लेखक : गिरीश कुबेर
प्रकाशक : राजहंस प्रकाशन
पृष्ठे- २२२, मूूल्य- २९० रुपये
गिरीश कुबेर यांचं "अधर्मयुद्ध" हे पुस्तक जेव्हा वाचून पूर्ण झालं त्याच वेळी मनात एक गोष्ट पक्की झाली होती ती म्हणजे या लेखकाची मिळतील ती सर्व पुस्तके वाचून काढायची आणि त्याचं कारणही तसंच आहे. आपल्या आसपास असो वा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात सतत घडणाऱ्या घटना ज्यांचा आपण सहसा कधी विचारही करत नाही त्यांचा आपल्या आयुष्यावर होणारा थेट परिणाम किती भयानक आणि दूरगामी असू शकतो याची जाणीव करून देणारं त्यांचं लेखन! आपल्याला खडबडून जागं करून वास्तवाचं भान करून देणारं त्यांचं लेखन! गिरीश कुबेर यांचं हेच वेगळंपण "अधर्मयुद्ध" मधून जाणवलं आणि आपसूकच त्यांच्या इतर पुस्तकांची यादी बनवायला घेतली. त्या यादीतीलच हे पुढचं पुस्तक "युद्ध जिवांचे"! वाचकाच्या मन आणि मेंदूचा ताबा घेणारा, वाचून मन सुन्न करणारा आणि अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारा असा या पुस्तकाचा विषय. वास्तव जीवनाशी निगडीत प्रश्नांचं सखोल संशोधन व अभ्यास करून लिहिलं गेलेलं असं हे साहित्य. जैविक व रासायनिक युद्धाचा संसर्गजन्य इतिहास ही टॅगलाईन डोक्यात ठेऊन वाचायला सुरुवात करणाऱ्या वाचकाला पहिल्या २-४ पानांतच दोन वर्षांपूर्वी अख्ख्या जगभर धुमाकूळ घालायला सुरुवात केलेला 'कोरोना' आठवला नाही तरच नवल. लेखकांनी पुस्तकात पुढे पुढे तर अशा काही गोष्टींचा उलगडा केला आहे की कोरोनाने घातलेला थैमानही त्यापुढे कवडीमोल वाटावा. भारतात बर्ड फ्लू आणि स्वाईन फ्लूची साथ पसरल्यानंतर अचानक अशा साथी का पसरतात, याचा शोध घेत असताना गिरीश कुबेर यांना अचानक जन्माला येणाऱ्या साथींमागचं जे 'राजकारण' जाणवलं त्याचा शोध त्यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केला आहे. बर्ड फ्लू किंवा स्वाईन फ्लूचे जंतू अचानकपणे, एका विशिष्ट ठिकाणीच कसे उगवतात आणि जसे अचानक येतात तसे निघूनही कसे जातात? हे असे जंतू प्रयोगशाळेत तयार करून कोणीतरी त्याची चाचणी तर घेत नसेल ना? अशा प्रशांची उत्तरे शोधत लेखकासोबतच वाचकदेखील पहिल्या महायुद्धाच्या कालखंडात ओढला जातो. ज्या पहिल्या महायुद्धाने जैविक व रासायनिक अस्त्रांना जन्माला घातलं त्या काळातील घटनांचा अभ्यास करून या रासायनिक अस्त्रांचा जन्म कसा झाला, प्राचीन इतिहासातील युद्धांत त्याची पाळंमुळं कुठवर आहेत आणि येणाऱ्या काळात या अस्त्रांचं रूप कसं असेल याचा अगदी सखोल अभ्यास करून जो वेधक आढावा गिरीश कुबेर यांनी घेतला आहे तो आपल्याला या "युद्ध जिवांचे" पुस्तकातून वाचायला मिळेल. पारंपरिक पद्धतीच्या युद्धातील डावपेचांनी जेव्हा समोरच्या शत्रूला हरवणं अवघड होऊ लागलं तेव्हा जन्माला आलेली ही नवीन कल्पना जैविक-रासायनिक हल्ला! अशा जैविक अस्त्रांचा जनक कोण? कोणत्या देशांनी या संशोधनाला पाठिशी घातलं? या जैविक अस्त्रांची चाचणी कशी घेतली जायची? चाचणी घेत असताना आणि प्रत्यक्ष त्याच्या वापरावेळी माणसावर त्याचा काय परिणाम झाला? किती लोक मारले गेले? कोणकोणत्या देशांनी अशा अस्त्रांचा वापर कधी, कोणाविरुद्ध आणि कसा केला? त्याचे जागतिक राजकारणावर काय परिणाम झाले? पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात या अस्त्रांचा वापर कसा आणि कोणी केला? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जेव्हा आपल्याला या पुस्तकात मिळतात तेव्हा एक मनुष्य जात म्हणून स्वतःचीच चीड आल्याशिवाय राहत नाही. गिरीश कुबेर यांनी काही अतिशय जुन्या, इसवी सनपूर्व घटनांचा संदर्भदेखील या पुस्तकात दिला आहे ज्यामधे शत्रू राष्ट्राच्या हद्दीत प्लेग सारख्या रोगांचा फैलाव कशा पद्धतीने केला जायचा याचं वर्णन आहे. असाध्य रोगाने मरण पावलेल्या लोकांची प्रेते शत्रू राष्ट्राच्या लोकांवर बॉम्बहल्ले करावेत अशा पद्धतीने टाकून तो रोग कसा पसरवला जायचा हे पुस्तकात वाचून मन सुन्न होते. अलीकडच्या काळात हिटलरचा अशा अस्त्रांच्या निमिर्तीतील वाटा आणि वापर तर जगजाहीर आहेच, पण दुसऱ्या महायुद्धाच्या विजयाचे शिल्पकार मानले जाणारे तथाकथित मानवतावादी चचिर्ल, रुझवेल्ट आदींनीही नरसंहारासाठी जैविक अस्त्रांच्या निमिर्तीला चालना देऊन त्याचा केलेला वापर आणि त्याचा परिणाम आपला थरकाप उडवून जातो. पुस्तकातील बऱ्याच गोष्टी वाचत असताना हिटलरचा क्रूरपणा आपल्याला इतर राष्ट्रांनी केलेल्या अत्याचारासमोर खूपच नगण्य वाटतो. उदाहरणच द्यायचे झाले तर अमेरिकेने हिरोशिमा-नागासाकीवर केलेल्या अणुबॉम्ब हल्ल्यानंतर बेचिराख झालेल्या जपानने नंतर जी फिनिक्स भरारी घेतली त्याचं नेहमीच कौतुक केलेलं आपण ऐकत आलोय पण गिरीश कुबेर यांनी या पुस्तकात दिलेले जपानी लोकांनी चीनमधील नागरिकांवर केलेल्या अत्याचाराचे तपशील वाचत असताना जपानबद्दल आपल्या मनात असणारी सहानुभूती आपोआप कमी होते. ज्यांचा युध्दाशी काहीही संबंध नव्हता अशा चिनी लोकांवर जपानने जे अत्याचार केले ते मानवतेच्या सर्व सीमा पार करणारे होते. जपान्यांनी ग्लँडर्स या जंतूंचा वापर चिनी लोकांवर केला आणि ते अघोरी कृत्य झाकण्यासाठी अणुबॉम्ब टाकून अमेरिकेने त्याहून अघोरी कृत्य केले. जैविक हल्ला केल्यानंतर कुठलाही प्रतिकार करण्याची संधी न देता अख्ख्या गावाचे तेथील पशुपक्षी आणि गुराढोरांसकट स्मशानभूमीत होणारे रूपांतर पुस्तकात वाचत असताना अंगावर शहारे येतात. विज्ञान आणि तंत्रज्ञानात माणसाने केलेली प्रगती आपल्याला कोणत्या वाटेवर घेऊन जाणार आहे याचीही कल्पना आपल्याला पुस्तकाच्या पाना-पानावर येत राहते. आज या जैविक आणि रासायनिक अस्त्रांनी शत्रू सैनिकांना मारण्यासाठी बंदूक आणि माणसांची गरजच संपवून टाकली आहे. जागतिक राजकारणात एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जर ही रासायनिक अस्त्रे दहशतवाद्यांच्या हाती लागली तर मानवजातीचा विनाश अटळ आहे आणि या गोष्टीचीही जाणीव गिरीश कुबेर यांनी काही काही घटनांतून आपल्याला करून दिली आहे. सत्य हे वास्तवाहून किती भयानक असू शकतं याची जाणीव करून देणारं एक जबरदस्त पुस्तक "युद्ध जिवांचे"!
जैविक-रासायनिक अस्त्रांचा रक्तरंजित इतिहास आणि माणसाने तयार केलेला हा जैविक अस्त्रांचा भस्मासुर आज माणसाचाच घास कसा घेऊ पाहतोय हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने आवर्जून वाचावं अस पुस्तक "युद्ध जिवांचे"!
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment