लेखक : नारायण धारप
प्रकाशक : साकेत प्रकाशन
नारायण धारपांच्या माझ्याकडील संग्रहातील आणखीण एक दर्जेदार पुस्तक "वेडा विश्वनाथ". वाचकाने एखाद्या अद्भुत, रहस्यमय, अंगावर काटा आणणाऱ्या दुनियेतून सफर करून यावी अशी त्यांच्या प्रत्येक पुस्तकातील कथांची मांडणी. याआधी मी त्यांची "अघटित", "चेटकीण", "लुचाई" ही पुस्तके वाचली होती आणि प्रत्येकात असणारा समान धागा म्हणजे एक थरारक, भयप्रद, अंगावर काटा उभा करणारा, दचकवणारा आणि शेवटी वाईटावर चांगल्याच्या विजय होऊन सर्वकाही ठीकठाक झाल्यानंतर होणारा कथेचा शेवट. त्यांची ही भयकादंबरी "वेडा विश्वनाथ" देखील अशा कथानकाला अपवाद नाही. जरी त्यांच्या सर्व पुस्तकांमध्ये आपल्याला हा समान धागा जाणवत असला तरी प्रत्येक पुस्तकातून वाचकांपर्यंत पोहोचवलेल्या वेगवेगळ्या कथांचं श्रेय नारायण धारप यांच्या कल्पनाशक्तीला द्यावं लागेल. नारायण धारप यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक असतात. कोणत्याही प्रकारचं रहस्य जाणून घेण्याची माणसाला असणारी उत्कंठा लक्षात घेऊन लिहिलेल्या नारायण धारपांच्या कथा पहिल्या पानापासून नव्हे तर त्यांच्या कादंबरीच्या मुखपृष्ठापासूनच वाचकाला घेरायला चालू करतात असं म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये. संपूर्ण उपेक्षित, कोणतीही जाण नसलेला, समाजात कोणतेही स्थान नसलेला ‘वेडा विश्वनाथ’ आणि असामान्यांचा मेरूमणी ‘आर्यवर्मन’! आताचा क्षण आणि सहस्रकांपूर्वीचा क्षण असे विलक्षण विरोधी घटक निवडून धारपांनी मन स्तिमित करणारी कथा या कादंबरीत विणली आहे. सज्जन-दुर्जन, पाप-पुण्य, सहिष्णुता-क्रौर्य यांच्यामधे असणाऱ्या अगदी अनादी, अतिप्राचीन संघर्षाची किनार असणारी ही कादंबरी "वेडा विश्वनाथ".
एका मध्यमवर्गीय कुटुंबातील, शाळामास्तरांचा मुलगा विश्वनाथ. लहानपणी मलेरियासारख्या आजाराने मेंदूला झालेली दुखापत आणि त्यातूनच त्याच्या वाट्याला कायमचाच आलेला अर्धवटपणा! अशी एखाद्या चित्रपटाला शोभणारी या कथेची सुरुवात. वैचारिक वाढ एखाद्या ३ वर्षांच्या मुलाएवढी आणि शारीरिक वाढ २५-३० वर्षें असणाऱ्या, सगळ्या गावाला "वेडा विश्या" म्हणून परिचित असणाऱ्या "विश्वनाथ" भोवती ही कथा फिरते. स्वतःच्या प्रत्येक गोष्टींसाठी पूर्णपणे आई-वडिलांवर अवलंबून असणारा विश्याचा रोजचा दिनक्रम अगदी ठरलेला, दिवसभर गावात कुठे ना कुठे फिरत राहून काही ना काही उद्योग करायचे आणि संध्याकाळी घरी परत यायचं. "अनामिक" आणि "आर्यवर्मन" यांच्या सुप्त संघर्षात ओढला गेलेल्या विश्याच्या नकळत त्याच्याकडून करवून घेतल्या गेलेल्या अनेक गोष्टी वाचताना वाचक त्या वातावरणात हरवून जातो. एखाद्या चित्रपटाला लाजवेल इतक्या सफाईदारपणे एक-एक प्रसंग वाचकांसमोर येत राहतात. लोकांच्या नजरेपासून दूर, निर्जन ठिकाणी आर्यवर्मनकडून आपल्या कामासाठी विश्याला तयार केले जात होते, पण एक दिवस आशा या गावातीलच मुलीवर ओढवलेल्या प्रसंगानंतर कादंबरीचा प्रवास वेगळ्या मार्गाने चालू होतो आणि तो साहजिकच वाचकाला सोबत घेऊनच! गावातील गुंडांकडून आशावर झालेला अतिप्रसंगाचा प्रयत्न कथेला एक वेगळेच वळण देतो. त्या प्रसंगादरम्यान गुंडांशी दोन हात करताना आशाला दिसलेलं विश्याचं वेगळं रुप तिला आश्चर्यचकित करणारं असतं. एक-दोन शब्दांच्या पलीकडेही न बोलणारा वेडा विश्या इतकी अचाट कामगिरी कशी करू शकतो, याचे तिला आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. पुढे या कथेत एन्ट्री होते ती पीएसआय अदवंत यांची. इथून पुढचा घटनाक्रम धारपांनी त्यांच्या नेहमीच्या शैलीमध्ये रंगवलेला आहे. अनेक वर्षांपूर्वी घडून गेलेल्या घटना, "अनामिक" - "आर्यवर्मन" यांचा संघर्ष आणि वेडा विश्वनाथ यांचा काय संबंध असू शकतो? या विचारात वाचकाला गुंतवून कथा पुढे सरकत राहते. अनेक रहस्ये हळूहळू उलगडत जातात. अदवंत, आशा आणि विश्वनाथ एका दुष्ट चक्रामध्ये फसल्यानंतर त्यातून सुटण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न रंजक पद्धतीने वाचकांसमोर मांडले आहेत. त्यातून ते बाहेर पडतात का आणि वेड्या विश्वनाथाचे पुढे काय होतं? या प्रश्नांची उत्तरे साहजिकच कथेच्या शेवटी मिळतात आणि "धारप स्टाईल" ने कथेचा शेवट होतो.
भयकथांची आवड असणाऱ्यांनी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "वेडा विश्वनाथ".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment