लेखक : आनंद नीलकंठन
अनुवाद : डॉ. शुचिता नांदापूरकर-फडके
प्रकाशक : मंजुल पब्लिशिंग हाऊस
पृष्ठे- ४५५, मूूल्य- ३९९ रुपये
रामायण या महाकाव्याची आपल्या मनावर असणारी मोहिनी आज हजारो वर्षें होऊनही कायम आहे. एक इतिहास म्हणून असो वा काव्य म्हणून, आजवर अखंड संशोधन होऊन पुढे येणाऱ्या माहितीच्या आधारे रामायणाच्या मुख्य कथानकाला अनेक उपकथानाकं जोडली गेली. प्रत्येकाने आपल्याला रामायण कसं हवं त्या दृष्टीने कथेत काही न काही बदल केले आणि त्यामुळेच बऱ्याचशा घटनांतील सत्यतेबद्दल आपल्या मनात एक संभ्रम निर्माण होतो. परंतु असं असलं तरीही रावणाकडून झालेलं सीतेचं अपहरण आणि आपल्या पत्नीला सोडवण्यासाठी ईश्वररूपी रामाकडून राक्षसराज रावणाचा झालेला वध हा रामायणाचा शेवट कोणत्याही कथानकात नाही बदलला. वाईटावर झालेला चांगल्याचा विजय याचं एक उत्तम उदाहरण म्हणूनच हा शेवट आपण पिढ्यानपिढ्या ऐकत, वाचत आलो. राम म्हणजे ईश्वराचा अवतार ज्याने राक्षसरुपी रावणाचा नाश केला. रावण म्हणजे दैत्य, रावण म्हणजे अंधःकार हाच इतिहास आपण आजपर्यंत वाचला. जो लिहिला 'जेत्यांनी'! पराजिताचा इतिहास कधी मांडलाच जात नाही, गुणगान होतं ते फक्त जेत्यांचंच! प्रत्येक युद्धाचा इतिहास हा जरी फक्त जेत्यांकडूनच लिहिला जात असला तरी पराभूतांचीसुद्धा कहाणी असतेच आणि जी शक्यतो आपल्यासमोर कधी येत नाही. जेत्यांकडून लिहिल्या गेलेल्या इतिहासात पराभूतांचा आवाज नेहमीच दडपून टाकला जातो. यालाच अनुसरून रावणाबद्दल केवळ नकारात्मक लेखनच केलं गेलं. परंतु रामायणात पराभूत झालेल्या रावण आणि त्याच्या साथीदारांना स्वतःबद्दल काही वेगळी गाथा सांगायची असेल तर? याचा आपण कधी विचारच नाही केला. असुरराज सुमालीची कन्या कैकसी आणि पुलस्त्य ऋषींचा पुत्र विश्रवा यांच्या पोटी जन्माला आलेली रावण, कुंभकर्ण, बिभीषण आणि शूर्पणखा ही चार भावंडं. ऋषिपुत्र असूनही कैकसी आणि विश्रवांची 'संकरीत मुले' म्हणून नेहमीच ही भावंडे अपमानित होत राहिली. लहानपणापासून या भावंडांना ऋषिंकडून नेहमी हीन वागणूकच मिळत गेली आणि इथंच रावणाच्या मनात देवांबद्दलच्या तिरस्काराची मुळे रुजली. बालपणी विश्रवा ऋषिंच्या आश्रमात राहून एक ऋषिपुत्र म्हणून अभिमानाने स्वतःची ओळख करून देणारा "दशग्रीव" म्हणजेच "रावण" पुढे जाऊन असुरराज लंकाधिपती झाला. रक्ताने ऋषिपुत्र असणाऱ्या या असुराचा पुढे रामाच्या हातून अंत झाला. एका ऋषिपुत्रापासून ते असुरांचा राजा, लंकाधिश होण्यापर्यंतचा रावणाचा प्रवास नेहमीच दुर्लक्षित राहिला. जो आपल्याला या "असुर"मधे वाचायला मिळेल. रावणाच्या पूर्वार्धाबद्दल नेहमीच आदराने बोललं जातं. अतिशय कठीण संघर्षातून स्वतःला घडवणारा, आपल्या भावंडांवर भरपूर प्रेम करणारा, आई, आजोबा आणि समस्त असुर जातीवर झालेल्या अत्याचाराने हळवा होणारा, सर्वप्रकारच्या ज्ञानार्जनासाठी नेहमीच भुकेला असणारा, महत्वकांक्षा, प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वासासोबतच धैर्य, सामर्थ्य, न्याय-नितीमत्ता अशा गुणांनी संपन्न असणारा, महादेवाचा निस्सीम भक्त, शिवतांडवस्तोत्र - रावणसंहिता आणि कुमारतंत्र लिहिणारा, बुद्धिबळ व रुद्रवीणा निर्मिती करणारा विद्वान, आयुर्वेद, व्यापार, वेदशास्त्र, राज्यशास्त्र, दर्शनशास्त्र यांसारख्या अनेक विषयांमधे पांडित्य मिळवणारा, दशग्रंथी ब्राम्हण, उत्तम विणावादक, अनेक रागांचा निर्माता, आपल्या प्रजेचा पाठीराखा अशा अनेक रुपांतून आपल्या समोर येणाऱ्या रावणाच्या आयुष्याने कलाटणी मारली ती राम आणि सीता यांनी त्याच्या आयुष्यात प्रवेश केल्यानंतर! तसं पाहिलं तर सुर-असुर, मानव-दानव या तर फक्त प्रवृत्ती आहेत. प्रत्येकाच्या मनात या प्रवृत्तींचे अंश दडलेलेच असतात आणि ज्या प्रवृत्तीचा आपल्यावर प्रभाव जास्त तसाच आपला स्वभाव घडत असतो. म्हणूनच बालपणापासून ते मरणापर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर एक वेगळा रावण आपल्यासमोर येत राहतो. तो रावण आपल्याला या "असुर" मधून भेटीस येतो. "असुर" या कादंबरीत आनंद नीलकंठन यांनी रावण आणि त्याचा सेवक भद्र यांच्या मनोगतातून रावणाच्या अपरिचित आयुष्यावर प्रकाश टाकला आहे ! "असुर"मधून लेखकांनी रावणाचा मनोव्यापार तर उलगडला आहेच पण सोबतच शक्तिशाली असुर साम्राज्याचा उदय आणि अस्त याचंदेखील अगदी सविस्तर वर्णन केलं आहे. एकूण ५२ प्रकरणे आणि ४६० पानांमधून आनंद नीलकंठन यांनी रावण आणि राक्षसकुळाची अज्ञातकथा त्यांच्या "असुर" मधून आपल्यासमोर मांडली आहे, ज्याचा अतिशय उत्कृष्ट अनुवाद केला आहे डॉ. शुचिता नांदापूरकर यांनी. रामायणातील आपल्याला माहीत असलेल्या घटनांशी विसंगत आणि धक्कादायक अशा बऱ्याच गोष्टी या पुस्तकात आहेत त्यामुळे सर्वमान्य रामायण मनात ठेवून हे पुस्तक वाचत असताना आपल्याला एकामागून एक धक्के बसल्यावाचून राहत नाहीत. तरीही या सर्व गोष्टी बाजूला ठेऊन एक कलाकृती म्हणून आस्वाद घेण्यासारखी ही कादंबरी "असुर"!
कादंबरीची सुरुवात होते रणभूमीवर मृत्यूशय्येवर पडलेला रावण आणि कोल्ह्या-कुत्र्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडायला चालू केलेल्या घटनेपासून. रणांगणातील अशा परिस्थितीत, शेवटच्या क्षणी आपल्या मनोगतातून स्वतःची बाजू मांडणारा रावण आपल्याला खूप निराश आणि हतबल वाटतो. संपन्नतेच्या शिखरावर असणारी असुर संस्कृती इंद्राने केलेल्या हल्ल्यात पार धुळीस मिळाली. महान राजा "बळी" अर्थातच "महाबली"सुद्धा पराभूत होऊन परागंदा आयुष्य जगत होता. अशा वेळी स्वतःला सिद्ध करण्यासाठी आपल्या भावंडांसोबत बाहेर पडलेल्या रावणाची भेट महाबलीसोबत होते. त्या महान असुर राजाला आपला गुरू बनवून रावण आपल्या पुढच्या आयुष्याची सुरुवात करतो. देवांना हरवून असुर साम्राज्य पुन्हा उभं करण्याचं तो मनाशी ठरवतो. महाबली कडून शिक्षा घेत असताना "दशानन" म्हणजे काय यावर होणाऱ्या चर्चेत बळीकडून रावणाला 'बुद्धिमत्ता' सोडून इतर १० गुणांचा त्याग करायचा सल्ला दिला जातो. परंतु बुद्धिमत्ता, राग, गर्व, द्वेष, दुःख, लोभ, आनंद, भीती, स्वार्थ आणि महत्वाकांक्षा या सर्वच्या सर्व १० गुणांमुळेच मी परिपूर्ण आहे, "दशानन" आहे असं ठामपणे सांगणारा रावण हे सर्व गुण एक सामान्य माणूस म्हणून आपल्यात का महत्त्वाचे आहेत हे सांगून महाबळीलासुध्दा निरुत्तर करतो. हे वाचत असताना पावित्र्याचं उसने अवसान न आणता आपण जसे आहोत तसेच स्वतःला समोर आणणारा रावण आपल्याला खूप वेगळा भासतो. यादरम्यान देवांच्या अत्याचारात आपल्या पत्नी आणि मुलीला गमावलेला असुर साम्राज्यातील एक सामान्य नागरिक "भद्र" रावणाच्या आयुष्यात येतो. रावणाच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक महत्वाच्या गोष्टीचा साक्षीदार असणारा हा "भद्र". रावणाच्या मनोगतातून उलगडणाऱ्या रामायणात जी अनेक महत्वाची वळणे आहेत त्यात "भद्र" हे एक प्रमुख प्रमुख पात्र आहे. असं असूनही नेहमी त्याचा तिरस्कार करणारा रावण आपल्या आयुष्यातून त्याला टाळू मात्र शकत नाही. रावणासोबतच भद्राच्या मनोगतानेही या रामायणाचे विविध पैलू लेखकांनी आपल्याला उलगडून दाखवले आहेत. महाबलीचं सैन्य घेऊन आपला मामा मारिच आणि प्रहस्त यांच्या सहाय्याने आपल्या सावत्र भावाचा, कुबेराचा पराभव करून रावणाने लंका जिंकली त्यात या भद्राचा सिंहाचा वाटा होता. त्यानंतर एकामागून एक राज्ये जिंकत जाऊन असुर साम्राज्याचा विस्तार करणाऱ्या रावणाने अयोध्येचा राजा अनर्ण्यला ठार मारून त्याचं छोटंसं राज्य सहज जिंकलं. यानंतर घडणाऱ्या काही घटना म्हणजे रावणाच्या आयुष्यात पुढे येऊ घातलेल्या वादळाची नांदीच! मंदोदरीपासून रावणाला झालेली पहिली मुलगी भविष्यात असुरांच्या नाशाला कारणीभूत ठरेल अशी एका जोतिष्याने केलेली भविष्यवाणी रावणाच्या सर्व जवळच्या लोकांना भीतीच्या गडद छायेत घेऊन जाते. नंतर याच भितीपोटी रावणाच्या गैरहजेरीत त्याच्या या मुलीला संपवण्याची जबाबदारी भद्रावर सोपवली जाते आणि पुढे अशा काही घटना घडतात की ती छोटीशी मुलगी जनक राजाला मिळते जिला आपण सर्वमान्य रामायणात "सीता" म्हणून ओळखतो. खरंतर संघदास रामायण, अद्भुत रामायण यामध्ये सीता ही रावणाची मुलगी आहे असा उल्लेख वाचायला मिळतो पण तरीही हे माहीत नसलेल्या माझ्यासारख्या वाचकाला "असुर" मधला हा धक्का पचवायला जड जातो. पुढे वाली आणि रावणाचं नातं, सीता स्वयंवर, रामाचा वनवास, रावणाकडून आपल्या मुलीचं म्हणजेच सीतेचं अपहरण, वाली-सुग्रीव तंटा आणि त्यातील रामाचा हस्तक्षेप, धोक्याने रामाकडून वालीला मारलं जाणं, वानरसेना घेऊन रामाचं लंकेत पोहोचणं आणि ते शेवटचं निर्यायक युद्ध या प्रवासातून मिळणारे नवनवीन धक्के पचवत वाचक सुन्न डोक्याने कथेसोबत पुढे सरकत राहतो. रणांगणात आपल्या शेवटच्या घटका मोजणाऱ्या रावणाच्या मृत्यूसमयी त्याच्या जवळ असणारा भद्र रामाकडून झालेल्या या पराभवाचा आपण सूड घेऊ असं रावणाला आश्वासन देतो आणि पुढे तो अयोध्येत राहण्यास जातो. अयोध्येत आल्यानंतर घडणाऱ्या घटना, त्यातूनच पुढे रामाच्या आयुष्यावर झालेला परिणाम आणि रामायणाचा शेवट कादंबरीतच वाचनं योग्य. रावणाच्या नजरेतून घडलेलं, ज्यामधे राम नाही तर सीता महत्वाच्या स्थानी आहे शिवाय भद्रासारखा अतिसामान्य आणि शूद्र माणूस एका समाजासाठी किती महत्वाचा होऊ शकतो हे दाखवणारं एक वेगळं रामायण आनंद नीलकंठन यांनी "असुर" मधून आपल्या भेटीला आणलं आहे.
पराजीतांची बाजू मांडणारं एक वेगळं पुस्तक, एक वेगळी कलाकृती म्हणून नक्की वाचावं असं "असुर"!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment