लेखक : वासुदेव सीताराम बेंद्रे
प्रकाशक : प्राकृत प्रकाशन
पृष्ठे- १०९, मूूल्य- २०० रुपये
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीवर इतिहासकारांनी आजपर्यंत बरंच संशोधन केलं, बरीच नवनवीन माहिती लोकांपर्यंत पोहचवली. आज ३५० वर्षांपेक्षा जास्त काळ जाऊनही आपल्या मनातील त्यांच्याबद्दलचा अभिमान तसूभरही कमी नाही झाला. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाशी मराठ्यांनी सुरू केलेला स्वातंत्र्यसंग्राम तर स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पानच आहे. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात औरंगजेब राहू लागला. मराठयांचा राजा मारला गेला, रायगड पडला, येसूबाई आणि लहान शाहू महाराज मोगलांच्या हाती सापडले अशा या कठीण काळात अनेक मोठ-मोठे मराठी सरदार मोगलांना जाऊन मिळाले त्यामुळे दख्खन जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात दिल्लीकडे परत जायची स्वप्ने बघणाऱ्या औरंगजेबाला आणि त्याच्या विशाल सागर सेनेला मराठ्यांनी आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर पुढची २७ वर्षें लढत ठेवलं. शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांचे साम्राज्य नष्ट करण्यासाठी आलेल्या औरंगजेब बादशहाविरोधात छत्रपती संभाजी महाराज, राजाराम महाराज आणि महाराणी ताराराणी यांच्या नेतृत्वाखाली हा लढा लढला गेला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनंतरच्या मराठ्यांच्या या लढ्याची आणि त्याच्या नायकांची इतिहासकारांकडून तशी उपेक्षाच झाली. छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याची थोडीफार दखल घेतली गेली असली तरी त्याहून अधिक त्यांचे चारित्र्यहनन आणि बदनामीच करण्यात आली. नंतरचा राजाराम महाराज आणि ताराराणींचा इतिहास तर अगदीच उपेक्षित राहिला. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या तोडीचा पराक्रम करून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य राखणाऱ्या, स्वराज्याच्या तिसऱ्या छत्रपतींचा, राजाराम महाराजांचा "एक दुर्लक्षित छत्रपती" असाच उल्लेख आज बऱ्याच ठिकाणी वाचायला आणि ऐकायला मिळतो. असं असलं तरी एक गोष्ट मान्य करावीच लागेल ती म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूपश्चात रायगड पडल्यानंतर जवळपास धुळीस मिळालेल्या स्वराज्याच्या उभारणीचं शिवधनुष्य जर राजाराम महाराजांनी नसतं उचललं तर स्वराज्यासह संपूर्ण दख्खन मुघलांनी कधीच आपल्या टाचेखाली घेतला असता. छत्रपती राजाराम महाराजांच्या या महापराक्रमाची पहिली पायरी होती झुल्फिकार खानाने रायगडला दिलेल्या वेढ्यातून निघून जिंजीला पोहोचणं! छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाचा सरदार झुल्फिकारबखान याने रायगडला वेढा दिला. प्रत्यक्ष राजधानीच संकटात असल्यामुळे मराठ्यांचे राज्य आता बुडणार अशी शंका निर्माण झाली. अशा कठीण प्रसंगी आपल्या पतीच्या निधनाचं दुःख बाजूला सारून महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांचं मंचकारोहण केलं आणि त्यांना रायगडावरून सुरक्षित बाहेर जाण्यास सांगितलं, हेतू एकच - छत्रपती शिवरायांनी उभारलेलं स्वराज्य राखलं पाहिजे हा. रायगडावरून निघून सुरक्षित जागी पोहचण्यासाठी मराठ्यांनी दक्षिणेतील, तामिळनाडूतील जिंजीची निवड केली. काही निवडक आणि विश्वासू सरदारांसह महाराज प्रतापगड, पन्हाळगड मार्गे दक्षिणेत उतरले. अतिशय प्रदीर्घ प्रवास आणि चारी बाजूला मुघलांचा वावर अशा धोकादायक परिस्थितीत राजाराम महाराज जिंजीला पोहचले. पुन्हा एकदा एका अवघड प्रसंगी मराठ्यांचे छत्रपती शत्रूच्या वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले. आज जर आपण नकाशावर रायगड पासून जिंजीपर्यंतचं अंतर बघितलं तर ते जवळपास १२०० किलोमीटर आहे तेव्हा आपण फक्त कल्पनाच केलेली बरी की राजाराम महाराजांचा हा "जिंजीचा प्रवास" किती धोकादायक होता आणि तो जर फसला असता तर त्यानंतर स्वराज्याचं भविष्य काय असतं. राजाराम महाराजांच्या या रायगडपासून ते जिंजीपर्यंतच्या संपूर्ण प्रवासाचे वर्णन करणारा "राजाराम चरित्रम" अर्थातच "जिंजीचा प्रवास" हा ग्रंथ राजाराम महाराजांचे समकालिन आणि शिवाजी महाराजांपासून राजदरबारात राजाश्रय असणारे कवी केशव पंडित यांनी संस्कृतमधे लिहिला होता. शिवकाळातील असणाऱ्या काही दुर्मिळ ग्रंथांपैकी केशव पंडितकृत "राजाराम चरित्रम" हा एक अत्यंत दुर्मिळ ग्रंथ आहे. एकूण पाच सर्ग आणि २७५ श्लोकांमधून लिहिल्या गेलेल्या या संस्कृत ग्रंथाचं मराठी भाषांतर वा. सी. बेंद्रे यांनी केलं आहे तेच हे पुस्तक "जिंजीचा प्रवास"!
छत्रपती राजाराम महाराजांचं कर्तृत्व किती अफाट होतं याची छोटीशी झलक देणारा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा ग्रंथ "जिंजीचा प्रवास"!
संदीप प्रकाश जाधव
छान
ReplyDelete