे पाहिले नाही. यातून इराकमध्ये जी अस्थिरता निर्माण झाली त्यातून तो देश आजतागायत सावरू शकला नाही. असंच उदाहरण म्हणून अफगाणिस्तानकडेही पाहता येईल. सद्दामनंतर इराकमध्ये 'आयसिस'चा उदय झाला तर अफगाणिस्तानात पुन्हा एकदा तालिबानी राजवट चालू झाली. ज्यांच्या क्रूरतेच्या कहाण्या ऐकून वाईट वाटतं. गिरीश कुबेर यांनी अमेरिकेच्या या बोटचेपी आणि दुटप्पी भूमिकेवरदेखील या पुस्तकातून प्रकाश टाकला आहे जे वाचत असताना या तथाकथित जागतिक महासत्तेबद्दल आपल्या मनात चीड निर्माण होते. यासर्वांसोबतच आखाती देशात चालू झालेल्या तेलाच्या राजकारणावरसुद्धा आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. लेखकांनी पुस्तकात केलेली इस्लामी जगातील दहशतवादाची अनेक वर्णनं वाचकांना थक्क करून सोडतात. 'धर्म ही अफूची गोळी आहे' या कार्ल मार्क्सच्या वाक्याला सप्रमाण सिद्ध करणारं हे एक उत्कृष्ट पुस्तक "अधर्मयुद्ध"!
धर्माचा वापर करून, धर्माला अधर्माच्या वाटेवर घेऊन जाणारं हे "अधर्मयुद्ध" कशाप्रकारे सुरू झालं, याचा सुरुवातीपासूनचा इतिहास जाणून घ्यायचा असेल तर आवर्जून वाचावं असं गिरीश कुबेर यांचं हे पुस्तक "अधर्मयुद्ध"!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment