Wednesday, June 29, 2022

"संभवामि युगेयुगे"

          


लेखक : अजिंक्य कुलकर्णी

प्रकाशक : शिवसमर्थ सेवा प्रकाशन

पृष्ठे- ३०६, मूूल्य- ३६० रुपये


'टाईम ट्रॅव्हल' अर्थातच 'कालभ्रमण', शास्त्रीयदृष्टीने सिध्द झालेली पण प्रत्यक्षात शक्य नसणारी अशी गोष्ट. प्रत्येक माणसाचं कुतूहल जागं करणाऱ्या या कल्पनेवर आधारित बरेच चित्रपट, मालिका, कथा आपण पाहिल्या-वाचल्या आहेत जिथे वर्तमानकाळातून भविष्यकाळात आणि भूतकाळात जाऊन येणारा एखादा नायक आपली मती गुंग करतो. आज एखाद्याला 'कालभ्रमण' करून कोणत्या काळात जायला आवडेल असा प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असू शकतं पण माझ्यासारख्या इतिहासप्रेमी माणसाचं उत्तर एकच असेल ते म्हणजे 'छत्रपती शिवरायांचा काळ'!!  आज ३५० वर्षांहून जास्त काळ लोटूनही ज्यांच्या फक्त नावानेच आपल्यात एक ऊर्जा निर्माण होते अशा युगपुरुषाचं दर्शन जर आपल्याला प्रत्यक्ष घेता आलं तर? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना प्रत्यक्ष लढाई करताना आपल्याला पाहता आलं तर? बाजीराव पेशव्यांसारख्या रणधुरंधर सेनानीला रणांगणावर तांडव करताना आपल्याला प्रत्यक्ष पाहता आलं तर? छत्रपती शिवाजी महाराज यांचा अकाली मृत्यू आणि संभाजी महाराजांचा फितुरीमुळे झालेला शेवट या घटना कालभ्रमण करून आपण बदलू शकलो तर? भूतकाळात जाऊन स्वराज्याचा इतिहास जर आपण बदलू शकलो तर आज आपला वर्तमान काय असता? अशा विचारांनीच आपल्या अंगावर शहारे येतात. जरी या गोष्टी प्रत्यक्षात शक्य नसल्या तरी 'टाईम ट्रॅव्हल' ची ही कल्पनाच अफलातून वाटते. लेखक अजिंक्य कुलकर्णी यांनी 'कलभ्रमणाच्या' याच कल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन,  शिवरायांपासून ते पानिपतपर्यंतचा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आणि कालभ्रमण या दोन धाग्यांना पकडून लिहिलेली ही एक भन्नाट काल्पनिक कादंबरी "संभवामि युगेयुगे"! आजपर्यंत कधी वाचनात न आलेलं असं या कादंबरीचं रोमांचकारी कथानक! पानापानावर वाढत जाणारा थरार आणि क्षणाक्षणाला रोमांच उभे करणाऱ्या घटनांतून अजिंक्य कुलकर्णी यांनी साकारलेला हा कल्पनाविष्कार आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. अजिंक्य कुलकर्णी यांनी या काल्पनिक कथेसाठी निवडला आहे पानिपतचा महासंग्राम! अहमदशाह अब्दाली सोबत मराठ्यांनी लढलेलं पानिपतचं युद्ध हिंदुस्थानच्या कपाळावरील भळभळती जखम आहे. हिंदुस्थानच्या सुरक्षेसाठी पानिपतावर मराठे प्राणपणाने लढले पण दुर्दैवाने त्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि हिंदुस्थानचे पुढचे भविष्यच बदलून गेले. पण विचार करा जर मराठे पानिपतावर हरलेच नसते तर? छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, भाऊसाहेब, विश्वासराव, होळकर, शिंदे, नानासाहेब इतिहासातील सर्व मराठा सरदारांसोबत पानिपतच्या रणभूमीवर अब्दालीविरुद्ध एकत्र उभे राहिले असते तर? छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवा दोघांनी मिळून जर अब्दालीचा पराभव केला असता तर? जरी या 'तर' ला आज काहीच अर्थ नसला तरी अजिंक्य कुलकर्णी यांनी त्यांच्या या काल्पनिक कादंबरीतून प्रत्येक इतिहासप्रेमीच्या मनाला हात घातला आहे. वाचक अक्षरशः हरवून जावा अशी ही कादंबरी "संभवामि युगेयुगे"!

तर कादंबरीची सुरुवात होते ऋषभ या इतिहासप्रेमी तरुणाच्या एका शोधापासून! असं म्हणतात की पानिपतच्या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून एकजण कामी आला होता आणि हेच डोक्यात ठेऊन आपल्या घराण्यातील कोणते पूर्वज पानिपतावर गेले होते का याचा शोध घेणारा हा ऋषभ! त्याचा हा शोध त्याला पुण्याहून नाशिकला घेऊन येतो आणि याचवेळी भारत-पाकिस्तान दरम्यान चालू असलेल्या युद्धात अशा काही घटना घडतात की ऋषभच्या डोक्यातील इतिहास त्याला आपल्यासोबत थेट इ.स. १७६० मधे घेऊन जातो. इ. स. १७६० हा काळ मराठ्यांच्या, स्वराज्याच्या आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या इतिहासातील खूप धामधुमीचा काळ. अटकेपार झेंडे लावून अखंड हिंदुस्थानावर वचक बसवलेल्या मराठा साम्राज्याच्या कसोटीचा हा काळ. ऋषभ जेव्हा या काळात पोहचतो तेव्हाची परिस्थिती अतिशय स्फोटक असते. काही दिवसांपूर्वीच दत्ताजी शिंदेसारख्या मातब्बर सरदाराची झालेली हत्या आणि त्यामुळे नजीब खान, कुतुबजंग, अहमदशाह अब्दालीवर चिडलेलं मराठा सैन्य! याच मनःस्थितीत सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली अनेक पराक्रमी मराठा सरदार नजीब खान आणि अब्दालीचा बिमोड करण्यासाठी उत्तरेकडे, दिल्लीच्या रोखाने निघतात. 'कालभ्रमण' करून भूतकाळात नेमका या मोहिमेच्या वेळीच आलेल्या ऋषभला मग एकामागून एक धक्के बसायला चालू होतात. भाऊंची ही मोहिम पुढे सरकण्यापूर्वीच ऋषभ भविष्यातील घडणाऱ्या घटना त्यांना सांगून इतिहासाची उलथापालथ करून टाकतो. कथेच्या या टप्प्यावर वाचक जो या कथेत गुरफटून जातो तो अगदी शेवटपर्यंत! प्रत्येक पानावर वाचक अक्षरशः भारावून जातो कारण इतिहासाची झालेली ही उलथापालथ फक्त इथेच नाही थांबत तर दोन्ही बाजूंनी कालभ्रमण करून आलेल्या इतरही अनेक व्यक्तिरेखा या कथेत सामील होतात. पानिपतच्या रणभूमीवर एकीकडे उभा असतो ३५५ वर्षें भविष्यात आलेला तैमूर, १३ वर्षें भविष्यात आलेला नादिरशाह, १०३ वर्षें भूतकाळात आलेला जॉन निकोलसन आणि स्वतःच्याच काळात असणारा अहमदशाह अब्दाली! तर दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानचे रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा या भूमीवर अवतरतात साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांना साथ असते ती २० वर्षें भविष्यात आलेल्या रणधुरंधर बाजीराव पेशव्यांची, सोबतच सारा हिंदुस्थान!! एकाबाजूला हिंदुस्थानचा घास घेण्यासाठी आलेल्या परकीय सत्ता तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एकछत्री हिंदुस्थान! कथेच्या शेवटी या लढाईचा निकाल काय लागू शकतो याची वाचकाला आधीच जाणीव होत असली तरीही अस्तित्वासाठी चालू झालेल्या या लढाईच्या रक्तरंजित आणि काल्पनिक इतिहासातून बाहेरच येऊ नये अशी काहीशी भावना आपल्या मनात येते.

अजिंक्य कुलकर्णी यांचा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा एक जबरदस्त कल्पनाविष्कार "संभवामि युगेयुगे"!





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, June 14, 2022

"युद्ध जिवांचे"

 


लेखक : गिरीश कुबेर

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- २२२, मूूल्य- २९० रुपये


गिरीश कुबेर यांचं "अधर्मयुद्ध" हे पुस्तक जेव्हा वाचून पूर्ण झालं त्याच वेळी मनात एक गोष्ट पक्की झाली होती ती म्हणजे या लेखकाची मिळतील ती सर्व पुस्तके वाचून काढायची आणि त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या आसपास असो वा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सतत घडणाऱ्या घटना ज्यांचा आपण सहसा कधी विचारही करत नाही त्यांचा आपल्या आयुष्यावर होणारा थेट परिणाम किती भयानक आणि दूरगामी असू शकतो याची जाणीव करून देणारं त्यांचं लेखन! आपल्याला खडबडून जागं करून वास्तवाचं भान करून देणारं त्यांचं लेखन! गिरीश कुबेर यांचं हेच वेगळंपण "अधर्मयुद्ध" मधून जाणवलं आणि आपसूकच त्यांच्या इतर पुस्तकांची यादी बनवायला घेतली. त्या यादीतीलच हे पुढचं पुस्तक "युद्ध जिवांचे"! वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारा, वाचून मन सुन्न करणारा आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा असा या पुस्तकाचा विषय. वास्तव जीवनाशी निगडीत प्रश्नांचं सखोल संशोधन व अभ्यास करून लिहिलं गेलेलं असं हे साहित्य. जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास ही टॅगलाईन डोक्यात ठेऊन वाचायला सुरुवात करणाऱ्या वाचकाला पहिल्या २-४ पानांतच दोन वर्षांपूर्वी अख्ख्या जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केलेला 'कोरोना' आठवला नाही तरच नवल. लेखकांनी पुस्तकात पुढे पुढे तर अशा काही गोष्टींचा उलगडा केला आहे की कोरोनाने घातलेला थैमानही त्यापुढे कवडीमोल वाटावा. भारतात बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लूची साथ पसरल्यानंतर अचानक अशा साथी का पसरतात, याचा शोध घेत असताना गिरीश कुबेर यांना अचानक जन्माला येणाऱ्या साथींमागचं जे 'राजकारण' जाणवलं त्याचा शोध त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बर्ड फ्लू किंवा स्वाईन फ्लूचे जंतू अचानकपणे, एका विशिष्ट ठिकाणीच कसे उगवतात आणि जसे अचानक येतात तसे निघूनही कसे जातात? हे असे जंतू प्रयोगशाळेत तयार करून कोणीतरी त्याची चाचणी तर घेत नसेल ना? अशा प्रशांची उत्तरे शोधत लेखकासोबतच वाचकदेखील पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात ओढला जातो. ज्या पहिल्या महायुद्धाने जैविक व रासायनिक अस्त्रांना जन्माला घातलं त्या काळातील घटनांचा अभ्यास करून या रासायनिक अस्त्रांचा जन्म कसा झाला, प्राचीन इतिहासातील युद्धांत त्याची पाळंमुळं कुठवर आहेत आणि येणाऱ्या काळात या अस्त्रांचं रूप कसं असेल याचा अगदी सखोल अभ्यास करून जो वेधक आढावा गिरीश कुबेर यांनी घेतला आहे तो आपल्याला या "युद्ध जिवांचे" पुस्तकातून वाचायला मिळेल. पारंपरिक पद्धतीच्या युद्धातील डावपेचांनी जेव्हा समोरच्या शत्रूला हरवणं अवघड होऊ लागलं तेव्हा जन्माला आलेली ही नवीन कल्पना जैविक-रासायनिक हल्ला! अशा जैविक अस्त्रांचा जनक कोण? कोणत्या देशांनी या संशोधनाला पाठिशी घातलं? या जैविक अस्त्रांची चाचणी कशी घेतली जायची? चाचणी घेत असताना आणि प्रत्यक्ष त्याच्या वापरावेळी माणसावर त्याचा काय परिणाम झाला? किती लोक मारले गेले? कोणकोणत्या देशांनी अशा अस्त्रांचा वापर कधी, कोणाविरुद्ध आणि कसा केला? त्याचे जागतिक राजकारणावर काय परिणाम झाले? पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात या अस्त्रांचा वापर कसा आणि कोणी केला? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जेव्हा आपल्याला या पुस्तकात मिळतात तेव्हा एक मनुष्य जात म्हणून स्वतःचीच चीड आल्याशिवाय राहत नाही. गिरीश कुबेर यांनी काही अतिशय जुन्या, इसवी सनपूर्व घटनांचा संदर्भदेखील या पुस्तकात दिला आहे ज्यामधे शत्रू राष्ट्राच्या हद्दीत प्लेग सारख्या रोगांचा फैलाव कशा पद्धतीने केला जायचा याचं वर्णन आहे. असाध्य रोगाने मरण पावलेल्या लोकांची प्रेते शत्रू राष्ट्राच्या लोकांवर बॉम्बहल्ले करावेत अशा पद्धतीने टाकून तो रोग कसा पसरवला जायचा हे पुस्तकात वाचून मन सुन्न होते. अलीकडच्या काळात हिटलरचा अशा अस्त्रांच्या निमिर्तीतील वाटा आणि वापर तर जगजाहीर आहेच, पण दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचे शिल्पकार मानले जाणारे तथाकथित मानवतावादी चचिर्ल, रुझवेल्ट आदींनीही नरसंहारासाठी जैविक अस्त्रांच्या निमिर्तीला चालना देऊन त्याचा केलेला वापर आणि त्याचा परिणाम आपला थरकाप उडवून जातो. पुस्तकातील बऱ्याच गोष्टी वाचत असताना हिटलरचा क्रूरपणा आपल्याला इतर राष्ट्रांनी केलेल्या अत्याचारासमोर खूपच नगण्य वाटतो. उदाहरणच द्यायचे झाले तर अमेरिकेने हिरोशिमा-नागासाकीवर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर बेचिराख झालेल्या जपानने नंतर जी फिनिक्स भरारी घेतली त्याचं नेहमीच कौतुक केलेलं आपण ऐकत आलोय पण गिरीश कुबेर यांनी या पुस्तकात दिलेले जपानी लोकांनी चीनमधील नागरिकांवर केलेल्या अत्याचाराचे तपशील वाचत असताना जपानबद्दल आपल्या मनात असणारी सहानुभूती आपोआप कमी होते. ज्यांचा युध्दाशी काहीही संबंध नव्हता अशा चिनी लोकांवर जपानने जे अत्याचार केले ते मानवतेच्या सर्व सीमा पार करणारे होते. जपान्यांनी ग्लँडर्स या जंतूंचा वापर चिनी लोकांवर केला आणि ते अघोरी कृत्य झाकण्यासाठी अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने त्याहून अघोरी कृत्य केले. जैविक हल्ला केल्यानंतर कुठलाही प्रतिकार करण्याची संधी न देता अख्ख्या गावाचे तेथील पशुपक्षी आणि गुराढोरांसकट स्मशानभूमीत होणारे रूपांतर पुस्तकात वाचत असताना अंगावर शहारे येतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानात माणसाने केलेली प्रगती आपल्याला कोणत्या वाटेवर घेऊन जाणार आहे याचीही कल्पना आपल्याला पुस्तकाच्या पाना-पानावर येत राहते. आज या जैविक आणि रासायनिक अस्त्रांनी शत्रू सैनिकांना मारण्यासाठी बंदूक आणि माणसांची गरजच संपवून टाकली आहे. जागतिक राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जर ही रासायनिक अस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागली तर मानवजातीचा विनाश अटळ आहे आणि या गोष्टीचीही जाणीव गिरीश कुबेर यांनी काही काही घटनांतून आपल्याला करून दिली आहे. सत्य हे वास्तवाहून किती भयानक असू शकतं याची जाणीव करून देणारं एक जबरदस्त पुस्तक "युद्ध जिवांचे"!

जैविक-रासायनिक अस्त्रांचा रक्तरंजित इतिहास आणि माणसाने तयार केलेला हा जैविक अस्त्रांचा भस्मासुर आज माणसाचाच घास कसा घेऊ पाहतोय हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने आवर्जून वाचावं अस पुस्तक "युद्ध जिवांचे"!





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, June 7, 2022

"असुर"

                  



लेखक : आनंद नीलकंठन

अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके

प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- ४५५, मूूल्य- ३९९ रुपये


रामायण या महाकाव्याची आपल्या मनावर असणारी मोहिनी आज हजारो वर्षें होऊनही कायम आहे. एक इतिहास म्हणून असो वा काव्य म्हणून, आजवर अखंड संशोधन होऊन पुढे येणाऱ्या माहितीच्या आधारे रामायणाच्या मुख्य कथानकाला अनेक उपकथानाकं जोडली गेली. प्रत्येकाने आपल्याला रामायण कसं हवं त्या दृष्टीने कथेत काही न काही बदल केले आणि त्यामुळेच बऱ्याचशा घटनांतील सत्यतेबद्दल आपल्या मनात एक संभ्रम निर्माण होतो. परंतु असं असलं तरीही रावणाकडून झालेलं सीतेचं अपहरण आणि आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी ईश्वररूपी रामाकडून राक्षसराज रावणाचा झालेला वध हा रामायणाचा शेवट कोणत्याही कथानकात नाही बदलला. वाईटावर झालेला चांगल्याचा विजय याचं एक उत्तम उदाहरण म्हणूनच हा शेवट आपण पिढ्यानपिढ्या ऐकत, वाचत आलो. राम म्हणजे ईश्वराचा अवतार ज्याने राक्षसरुपी रावणाचा नाश केला. रावण म्हणजे दैत्य, रावण म्हणजे अंधःकार हाच इतिहास आपण आजपर्यंत वाचला. जो लिहिला 'जेत्यांनी'! पराजिताचा इतिहास कधी मांडलाच जात नाही, गुणगान होतं ते फक्त जेत्यांचंच! प्रत्येक युद्धाचा इतिहास हा जरी फक्त जेत्यांकडूनच लिहिला जात असला तरी पराभूतांचीसुद्धा कहाणी असतेच आणि जी शक्यतो आपल्यासमोर कधी येत नाही. जेत्यांकडून लिहिल्या गेलेल्या इतिहासात पराभूतांचा आवाज नेहमीच दडपून टाकला जातो. यालाच अनुसरून रावणाबद्दल केवळ नकारात्मक लेखनच केलं गेलं. परंतु रामायणात पराभूत झालेल्या रावण आणि त्याच्या साथीदारांना स्वतःबद्दल काही वेगळी गाथा सांगायची असेल तर? याचा आपण कधी विचारच नाही केला. असुरराज सुमालीची कन्या कैकसी आणि पुलस्त्य ऋषींचा पुत्र विश्रवा यांच्या पोटी जन्माला आलेली रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा ही चार भावंडं. ऋषिपुत्र असूनही कैकसी आणि विश्रवांची 'संकरीत मुले' म्हणून नेहमीच ही भावंडे अपमानित होत राहिली. लहानपणापासून या भावंडांना ऋषिंकडून नेहमी हीन वागणूकच मिळत गेली आणि इथंच रावणाच्या मनात देवांबद्दलच्या तिरस्काराची मुळे रुजली. बालपणी विश्रवा ऋषिंच्या आश्रमात राहून एक ऋषिपुत्र म्हणून अभिमानाने स्वतःची ओळख करून देणारा "दशग्रीव" म्हणजेच "रावण" पुढे जाऊन असुरराज लंकाधिपती झाला. रक्ताने ऋषिपुत्र असणाऱ्या या असुराचा पुढे रामाच्या हातून अंत झाला. एका ऋषिपुत्रापासून ते असुरांचा राजा, लंकाधिश होण्यापर्यंतचा रावणाचा प्रवास नेहमीच दुर्लक्षित राहिला. जो आपल्याला या "असुर"मधे वाचायला मिळेल. रावणाच्या पूर्वार्धाबद्दल नेहमीच आदराने बोललं जातं. अतिशय कठीण संघर्षातून स्वतःला घडवणारा, आपल्या भावंडांवर भरपूर प्रेम करणारा, आई, आजोबा आणि समस्त असुर जातीवर झालेल्या अत्याचाराने हळवा होणारा, सर्वप्रकारच्या ज्ञानार्जनासाठी नेहमीच भुकेला असणारा, महत्वकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासासोबतच धैर्य, सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता अशा गुणांनी संपन्न असणारा, महादेवाचा निस्सीम भक्त, शिवतांडवस्तोत्र - रावणसंहिता आणि कुमारतंत्र लिहिणारा, बुद्धिबळ व रुद्रवीणा निर्मिती करणारा विद्वान, आयुर्वेद, व्यापार, वेदशास्त्र, राज्यशास्त्र, दर्शनशास्त्र यांसारख्या अनेक विषयांमधे पांडित्य मिळवणारा, दशग्रंथी ब्राम्हण, उत्तम विणावादक, अनेक रागांचा निर्माता, आपल्या प्रजेचा पाठीराखा अशा अनेक रुपांतून आपल्या समोर येणाऱ्या रावणाच्या आयुष्याने कलाटणी मारली ती राम आणि सीता यांनी त्याच्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतर! तसं पाहिलं तर सुर-असुर, मानव-दानव या तर फक्त प्रवृत्ती आहेत. प्रत्येकाच्या मनात या प्रवृत्तींचे अंश दडलेलेच असतात आणि ज्या प्रवृत्तीचा आपल्यावर प्रभाव जास्त तसाच आपला स्वभाव घडत असतो. म्हणूनच बालपणापासून ते मरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळा रावण आपल्यासमोर येत राहतो. तो रावण आपल्याला या "असुर" मधून भेटीस येतो. "असुर" या कादंबरीत आनंद नीलकंठन यांनी रावण आणि त्याचा सेवक भद्र यांच्या मनोगतातून रावणाच्या अपरिचित आयुष्यावर प्रकाश टाकला आहे ! "असुर"मधून लेखकांनी रावणाचा मनोव्यापार तर उलगडला आहेच पण सोबतच शक्तिशाली असुर साम्राज्याचा उदय आणि अस्त याचंदेखील अगदी सविस्तर वर्णन केलं आहे. एकूण ५२ प्रकरणे आणि ४६० पानांमधून आनंद नीलकंठन यांनी रावण आणि राक्षसकुळाची अज्ञातकथा त्यांच्या "असुर" मधून आपल्यासमोर मांडली आहे, ज्याचा अतिशय उत्कृष्ट अनुवाद केला आहे डॉ. शुचिता नांदापूरकर यांनी. रामायणातील आपल्याला माहीत असलेल्या घटनांशी विसंगत आणि धक्कादायक अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकात आहेत त्यामुळे सर्वमान्य रामायण मनात ठेवून हे पुस्तक वाचत असताना आपल्याला एकामागून एक धक्के बसल्यावाचून राहत नाहीत. तरीही या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन एक कलाकृती म्हणून आस्वाद घेण्यासारखी ही कादंबरी "असुर"!

कादंबरीची सुरुवात होते रणभूमीवर मृत्यूशय्येवर पडलेला रावण आणि कोल्ह्या-कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडायला चालू केलेल्या घटनेपासून. रणांगणातील अशा परिस्थितीत, शेवटच्या क्षणी आपल्या मनोगतातून स्वतःची बाजू मांडणारा रावण आपल्याला खूप निराश आणि हतबल वाटतो. संपन्नतेच्या शिखरावर असणारी असुर संस्कृती इंद्राने केलेल्या हल्ल्यात पार धुळीस मिळाली. महान राजा "बळी" अर्थातच "महाबली"सुद्धा पराभूत होऊन परागंदा आयुष्य जगत होता. अशा वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या भावंडांसोबत बाहेर पडलेल्या रावणाची भेट महाबलीसोबत होते. त्या महान असुर राजाला आपला गुरू बनवून रावण आपल्या पुढच्या आयुष्याची सुरुवात करतो. देवांना हरवून असुर साम्राज्य पुन्हा उभं करण्याचं तो मनाशी ठरवतो. महाबली कडून शिक्षा घेत असताना "दशानन" म्हणजे काय यावर होणाऱ्या चर्चेत बळीकडून रावणाला 'बुद्धिमत्ता' सोडून इतर १० गुणांचा त्याग करायचा सल्ला दिला जातो. परंतु बुद्धिमत्ता, राग, गर्व, द्वेष, दुःख, लोभ, आनंद, भीती, स्वार्थ आणि महत्वाकांक्षा या सर्वच्या सर्व १० गुणांमुळेच मी परिपूर्ण आहे, "दशानन" आहे असं ठामपणे सांगणारा रावण हे सर्व गुण एक सामान्य माणूस म्हणून आपल्यात का महत्त्वाचे आहेत हे सांगून महाबळीलासुध्दा निरुत्तर करतो. हे वाचत असताना पावित्र्याचं उसने अवसान न आणता आपण जसे आहोत तसेच स्वतःला समोर आणणारा रावण आपल्याला खूप वेगळा भासतो. यादरम्यान देवांच्या अत्याचारात आपल्या पत्नी आणि मुलीला गमावलेला असुर साम्राज्यातील एक सामान्य नागरिक "भद्र" रावणाच्या आयुष्यात येतो. रावणाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचा साक्षीदार असणारा हा "भद्र". रावणाच्या मनोगतातून उलगडणाऱ्या रामायणात जी अनेक महत्वाची वळणे आहेत त्यात "भद्र" हे एक प्रमुख प्रमुख पात्र आहे. असं असूनही नेहमी त्याचा तिरस्कार करणारा रावण आपल्या आयुष्यातून त्याला टाळू मात्र शकत नाही. रावणासोबतच भद्राच्या मनोगतानेही या रामायणाचे विविध पैलू लेखकांनी आपल्याला उलगडून दाखवले आहेत. महाबलीचं सैन्य घेऊन आपला मामा मारिच आणि प्रहस्त यांच्या सहाय्याने आपल्या सावत्र भावाचा, कुबेराचा पराभव करून रावणाने लंका जिंकली त्यात या भद्राचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर एकामागून एक राज्ये जिंकत जाऊन असुर साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या रावणाने अयोध्येचा राजा अनर्ण्यला ठार मारून त्याचं छोटंसं राज्य सहज जिंकलं. यानंतर घडणाऱ्या काही घटना म्हणजे रावणाच्या आयुष्यात पुढे येऊ घातलेल्या वादळाची नांदीच! मंदोदरीपासून रावणाला झालेली पहिली मुलगी भविष्यात असुरांच्या नाशाला कारणीभूत ठरेल अशी एका जोतिष्याने केलेली भविष्यवाणी रावणाच्या सर्व जवळच्या लोकांना भीतीच्या गडद छायेत घेऊन जाते. नंतर याच भितीपोटी रावणाच्या गैरहजेरीत त्याच्या या मुलीला संपवण्याची जबाबदारी भद्रावर सोपवली जाते आणि पुढे अशा काही घटना घडतात की ती छोटीशी मुलगी जनक राजाला मिळते जिला आपण सर्वमान्य रामायणात "सीता" म्हणून ओळखतो. खरंतर संघदास रामायण, अद्भुत रामायण यामध्ये सीता ही रावणाची मुलगी आहे असा उल्लेख वाचायला मिळतो पण तरीही हे माहीत नसलेल्या माझ्यासारख्या वाचकाला "असुर" मधला हा धक्का पचवायला जड जातो. पुढे वाली आणि रावणाचं नातं, सीता स्वयंवर, रामाचा वनवास, रावणाकडून आपल्या मुलीचं म्हणजेच सीतेचं अपहरण, वाली-सुग्रीव तंटा आणि त्यातील रामाचा हस्तक्षेप, धोक्याने रामाकडून वालीला मारलं जाणं, वानरसेना घेऊन रामाचं लंकेत पोहोचणं आणि ते शेवटचं निर्यायक युद्ध या प्रवासातून मिळणारे नवनवीन धक्के पचवत वाचक सुन्न डोक्याने कथेसोबत पुढे सरकत राहतो. रणांगणात आपल्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या रावणाच्या मृत्यूसमयी त्याच्या जवळ असणारा भद्र रामाकडून झालेल्या या पराभवाचा आपण सूड घेऊ असं रावणाला आश्वासन देतो आणि पुढे तो अयोध्येत राहण्यास जातो. अयोध्येत आल्यानंतर घडणाऱ्या घटना, त्यातूनच पुढे रामाच्या आयुष्यावर झालेला परिणाम आणि रामायणाचा शेवट कादंबरीतच वाचनं योग्य. रावणाच्या नजरेतून घडलेलं, ज्यामधे राम नाही तर सीता महत्वाच्या स्थानी आहे शिवाय भद्रासारखा अतिसामान्य आणि शूद्र माणूस एका समाजासाठी किती महत्वाचा होऊ शकतो हे दाखवणारं एक वेगळं रामायण आनंद नीलकंठन यांनी "असुर" मधून आपल्या भेटीला आणलं आहे. 

पराजीतांची बाजू मांडणारं एक वेगळं पुस्तक, एक वेगळी कलाकृती म्हणून नक्की वाचावं असं "असुर"!





संदीप प्रकाश जाधव






"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये