Sunday, May 29, 2022

"या सम हा"

 



लेखक : मे. जनरल शशिकांत गिरीधर पित्रे

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- ३३१, मूूल्य- ४३० रुपये


बाजीराव म्हटलं आजही कित्येक लोकांचे विचार मस्तानीच्या पुढे जातच नाहीत. मस्तानीच्या पलीकडे बाजीराव माहीतच नाही असे शेकडो लोक आपल्याला आजही सहज सापडतील आणि हे खरं तर आपलं खूप मोठं दुर्दैव आहे. मस्तानी हे प्रकरण बाजीराव पेशव्यांच्या झळाळत्या कारकिर्दीतील फक्त एक पान होतं आणि लोक त्याची इतकी चर्चा करत राहिले की बाजीराव पेशवा म्हणजे एक प्रेमवेडा अशी एक छबीच बनून गेली. या आपल्या दुर्दैवाचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे अशा थोर लोकांना जातीच्या कोंदनात घालून आपापल्या सोयीने त्यांचा इतिहास लोकांपुढे आणणारे काही ठराविक गट! परंतु खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या व्यक्ती या जातींसाठी जन्मल्याच नव्हत्या मुळी, जातीपातींच्या पलीकडे जाऊन पुढच्या शेकडो पिढ्यांना प्रेरणादायी ठरावं असं आयुष्य ते जगले. या अशा थोर लोकांपैकी बाजीरावांचा आपल्याला ठाउक नसलेला आणि वाचून अंगावर रोमांच उभे राहतील असा इतिहास म्हणजे हे मेजर जनरल शशिकांत गिरीधर पित्रे यांचं पुस्तक "या सम हा"! शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या या ग्रंथात बाजीरावांच्या विशाल कर्तृत्वाचा एक कुशल सेनानी म्हणून परिचय करून दिला आहे. छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचं एका विशाल साम्राज्यात रूपांतर करणारा रणधुरंधर म्हणजे बाजीराव पेशवा! अवघं ४१ वर्षांचं आयुष्य, २० वर्षांची वादळी कारकीर्द आणि त्यात लढलेल्या ४० लढायांपैकी एकही लढाई न हरलेला सेनानायक म्हणजे बाजीराव पेशवा! मराठा साम्राज्याची विजयी पताका चारी दिशांना फडकवणारा, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीमहाराज यांचा संकल्प पुढे नेऊन महाराष्ट्राला ४०० वर्षें वाकुल्या दाखवणारी दिल्ली काबीज करणारा पराक्रमी योद्धा म्हणजे बाजीराव पेशवा! राजमुद्रेतील छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले ‘वर्धिष्णू’ आणि ‘विश्ववंदिता’ हे शब्द सार्थ करून अवघ्या हिंदुस्थानात तांडव करणारा रुद्र म्हणजे बाजीराव पेशवा! स्वतःच्या कष्टाने पेशवेपद मिळवलेल्या बाळाजी विश्वनाथांच्या अकस्मात मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी बाजीरावच्या खांद्यावर पेशवाईची जबाबदारी दिली आणि पुढच्या ४च वर्षांत या मिसरूड फुटलेल्या तरुणाने स्वतःला असं काही सिद्ध केलं की विस्कळीत होऊ घातलेलं स्वराज्य पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहू लागलं. बाजीराव पेशव्यांच्या अल्पशा कारकिर्दीत स्वराज्य फक्त उभंच नाही राहिलं तर त्यांच्या या २ दशकांच्या कारकिर्दीत मोगल, पोर्तुगीज आणि सिद्दी यांसारख्या प्रतिस्पर्ध्याना नमवून त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे एका साम्राज्यात रूपांतर केलं. पित्रे यांनी बाजीरावांच्या कर्तृत्वावर लिहिलेलं "या सम हा" हे पुस्तक म्हणजे अजिंक्य बाजीरावाच्या युद्धनेतृत्त्वाची लोकविलक्षण यशोगाथाच आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. लेखकांनी पुस्तकाच्या  सुरुवातीलाच बाजीराव पेशव्यांच्या व्यक्तिमत्वाचं केलेलं वर्णन वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. चैतन्य, ऊर्जा, अभिनिवेश, स्वामिनिष्ठा यांनी ओतपोत भरलेली तसंच आपल्या मातृभूमीवर नितांत प्रेम करणाऱ्या योध्याची ही रांगडी प्रतिमा संपूर्ण पुस्तक वाचून होईपर्यंत सतत आपल्या डोळ्यासमोर तरळत राहते. म्हणूनच शशिकांत पित्रे यांनी लिहिलेला ३३१ पाने, १० प्रकरणे आणि एकूण २० नकाशांतून साकार झालेला हा ग्रंथ बाजीराव पेशव्यांसारख्या वीरश्रेष्ठाच्या शौर्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून शेकडो वर्षांपासून फक्त एक प्रेमवेडा, प्रेमांध म्हणून त्याच्या प्रेमविलासाचं उदात्तीकरण  करणाऱ्यांसाठी एक सणसणीत चपराक आहे. अशा मूठभर लोकांच्या डोळ्यात घातलेलं हे एक झणझणीत अंजनच आहे.

"स्वराज्याचे पुनरुत्थान" या पहिल्या प्रकरणापासून या ग्रंथाची सुरुवात होते. लेखकांनी या पहिल्या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला अतिशय गुंतागुंतीचा घटनाक्रम अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे. शाहू महाराजांचं औरंगजेबाकडून पुन्हा स्वराज्यात येणं, कोल्हापूरच्या गादीसोबत चालू झालेला शाहू महाराजांचा संघर्ष, बाजीराव पेशव्यांचे वडील बाळाजी विश्वनाथांचं स्वराज्यासाठीचं योगदान, बाळाजीने आखलेली महसूल पद्धती, स्वराज्याभोवतालच्या इतर शाह्यांसोबतचं संघटन आणि पेशवाईचा घातलेला मजबूत पाया, लहानपणापासूनचं बाजीराव आणि चिमाजी यांचं नातं, बाळाजींचा झालेला अकस्मात मृत्यू, बाजीराव पेशव्यांच्या शिरावर अचानकपणे पडलेली पेशवेपदाची जबाबदारी, उमद्या वयातील बाजीरावाचं आपल्याहून वयाने आणि अनुभवाने मोठ्या सरदारांसोबत असणारं नातं, त्याकाळातील एकूण मोगल साम्राज्य आणि स्वराज्य यांची भौगोलिक पार्श्वभूमी, बाजीरावाच्या संबंधित असलेल्या सरदारांची ओळख या सर्वांची अगदी विस्तृत माहिती पहिल्या प्रकरणात आपल्याला वाचायला मिळते. यानंतरच्या प्रकरणांतून पेशवेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बाजीरावांनी स्वराज्याची उत्तरोत्तर केलेली प्रगती वाचण्यास मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेले लष्कराचे प्रमुख भाग, लष्कराची रचना आणि त्यातील हुद्दे बाजीरावांच्या काळात कसे होते याचीही रोचक माहिती आपल्याला या ग्रंथात मिळते. शिवरायांनी आपल्या सेनेत रुजवलेली मूल्यं बाजीरावांच्या काळातही प्राणपणाने कशी जपली जात होती हे पुस्तकात वाचताना अतिशय अभिमान होतो. बाजीराव पेशव्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांच्यापुढे असलेल्या डोंगरासमान आव्हानांसोबतच त्यांनी लढलेल्या लढायांची अगदी विस्तृत माहिती आपल्याला या ग्रंथात मिळते. खांडवा, बाळापूर,  फत्तेखर्डा, माळवा, गुजरात, कर्नाटक, डभई अशा अनेक यशस्वी  मोहिमा तसंच ठिकठिकाणी निजामाला दिलेला शह, आग्ऱ्यातील सैन्याला चाहूलही न लागू देता त्यांच्यामधूनच पुढे जात दिल्लीत  पोहचणाऱ्या आक्रमक बाजीरावाच्या रोमांचकारी प्रवासाचं  अद्भुत दर्शन लेखकांनी आपल्याला घडवलं आहे. पित्रे यांनी बाजीरावांनी लढलेली प्रत्येक लढाई एका क्रमाने घेऊन ती लढण्यामागचा त्यांचा मुख्य उद्देश स्पष्ट करून सांगितला आहे. मोहिमेआधी निरीक्षण करून, शत्रूचं वैगुण्य अचूक हेरून बाजीरावने घेतलेले महत्वाचे निर्णय, युद्धाच्या पूर्वीच्या हालचाली, लढाईच्या मैदानाचे गुणधर्म, अभिजात व्यूहरचना आणि प्रत्यक्ष लढाई असं सगळं लेखकांनी ठिकठिकाणी नकाशाच्या सहाय्याने मांडलेलं आहे. बाजीरावांनी लढलेल्या प्रत्येक लढाईचं लष्करी तत्त्वांवर मूल्यमापन आणि त्याचा तत्कालीन राजकारणावर झालेला दूरगामी परिणाम या गोष्टींचंही लेखकांनी संदर्भासह दिलेलं सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला अचंबित करतं! चातुर्याने हालचाली केल्या तर आपले कमीतकमी नुकसान करुन रणमैदानात काय चमत्कार करुन दाखवता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणून बाजीरावांनी लढलेल्या प्रत्येक लढाईकडे पाहता येईल. बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत शिवरायांच्या गनिमीकावा या युद्धनीतीचा विकास झालेला दिसून येतो. याचं अगदी ठळक उदाहरण म्हणजे फेब्रुवारी १७२८ मधे झालेला पालखेडचा संग्राम! शिंदे, होळकरांसारख्या विश्वासू आणि कर्तबगार सरदारांना घेऊन आपल्या बुद्धी आणि बाहुबलाच्या जोरावर तीन शतकांपूर्वी बाजीराव पेशव्यांनी जिंकलेल्या पालखेडच्या लढाईकडे आजही युद्धशास्त्राचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहिलं जातं. अवजड तोफा, हत्ती, जनाना, बुणगे  यांसह सुस्त चालणाऱ्या मोगल सैन्याविरुद्ध विजेच्या चपळाईने गतिमान होत त्यांचं नेतृत्व करणारा झपाटलेला बाजीराव वाचत असताना उर अभिमानाने भरून येतो. फक्त आधुनिक तंत्रज्ञान वा शस्त्रांनी नव्हे तर दृढनिश्चयी मन आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर लढाई जिंकली जाते हे बाजीरावांनी जगाला दाखवून दिलं. पित्रे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल बोलावं तितकं कमीच. बाजीरावांच्या अल्पशा कारकिर्दीवर नजर टाकताना "या सम हा" हे शिर्षक किती योग्य आहे याची जाणीव या पुस्तकाच्या पाना-पानावर होत राहते.

प्रेमवीर ही बाजीराव पेशव्यांची प्रतिमा पुसून एक रणधुरंधर, अतिशय हुशार असा सेनानायक, रणपंडित म्हणून त्यांना समोर आणण्याचं लाखमोलाचं काम शशिकांत पित्रे यांचं हे पुस्तक करते. बाजीराव पेशवा जाणून घ्यायचा असेल तर आवर्जून वाचावं असं पुस्तक "या सम हा"!





संदीप प्रकाश जाधव


Sunday, May 22, 2022

"अश्वत्थामा"

 




लेखक : संजय सोनवणी

प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन

पृष्ठे- १९२, मूूल्य- २४० रुपये 


महाभारताला महर्षी व्यासांनी लिहिलेलं काव्य म्हणा अगर भारताचा प्राचीन इतिहास म्हणा त्यातील प्रत्येक पात्र, घटना आपल्याला काही न काही शिकवून जातातच. महाभारताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील कोणत्याही पात्राच्या नजरेतून, कितीही वेळा आपण महाभारताकडे पाहिलं तर ते पात्रच योग्य आणि इतर पात्रे त्याच्यासमोर चुकीची वाटतात. परंतु असं असलं तरी हजारो वर्षांपासून नितीचा अनितीवर, धर्माचा अधर्मावर आणि वाईटाचा चांगल्यावर झालेला विजय म्हणूनच महाभारत आपल्यासमोर सादर केलं गेलंय. पांडव चांगले आणि कौरव वाईट, पांडव नितीने आणि कौरव अनितीने वागले हे सांगत असताना त्यादरम्यान घडलेल्या घटनांमधील विरोधाभास मात्र नेहमीच दुर्लक्षित केला जातो. महाभारताच्या जितकं खोलात जाऊ तितका हा विरोधाभास अधिकच जाणवत राहतो. निती-अनितीवर शंका घेणारे शेकडो अनुत्तरीत प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. परंतु या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन महाभारत का घडलं असा प्रश्न जर कोणाला विचारला तर त्याची वेगवेगळी उत्तरे आपल्याला मिळतील, कोणी म्हणेल कौरव-पांडवांमधील सत्तासंघर्षामुळे महाभारत घडलं तर कोणी म्हणेल द्रौपदीमुळे महाभारत घडलं. कोणाला भीष्म दोषी दिसेल तर कोणाला धृतराष्ट्र. कोणाला कुंती तर कोणाला कर्ण. पण खरंच यांच्यामुळे घडलं का महाभारत? तर नाही, महाभारत घडलं ते भारद्वाजपुत्र द्रोणामुळे! आपल्या पुत्राच्या, अश्वत्थाम्याच्या चांगल्या भविष्यासाठी घेतलेल्या द्रोणांच्या एका निर्णयामुळे! द्रुपद राजाने द्रोणाचा अपमान केल्यानंतर त्या अपमानाच्या आगीत सुडाने पेटलेल्या द्रोणांनी द्रुपदाचा बदला घेण्यासाठी कौरव-पांडवांचे गुरु बनत द्रुपद राजावर हल्ला चढवून त्याचा पराभव केला. या पराभवानंतर द्रुपदाने यज्ञातून निर्माण केलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी हे या सूडनाट्याची पुढची पायरी! इथून सुरुवात झालेल्या या सूडनाट्याने पुढे महाभारत घडवलं आणि त्याचा शेवट न्याय्य बाजूलाच बदनाम करण्यात झाला. या सुडनाट्याच्या सुरुवातीची मुळे ज्याच्या बालहट्टाने रुजवली गेली त्या द्रोणपुत्र "अश्वत्थाम्याला" चिरकाल ती भळभळती जखम आपल्या भाळावर वागवावी लागली. "अश्वत्थामा" ही संजय सोनवणी यांची याच द्रोणपुत्राच्या आयुष्यावर बेतलेली आणि अश्वत्थाम्याच्या नजरेतून आपल्याला महाभारत दाखवणारी कादंबरी!

द्रोणांच्या निवेदनातून या कादंबरीची सुरुवात होते. द्रोणांचं बालपण, द्रोण लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा-भारद्वाज ऋषींचा झालेला मृत्यू, अग्निवेशांकडून द्रोणांचं झालेलं संगोपन, द्रोण-कृपी यांचा संसार, द्रोणांनी प्रत्यक्ष परशुरामाकडून मिळवलेली विद्या या सर्वांना तशा परिचयाच्याच गोष्टींतून ही कथा पुढे सरकत राहते. जंगलातील आश्रमात जन्माला आलेला द्रोण आणि कृपी यांचा पुत्र "अश्वत्थामा"! द्रोणांनी भगवान शंकराला प्रसन्न करून शिवासारखा पराक्रमी आणि चिरंजीवी असा हा पुत्र जन्माला घातला खरा पण द्रोणांच्या आश्रमातील साध्या राहणीमानामुळे "अश्वत्थाम्याचे" बालपण खूपच कठीण जायला लागते. युद्धशास्त्रात निष्णात असणाऱ्या द्रोणांचा मानी स्वभाव त्यांच्या पुत्राच्या साध्या-साध्या ईच्छादेखील पुऱ्या करण्यास असमर्थ ठरतो. परंतु अश्वत्थाम्याने दुधासाठी केलेला हट्ट आणि तो पूर्ण करण्यासाठी असणारी आपली असमर्थता द्रोणांना त्यांच्या स्वभावाविरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडते. कधीही कोणासमोर हात न पसरवणारे द्रोण शेवटी आपल्या बालमित्राची, द्रुपदाची मदत घेण्याचे ठरवतात आणि इथेच ठिणगी पडते भविष्यात होऊ घातलेल्या महाभारताची! अश्वत्थाम्यावरील प्रेमाखातर द्रुपदासमोर गेलेले द्रोण अपमानित होऊन परत येतात. राजा आणि भिकारी हे कधीच मित्र असू शकत नाहीत असं बोलून भर दरबारात द्रुपदाकडून द्रोणाचा अपमान केला जातो. आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी द्रोण कुटुंबासह हस्तिनापुरात येऊन कौरव-पांडवांचे गुरू म्हणून रहायला लागतात. नंतर पांडवांकडून द्रुपदाचा पराभव करवून ते आपल्या अपमानाचा सूड घेतात परंतु ज्या पुत्रप्रेमाखातर हे सगळे घडले तो "अश्वत्थामा" मात्र त्यांच्यापासून दुःखावतो, दुरावतो. पुत्राच्या एका साध्या इच्छापूर्तीसाठी ब्राम्हधर्म सोडून क्षात्रधर्म स्वीकारणारे द्रोणाचार्य अशा वळणावर येऊन पोहचतात जिथून माघार अशक्य! या सर्व प्रवासात द्रोण आणि अश्वत्थामा या दोघांमध्ये होणारी धर्म-अधर्मावर, निती-अनितीवर, कौरव-पांडवांवर कादंबरीतील चर्चा वाचकाला विचारात पाडते. आजपर्यंत आपण जे ऐकत-वाचत आलो त्यावर नव्याने विचार करायला वाचक भाग पडतो. अश्वत्थाम्याच्या नजरेतून कृष्ण, अर्जुन, दुर्योधन, दुःशासन, विदुर, कर्ण, एकलव्य, भीष्म, युधिष्ठिर, धृतराष्ट्र, द्रौपदी आणि साक्षात द्रोण यांच्याकडे पाहताना महाभारताचं एक वेगळं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. या पात्रांच्या आजपर्यंत आपल्या मनात असणाऱ्या प्रतिमांना छेद देण्याचं काम "अश्वत्थामा"चं या कादंबरीतील निवेदन करतं. पांडव अनितीने वागत आहेत हे माहित असूनही पांडवांना झुकते माप देणाऱ्यांबद्दल द्रोणांजवळ स्पष्टपणे नाराजी व्यक्त करून शेवटपर्यंत दुर्योधनाला साथ देणारा हा "अश्वत्थामा" आपल्याला सर्वांहून मोठा भासतो. (असं खरं तर महाभारतातील प्रत्येक पात्राबद्दल वाटते जेव्हा आपण त्याच्या नजरेतून महाभारत पाहतो). प्रत्यक्ष युद्धास सुरुवात झाल्यानंतर द्रोणाचार्य कौरवांचे सेनापतीपद स्वीकारतात आणि पांडवसेनेवर तिखट हल्ला चालू करतात. पांडवांची बाजू मार खायला लागताच कृष्णाकडून अनितीने द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवण्यास लावले जाते. भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी आवई उठवली. आपला पुत्र "अश्वत्थामा" चिरंजीवी आहे, तो अमर आहे हे माहित असूनही द्रोण या आवईने विचलित होतात. सर्वांत विश्वसनीय आणि सत्यवादी युधिष्ठिराकडूनही जेव्हा त्यांना ’अश्वत्थामा मेला’ हेच ऐकायला मिळते तेव्हा बसणाऱ्या मानसिक धक्क्याने ते शस्त्र खाली ठेवतात. त्यानंतर दृष्टद्युम्नाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला. पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला. "अश्वत्थामा" हा महाभारतात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून लढला. युद्ध संपल्यानंतर आणि दुर्योधन मृत्यू पंथास लागला असताना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले. आपला निर्वंश झाला हे पाहून पांडव संतप्त होतात. अर्जुन आणि अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्‍नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन तू तेल मागत दारोदार फिरशील. पुत्राच्या दुधाच्या इच्छेखातर द्रोणांकडून नकळत चालू झालेलं हे सूडनाट्य महाभारताच्या शेवटी त्याच पुत्रावर आपल्या भाळी भळभळती जखम घेऊन फिरण्याची वेळ आणते आणि सिद्ध करते 'विधिलिखित अटळ आहे'.

संजय सोनवणी यांचं अतिशय वाचनीय पुस्तक "अश्वत्थामा"!





संदीप प्रकाश जाधव


 


Sunday, May 15, 2022

"जिंजीचा प्रवास"

 



लेखक : वासुदेव सीताराम बेंद्रे

प्रकाशक : प्राकृत प्रकाशन

पृष्ठे- १०९, मूूल्य- २०० रुपये


छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर इतिहासकारांनी आजपर्यंत बरंच संशोधन केलं, बरीच नवनवीन माहिती लोकांपर्यंत पोहचवली. आज ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ जाऊनही आपल्या मनातील त्यांच्याबद्दलचा अभिमान तसूभरही कमी नाही झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाशी मराठ्यांनी सुरू केलेला स्वातंत्र्यसंग्राम तर स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पानच आहे. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात औरंगजेब राहू लागला. मराठयांचा राजा मारला गेला, रायगड पडला, येसूबाई आणि लहान शाहू महाराज मोगलांच्या हाती सापडले अशा या कठीण काळात अनेक मोठ-मोठे मराठी सरदार मोगलांना जाऊन मिळाले त्यामुळे दख्खन जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात दिल्लीकडे परत जायची स्वप्ने बघणाऱ्या औरंगजेबाला आणि त्याच्या विशाल सागर सेनेला मराठ्यांनी आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर पुढची २७ वर्षें लढत ठेवलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशहाविरोधात छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या मराठ्यांच्या या लढ्याची आणि त्याच्या नायकांची इतिहासकारांकडून तशी उपेक्षाच झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची थोडीफार दखल घेतली गेली असली तरी त्याहून अधिक त्यांचे चारित्र्यहनन आणि बदनामीच करण्यात आली. नंतरचा राजाराम महाराज आणि ताराराणींचा इतिहास तर अगदीच उपेक्षित राहिला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या तोडीचा पराक्रम करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य राखणाऱ्या, स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतींचा, राजाराम महाराजांचा "एक दुर्लक्षित छत्रपती" असाच उल्लेख आज बऱ्याच ठिकाणी वाचायला आणि ऐकायला मिळतो. असं असलं तरी एक गोष्ट मान्य करावीच लागेल ती म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात रायगड पडल्यानंतर जवळपास धुळीस मिळालेल्या स्वराज्याच्या उभारणीचं शिवधनुष्य जर राजाराम महाराजांनी नसतं उचललं तर स्वराज्यासह संपूर्ण दख्खन मुघलांनी कधीच आपल्या टाचेखाली घेतला असता. छत्रपती राजाराम महाराजांच्या या महापराक्रमाची पहिली पायरी होती झुल्फिकार खानाने रायगडला दिलेल्या वेढ्यातून निघून जिंजीला पोहोचणं! छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारबखान याने रायगडला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य आता बुडणार अशी शंका निर्माण झाली. अशा कठीण प्रसंगी आपल्या पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं आणि त्यांना रायगडावरून सुरक्षित बाहेर जाण्यास सांगितलं, हेतू एकच - छत्रपती शिवरायांनी उभारलेलं स्वराज्य राखलं पाहिजे हा. रायगडावरून निघून सुरक्षित जागी पोहचण्यासाठी मराठ्यांनी दक्षिणेतील, तामिळनाडूतील जिंजीची निवड केली. काही निवडक आणि विश्वासू सरदारांसह महाराज प्रतापगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेत उतरले. अतिशय प्रदीर्घ प्रवास आणि चारी बाजूला मुघलांचा वावर अशा धोकादायक परिस्थितीत राजाराम महाराज जिंजीला पोहचले. पुन्हा एकदा एका अवघड प्रसंगी मराठ्यांचे छत्रपती शत्रूच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले. आज जर आपण नकाशावर रायगड पासून जिंजीपर्यंतचं अंतर बघितलं तर ते जवळपास १२०० किलोमीटर आहे तेव्हा आपण फक्त कल्पनाच केलेली बरी की राजाराम महाराजांचा हा "जिंजीचा प्रवास" किती धोकादायक होता आणि तो जर फसला असता तर त्यानंतर स्वराज्याचं भविष्य काय असतं. राजाराम महाराजांच्या या रायगडपासून ते जिंजीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करणारा "राजाराम चरित्रम" अर्थातच "जिंजीचा प्रवास" हा ग्रंथ राजाराम महाराजांचे समकालिन आणि शिवाजी महाराजांपासून राजदरबारात राजाश्रय असणारे कवी केशव पंडित यांनी संस्कृतमधे लिहिला होता. शिवकाळातील असणाऱ्या काही दुर्मिळ ग्रंथांपैकी केशव पंडितकृत "राजाराम चरित्रम" हा एक अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आहे. एकूण पाच सर्ग आणि २७५ श्लोकांमधून लिहिल्या गेलेल्या या संस्कृत ग्रंथाचं मराठी भाषांतर वा. सी. बेंद्रे यांनी केलं आहे तेच हे पुस्तक "जिंजीचा प्रवास"!

छत्रपती राजाराम महाराजांचं कर्तृत्व किती अफाट होतं याची छोटीशी झलक देणारा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा ग्रंथ "जिंजीचा प्रवास"!





संदीप प्रकाश जाधव


Sunday, May 8, 2022

"सार्थ"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २७२, मूूल्य- २९५ रुपये


"सार्थ" म्हणजे व्यापाऱ्यांचा तांडा! भैरप्पांच्या या कादंबरीची कथा आहे जवळपास ७व्या-८व्या शतकातील. कादंबरीच्या सुरुवातीलाच लेखक आपल्याला त्या कालखंडात घेऊन जातात. अगदी साधाच विषय पण मानवी मनाचे विविध पैलू उलगडत जाणारे कथानक. नागभट्ट हा या कादंबरीचा नायक. हा नागभट्ट म्हणजे तारावती नगरातील आमरुक राजाचा बालमित्र आणि अत्यंत जवळचा, विश्वासू असा राजदरबारातील एक व्यक्ती. गुरुकुलात वेदाध्ययन केलेल्या तरुण नागभट्टावर अचानकच आमरुक राजा एक गुप्त कामगिरी सोपवतो. देशोदेशी फिरणाऱ्या विविध व्यापारी 'तांड्यां'बरोबर फिरून ते करत असलेल्या व्यापाराची माहिती गोळा करण्याची ही कामगिरी, ज्या माहितीचा वापर आपण आपल्या राज्याच्या विकासासाठी करू असं आमरुक राजा नागभट्टला पटवून देतो. पण आमरुक राजाची ही खेळी खरं तर नागभट्टाच्या पत्नीला हस्तगत करण्यासाठी असते. आपल्या जिवलग मित्राने, तारावती नगराच्या राजाने आपल्याला अतिशय महत्त्वाची जबाबदारी पाड पाडण्यास निवडले या आनंदातच नागभट्ट प्रवासाला लागतो. व्यापारी 'तांड्यां'सोबत काही वर्षांचा काळ घालवल्यानंतर परत आपल्या गावी जाण्याच्या मनस्थितीत आलेल्या नागभट्टाला प्रवासातच एक धक्का बसतो जो त्याच्या पुढच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकतो. राजाच्या आज्ञेनुसार प्रवासाला निघालेल्या नागभट्टला वाटेतच आपल्या पत्नीच्या व्याभिचाराविषयी समजते. आपल्या पत्नीने आणि जिवलग मित्राने केलेल्या या विश्वासघाताने निराश होऊन घरी न परतता सार्थासोबतच वाट मिळेल तिकडे आणि नशीब नेईल तिथे जाण्याचे तो ठरवतो. इथून खऱ्या अर्थाने या कादंबरीची कथा सुरू होते. नागभट्टाच्या या प्रवासात त्याला अनेक व्यक्ती भेटतात. अनेक मानसिक स्थित्यंतरातून त्याला जावे लागते आणि मग त्यानंतर सुरू होते मानसिक द्वंद्व, "वैदीक विरुद्ध बौद्ध", "गृहस्थाश्रम विरुद्ध संन्यास", "जीवन विरुद्ध मृत्यू"! याच प्रवासाची, द्वंद्वाची कहाणी म्हणजे ही कादंबरी "सार्थ"! 

सुरुवातीला थोडंस फ्लॅशबॅकमधे जाणारी ही कथा जिथे नागभट्टाला एका "सार्थात" सामिल झाल्यानंतर आलेले अनुभव वाचत असताना नकळत आपणही त्या "सार्थात" सहभागी होऊन जातो. व्यापारातील अनेक खाचाखोचा समजून घेत असताना "सार्थ" म्हणजे आपल्यासारखा सामान्य माणूस कल्पनाही करू शकणार नाही असं प्रकरण असल्याची जाणीव नागभट्टाला येते. हा "सार्थ" साधासुधा नाही तर व्यापार्‍यांसाठी आवश्यक असलेले सामान लादलेले पंच्याहत्तर घोडे, दोनशे बैलगाड्या, शंभर गाढवं, दररोजच्या आहारासाठी लागणारं धान्य, इतर सामान, गाड्यांची, चाकाची धाव सुटली तर बसवायला सुतार, लोहार इतका प्रचंड काफीला ज्यात बहुतेक माणसं अशी ज्यांना तलवार चालवता येते आणि स्वतःच्या व इतरांच्याही जीवाचं सोबतच मौल्यवान वस्तूंचं संरक्षण करता येतं. अशा सार्थात सहभागी होऊन मार्गक्रमण करणारा नागभट्ट या मोहीमेतून जे काही शिकत जातो त्यातून वाचकालाही बऱ्याच गोष्टी समजत राहतात. हा वरवर दिसणारा फक्त एका भौगोलिक प्रदेशातील प्रवास नसून त्याच्या अंतरंगातही एक अविरत प्रवास चालू असल्याची जाणीव वाचकला विचारात पाडते. या प्रवासात नागभट्टाला अनेक धर्म- पंथातल्या तात्विक मतभेदालाही सामोरं जावं लागतं. काही काळ "सार्था"सोबत प्रवास केल्यानंतर, नागभट्ट एका नाटक मंडळीच्या संपर्कात येतो. कृष्णावर आधारित असणा-या नाटकात त्याला मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळते. "कृष्णानंद" नावाने त्याची कीर्ती सर्वदूर पसरते. बायकोने केलेल्या विश्वासघाताने खचलेला नागभट्ट त्याच कृष्णाच्या नाटकातील नटी चंद्रिकाच्या प्रेमात पडतो. परंतु ध्यानमार्गाचा अवलंब करणारी चंद्रिका नागभट्टावर प्रेम करत असूनही ती ते मान्य करत नाही. त्यामुळे नागभट्ट तिच्यापासून दूर जाण्याचे ठरवतो. एक ब्राह्मण असूनही तो तंत्रसाधनेचा मार्गाला लागतो. अनेक अनुचित मार्ग तो अवलंबतो. हटयोग आणि अघोरी तंत्रविद्या आत्मसात करण्याच्या नादात त्याचे जीवन भरकटत जाते. पण तरीही एका वळणावर त्याची आणि चंद्रिकेची पुन्हा एकदा भेट होते. नागभट्टाच्या तंत्रविद्येतील एका विधीसाठी त्याला मदत करण्यास तयार होणारी चंद्रिका नंतर त्याला "सार्थ" जगणे काय असते ते शिकवते. नागभट्ट आणि चंद्रिका यांच्यामधील हे नाते लेखकाने अगदी तरलपणे उलगडले आहे. कादंबरीतील या ७व्या-८व्या शतकातील काळात बौध्द धर्माने बहुतांश भारत व्यापलेला होता. बौध्द धर्मीय लोक वैदिक लोकांना बौद्ध धर्माचे महत्व पटवून देत असल्याचा विलक्षण प्रसंग मोठ्या खुबीने भैरप्पांनी या कादंबरीत लिहिला आहे. नालंदा विद्यापीठ, पूर्वेचं सूर्यमंदिर या ऐतिहासिक स्थळांचं वर्णन वाचकाला आपल्या इतिहासाच्या भव्यतेची जाणीव करून देतात. नागभट्टाला येणारे उलटसुलट  अनुभव आयुष्यातला नेमका कोणता मार्ग खरा यावर विचार करायला वाचकाला भाग पाडतात. नागभट्टाची होणारी तगमग, सगळीकडे त्याला येणारा शून्याचा, अपूर्णत्वाचा अनुभव आणि तरीही त्याचं सतत सत्याचा शोध घेत राहाणं हा या कादंबरीतील कथेचा गाभा. चंद्रिकेसोबत राहत असताना पुढे नागभट्टाची गाठ गुरु कुमारील भट्टांशी पडते. तत्कालीन समाजामध्ये पंडित कुमारील भट्ट ही एक अतिशय आदरणीय अशी व्यक्ती होती. कुमारील भट्टांची वैदिक धर्मावर अपार श्रद्धा असूनदेखील बौध्द धर्म समजून घेण्यासाठी ते बौद्ध धर्माचा स्वीकार करतात. धर्मांतरण ही त्या काळात खूप निंदनीय गोष्ट असूनदेखील कुमारील भट्ट ते करतात. धर्मांतर केलेल्या व्यक्तीला पूर्वीच्या धर्माचा नैतिक अधिकार राहत नसे परंतु वैदिक धर्माचरण हा कुमारील भट्टांचा श्वास असल्यामुळे प्रायश्चित्त म्हणून सर्वांसमक्ष, स्वतः चिता रचून ते आत्मदहन करायचं ठरवतात. स्वधर्माची महती जाणून घेण्यासाठी प्रसंगी धर्मांतरणाचे पाप करून, प्रायश्चित्त म्हणून प्राणांचे बलिदान देणाऱ्या कुमारील भट्टांची धर्मनिष्ठा आणि चंद्रीकेचे निर्व्याज प्रेम या दोन गोष्टींमुळे नागभट्टाच्या भरकटलेल्या आयुष्यात खूप मोठा बदल होतो आणि शेवटी "सार्थासोबत" चालू झालेल्या या प्रवासात त्याला जीवनाची 'सार्थता' लाभते. 

आपले वाचन 'सार्थ' झाल्याचा अनुभव देणारी, आवर्जून वाचावी अशी कादंबरी, "सार्थ"!!






संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये