लेखक : नारायण धारप
प्रकाशक : साकेत प्रकाशन
पृष्ठे- २४६, मूूल्य- ३०० रुपये
"अघटित" हा नारायण धारपांचा मी वाचलेला पहिला भयकथासंग्रह! भयकथा असोत की गूढकथा त्यांची परिणामकारकता लेखकाच्या कल्पनाशक्तीवर तसेच कथांच्या मंडणीवरच अवलंबून असते आणि या दोन्हीही बाबतीत नारायण धारप यांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागेल इतक्या त्यांच्या भयकथा-कादंबऱ्या परिणामकारक असतात. विषय साधेच पण प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर अशा विषयांची कथेत केलेली मांडणी वाचकाला त्यांच्या लेखनाच्या प्रेमात न पाडते तरच नवल. एखाद्या व्यक्तीला ठराविक साहित्य वाचनाचीदेखील 'चटक' लागू शकते याचा प्रत्यय मला खरंतर धारप आणि मतकरी यांच्या पुस्तक वाचनातून आला. माझ्या नेहमीच्या वाचनातून थोडासा बदल म्हणून जर मी कोणती पुस्तके वाचत असेल तर ती धारप आणि मतकरींचीच! "अघटित"नंतर धरपांची पुस्तके शोधून संग्रही घेण्याचा मी सपाटाच लावला आहे. आज नारायण धारप आणि रत्नाकर मतकरी यांची जवळपास २०हून अधिक पुस्तके माझ्या संग्रही आहेत आणि हा आकडा अजून वाढत जाईल यात शंकाच नाही. तर "अघटित"पासून धारपांसोबत चालू झालेल्या या माझ्या प्रवासात पुढे त्यांची "चेटकीण", "लुचाई", "वेडा विश्वनाथ", "स्वाहा", "देवाज्ञा", "ग्रहण" अशी एकाहून एक दर्जेदार पुस्तके मी वाचून काढली. प्रत्येकवेळी आलेला अनुभव खासच! या सर्व पुस्तकांच्या पंक्तीत आज आणखी एका उत्कृष्ठ कथा संग्रहाची भर पडली आणि तो म्हणजे "पडछाया"! "पडछाया" चा शब्दशः अर्थ "प्रतिबिंब"! १० वेगवेगळ्या कथांचा हा संग्रह आणि प्रत्येक कथेचा विषय वाचकाला खिळवून ठेवणारा असा आहे. आपल्या प्रचंड कल्पनाशक्तीच्या जोरावर धारपांनी प्रत्येक कथेमधून जी "पडछाया" वाचकांसमोर आणली आहे ती वाचकाला एका वेगळ्या जगात घेऊन जाते. कथा साध्याच पण जबरदस्त परिणामकारक! वाचत असताना धारपांच्या कल्पनाशक्तीला दाद दिल्याशिवाय राहवत नाही. पुस्तकातील पहिलीच कथा आहे "पडछाया" जी फिरते वामन या नायकाभोवती. पुण्यातील आपल्या वाड्यातून पळून गेलेला किशोरवयीन वामन जेव्हा जवळपास १८ वर्षांनी पुण्यात परत येतो त्यानंतर सुरुवात होते या कथेची. वामनच्या परत येण्याची १८ वर्षें वाट बघणारी त्याची मैत्रीण उर्मिला हे या कथेतील आणखी एक पात्र. १८ वर्षांपूर्वीच्या वामनची त्याच्या वाड्यात वावरणारी "पडछाया" आणि आज वर्तमानकाळात जगणारा वामन यांच्या संघर्षाची ही कथा जी प्रत्यक्ष वाचताना अंगावर शहारे आणते. दुसरी कथा आहे "मुक्ती"! खरंतर नावावरूनच वाचकाला कथेचा थोडाफार अंदाज येतो. या कथेचा नायक आहे नारायण आणि ही कथा आहे नायकाची बालमैत्रिण कमलच्या मृत्यूनंतरच्या "मुक्ती"ची! रस्तारुंदीकरणात आपला जुना वाडा पाडला जाणार म्हणून जवळपास ३० वर्षांनी वाड्याला शेवटची भेट देण्यासाठी म्हणून आलेल्या नारायणला त्या वाड्यात जाणवणारी कमलची "पडछाया" आणि फ्लॅशबॅकमधे कमलच्या मृत्यूचा होणारा उलगडा, नंतर नारायणकडून कमलला मिळणाऱ्या "मुक्ती"ने होणारा कथेचा शेवट. "तो कोण होता?" ही थोड्या वेगळ्या अंदाजाने सुरुवात होणारी या संग्रहातील तिसरी कथा. स्वतःला सिद्ध करण्यासाठी संघर्ष करणारा एक लेखक आणि त्याची पत्नी विमल ही या कथेतील महत्वाची पात्रे. आपल्या पत्नीच्या "पडछाये"सोबत राहणारा आणि शेवटी स्वतःचेच अस्तित्व सिद्ध करण्यासाठी धडपडणारा हा नायक कथेच्या शेवटी वाचकालादेखील संभ्रमात टाकतो. "मन मोहाचे घर" ही चौथी कथा आहे शेखरची. एक मेल प्रॉस्टिट्यूट होऊन चैनीत आयुष्य जगणाऱ्या शेखरचं आयुष्य त्याच्या लग्नानंतर अचानक वादळी होतं आणि त्यातूनच त्याच्या हातून त्याच्या पत्नीचा खून होतो. पुढे त्याच्या पत्नीच्या "पडछाये"कडून घेतल्या गेलेल्या सूडाने या कथेचा शेवट होतो. धारपांनी या कथेतून निर्माण केलेली वातावरण निर्मिती अफलातून आहे. यानंतरची कथा आहे "तितू"! चित्रा ही या कथेची नायिका आणि प्रभाकर हा नायक. आपल्या सावत्र आईकडून फसवून प्रभाकरसोबत लग्न लावून दिलेल्या चित्राचा प्रभाकरला दिसणाऱ्या "तितू"नामक "पडछाये"सोबत होणारा संघर्ष म्हणजे ही कथा. हे "तितू" काय प्रकरण आहे आणि त्याचा उद्देश काय आहे याचा उलगडा कथेच्या शेवटी प्रभाकरच्या मृत्यूनंतर होतो, तोदेखील फक्त चित्रापुरताच! लोकांच्या नजरेत वेड्याच्या इस्पितळात दाखल झालेला प्रभाकर हा खरंतर आता जिवंतच नाहीये याची चित्राला होणारी जाणीव आणि इथेच वाचकाला विचारात पाडून होणारा कथेचा शेवट. एका नवकवीच्या संघर्षाची ६वी कथा आहे "मोहन किरपेकर - एक शोकांतिका". चेटूक करून आपल्याच पतीचा जीव घेणाऱ्या बेबीची कथा आहे "चेटकिण". स्वतःच्या आईची मावशी म्हणून जगाला ओळख सांगणाऱ्या बेबीच्या बऱ्याच वर्षांनी आपल्या बालमैत्रिण सुमनसोबत अचानक होणाऱ्या भेटीने या कथेची सुरुवात होते. पुढे फ्लॅशबॅकमध्ये लहानपणी बेबीकडून घडलेल्या एका घटनेचा उल्लेख करून लेखकांनी वाचकाला बेबीबद्दल विचार करायला भाग पाडलं आहे. या संग्रहातील इतरही कथा "बळी", "चौरस्ता", "अनाहूत" अतिशय दर्जेदार आहेत. प्रत्येक कथेत असणारं वेगळेपण आणि तरीही या सर्व कथांमध्ये असणारा सामाईक धागा "पडछाया" वाचकाला अक्षरशः खिळवून ठेवतात. या संग्रहातील ८वी कथा "बळी" ही अलीकडेच येऊन गेलेला चित्रपट "तुंबाड" ची आठवण करून देते. जवळपास याच कथानकावर बेतलेला हा चित्रपट जर आपण पहिला असेल तर धारपांनी लिहिलेल्या कथांचा आणि त्यांच्या जबरदस्त कल्पनाशक्तीचा आपण अंदाज लावू शकतो.
कथानकात पुढे काय होईल याची उत्सुकता कायम ठेवत, वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवत त्याला त्या वतावरणाचाच एक भाग बनवणाऱ्या नारायण धारप यांचा एक वाचनीय कथासंग्रह "पडछाया"!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment