लेखक : रवींद्र गुर्जर
प्रकाशक : श्रीराम बूक एजन्सी
पिअर्स पॉल रीड यांच्या "ALIVE" कादंबरीचे मराठी अनुवादित पुस्तक "सत्तर दिवस". रवींद्र गुर्जर यांचं "सत्तर दिवस" हे बऱ्याच जणांकडून वाचायला सुचवलेलं पुस्तक संग्रही घेऊन वाचून काढलं. सकारात्मक आणि समाधानी आयुष्य जगण्याचा संदेश देणारं हे 199 पानांचं अतिशय उत्कृष्ठ पुस्तक वाचायला घेल्यानंतर पुढं काय झालं असेल या एकाच विचाराने एकसारखं वाचून अवघ्या एका दिवसात पूर्ण केलं. जगण्याची जिद्द काय असते याचं पाना-पानावर दर्शन देणारं, सत्यघटनेवर आधारित हे पुस्तक खचलेल्या मनाला उभारी देण्याचं काम करतं. माणसाजवळ जर जिद्द असेल तर कितीही प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहता येऊ शकते हे पुस्तक वाचताना सतत जाणवत राहते. युरुग्वे हा दक्षिण अमेरिकेतील एक छोटासा देश. १२ ऑक्टोबर १९७२, युरुग्वे एअर फोर्सच्या फेअर चाइल्ड ए २२७ ह्या विमानानं पंचेचाळीस प्रवाशांसह आकाशात झेप घेतली. रग्बी खेळाडूंचा संघ चिलीकडे निघाला होता. लांबीने जगातील सर्वात जास्त आणि हिमालयाच्या बरोबरीचा पर्वत समूह, अँडीज ओलांडून त्यांना जायचं होतं. चिलीकडे जायला निघालेल्या विमानातील सर्व ४५ लोकांच्या मनात आनंदाचं उधान आलं होतं. एकमेकांसोबत गप्पा मारत, दंगा-मस्ती करत आणि रग्बी सामना जिंकल्याची स्वप्ने बघत मजेत चाललेल्या त्यातील एकालाही पुढं येऊ घातलेल्या भयानक संकटाची पुसटशीही कल्पना नव्हती. अँडीज मधून फेअर चाइल्ड विमान जाऊ लागलं आणि अचानक ते ढगात शिरलं. हिमवर्षाव तर सतत चालूच होता. दुपारी ३.३० वाजता वैमानिकानं सॅंटियागो विमानतळावर "All Good" चा संदेश दिला. परंतु त्यानंतर एकाच मिनिटात विमानाचा सॅंटियागो टॉवरसोबतचा संपर्क तुटला. झंझावती वाऱ्याने विमानाला दोन प्रचंड तडाखे दिले आणि नियतीने वाढून ठेवलेल्या भयानक संकटाची चाहूल विमानातील ४५ जणांना झाली. काही क्षणात विमान चारही बाजूंनी हिमशिखरांनी वेढलेल्या दरीत कोसळलं. ढगांमुळे आधीच प्रकाश मंदावला होता. त्यात बर्फ पडू लागला. बचावलेले व थोडया सुस्थितीत असलेले प्रवासी जखमी लोकांना बाहेर काढू लागले. फेअर चाइल्ड विमान बेपत्ता झाल्याचं आपल्या देशात सर्वांच्या लक्षात येणार आणि लवकरच आपल्याला मदत मिळणार या आशेवर ते सगळे होते. त्यांनी रेडिओ सुरु करण्याचा प्रयत्न केला पण ट्रान्समीटर निकामी झाला होता. अनेक जण भयंकर जखमी झाले होते तर काही जण जागीच मृत्युमुखी पडले होते. दिवस संपला, रात्र सुरु झाली तरी अजून मदतीचा काही पत्ता नव्हता. रात्रीच्या अंधारात ओरडणे, किंचाळणे यांशिवाय काहीही ऐकायला येत नव्हतं. पुढचे आठ दिवस चिली, अर्जेंटिना आणि युरुग्वेकडून विमानाचा जारीने शोध घेण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ! अँडीजची शेकडो मैल लांबी, वादळ आणि हिमवृष्टी लक्षात घेता, विमान सापडण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी झाली सोबतच विमानातील कोणीही वाचले असण्याची आशादेखील सोडून देण्यात आली. परंतु नियतीला हे मान्य नव्हतं, वाचलेल्या लोकांकडून काहीतरी अचाट पराक्रम करून घेण्यासाठीच जणू हा सर्व खेळ मांडला होता. त्या वाचलेल्या लोकांनी जगण्यासाठी केलेल्या संघर्षाची सत्यकथा म्हणजे हे पुस्तक "सत्तर दिवस".
अपघातानंतर मदतीची वाट पाहता तुटपुंज्या अन्नाच्या साठ्यावर ते एक-एक दिवस ढकलत राहतात. पुढे अन्नसाठा संपत आल्यानंतर फक्त एक चॉकलेटचा तुकडा आणि एक घोटभर रम यावर ते दिवस काढू लागतात. प्रत्येक दिवसाची सुरवात काहीतरी मदत मिळेल या आशेने होत होती आणि शेवट मात्र निराशेने होत होता. पुन्हा दुसऱ्या दिवशी नव्या उमेदिने त्यांचे प्रयत्न सुरु होत असत. परंतु आपल्याला मदत मिळणे आता अशक्य आहे त्यामुळे सुटकेचे प्रयत्न आता आपल्यालाच करावे लागतील याची त्यांना लवकरच जाणीव झाली आणि तिथून बाहेर पडण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले. इथून पुढचा या सर्वांचा थरारक संघर्ष अंगावर काटा आणतो. प्रत्येक दिवस मरणाच्या दारात उभे राहण्याचा अनुभव घेऊन ते लढत राहतात. मधेच अचानक कोसळलेल्या हिमकडेने आणखीन काही लोकांचा मृत्यू होतो त्यावेळच्या प्रसंगाने तर वाचकाचे मन अक्षरशः चिरून जाते. सांघिक एकीच्या जोरावर येणाऱ्या संकटांवर ते मात करत राहतात. पोटाची आग विझवण्यासाठी आपल्याच मित्रांच्या मृतदेहांचे मांस खायची कठीण वेळ त्यांच्यावर येते. सुटकेसाठी त्यांनी केलेले वेगवेगळे प्रयत्न आणि प्रत्येकवेळी येणारे अपयश तरीही हार न मानता त्यांची चाललेली धडपड त्यांच्याकडे असणाऱ्या जिद्द आणि दुर्दम्य इच्छाशक्तीची साक्ष देते. त्यांच्यापैकीच एक लेनेसा आणि पेराडो यांनी तिथून बाहेर पडण्यासाठी केलेल्या धाडसी शोधमोहिमेला अखेर यश येते. तब्बल १० आठवड्यानंतर त्यांच्या अस्तित्वाबद्दल बाहेरील जगाला समजते. एक चिली शेतकरी आपल्या गुरांना चारण्यासाठी अँडीजच्या खोल दरीत गेला असताना त्याला दूरवर दोन माणसांच्या आकृत्या दिसतात. लेनेसा आणि पेराडो त्या शेतकर्याला जवळ येण्यासाठी जोरजोरात खुणावत होते परंतु त्यांचं भयानक स्वरूप आणि गुडघ्यांवर खुरडत येण्यामुळे घाबरलेल्या शेतकऱ्याने दुरुनच रुमालातून कागद-पेन त्यांच्याकडे फेकलं. दाढी वाढलेल्या,भकास चेहेर्याच्या आणि कपडयांचा चिंध्या झालेल्या पेराडोने काही तरी लिहून कागद परत फेकला. त्यावर लिहिलं होतं : "पर्वतावर कोसळलेल्या विमानातील मी एक उतारू आहे. मी युरुग्वेचा रहिवासी". शेवटी तब्बल ७० दिवसानंतर सर्वांची त्या जीवघेण्या संकटातून सुटका झाली.
अपघातानंतर बाहेर पडण्यासाठी त्यांनी कोणकोणते प्रयत्न केले? त्यांना कोणकोणतं अपयश येत गेलं? अपयश येवूनही ते पुन्हा दुसऱ्या दिवशी कसे प्रयत्न करत होते? जिवंत राहण्यासाठी, अन्न मिळवण्यासाठी त्यांनी कोणता मार्ग स्वीकारला? त्यानंतर ते कसे बाहेर पडू शकले? त्यांनी विमान अपघातासोबतच इतर नैसर्गिक आपत्तींना कशाप्रकारे तोंड दिलं? शेवटी ते सर्व या संकटातून कसे बाहेर पडले? हे सर्व जाणून घेण्यासाठी हे पुस्तकं नक्कीच वाचायला हवं. त्या दुर्दैवी अपघातातून ४५ जणांपैकी बचावलेल्या सोळा लोकांनी सांगितलेली त्यांच्या ७० दिवसांची ह्रदयद्रावक सत्यकथा "सत्तर दिवस".
संदीप प्रकाश जाधव
No comments:
Post a Comment