लेखक : कुलदीप नय्यर
प्रकाशक : रोहन प्रकाशन
मराठी अनुवाद : भगवान दातार
पृष्ठे- २१४, मूूल्य- ३०० रुपये
सरफ़रोशी की तमन्ना अब हमारे दिल में है|
देखना है ज़ोर कितना बाज़ु-ए-क़ातिल में है|
वक़्त आने दे बता देंगे तुझे ऐ आसमाँ|
हम अभी से क्या बतायें क्या हमारे दिल में है|
अवघ्या २३ वर्षांच्या आयुष्यात देशासाठी हसत हसत फासावर चढलेल्या आणि इतक्या कमी वेळात अख्या ब्रिटिश साम्राज्याला हादरे देऊन स्वतःची दखल घेण्यास भाग पाडणाऱ्या भगतसिंगांसारख्या व्यक्तीचं चरित्र खरं तर २१४ पानांमध्ये मांडणं अशक्यच! पण तरीही कुलदीप नय्यर यांनी त्यांच्या "शहीद" मधून ज्या पद्धतीने भगतसिंग यांचं चरित्र आपल्यासमोर मांडलं आहे त्याला तोड नाही. भगवान दातार यांनीही तितक्याच ताकदीने याचं मराठी अनुवादन केलं आहे. खरं तर दोन व्यक्तींची तुलना कधीच केली जाऊ शकत नाही पण तरीही "शहीद" वाचत असताना राहून राहून छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर येत होती आणि नकळत दोघांनी दिलेल्या बलिदानांचे विचार डोक्यात नाचू लागले. या दोन्ही बलिदानांची तुलना जरी होऊ शकत नसली तरी उद्देश मात्र एकच होता तो म्हणजे स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन लोकांच्या मनातील स्वातंत्र्याच्या, क्रांतीच्या ठिणगीचे वणव्यात रूपांतर करणे. एक छोटीशी माघार कदाचित त्यांचं आयुष्य वाचवू शकली असती पण परकीय सत्तेविरुद्ध लोकभावना तयार होण्यासाठी हसत हसत मृत्यूला सामोरे जाणं त्यांनी पसंत केलं. भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी स्वातंत्र्य चळवळीला दिलेला वेळ भलेही कमी असेल पण त्यांच्या बलिदानाने जो क्रांतीचा वणवा देशभर पेटला त्यामुळे पुढच्या अवघ्या १६ वर्षांत इंग्रजांनी भारतातून काढता पाय घेतला. २३ मार्च १९३१ रोजी या तीन तरुणांनी अख्या जगाला दाखवून दिलं देशभक्ती म्हणजे काय असते. भगतसिंग आणि त्यांच्या क्रांतिकारक सहकाऱ्यांच्या कामांची काही लोक दहशतवादी कारवायांसोबत तुलना करत. अशा लोकांना भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी जेलमधे असताना ६३ दिवस उपवास करून दाखवून दिलं की स्वातंत्र्यासाठी कोणत्याही प्रकारची लढाई लढण्याची तयारी या क्रांतीकारकांमधे आहे. भगतसिंग यांनी तर तब्बल ११६ दिवस आपलं उपोषण चालू ठेवलं जो एकप्रकारे विश्वविक्रमच आहे. खरंतर फाळणीनंतर बरीचशी ऐतिहासिक कागदपत्रे पाकिस्तानच्या सरकारी दफ्तरी जमा असल्याने भगत सिंगांबद्दल, त्यांनी केलेल्या कामांबद्दल माहिती मिळवणं खूप मुश्किलीचं काम होतं पण कुलदीप नय्यर यांनी अतिशय सखोल संशोधन करून, गरज असलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष त्या जागेवर जाऊन अभ्यास करून आणि प्रसंगी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या नातेवाईकांना भेटून हे अतिशय उत्कृष्ट पुस्तक वाचकांच्या भेटीला आणलं आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर प्रकाशात आलेल्या भगत सिंग यांच्या साहित्याचा अभ्यास करून आणि काही प्रकाशात न आलेल्या कागदपत्रांचा शोध घेऊन कुलदीप नय्यर यांनी हे चरित्र लिहिलं आहे. भगतसिंग यांच्यावर असलेला मार्क्स, लेनिन आदी क्रांतिकारक विचारवंताचा प्रभाव, त्यांच्याबद्दलची त्यांची मतं, आणि त्यांनी पाहिलेलं समाजवादी-धर्मनिरपेक्ष भारताचं स्वप्न आदी गोष्टींचं नय्यर यांनी अगदी अभ्यासपूर्ण विवेचन या पुस्तकात केलं आहे. भगतसिंग यांच्यावर चालवण्यात आलेल्या खटल्याचं तपशीलवार वर्णन आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल तसंच हंसराज व्होरा यांच्या माफीचे साक्षीदार राहण्याबाबतचे तपशीलही प्रथमच प्रकाशात आलेले आहेत. या सर्वांसोबतच या पुस्तकात महात्मा गांधींच्या अहिंसात्मक तत्त्वज्ञानाबद्दलचे भगतसिंग यांचे विचारही मांडण्यात आले आहेत. भगत सिंग यांची फाशी टाळण्यासाठी महात्मा गांधींनी कोणते प्रयत्न केले हेही कुलदीप नय्यर यांनी यात यष्ट केलं आहे. "व्यक्ती मेला तरी त्याचे विचार कायम राहतात" याचं सर्वांत चांगलं उदाहरण म्हणून भगत सिंगांच्या फाशीकडे बघता येईल. आपल्या शेवटच्या लाहोर तुरुंगवासात मृत्यू समोर दिसत असताना भगतसिंग अखंडपणे वाचन करत होते, टिपणं काढत होते, नोंदी ठेवत होते. तुरुंगातील त्यांच्या नोंदवहीत एकूण १०७ लेखकांची नावे आणि अवतरणे आढळतात. या नोंदींचाच आकार १४० छापील पानांइतका आहे. यावरून भगतसिंगांनी वाचलेल्या ग्रंथांची आपण कल्पना करू शकतो. आज दुर्दैवाने भगतसिंग म्हटलं की राजगुरू आणि सुखदेव यांच्यासमवेत त्यांचं फासावर जाणं हेच ठळकपणे आपल्यासमोर येतं. परंतु कुलदीप नय्यर यांच्या "शहीद" मधून आपल्यासमोर येणारं भागातसिंगांचं रूप खूप वेगळं आहे. त्याला अनेक छटा आहेत ज्या एकामागून एक उलगडत जातात. या छटांमधून एक भारतीय म्हणून आपल्याला विचारात पाडणारा क्रांतिकारक, आपल्या चौफेर ज्ञानाने आपल्या विचारांना दिशा देणारा, एक कुशल संघटक, मार्गदर्शक, देशासाठी बलिदान देण्यात सर्वांत पुढे असणारा तरुण, प्रचंड बुद्धिमान, जहाल क्रांतिकारक, दूरदृष्टी असणारा, आपल्या कार्याची दिशा पक्की ठाऊक असलेला, जगातल्या सगळ्या दु:ख-दैन्याबाबत मनात करुणा बाळगणारा, आपल्या अखेरच्या तुरुंगवासात फाशीच्या कोठडीत असंख्य पुस्तके वाचून टिपणे काढणारा व्यासंगी, भारतीय तसेच जागतिक साहित्याची सूक्ष्म जाण असलेला समीक्षक, अतिशय प्रगल्भ असा विचारवंत आणि तरीही स्वप्नाळू, कविमनाचा उमदा तरुण अशी एक ना अनेक रूपे आपल्या समोर येतात. भागतसिंगांचं हे सारं कर्तृत्व आहे अवघ्या २३ वर्षें ५ महिन्यांच्या अल्पायुष्यातलं! जे खरंतर आपल्या मनाला चटका लावून जातं. पुस्तक वाचून झाल्यानंतर राहून राहून वाटत राहतं की असा नेता स्वतंत्र भारतात असता तर आज भारताची जागतिक ओळख किती वेगळी असती!
प्रत्येक भारतीयाने संग्रही घेऊन आवर्जून वाचावं असं पुस्तक "शहीद"!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment