लेखिका : इरावती कर्वे
प्रकाशक : देशमुख अँड कंपनी
कोणत्याही ऐतिहासिक घटनांवर होणाऱ्या संशोधानातून पुढे येणाऱ्या गोष्टी या कधीच अंतिम सत्य मानता येत नाहीत कारण जितके त्या गोष्टीच्या किंवा घटनेच्या खोलात शिरण्याचा प्रयत्न केला जातो तितक्या नवनवीन गोष्टी बाहेर येतच राहतात. परंतु एक गोष्ट मात्र नक्की की जर डोळसपणे बघितलं तर संशोधनामुळे सत्याच्या अधिकाधिक जवळ मात्र पोहचता येते. "महाभारत" आणि "रामायण" यांना आपला इतिहास म्हणायचा की फक्त ग्रंथ याबद्दल बरीच मतमतांतरे असली तरी हजारो वर्षांपूर्वीच्या या दोन्हीही घटनांवर आजही अखंड संशोधन चालूच आहे. अशा संशोधनातून सिद्ध झालेल्या जुन्या गोष्टी वगळणे आणि नवीन गोष्टींचा समावेश करणे हे आजही अविरतपणे चालूच आहे. पण आपण ऐकलं किंवा वाचलं असलेलं "रामायण", "महाभारत" यांचा आपल्यावर असणारा प्रभावच इतका जबरदस्त आहे की बऱ्याचवेळा या संशोधनात्मक शोधांकडे दुर्लक्षच केलं जातं. जय नावाचा इतिहास आज आपण महाभारत म्हणून ओळखतो परंतु व्यासांनी महाभारत लिहिल्यापासून ते आजपर्यंत त्यामधे अनेक बदल झाले. आज आधुनिक जगात इतिहास अभ्यासकांनी महाभारताची शक्य तितकी जुनी प्रत शोधायचा प्रयत्न करून, सर्व संशोधनाअंती जी नवीन प्रत बनवली आहे त्यावर इरावती कर्वे यांचं हे पुस्तक आधारित आहे, महाभारतातील पात्रांवरील "युगान्त" ही त्यांची कादंबरी अशा नवीन संशोधनाचा आधार घेऊनच लिहिली गेली आहे त्यामुळे ही कादंबरी जितकी अलिप्तपणे वाचली जाईल तितक्या अधिक प्रमाणात महाभारतातील पात्रांची नव्याने ओळख झाल्याचा अनुभव वाचकाला मिळत राहतो. इरावती कर्वे यांनी या आवृत्तीत महाभारतातील कोणत्याही पात्राला देवत्व दिलेलं नाही, कोणतेही चमत्कार नाहीत, कठोर असला तरी पटेल असा एक इतिहास आहे. उदाहरणार्थ कादंबरीत श्रीकृष्णाच्या देवाचा अवतार या कल्पनेला छेद दिलेला आहे. नवीन संशोधनाचा दाखला देऊन श्रीकृष्ण हा एक अतुलनीय शक्ती असणारा महापुरुष होता या दृष्टिकोनातूनच त्याचं पात्र वाचकांसमोर आणलं आहे त्यामुळे महाभारत ही काल्पनिक कथा नसून तो आपला इतिहास आहे या दाव्याला एकप्रकारची पुष्टी मिळते. शास्त्रीय संदर्भ लावून जर महाभारताचे वाचन केले तर बऱ्याचशा गोष्टी अमानवीय वाटत नाहीत. फक्त त्या गोष्टी मान्य करायला आपल्या मनाची तयारी असायला हवी. इरावती कर्वे यांची "युगान्त" ही कादंबरी वाचल्यानंतर महाभारताविषयी आपल्या मनातील बऱ्याच शंकांचे निरसन होण्यासोबतच काही नवीन शंका देखील जन्माला येतात, पण साहजिकच येणाऱ्या काळात जे संशोधन होईल त्यातून त्यांचंही निरसन होईलच! सर्वांना परिचित असणाऱ्या महाभारताच्या मुख्य कथेला फाटा देऊन, शक्य तितक्या मुळ प्रतींचा अभ्यास करून महाभारतातील व्यक्तिरेखांवर लिहिलेल्या काही लेखांचा संग्रह म्हणजे हे इरावती कर्वे यांचं पुस्तक "युगान्त" ! भीष्म, गांधारी, कुंती, कर्ण, अर्जुन, भीम, द्रौपदी, द्रोण, विदुर या आणि अशा इतर पात्रांवरील लेखांसोबतच इरावती कर्वे यांनी महाभारताचा काळ शोधण्याचा प्रयत्नदेखील "युगान्त" मधून केला आहे.
महाभारतातील आपण आजपर्यंत मनात ठेवून राहिलेल्या बऱ्याच व्यक्तिरेखांच्या प्रतिमांना छेद देण्याचं काम इरावती कर्वे यांनी "युगान्त" मधून केलंय असं म्हटलं तरी ते चुकीचं नाही होणार. उदाहरणार्थ धृतराष्ट्र आणि गांधारी ह्यांच्या व्यक्तीरेखांबद्दल त्यांनी जे मत मांडलंय ते तांत्रिकदृष्ट्या अगदी योग्य वाटतं. 'गांधारीचे लग्न धृतराष्ट्राशी झाल्यानंतर तिने आपल्या डोळ्यांवर पट्टी बांधली ती पतीप्रेमाने नाही तर आपण एका मोठ्या देशाची सुंदर राजकन्या असताना भीष्माने जबरदस्ती आंधळ्या राजपुत्राशी आपल्याला लग्न करायला भाग पाडलं पण तिला कुण्या आंधळ्याची काठी व्हायचे नव्हते म्हणून!' शिवाय दुसरा मुद्दाही असाच पटण्यासारखा आहे, डोळ्याला पट्टी बांधून गांधारीने आपल्याच वंशाच्या नाशाची बीजं पेरली असं लेखिका म्हणतात. अर्थात मुलांवर चांगले संस्कार करणं ही केवळ आईची जबाबदारी नसते. पण धृतराष्ट्राकडून याबाबत काही अपेक्षा ठेवण्यात अर्थ नसल्याने तिच्यावर जास्त जबाबदारी होती आणि ती तिने पार पाडली नाही हेही तितकंच खरं. हा मुद्दा आणखी पटवून देण्यासाठी इथे कुंतीचं उदाहरण दिलं गेलंय जिने शेवटपर्यंत आपल्या पाचही मुलांवर नजर ठेवली आणि चांगल्या वाईटाचं मार्गदर्शन केलं. महाभारतातील एखादे पात्र ठराविक प्रसंगी एका विशिष्ट प्रकारेच का वागले असावे असा विचार शक्यतो आपण कधी केलाच नाही परंतु इरावती कर्वे लिखित "युगान्त" मधे असे बरेच प्रसंग आहेत जिथे एखादे पात्र असे का वागले असावे यावर संशोधनात्मक संदर्भ देऊन प्रकाश टाकण्यात आला आहे ज्यामुळे वाचक विचारात पडतो. एखादी व्यक्ती जेव्हा महत्प्रयासाने काही गोष्टी सिद्धीस नेते तेव्हा त्या प्रवासात त्या व्यक्तीने बऱ्याच गोष्टी गमावल्या देखील असतात आणि महाभारतातील प्रत्येक पात्राला हे अगदी तंतोतंत लागू होते. इरावती कर्वे यांनी महाभारतातील प्रत्येक व्यक्तिरेखेला आपल्यासमोर आणताना जे संदर्भ दिलेले आहेत ते वाचताना मनाला सतत होणारी जाणीव म्हणजे, 'मानवी प्रयत्न निष्फळ असतात, मानवी जीवन नेहमी विफलच राहणार, हा धडा मनावर बिंबवण्यासाठी तर महाभारत रचलेले नाही ना?' इरावती कर्वे यांनी कोणत्याही पात्राला अतिशयोक्ती न होऊ देता "युगान्त" मधून ज्या पद्धतीने वाचकांसमोर आणलं आहे त्यामुळे महाभारताबद्दल वेगळं असं काहीतरी वाचल्याचं समाधान हे पुस्तक देऊन जातं. परंतु मूळ संस्कृत महाभारतावर आणि तत्कालीन साहित्यावर अभ्यास करून केलं गेलेलं इरावती कर्वे यांचं या पुस्तकातील परीक्षण अलिप्तपणे आणि महाभारत-कृष्ण यांबद्दलच्या आपल्या मनातील पूर्वकल्पना बाजूला ठेऊन वाचलं तरच एक वेगळं साहित्य वाचल्याचं समाधान मिळू शकतं.
संग्रही ठेऊन आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "युगान्त".
संदीप प्रकाश जाधव
Mast
ReplyDelete