लेखक : मे. जनरल शशिकांत गिरीधर पित्रे
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठे- ३३१, मूूल्य- ४३० रुपये
बाजीराव म्हटलं आजही कित्येक लोकांचे विचार मस्तानीच्या पुढे जातच नाहीत. मस्तानीच्या पलीकडे बाजीराव माहीतच नाही असे शेकडो लोक आपल्याला आजही सहज सापडतील आणि हे खरं तर आपलं खूप मोठं दुर्दैव आहे. मस्तानी हे प्रकरण बाजीराव पेशव्यांच्या झळाळत्या कारकिर्दीतील फक्त एक पान होतं आणि लोक त्याची इतकी चर्चा करत राहिले की बाजीराव पेशवा म्हणजे एक प्रेमवेडा अशी एक छबीच बनून गेली. या आपल्या दुर्दैवाचं आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे अशा थोर लोकांना जातीच्या कोंदनात घालून आपापल्या सोयीने त्यांचा इतिहास लोकांपुढे आणणारे काही ठराविक गट! परंतु खरं तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज आणि बाजीराव पेशव्यांसारख्या व्यक्ती या जातींसाठी जन्मल्याच नव्हत्या मुळी, जातीपातींच्या पलीकडे जाऊन पुढच्या शेकडो पिढ्यांना प्रेरणादायी ठरावं असं आयुष्य ते जगले. या अशा थोर लोकांपैकी बाजीरावांचा आपल्याला ठाउक नसलेला आणि वाचून अंगावर रोमांच उभे राहतील असा इतिहास म्हणजे हे मेजर जनरल शशिकांत गिरीधर पित्रे यांचं पुस्तक "या सम हा"! शशिकांत पित्रे यांनी लिहिलेल्या या ग्रंथात बाजीरावांच्या विशाल कर्तृत्वाचा एक कुशल सेनानी म्हणून परिचय करून दिला आहे. छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या हिंदवी स्वराज्याचं एका विशाल साम्राज्यात रूपांतर करणारा रणधुरंधर म्हणजे बाजीराव पेशवा! अवघं ४१ वर्षांचं आयुष्य, २० वर्षांची वादळी कारकीर्द आणि त्यात लढलेल्या ४० लढायांपैकी एकही लढाई न हरलेला सेनानायक म्हणजे बाजीराव पेशवा! मराठा साम्राज्याची विजयी पताका चारी दिशांना फडकवणारा, छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजीमहाराज यांचा संकल्प पुढे नेऊन महाराष्ट्राला ४०० वर्षें वाकुल्या दाखवणारी दिल्ली काबीज करणारा पराक्रमी योद्धा म्हणजे बाजीराव पेशवा! राजमुद्रेतील छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेले ‘वर्धिष्णू’ आणि ‘विश्ववंदिता’ हे शब्द सार्थ करून अवघ्या हिंदुस्थानात तांडव करणारा रुद्र म्हणजे बाजीराव पेशवा! स्वतःच्या कष्टाने पेशवेपद मिळवलेल्या बाळाजी विश्वनाथांच्या अकस्मात मृत्यूनंतर छत्रपती शाहू महाराजांनी वयाच्या अवघ्या २०व्या वर्षी बाजीरावच्या खांद्यावर पेशवाईची जबाबदारी दिली आणि पुढच्या ४च वर्षांत या मिसरूड फुटलेल्या तरुणाने स्वतःला असं काही सिद्ध केलं की विस्कळीत होऊ घातलेलं स्वराज्य पुन्हा एकदा नव्या जोमाने उभं राहू लागलं. बाजीराव पेशव्यांच्या अल्पशा कारकिर्दीत स्वराज्य फक्त उभंच नाही राहिलं तर त्यांच्या या २ दशकांच्या कारकिर्दीत मोगल, पोर्तुगीज आणि सिद्दी यांसारख्या प्रतिस्पर्ध्याना नमवून त्यांनी शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे एका साम्राज्यात रूपांतर केलं. पित्रे यांनी बाजीरावांच्या कर्तृत्वावर लिहिलेलं "या सम हा" हे पुस्तक म्हणजे अजिंक्य बाजीरावाच्या युद्धनेतृत्त्वाची लोकविलक्षण यशोगाथाच आहे असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. लेखकांनी पुस्तकाच्या सुरुवातीलाच बाजीराव पेशव्यांच्या व्यक्तिमत्वाचं केलेलं वर्णन वाचकांच्या मनाचा ठाव घेतं. चैतन्य, ऊर्जा, अभिनिवेश, स्वामिनिष्ठा यांनी ओतपोत भरलेली तसंच आपल्या मातृभूमीवर नितांत प्रेम करणाऱ्या योध्याची ही रांगडी प्रतिमा संपूर्ण पुस्तक वाचून होईपर्यंत सतत आपल्या डोळ्यासमोर तरळत राहते. म्हणूनच शशिकांत पित्रे यांनी लिहिलेला ३३१ पाने, १० प्रकरणे आणि एकूण २० नकाशांतून साकार झालेला हा ग्रंथ बाजीराव पेशव्यांसारख्या वीरश्रेष्ठाच्या शौर्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करून शेकडो वर्षांपासून फक्त एक प्रेमवेडा, प्रेमांध म्हणून त्याच्या प्रेमविलासाचं उदात्तीकरण करणाऱ्यांसाठी एक सणसणीत चपराक आहे. अशा मूठभर लोकांच्या डोळ्यात घातलेलं हे एक झणझणीत अंजनच आहे.
"स्वराज्याचे पुनरुत्थान" या पहिल्या प्रकरणापासून या ग्रंथाची सुरुवात होते. लेखकांनी या पहिल्या प्रकरणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला अतिशय गुंतागुंतीचा घटनाक्रम अगदी सोप्या भाषेत सांगितला आहे. शाहू महाराजांचं औरंगजेबाकडून पुन्हा स्वराज्यात येणं, कोल्हापूरच्या गादीसोबत चालू झालेला शाहू महाराजांचा संघर्ष, बाजीराव पेशव्यांचे वडील बाळाजी विश्वनाथांचं स्वराज्यासाठीचं योगदान, बाळाजीने आखलेली महसूल पद्धती, स्वराज्याभोवतालच्या इतर शाह्यांसोबतचं संघटन आणि पेशवाईचा घातलेला मजबूत पाया, लहानपणापासूनचं बाजीराव आणि चिमाजी यांचं नातं, बाळाजींचा झालेला अकस्मात मृत्यू, बाजीराव पेशव्यांच्या शिरावर अचानकपणे पडलेली पेशवेपदाची जबाबदारी, उमद्या वयातील बाजीरावाचं आपल्याहून वयाने आणि अनुभवाने मोठ्या सरदारांसोबत असणारं नातं, त्याकाळातील एकूण मोगल साम्राज्य आणि स्वराज्य यांची भौगोलिक पार्श्वभूमी, बाजीरावाच्या संबंधित असलेल्या सरदारांची ओळख या सर्वांची अगदी विस्तृत माहिती पहिल्या प्रकरणात आपल्याला वाचायला मिळते. यानंतरच्या प्रकरणांतून पेशवेपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर बाजीरावांनी स्वराज्याची उत्तरोत्तर केलेली प्रगती वाचण्यास मिळते. छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेले लष्कराचे प्रमुख भाग, लष्कराची रचना आणि त्यातील हुद्दे बाजीरावांच्या काळात कसे होते याचीही रोचक माहिती आपल्याला या ग्रंथात मिळते. शिवरायांनी आपल्या सेनेत रुजवलेली मूल्यं बाजीरावांच्या काळातही प्राणपणाने कशी जपली जात होती हे पुस्तकात वाचताना अतिशय अभिमान होतो. बाजीराव पेशव्यांचं कार्यक्षेत्र आणि त्यांच्यापुढे असलेल्या डोंगरासमान आव्हानांसोबतच त्यांनी लढलेल्या लढायांची अगदी विस्तृत माहिती आपल्याला या ग्रंथात मिळते. खांडवा, बाळापूर, फत्तेखर्डा, माळवा, गुजरात, कर्नाटक, डभई अशा अनेक यशस्वी मोहिमा तसंच ठिकठिकाणी निजामाला दिलेला शह, आग्ऱ्यातील सैन्याला चाहूलही न लागू देता त्यांच्यामधूनच पुढे जात दिल्लीत पोहचणाऱ्या आक्रमक बाजीरावाच्या रोमांचकारी प्रवासाचं अद्भुत दर्शन लेखकांनी आपल्याला घडवलं आहे. पित्रे यांनी बाजीरावांनी लढलेली प्रत्येक लढाई एका क्रमाने घेऊन ती लढण्यामागचा त्यांचा मुख्य उद्देश स्पष्ट करून सांगितला आहे. मोहिमेआधी निरीक्षण करून, शत्रूचं वैगुण्य अचूक हेरून बाजीरावने घेतलेले महत्वाचे निर्णय, युद्धाच्या पूर्वीच्या हालचाली, लढाईच्या मैदानाचे गुणधर्म, अभिजात व्यूहरचना आणि प्रत्यक्ष लढाई असं सगळं लेखकांनी ठिकठिकाणी नकाशाच्या सहाय्याने मांडलेलं आहे. बाजीरावांनी लढलेल्या प्रत्येक लढाईचं लष्करी तत्त्वांवर मूल्यमापन आणि त्याचा तत्कालीन राजकारणावर झालेला दूरगामी परिणाम या गोष्टींचंही लेखकांनी संदर्भासह दिलेलं सविस्तर स्पष्टीकरण आपल्याला अचंबित करतं! चातुर्याने हालचाली केल्या तर आपले कमीतकमी नुकसान करुन रणमैदानात काय चमत्कार करुन दाखवता येतो याचं उत्तम उदाहरण म्हणून बाजीरावांनी लढलेल्या प्रत्येक लढाईकडे पाहता येईल. बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीत शिवरायांच्या गनिमीकावा या युद्धनीतीचा विकास झालेला दिसून येतो. याचं अगदी ठळक उदाहरण म्हणजे फेब्रुवारी १७२८ मधे झालेला पालखेडचा संग्राम! शिंदे, होळकरांसारख्या विश्वासू आणि कर्तबगार सरदारांना घेऊन आपल्या बुद्धी आणि बाहुबलाच्या जोरावर तीन शतकांपूर्वी बाजीराव पेशव्यांनी जिंकलेल्या पालखेडच्या लढाईकडे आजही युद्धशास्त्राचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणून पाहिलं जातं. अवजड तोफा, हत्ती, जनाना, बुणगे यांसह सुस्त चालणाऱ्या मोगल सैन्याविरुद्ध विजेच्या चपळाईने गतिमान होत त्यांचं नेतृत्व करणारा झपाटलेला बाजीराव वाचत असताना उर अभिमानाने भरून येतो. फक्त आधुनिक तंत्रज्ञान वा शस्त्रांनी नव्हे तर दृढनिश्चयी मन आणि कुशाग्र बुद्धीच्या जोरावर लढाई जिंकली जाते हे बाजीरावांनी जगाला दाखवून दिलं. पित्रे यांनी लिहिलेल्या या पुस्तकाबद्दल बोलावं तितकं कमीच. बाजीरावांच्या अल्पशा कारकिर्दीवर नजर टाकताना "या सम हा" हे शिर्षक किती योग्य आहे याची जाणीव या पुस्तकाच्या पाना-पानावर होत राहते.
प्रेमवीर ही बाजीराव पेशव्यांची प्रतिमा पुसून एक रणधुरंधर, अतिशय हुशार असा सेनानायक, रणपंडित म्हणून त्यांना समोर आणण्याचं लाखमोलाचं काम शशिकांत पित्रे यांचं हे पुस्तक करते. बाजीराव पेशवा जाणून घ्यायचा असेल तर आवर्जून वाचावं असं पुस्तक "या सम हा"!
संदीप प्रकाश जाधव