लेखक : संजय सोनवणी
प्रकाशक : प्राजक्त प्रकाशन
पृष्ठे- १९२, मूूल्य- २४० रुपये
महाभारताला महर्षी व्यासांनी लिहिलेलं काव्य म्हणा अगर भारताचा प्राचीन इतिहास म्हणा त्यातील प्रत्येक पात्र, घटना आपल्याला काही न काही शिकवून जातातच. महाभारताचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील कोणत्याही पात्राच्या नजरेतून, कितीही वेळा आपण महाभारताकडे पाहिलं तर ते पात्रच योग्य आणि इतर पात्रे त्याच्यासमोर चुकीची वाटतात. परंतु असं असलं तरी हजारो वर्षांपासून नितीचा अनितीवर, धर्माचा अधर्मावर आणि वाईटाचा चांगल्यावर झालेला विजय म्हणूनच महाभारत आपल्यासमोर सादर केलं गेलंय. पांडव चांगले आणि कौरव वाईट, पांडव नितीने आणि कौरव अनितीने वागले हे सांगत असताना त्यादरम्यान घडलेल्या घटनांमधील विरोधाभास मात्र नेहमीच दुर्लक्षित केला जातो. महाभारताच्या जितकं खोलात जाऊ तितका हा विरोधाभास अधिकच जाणवत राहतो. निती-अनितीवर शंका घेणारे शेकडो अनुत्तरीत प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. परंतु या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन महाभारत का घडलं असा प्रश्न जर कोणाला विचारला तर त्याची वेगवेगळी उत्तरे आपल्याला मिळतील, कोणी म्हणेल कौरव-पांडवांमधील सत्तासंघर्षामुळे महाभारत घडलं तर कोणी म्हणेल द्रौपदीमुळे महाभारत घडलं. कोणाला भीष्म दोषी दिसेल तर कोणाला धृतराष्ट्र. कोणाला कुंती तर कोणाला कर्ण. पण खरंच यांच्यामुळे घडलं का महाभारत? तर नाही, महाभारत घडलं ते भारद्वाजपुत्र द्रोणामुळे! आपल्या पुत्राच्या, अश्वत्थाम्याच्या चांगल्या भविष्यासाठी घेतलेल्या द्रोणांच्या एका निर्णयामुळे! द्रुपद राजाने द्रोणाचा अपमान केल्यानंतर त्या अपमानाच्या आगीत सुडाने पेटलेल्या द्रोणांनी द्रुपदाचा बदला घेण्यासाठी कौरव-पांडवांचे गुरु बनत द्रुपद राजावर हल्ला चढवून त्याचा पराभव केला. या पराभवानंतर द्रुपदाने यज्ञातून निर्माण केलेले धृष्टद्युम्न आणि द्रौपदी हे या सूडनाट्याची पुढची पायरी! इथून सुरुवात झालेल्या या सूडनाट्याने पुढे महाभारत घडवलं आणि त्याचा शेवट न्याय्य बाजूलाच बदनाम करण्यात झाला. या सुडनाट्याच्या सुरुवातीची मुळे ज्याच्या बालहट्टाने रुजवली गेली त्या द्रोणपुत्र "अश्वत्थाम्याला" चिरकाल ती भळभळती जखम आपल्या भाळावर वागवावी लागली. "अश्वत्थामा" ही संजय सोनवणी यांची याच द्रोणपुत्राच्या आयुष्यावर बेतलेली आणि अश्वत्थाम्याच्या नजरेतून आपल्याला महाभारत दाखवणारी कादंबरी!
द्रोणांच्या निवेदनातून या कादंबरीची सुरुवात होते. द्रोणांचं बालपण, द्रोण लहान असतानाच त्यांच्या वडिलांचा-भारद्वाज ऋषींचा झालेला मृत्यू, अग्निवेशांकडून द्रोणांचं झालेलं संगोपन, द्रोण-कृपी यांचा संसार, द्रोणांनी प्रत्यक्ष परशुरामाकडून मिळवलेली विद्या या सर्वांना तशा परिचयाच्याच गोष्टींतून ही कथा पुढे सरकत राहते. जंगलातील आश्रमात जन्माला आलेला द्रोण आणि कृपी यांचा पुत्र "अश्वत्थामा"! द्रोणांनी भगवान शंकराला प्रसन्न करून शिवासारखा पराक्रमी आणि चिरंजीवी असा हा पुत्र जन्माला घातला खरा पण द्रोणांच्या आश्रमातील साध्या राहणीमानामुळे "अश्वत्थाम्याचे" बालपण खूपच कठीण जायला लागते. युद्धशास्त्रात निष्णात असणाऱ्या द्रोणांचा मानी स्वभाव त्यांच्या पुत्राच्या साध्या-साध्या ईच्छादेखील पुऱ्या करण्यास असमर्थ ठरतो. परंतु अश्वत्थाम्याने दुधासाठी केलेला हट्ट आणि तो पूर्ण करण्यासाठी असणारी आपली असमर्थता द्रोणांना त्यांच्या स्वभावाविरुद्ध निर्णय घेण्यास भाग पाडते. कधीही कोणासमोर हात न पसरवणारे द्रोण शेवटी आपल्या बालमित्राची, द्रुपदाची मदत घेण्याचे ठरवतात आणि इथेच ठिणगी पडते भविष्यात होऊ घातलेल्या महाभारताची! अश्वत्थाम्यावरील प्रेमाखातर द्रुपदासमोर गेलेले द्रोण अपमानित होऊन परत येतात. राजा आणि भिकारी हे कधीच मित्र असू शकत नाहीत असं बोलून भर दरबारात द्रुपदाकडून द्रोणाचा अपमान केला जातो. आपल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी द्रोण कुटुंबासह हस्तिनापुरात येऊन कौरव-पांडवांचे गुरू म्हणून रहायला लागतात. नंतर पांडवांकडून द्रुपदाचा पराभव करवून ते आपल्या अपमानाचा सूड घेतात परंतु ज्या पुत्रप्रेमाखातर हे सगळे घडले तो "अश्वत्थामा" मात्र त्यांच्यापासून दुःखावतो, दुरावतो. पुत्राच्या एका साध्या इच्छापूर्तीसाठी ब्राम्हधर्म सोडून क्षात्रधर्म स्वीकारणारे द्रोणाचार्य अशा वळणावर येऊन पोहचतात जिथून माघार अशक्य! या सर्व प्रवासात द्रोण आणि अश्वत्थामा या दोघांमध्ये होणारी धर्म-अधर्मावर, निती-अनितीवर, कौरव-पांडवांवर कादंबरीतील चर्चा वाचकाला विचारात पाडते. आजपर्यंत आपण जे ऐकत-वाचत आलो त्यावर नव्याने विचार करायला वाचक भाग पडतो. अश्वत्थाम्याच्या नजरेतून कृष्ण, अर्जुन, दुर्योधन, दुःशासन, विदुर, कर्ण, एकलव्य, भीष्म, युधिष्ठिर, धृतराष्ट्र, द्रौपदी आणि साक्षात द्रोण यांच्याकडे पाहताना महाभारताचं एक वेगळं रूप आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. या पात्रांच्या आजपर्यंत आपल्या मनात असणाऱ्या प्रतिमांना छेद देण्याचं काम "अश्वत्थामा"चं या कादंबरीतील निवेदन करतं. पांडव अनितीने वागत आहेत हे माहित असूनही पांडवांना झुकते माप देणाऱ्यांबद्दल द्रोणांजवळ स्पष्टपणे नाराजी व्यक्त करून शेवटपर्यंत दुर्योधनाला साथ देणारा हा "अश्वत्थामा" आपल्याला सर्वांहून मोठा भासतो. (असं खरं तर महाभारतातील प्रत्येक पात्राबद्दल वाटते जेव्हा आपण त्याच्या नजरेतून महाभारत पाहतो). प्रत्यक्ष युद्धास सुरुवात झाल्यानंतर द्रोणाचार्य कौरवांचे सेनापतीपद स्वीकारतात आणि पांडवसेनेवर तिखट हल्ला चालू करतात. पांडवांची बाजू मार खायला लागताच कृष्णाकडून अनितीने द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवण्यास लावले जाते. भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी आवई उठवली. आपला पुत्र "अश्वत्थामा" चिरंजीवी आहे, तो अमर आहे हे माहित असूनही द्रोण या आवईने विचलित होतात. सर्वांत विश्वसनीय आणि सत्यवादी युधिष्ठिराकडूनही जेव्हा त्यांना ’अश्वत्थामा मेला’ हेच ऐकायला मिळते तेव्हा बसणाऱ्या मानसिक धक्क्याने ते शस्त्र खाली ठेवतात. त्यानंतर दृष्टद्युम्नाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला. पुढे अश्वत्थाम्यानेही दृष्टद्युम्नाचा वध करून आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेतला. "अश्वत्थामा" हा महाभारतात कौरवांचा शेवटचा सेनापती म्हणून लढला. युद्ध संपल्यानंतर आणि दुर्योधन मृत्यू पंथास लागला असताना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधार असल्याने त्याला पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी आणणे शक्य झाले. आपला निर्वंश झाला हे पाहून पांडव संतप्त होतात. अर्जुन आणि अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रह्मास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रह्मास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्यूची पत्नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतापर्यंत ही जखम कपाळी घेऊन तू तेल मागत दारोदार फिरशील. पुत्राच्या दुधाच्या इच्छेखातर द्रोणांकडून नकळत चालू झालेलं हे सूडनाट्य महाभारताच्या शेवटी त्याच पुत्रावर आपल्या भाळी भळभळती जखम घेऊन फिरण्याची वेळ आणते आणि सिद्ध करते 'विधिलिखित अटळ आहे'.
संजय सोनवणी यांचं अतिशय वाचनीय पुस्तक "अश्वत्थामा"!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment