Wednesday, June 29, 2022

"संभवामि युगेयुगे"

          


लेखक : अजिंक्य कुलकर्णी

प्रकाशक : शिवसमर्थ सेवा प्रकाशन

पृष्ठे- ३०६, मूूल्य- ३६० रुपये


'टाईम ट्रॅव्हल' अर्थातच 'कालभ्रमण', शास्त्रीयदृष्टीने सिध्द झालेली पण प्रत्यक्षात शक्य नसणारी अशी गोष्ट. प्रत्येक माणसाचं कुतूहल जागं करणाऱ्या या कल्पनेवर आधारित बरेच चित्रपट, मालिका, कथा आपण पाहिल्या-वाचल्या आहेत जिथे वर्तमानकाळातून भविष्यकाळात आणि भूतकाळात जाऊन येणारा एखादा नायक आपली मती गुंग करतो. आज एखाद्याला 'कालभ्रमण' करून कोणत्या काळात जायला आवडेल असा प्रश्न विचारला तर प्रत्येकाचं उत्तर हे वेगळं असू शकतं पण माझ्यासारख्या इतिहासप्रेमी माणसाचं उत्तर एकच असेल ते म्हणजे 'छत्रपती शिवरायांचा काळ'!!  आज ३५० वर्षांहून जास्त काळ लोटूनही ज्यांच्या फक्त नावानेच आपल्यात एक ऊर्जा निर्माण होते अशा युगपुरुषाचं दर्शन जर आपल्याला प्रत्यक्ष घेता आलं तर? छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांना प्रत्यक्ष लढाई करताना आपल्याला पाहता आलं तर? बाजीराव पेशव्यांसारख्या रणधुरंधर सेनानीला रणांगणावर तांडव करताना आपल्याला प्रत्यक्ष पाहता आलं तर? छत्रपती शिवाजी महाराज यांचा अकाली मृत्यू आणि संभाजी महाराजांचा फितुरीमुळे झालेला शेवट या घटना कालभ्रमण करून आपण बदलू शकलो तर? भूतकाळात जाऊन स्वराज्याचा इतिहास जर आपण बदलू शकलो तर आज आपला वर्तमान काय असता? अशा विचारांनीच आपल्या अंगावर शहारे येतात. जरी या गोष्टी प्रत्यक्षात शक्य नसल्या तरी 'टाईम ट्रॅव्हल' ची ही कल्पनाच अफलातून वाटते. लेखक अजिंक्य कुलकर्णी यांनी 'कलभ्रमणाच्या' याच कल्पनेला केंद्रस्थानी ठेऊन,  शिवरायांपासून ते पानिपतपर्यंतचा मराठ्यांचा गौरवशाली इतिहास आणि कालभ्रमण या दोन धाग्यांना पकडून लिहिलेली ही एक भन्नाट काल्पनिक कादंबरी "संभवामि युगेयुगे"! आजपर्यंत कधी वाचनात न आलेलं असं या कादंबरीचं रोमांचकारी कथानक! पानापानावर वाढत जाणारा थरार आणि क्षणाक्षणाला रोमांच उभे करणाऱ्या घटनांतून अजिंक्य कुलकर्णी यांनी साकारलेला हा कल्पनाविष्कार आपल्याला एका वेगळ्याच जगात घेऊन जातो. अजिंक्य कुलकर्णी यांनी या काल्पनिक कथेसाठी निवडला आहे पानिपतचा महासंग्राम! अहमदशाह अब्दाली सोबत मराठ्यांनी लढलेलं पानिपतचं युद्ध हिंदुस्थानच्या कपाळावरील भळभळती जखम आहे. हिंदुस्थानच्या सुरक्षेसाठी पानिपतावर मराठे प्राणपणाने लढले पण दुर्दैवाने त्या युद्धात मराठ्यांचा पराभव झाला आणि हिंदुस्थानचे पुढचे भविष्यच बदलून गेले. पण विचार करा जर मराठे पानिपतावर हरलेच नसते तर? छत्रपती शिवाजी महाराज, बाजीराव पेशवे, भाऊसाहेब, विश्वासराव, होळकर, शिंदे, नानासाहेब इतिहासातील सर्व मराठा सरदारांसोबत पानिपतच्या रणभूमीवर अब्दालीविरुद्ध एकत्र उभे राहिले असते तर? छत्रपती शिवराय आणि बाजीराव पेशवा दोघांनी मिळून जर अब्दालीचा पराभव केला असता तर? जरी या 'तर' ला आज काहीच अर्थ नसला तरी अजिंक्य कुलकर्णी यांनी त्यांच्या या काल्पनिक कादंबरीतून प्रत्येक इतिहासप्रेमीच्या मनाला हात घातला आहे. वाचक अक्षरशः हरवून जावा अशी ही कादंबरी "संभवामि युगेयुगे"!

तर कादंबरीची सुरुवात होते ऋषभ या इतिहासप्रेमी तरुणाच्या एका शोधापासून! असं म्हणतात की पानिपतच्या युद्धात महाराष्ट्रातील प्रत्येक घरातून एकजण कामी आला होता आणि हेच डोक्यात ठेऊन आपल्या घराण्यातील कोणते पूर्वज पानिपतावर गेले होते का याचा शोध घेणारा हा ऋषभ! त्याचा हा शोध त्याला पुण्याहून नाशिकला घेऊन येतो आणि याचवेळी भारत-पाकिस्तान दरम्यान चालू असलेल्या युद्धात अशा काही घटना घडतात की ऋषभच्या डोक्यातील इतिहास त्याला आपल्यासोबत थेट इ.स. १७६० मधे घेऊन जातो. इ. स. १७६० हा काळ मराठ्यांच्या, स्वराज्याच्या आणि पर्यायाने हिंदुस्थानच्या इतिहासातील खूप धामधुमीचा काळ. अटकेपार झेंडे लावून अखंड हिंदुस्थानावर वचक बसवलेल्या मराठा साम्राज्याच्या कसोटीचा हा काळ. ऋषभ जेव्हा या काळात पोहचतो तेव्हाची परिस्थिती अतिशय स्फोटक असते. काही दिवसांपूर्वीच दत्ताजी शिंदेसारख्या मातब्बर सरदाराची झालेली हत्या आणि त्यामुळे नजीब खान, कुतुबजंग, अहमदशाह अब्दालीवर चिडलेलं मराठा सैन्य! याच मनःस्थितीत सदाशिवराव भाऊंच्या नेतृत्वाखाली अनेक पराक्रमी मराठा सरदार नजीब खान आणि अब्दालीचा बिमोड करण्यासाठी उत्तरेकडे, दिल्लीच्या रोखाने निघतात. 'कालभ्रमण' करून भूतकाळात नेमका या मोहिमेच्या वेळीच आलेल्या ऋषभला मग एकामागून एक धक्के बसायला चालू होतात. भाऊंची ही मोहिम पुढे सरकण्यापूर्वीच ऋषभ भविष्यातील घडणाऱ्या घटना त्यांना सांगून इतिहासाची उलथापालथ करून टाकतो. कथेच्या या टप्प्यावर वाचक जो या कथेत गुरफटून जातो तो अगदी शेवटपर्यंत! प्रत्येक पानावर वाचक अक्षरशः भारावून जातो कारण इतिहासाची झालेली ही उलथापालथ फक्त इथेच नाही थांबत तर दोन्ही बाजूंनी कालभ्रमण करून आलेल्या इतरही अनेक व्यक्तिरेखा या कथेत सामील होतात. पानिपतच्या रणभूमीवर एकीकडे उभा असतो ३५५ वर्षें भविष्यात आलेला तैमूर, १३ वर्षें भविष्यात आलेला नादिरशाह, १०३ वर्षें भूतकाळात आलेला जॉन निकोलसन आणि स्वतःच्याच काळात असणारा अहमदशाह अब्दाली! तर दुसऱ्या बाजूला हिंदुस्थानचे रक्षण करण्यासाठी पुन्हा एकदा या भूमीवर अवतरतात साक्षात छत्रपती शिवाजी महाराज आणि ज्यांना साथ असते ती २० वर्षें भविष्यात आलेल्या रणधुरंधर बाजीराव पेशव्यांची, सोबतच सारा हिंदुस्थान!! एकाबाजूला हिंदुस्थानचा घास घेण्यासाठी आलेल्या परकीय सत्ता तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली एकछत्री हिंदुस्थान! कथेच्या शेवटी या लढाईचा निकाल काय लागू शकतो याची वाचकाला आधीच जाणीव होत असली तरीही अस्तित्वासाठी चालू झालेल्या या लढाईच्या रक्तरंजित आणि काल्पनिक इतिहासातून बाहेरच येऊ नये अशी काहीशी भावना आपल्या मनात येते.

अजिंक्य कुलकर्णी यांचा, प्रत्येकाने आवर्जून वाचावा असा एक जबरदस्त कल्पनाविष्कार "संभवामि युगेयुगे"!





संदीप प्रकाश जाधव


2 comments:

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये