Monday, August 30, 2021

"नांगरणी"

 


लेखक : आनंद यादव

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


                                            पृष्ठे- ३४४, मूूल्य- २८० रुपये.

आनंद यादव यांच्या आत्मचरित्रातील "झोंबी" नंतरचा पुढचा भाग "नांगरणी"! आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला मन हेलावून टाकणारा आणि अत्यंत प्रेरणादायी संघर्ष "झोंबी" मधे वाचायला मिळाला. त्यांच्या आत्मचरित्राच्या पहिल्या दोन भागांतील या कादंबरींची नावेही तितकीच समर्पक आहेत. "झोंबी"चा शब्दशः अर्थ 'झुंज' किंवा 'लढाई'. यादव यांनी दहावी पर्यंतच्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांचा असणारा प्रखर विरोध आणि दारिद्र्य यांच्यासोबत दिलेली अगदी टोकाची लढाई त्यांनी "झोंबी" मधून मांडली आहे. "नांगरणी" हे नावसुद्धा तितकच समर्पक आहे. जमिनीमध्ये कणखर सकसता आणण्यासाठी, उत्तम पिकासाठी तिच्यावर धारदार अवजारांनी उभे-आडवे घाव घालून मशागतीस होणारी सुरुवात म्हणजे "नांगरणी". यादव यांच्या आयुष्याची होणारी अशीच मशागत या पुढील भागात, "नांगरणीत" आहे ज्यामधून त्यांचा अंदा पासून ते लेखक आनंद यादव बनण्यापर्यंतचा प्रवास अधोरेखीत केलेला आहे. माझ्या वाचनात बरीच आत्मचरित्रे वाचनात आली त्यातील प्रत्येकाची कहाणी वेगळी, प्रत्येकाचा संघर्ष वेगळा! असाच एक प्रेरणादायी संघर्ष "नांगरणी"! परिस्थितीसोबत दोन हात करायला शिकवणारे हे अतिशय सुंदर आत्मचरित्र! कुठेतर वाचनात आलं होतं की आनंद यादव यांचं चरित्र ग्रामीण भागात राहून मोठी स्वप्ने बघणाऱ्यांसाठी खूप प्रेरणादायी आहे पण खरं तर फक्त ग्रामीण भागासाठीच नाही तर ते अशा प्रत्येक व्यक्तीसाठी एक ऊर्जास्रोत जे आपले ध्येय गाठण्यासाठी धडपडत असतात. परिस्तिथीला दोष न देता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष ठेऊन अतिशय कठीण संघर्षातून ते खेचून आणण्याची कहाणी म्हणजे आनंद यादव यांचं हे आत्मचरित्र. एका भूमिहीन शेतकऱ्याच्या घरी जन्मलेला, अठराविश्वे दारिद्र्यात जगणारा, जिथे दोन वेळच्या खायचीदेखील भ्रांत, घरातून शिक्षणाला होणारा प्रखर विरोध अशा वातावरणातून पुढे येऊन साहित्यातील एक उच्च शिखर गाठणाऱ्या आनंद यादव यांची कहाणी खूप काही सांगून जाते. 

दहावीनंतर पुढच्या शिक्षणासाठी आनंद यादव घरातून पळून रत्नागिरीला जातात. रत्नागिरीला गेल्यानंतर तिथे भाई अर्थातच पु.ल.देशपांडे आणि सुनिता ताई यांच्या संपर्कात आल्यानंतर खरं तर त्यांच्यातील साहित्यिकाला एक दिशा मिळाली. बी.ए. आणि पुढे एम.ए. पर्यंतच्या शिक्षणासाठी यादव यांना भाई आणि सुनिता ताईंकडून मोलाची मदत झाली आणि ती कृतज्ञता त्यांनी या आत्मचरित्रात बऱ्याचवेळा बोलूनदेखील दाखवली आहे. हे पुढचे शिक्षण घेत असताना साहित्यलेखनात त्यांची प्रगती होत असली तरी त्यांची आर्थिक परिस्थिती ही नेहमीच त्यांच्या आड येत होती. घरी सर्व भावंडांमध्ये सर्वात मोठे असल्याने घर चालवण्यासाठी घरच्यांची त्यांच्याकडून असणारी अपेक्षा आणि स्वतःचे शिक्षण पूर्ण करून आयुष्यात काहीतरी करून दाखवण्याचं ध्येय या दोघांमध्ये होणारी त्यांची तारेवरची कसरत वाचकाला बऱ्याच वेळा भावनिक करून जाते. दर दोन वर्षांनी मूल जन्माला घालणारी त्यांची आई जेव्हा २०-२२ वर्षें वयाच्या आनंद यादव यांच्याजवळ आता मला मूल नाही जन्माला घालायचं म्हणून मन मोकळं करते तेव्हाचा प्रसंग लेखकासोबतच आपल्याही डोळ्यात पाणी आणतो, लेखकासोबतच नकळत आपणही त्याच्या वडिलांचा राग करतो. घरची परिस्थिती अशी सर्वच बाजूंनी प्रतिकूल असली तरीही आपले शिक्षण आणि साहित्य या दोन्ही गोष्टी सांभाळून ते घराकडेदेखील लक्ष देत राहिले. हा सर्व संघर्ष त्यांनी त्यांच्या शब्दांतून आपल्यासमोर उभा केला आहे. त्यांच्या साहित्यातील गुणांना खरी ओळख मिळाली जेव्हा ते पुणे आकाशवाणीसोबत जोडले गेले. माडगूळकर आणि इतर मोठ-मोठ्या लोकांच्या सहवासाने त्यांच्यातील कवी-लेखक अधिक समृद्ध झाला. तरीही त्यांचा आर्थिक आणि भावनिक संघर्ष काही सुटला नव्हता. त्यांच्या हिरवं जग या कवितासंग्रहाला मिळालेल्या पारितोषिकाने ते एक नवकवी म्हणून साहित्यविश्वात ओळखले जाऊ लागले. एम.ए. पूर्ण झाल्यानंतर त्यांनी नव्याने नोकरीचा शोध सुरू केला आणि शेवटी रयत शिक्षण संस्थेच्या पंढरपूर मधील महाविद्यालयात प्रोफेसर म्हणून रुजू झाले. झोंबीपासून चालू झालेला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा, अंदा ते आनंद यादव हा अतिशय भावस्पर्शी प्रवास नांगरणीच्या शेवटाने सुखावह होतो. 

संघर्षावस्थेत येणाऱ्या प्रत्येक संकटाचा नेटाने सामना करून, प्रतिकूल परिस्तिथीवर मात करून स्वतःला घडवणाऱ्या आनंद यादव यांचं प्रत्येकाने किमान एकदा तरी वाचावं अशा आत्मचरित्रातील एक टप्पा "नांगरणी".





संदीप प्रकाश जाधव

Tuesday, August 24, 2021

"पॅलेस्टाईन - इस्रायल : एका अस्तित्वाचा संघर्ष"

 


लेखक : अतुल कहाते

प्रकाशक : मनोविकास प्रकाशन

                                                                           पृष्ठे- २५४, मूूल्य- २५० रुपये.


लेखकाप्रमाणेच अगदी शाळेत असल्यापासून मला जर कोणत्या देशाबद्दल कुतूहल असेल तर तो म्हणजे इस्रायल. इस्रायलबद्दल चालू असणाऱ्या कोणत्याही चर्चेत इस्रायल म्हणजे नायक आणि पॅलेस्टाईन म्हणजे खलनायक हे ठरलेलंच! तेव्हा वाचन फारसं नसलं तरी मित्रांच्या गप्पांतून इस्रायल म्हणजे एक अफाट शक्तीचा देश आहे, चारी बाजूंनी दुश्मन अरब देशांनी घेरलेला असूनही स्वतःचं वेगळेपण त्यानं कसं जगावर ठसवलंय, पाण्याची कमी असूनही त्याने आधुनिक शेती कशी केली आहे, त्याचं 'water management', तंत्रज्ञानावरची त्याची मजबूत पकड, त्याची गुप्तचर संघटना 'मोसाद' सोबतच अमेरिकेच्या तोडीस तोड असणारी त्याची सैनिकी ताकद, त्याने मोडीस काढलेला दहशतवाद हेच ऐकत आलो. असेच आणखी एक ऐकून ऐकून पारायणे झालेलं वाक्य म्हणजे पॅलेस्टाईनमधल्या अतिरेक्यांनी इस्रायलवर हल्ला केल्यानंतर त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून असा जबरदस्त हवाईहल्ला केला जातो की कमीतकमी १-२ वर्षें तरी पॅलेस्टाईनकडे कोणताही दहशतवादी हल्ला करण्याची ताकद राहत नाही त्यामुळे भारतानेही पाकिस्तानच्या बाबतीत असंच काही तर केलं पाहिजे तरच पाकिस्तान वठणीवर येईल! दहशतवादाच्या बाबतीत भारतानेही इस्रायल सारखंच वागलं पाहिजे! परंतु अतुल कहाते यांच्या या पुस्तक वाचनानंतर आपल्या देशाबद्दलचा अभिमान आणखी वाढेल कारण आपण इस्रायल सारखं नाही याची होणारी जाणीव! आपल्याच आश्रयदात्याला मारून, त्याला देशोधडीला लावण्याचं कृत्य करणाऱ्या इस्रायलसारखा भारत नाही याची होणारी जाणीव! पॅलेस्टाईन-इस्रायल हा संघर्ष खरं तर पॅलेस्टिनी अरब विरूद्ध ज्यू यांच्यातला आहे. हिटलरकडून लाखो ज्यू लोकांचं झालेलं हत्याकांड ही या संघर्षाची पहिली पायरी म्हंटलं तरी ते चुकीचं नाही होणार. जर्मनीचा नाझी हुकूमशहा हिटलरच्या छळछावणीतून निसटलेल्या ज्यू लोकांनी पॅलेस्टाईन या अरबांच्या देशात आश्रय घेतला सोबतच जर्मनीसह युरोपच्या अन्य भागात आश्रित म्हणून राहणाऱ्या ज्यू लोकांनीही पॅलेस्टाईनमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर केले. नंतर याच अल्पसंख्याक ज्यूंनी त्यांच्या आश्रयदात्या बहुसंख्य पॅलेस्टिनींना त्यांच्याच देशात निर्वासित बनवलं, अगदी नियोजनबद्धरित्या! आश्रित म्हणून राहणाऱ्या ज्यूंना आपल्या स्वतंत्र ज्यू राष्ट्राच्या निर्मितीच्या विचाराने इतकं पछाडलं की त्यांनी १२०० वर्षांच्या वास्तव्याचा वैभवशाली इतिहास लाभलेल्या पॅलेस्टिनींच्या स्वप्नांची अक्षरशः राखरांगोळी केली. आपल्याच आश्रयदात्याला देशोधडीला लावले. नंतर आपलं गेलेलं वैभव परत मिळवण्यासाठी, आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या पॅलेस्टिनींच्या चळवळीला दहशतवादाचं लेबल लावण्यात आलं आणि उलट इस्रायलच कसा वर्षानुवर्षे दहशतवाद झेलत आहे, आपलं अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी ज्यूंना कसा सतत संघर्ष करावा लागत आहे हेच ठासून सांगण्यात आलं. अतुल कहाते यांनी नेमका हाच धागा पकडून या संघर्षाचा खरा इतिहास त्यांच्या पुस्तकातून समोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. हा इतिहास सांगत असताना ज्यूंचा जेवढा छळ हिटलरने केला नसेल तेवढा अत्याचार ज्यूंकडून पॅलेस्टिनी अरबांवर केला गेला आणि हे पटण्यासारखे बरेच मुद्दे या पुस्तकात कहाते यांनी मांडले आहेत. पुराव्यादाखल कहाते यांनी पॅलेस्टिनी भूमीवरील नरसंहाराच्या अनेक घटनांची मुद्देसुद माहिती पुस्तकात दिली आहे. पॅलेस्टाईन-इस्रायल हा संघर्ष नेमका काय आहे? या संघर्षाला कारण असणारा नेमका खलनायक कोण आहे? दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक शांततेसाठी सतत प्रयत्न चालू असताना हा वाद का आणि कशामुळे आजही चिघळत पडला आहे? जागतिक महासत्ता म्हणून मिरवणारी अमेरिका आणि आपल्या वसाहती उठवून पॅलेस्टाईनमधून निघून गेलेल्या ब्रिटनसह पाश्चिमात्य देशांची या वादात नेमकी काय भूमिका आहे? भारत या संघर्षाकडे कोणत्या नजरेने बघतो आणि भारताची यामध्ये काय भूमिका राहिली आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अतुल कहाते यांनी त्यांच्या "पॅलेस्टाईन-इस्रायल : एका अस्तित्वाचा संघर्ष" या पुस्तकातून देण्याचा प्रयत्न केला आहे.

मध्यपूर्व आशियातील स्थित्यंतरं आणि इस्लामचा उदय या पहिल्या प्रकारणापासून सुरुवात करताना लेखकांनी ज्यूंचा इतिहास, त्यांचा राष्ट्रवाद म्हणजेच झियोनिझम, बॅल्फोरच्या घोषणेचे परिणाम, पॅलेस्टाईनमधील अस्थिरता, ब्रिटिशांनी केलेला पॅलेस्टिनींच्या चळवळीवरील हल्ला आणि इस्रायलची निर्मिती, निर्मितीनंतरचा काळ, अरबांची युती, इतिहासात गाजलेली दोन युद्धे 'सहा दिवसांचं युद्ध' आणि 'दहा दिवसांचं युद्ध', यासीर अराफतचा उदय, मध्यंतरीच्या काळात शांत झालेला हा संघर्ष आणि पुन्हा चालू झालेलं हिंसाचाराचं थैमान, शेवटी इस्रायल - पॅलेस्टाईन यांच्यासोबत भारताचं असणारं नातं या आणि इतरही काही प्रकरणांतून जवळपास सात दशकांपेक्षा जास्त काळापासून चालू असणाऱ्या या संघर्षाची जवळून ओळख वाचकाला करून दिली आहे. १४ मे १९४८ ला झालेल्या इस्रायलच्या निर्मितीनंतर बळाच्या जोरावर साडेसात ते दहा लाख पॅलेस्टिनी अरबांना देशाबाहेर हाकलून लावण्यात आलं. स्वतःच्याच भूमीवरील त्यांच्या वस्त्या उद्ध्वस्त करण्यात आल्या. या काळातल्या घटनाक्रमाचं वर्णन पॅलेस्टिनी अरब ‘अल-नक्बा’ असं करतात म्हणजेच अत्यंत दुर्दैवी आणि महाभयानक संकट! अमेरिकेने इस्रायलच्या निर्मितीला सर्वात प्रथम मान्यता तर दिलीच शिवाय संयुक्त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून अनेक देशांवर दबाव टाकून इस्रायलच्या निर्मितीसाठी मार्ग मोकळा होईल याची दक्षता घेतली. याशिवाय इतरही पाश्चिमात्य देशांनी आपलं मत इस्रायलच्या बाजूने टाकलं. सोव्हिएत युनियननेही इस्रायल हा स्वतंत्र देश असल्याचं मान्य केलं. त्यामुळे ज्यूंच्या महत्त्वकांक्षी झियोनिझमला पॅलेस्टाईनचा घास गिळण्यासाठी जणू रानच मोकळं झालं. संयुक्त राष्ट्रासह कोणालाही न जुमानता इस्रायलने पॅलेस्टाईन लोकांवर जो अत्याचार केला त्याचं अगदी विस्तृत आणि मन सुन्न करणारं वर्णन पुस्तकात वाचायला मिळेल. पॅलेस्टाईन-इस्रायल वादावर दिशाभूल करणारा इतिहास लिहून ज्यू इतिहासकारांनी पॅलेस्टाईनला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचं काम नेटाने पार पाडलं आहे असं सांगत असताना त्याबद्दल लेखकांनी बरेच दाखले दिले आहेत. आपली गुप्त कागदपत्रं राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली कधीही बाहेर येऊ न देणाऱ्या इस्रायलने पॅलेस्टाईनचा ऐतिहासिक दस्तावेज मात्र जाणीवपूर्वक नष्ट करून टाकला. याच्याबद्दल देखील पुस्तकात वाचायला मिळेल. ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम या तिन्ही धर्मांसाठी समान ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्व असणाऱ्या जेरुसलेम या शहराच्या वादावरसुद्धा लेखकांनी प्रकाश टाकला आहे. या सात दशकांच्या काळात इस्रायलचा प्रतिकार करण्यासाठी पॅलेस्टिनींच्या अनेक संघटनांचा आणि नेत्यांचा ठराविक अंतराने उदय होत राहिला. त्यात सर्वांत लक्ष्यात राहण्यासारखी संघटना म्हणजे पीएलओ आणि तिच्याच एका उपसंघटनेचा, फताहचा नेता 'यासिर अराफत'! फताहकडून इस्रायला तोडीस तोड उत्तर मिळू लागले आणि अराफात अरब देशांमध्ये हीरो ठरला, पुढे जाऊन तो पीएलओचाही प्रमुख बनला. त्यानंतर अराफातचा वाढता प्रभाव, दहशतवादाचं लेबल पुसण्यासाठी अराफातनं केलेल्या तडजोडी, चार दशकांच्या अखंड संघर्षानंतर १९९३ मधे इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांच्या पुढाकारानं झालेला ऐतिहासिक शांतता करार, वेस्ट बँक आणि गाझा पट्टा या भागांमध्ये पॅलेस्टिनी लोकांचं तात्पुरतं सरकार स्थापन करण्यास मिळालेली मान्यता, अराफातना मिळालेलं शांततेचं नोबेल, अराफात यांचं जन्मठिकाण आणि मृत्यूबद्दलचं गूढ याबद्दलदेखील पुस्तकात वाचायला मिळेल. नोव्हेंबर २००४ मधे अराफातच्या निधनानंतर पूर्णत्वास जात असलेली ही पॅलेस्टिनी चळवळ पुन्हा एकदा भरकटली. आजही मूळ पॅलेस्टाईनचा ७८ टक्के भूभाग इस्रायलच्या ताब्यात आहे. ५० लाखांहूनही जास्त पॅलेस्टिनी लोक आज निर्वासित छावण्यांमध्ये राहत आहेत. आपल्याच देशातून, आपल्याच भूमीवरून हाकलले गेल्याने पॅलेस्टाईन लोकांची होणारी मानसिक आणि शारीरिक फरफट शब्दांत सांगणे महाकठीण. लेखकाच्या मते, पॅलेस्टिनी लोकांची संख्या कमी करत राहणं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं आणि आपली दहशत आणखी वाढवणं, हाच इस्रायलचा इतिहास आहे आणि तेच त्यांचं भविष्यही असणार आहे!

इस्रायलच्या निर्मितीपासून पॅलेस्टाईन लोकांवर झालेल्या अत्याचाराची कहाणी म्हणजेच हे अतुल कहाते यांचं आवर्जून वाचण्यासारखं पुस्तक "पॅलेस्टाईन-इस्रायल : एका अस्तित्वाचा संघर्ष".






संदीप प्रकाश जाधव

Monday, August 16, 2021

"चक्रीवादळ"

 


लेखक : प्रभाकर पेंढारकर

प्रकाशक : मौज प्रकाशन

                                                                           पृष्ठे- १६६, मूूल्य- १५० रुपये.


उत्तरोत्तर प्रगती करणाऱ्या मानवाने निसर्गावर कितीही मात करायचा प्रयत्न केला तरी शेवटी तो निसर्गाच्या एक पाऊल मागेच राहतो. भविष्यात चंद्र आणि मंगळवार वसाहती निर्माण करण्याची स्वप्ने पाहणाऱ्या माणसाकडे आजही निसर्गातील बऱ्याच प्रश्नांची उत्तरे नाहीत. भूकंप, त्सुनामी, वादळ, पाऊस, दुष्काळ यांद्वारे सतत निसर्गाने माणसाला त्याची जागा दाखवून दिली आहे. तरीही मानवाची प्रगती आणि निसर्ग यांचा संघर्ष असाच अविरत चालू आहे. "चक्रीवादळ" ही कादंबरी आहे अशाच एका नैसर्गिक आपत्तीवरील! सत्यघटना आणि लेखक प्रभाकर पेंढारकर यांच्या स्वानुभवातून लिहिली गेलेली ही अतिशय विदारक परिस्थितीचे दर्शन घडवणारी, माणूस निसर्गापुढे किती खूजा आहे याची जाणीव करून देणारी एका वेगळ्या प्रकारची कादंबरी "चक्रीवादळ"! ४० वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशच्या सागरकिनाऱ्यावर घोंगावत आलेल्या एका राक्षसी चक्रीवादळाच्या तडाख्यात उडालेल्या हाहाकाराची विदारक कहाणी म्हणजे ही कादंबरी. आपल्या व्यवसायाचा भाग म्हणून चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचं चित्रण करणाऱ्या पेंढारकर यांनी त्यांना आलेला प्रत्यक्ष अनुभव या कादंबरीच्या माध्यमातून मांडला आहे. १९ नोव्हेंबर १९७७ ला आंध्रप्रदेशच्या समुद्रकिनाऱ्यावरील काही जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळामुळे आलेला भयानक जलप्रलय आणि त्यानंतर झालेला मृत्यूचा तांडव पेंढारकर यांनी या कादंबरीत उतरवत असताना कादंबरीला आवश्यक असणाऱ्या नायक किंवा नायिकेच्या पात्रांना छेद देऊन एका वेगळ्या पद्धतीने ती वाचकांसमोर मांडली आहे. पेंढारकर म्हणतात त्याप्रमाणे या विनाशकारी वादळाचा हा काही अहवाल नाही, तसेच ही पूर्णपणे नेहमीच्या वळणाने जाणारी कादंबरीही नाही. यातील घटना खऱ्या आहेत. कितीतरी माणसे खरी आहेत. त्यांची दुःखे खरी आहेत. दृश्य स्वरूपात दिसतो तेवढाच हा हाहाकार सिमीत नाही तर त्याचे विविध स्तरांवरील मन सुन्न करणारे परिणाम या कादंबरीत वाचायला मिळतील. ३०,००० हून अधिक लोकांचा मृत्यू, १० लाखांहून अधिक गुरांचा मृत्यू, जवळपास ३ लाख एकरातील पाण्याखाली गेलेली शेती आणि ३००० कोटी रुपयांचं आर्थिक नुकसान या आकडेवरूनच आपण आज अंदाज बांधू शकतो ४० वर्षांपूर्वीच्या त्या महाप्रलयाचा! या भयानक नैसर्गिक आपत्तीने झालेल्या निर्घृण मृत्यूंनी पोळलेली मनं, त्यांच्या प्राणांतिक जखमा, तरीही जगण्याचा अपरिहार्य संघर्ष आणि या संघर्षाला सावरणारे मदतीचे हजारो उबदार हात या सर्वांतून साकारणारा, एकाच भयाण वास्तवाच्या असंख्य छटांचा कोलाज म्हणजे ही प्रभाकर पेंढारकरांची कादंबरी "चक्रीवादळ".

माझ्यासारख्या आजच्या पिढीतील लोकांना अलीकडे येऊन गेलेली त्सुनामी आणि त्यामुळे झालेलं नुकसान परिचयाचं आहे. त्या त्सुनामीमुळे लोकांचं झालेलं मानसिक, आर्थिक नुकसान किती भयानक आहे याच्या चर्चा सोशल मीडियाच्या माध्यमातून भारताच्या कानाकोपऱ्यात पोहचल्या आणि मदतीचा प्रचंड ओघ त्सुनामी पीडितांसाठी चालू झाला, ज्याच्या सहाय्याने आजही ते लोक उभे रहायचा प्रयत्न करत आहेत. विविध माध्यमातून या त्सुनामीची दाहकता जगभरातल्या लोकांपर्यंत पोहचली परंतु ४० वर्षांपूर्वी येऊन गेलेलं हे "चक्रीवादळ" या त्सुनामीच्या कितीतरी पट अधिक प्रलयंकारी होतं याची जाणीव पेंढारकरांची ही कादंबरी करून देते. ताशी २५० किलोमीटरपेक्षा जास्त वेगाने वाहणाऱ्या या चक्रीवादळाने गावेच्या गावे ओसाड करून टाकली. या चक्रीवादळाने ना गरीब बघितला ना श्रीमंत! वादळाचा हा प्रचंड हाहाकार जसा असंख्य गरीब आणि सुखवस्तू माणसांच्या मृत्यूचा, तसाच तो त्यांच्या मागं उरलेल्या अनेकांच्या स्वप्नांचा व आकांक्षांचाही होता. त्यांच्या हतबल मनांचा होता तसाच तो आपल्याच घरादारांतून निर्वासित होण्याच्या असहायतेचा व निराधारतेचाही होता. येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना मानसिकदृष्ट्या विकलांग करणारा हा प्रलय माणुसकीचे अनेक पदर दाखवणारा देखील होता. प्रभाकर पेंढारकरांच्या या कादंबरीला नायक नसला तरी त्यांनी समुद्रकिनाऱ्यावर राहणारे सर्वस्व हरवलेले कोळी, सामान्य गरीब जनता, सचिवालयातील सरकारी अधिकारी, राजकीय पुढारी, रेल्वेचा इंजिन ड्राइव्हर, एका विदेशी बोटीचा कप्तान, वायुदलाचे वैमानिक, न्यूजरिलचे चित्रण करणारा भास्कर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते, सोबतच या भयानक प्रलयाला माणुसकीचा धडा शिकवणारी मधु आणि तिचे सहकारी अशा आणखीणही काही पात्रांच्या माध्यमातून एक जिवंतपणा दिला आहे. अशा पात्रांच्या माध्यमातून त्या "चक्रीवादळाची" दाहकता वाचकांपर्यंत पोहचवण्यात पेंढारकर यशस्वी झाले आहेत. शिवाय अशा भयानक संकटसमयी आपल्या लोकांमागे ठामपणे उभे न राहता लालफितीच्या बंधनात अडकलेल्या यंत्रणेला देखील पेंढारकरांनी इथं फटकारलेलं पहायला मिळेल.

आवर्जून वाचण्यासारखी वास्तवदर्शी कादंबरी "चक्रीवादळ".






संदीप प्रकाश जाधव



 


Monday, August 9, 2021

"शिवपुत्र राजाराम"

 


 

लेखक : डॉ. प्रमिला जरग

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

                                                                           पृष्ठे- ४६८, मूूल्य- ५९५ रुपये.


स्वराज्याच्या इतिहासावर नजर टाकली तर शिवरायांचे द्वितीय पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांच्या कारकिर्दीकडे नकळत का होईना नेहमीच दुर्लक्ष झालं आहे असं नेहमी वाटतं. त्यामुळेच की काय बऱ्याच ठिकाणी त्यांचा "एक दुर्लक्षित छत्रपती" असा उल्लेख वाचायला मिळतो. परंतु छत्रपती राजाराम महाराजांनी केलेलं कर्तृत्व किती अफाट आहे हे त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत, जवळपास धुळीस मिळालेल्या स्वराज्याला दिलेल्या उभारणीकडे पाहून लक्ष्यात येतं. छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाशी मराठ्यांनी सुरू केलेला स्वातंत्र्यसंग्राम हे स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मोगलांकडून पकडले जाणे हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात औरंगजेब राहू लागला. मराठयांचा राजा मारला गेला, रायगड पडला, येसूबाई आणि लहान शाहू महाराज मोगलांच्या हाती सापडले, अशा या कठीण काळात अनेक मोठ-मोठे मराठी सरदार मोगलांना जाऊन मिळाले त्यामुळे दख्खन जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात दिल्लीकडे परत जायची स्वप्ने बघणाऱ्या औरंजेबाला आणि त्याच्या विशाल सागर सेनेला मराठ्यांनी आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर पुढची २७ वर्षें लढत ठेवलं. बादशाह औरंगजेबाला त्याच्या मनसुब्यांसोबतच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं. या २७ वर्षांमध्ये छत्रपती राजाराम महाराजांची ११ वर्षांची कारकीर्द आणि त्यादरम्यान झालेल्या घटना स्वराज्य राखण्यासाठी खूप महत्वाच्या होत्या. संभाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर जेव्हा मराठा साम्राज्य प्रचंड अडचणीत आले तेव्हा राजाराम महाराजांनी स्वराज्य रक्षणाची जबाबदारी उचलली व औरंगजेबाचे स्वराज्य काबीज करण्याचे स्वप्न धुळीस मिळवले. लाखोंची सेना घेऊन आलेल्या औरंगजेबाला रोखणं महाकठीण काम परंतु राजाराम महाराजांचं मुत्सद्दी राजकारण आणि त्याला मिळालेल्या स्वराज्यनिष्ठ सरदारांच्या अतुल्य पराक्रमाच्या जोडीने जवळपास संपुष्टात आलेलं मराठी साम्राज्य पुन्हा उभं राहिलं! फक्त उभंच नाही तर येणाऱ्या काळात पार अटकेपार जाऊन पोहचलं. स्वराज्याच्या अत्यंत कठीण अशा काळात ११ वर्षं नेतृत्व करणाऱ्या छत्रपती राजाराम महाराजांची जीवनगाथा म्हणजे ही डॉ. प्रमिला जरग यांची कादंबरी "शिवपुत्र राजाराम". राजाराम महाराजांनी त्यांच्या कारकिर्दीत घेतलेल्या वादग्रस्त निर्णयांपैकी एक म्हणजे शिवछत्रपतींनी बंद केलेली वतनदारी पुन्हा चालू करण्याचा! पण हा वादग्रस्त धोरणात्मक निर्णय घेणं का योग्य होतं याचं उत्तर ही कादंबरी वाचत असताना वाचकांना मिळून जाते. या धोरणामुळे मोगलांच्या पदरी असणारी अनेक फौजबंद सरदार मंडळी राजाराम महाराजांजवळ जमा झाली. त्यांना त्यांनी मोगलांच्या ताब्यातील भूभागावर आक्रमण करून तो भाग आपल्या राज्याला जोडल्यास त्याचे वसुलीचे हक्क देऊ, अशा सनदा दिल्या आणि खरेतर त्यामुळे स्वराज्य राखण्याच्या कामात मोलाची मदतच झाली. राजाराम महाराजांचे हे धोरण योग्य होते का? अशा निर्णयाची खरंच आवश्यकता होती का? थोरल्या महाराजांनी उभारलेल्या स्वराज्यावर त्याचे काही विपरीत परिणाम झाले का? असे अनेक प्रश्न निर्माण करून आजही त्यावर चर्चा होतच असतात. परंतु एका गोष्टीकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलं जातं ती म्हणजे जेव्हा मोगल बादशाहा स्वत: मराठा सरदारांना जमिनीची वतनदारी देऊन त्यांना आपल्याकडे आकर्षित करत होता तेव्हा मराठी राज्यकर्त्यांनी तसंच केलं नसतं तर मोगलांशी युद्ध करण्यासाठी आवश्यक सैन्य उभारणे त्यांना कधीच शक्य झाले नसते आणि पाठोपाठ अगदी सहजपणे औरंगजेबाने स्वराज्याचा घास घेतला असता. राजाराम महाराजांनी घेतलेल्या अशा बऱ्याच मुत्सद्दी निर्णयांवर डॉ. जरग यांनी या कादंबरीतून प्रकाश टाकला आहे. मराठा साम्राज्याच्या तिसऱ्या छत्रपतींच्या कारकिर्दीचा अत्यंत रोमहर्षक, अभिमानास्पद परंतु काही कारणांनी दुर्लक्षित राहिलेला इतिहास म्हणजे डॉ. प्रमिला जरग यांची ही कादंबरी "शिवपुत्र राजाराम".


छत्रपती राजाराम महाराज हे शिवरायांचे द्वितीय चिरंजीव. त्यांच्या वयाच्या अवघ्या दहाव्या वर्षी आधी पित्याचे आणि वर्षभरातच आईचे छत्र गमावले. शिवाजी महाराजांच्या निधनानंतर लाखोंचे सैन्य आणि एकाहून एक मातब्बर सरदार घेऊन औरंगजेब स्वराज्यावर चालून आला. सतत ९ वर्षें संभाजी महाराज औरंगजेबाशी लढत राहिले आणि शेवटी दगाबाजीमुळे ते पकडले गेले. जवळपास सव्वामहिन्याच्या अतोनात छळानंतर औरंगजेबाने अतिशय निर्घृणपणे त्यांना ठार केले आणि संभाजी महाराजांनी अतिशय पराक्रमाने बसवलेली स्वराज्याची घडी विस्कळीत व्हायला लागली. अशा कठीण परिस्थितीत येसूबाईंनी राजाराम महाराजांचा राज्याभिषेक केला आणि ध्यानी-मनी नसताना अचानक छत्रपतीपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. स्वराज्यावर आलेल्या अतिशय भयानक संकटाच्या सावलीत, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली. औरंगजेबाने आधीच आदीलशाही आणि कुतुबशाही गिळंकृत करून तेथील बादशहांना कैदेत ठेवलं होतं! छत्रपती संभाजी महाराजांना, मराठ्यांच्या शूर-पराक्रमी छत्रपतीला ठार मारले होते! त्यानंतरच्या फक्त २च आठवड्यांत इतिकदखानाने रायगडाला वेढा घातला होता! राजधानी रायगड पडली की मराठ्यांचे साम्राज्य नष्ट झाल्यात जमा होते! राजाराम महाराजांना आणि शिवरायांच्या कुटुंबाला ताब्यात घेऊन आपली दख्खन मोहीम यशस्वी करून दिल्लीला परतायची स्वप्ने औरंगजेब पाहत होता! औरंगजेबाला जणू गगन ठेंगणे झाले होते! दख्खन मोहीम फते झाल्याच्या आनंदात त्याच्या फौजेत तर जल्लोषाला सुरुवातसुद्धा झाली होती! आपल्या पराक्रमी पतीचा मृत्यू आणि राजधानीला पडलेला वेढा, अशा कठीण प्रसंगीसुद्धा येसूबाई आपले दुःख विसरून कणखर पणे उभ्या राहिल्या आणि राजाराम महाराजांना त्यांच्या दोन पत्नी ताराराणी, राजसबाई यांच्यासह वेढ्यातून निसटून प्रतापगडाकडे पाठवण्याचा धाडसी निर्णय घेतला. रायगडला पडलेला वेढा आणि त्यातून राजाराम महाराजांची थरारक सुटका कादंबरीत वाचताना वाचक शहारून जातो. इथे शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुटलेली घटना वाचकाला सहज आठवून जाते पण यावेळची परिस्थिती त्याहूनही किती कठीण होती याची जाणीवदेखील होते. रायगडावरून निसटून राजे प्रतापगाडी पोहचले आणि राजे प्रतापगडावर आहेत हे समजल्यानंतर मुक्रबखानने प्रतापगडाला वेढा दिला. राजाराम महाराज परत एकदा वेढ्यात अडकले! मग पुन्हा तिथून राजे निसटले ते पन्हाळ्यावर. तिथून त्यांनी आपला कबिला पाठवला सुरक्षित अशा विशाळगडावर. त्यानंतर राजाराम राजांनी स्वतः जिंजीच्या किल्ल्यावर निसटायचं ठरवलं. दक्षिण मोहिमेवर असताना शिवाजी महाराजांनी जिंकलेला हा जिंजीचा अभेद्य किल्ला. अगदी बेलाग असणाऱ्या या किल्ल्यामुळे महाराजांना सुरक्षितता लाभणार होती आणि औरंगजेबाशी मुकाबला करण्यासाठी थोडी फुरसत मिळणार होती. परंतु स्वराज्यापासून जवळपास ८०० किलोमीटर लांब असणाऱ्या या किल्ल्यावर पोहचणे त्यावेळच्या परिस्थितीत जवळपास अशक्य होतं. ८०० किलोमीटरचा प्रवास आणि तोही मुघल साम्राज्यातून याचा फक्त विचारच केलेला बरा पण पर्याय नव्हता! अवघ्या १८-१९ वर्षें वयाचे राजाराम महाराज लिंगायत स्वामींच्या वेषात मोजक्या लोकांच्या बरोबर अपरिमित संकटाना तोंड देऊन जिंजीच्या अलीकडे असलेल्या वेल्लोरला पोहचले. राजाराम महाराजांचा हा थरारक प्रवास वाचकाला आग्र्याहून झालेल्या शिवाजी महाराजांच्या सुटकेच्या प्रसंगाची आठवण करुन देतो. राजाराम महाराजांच्या या प्रवासादरम्यानच्या काळात दोन अतिशय दुर्दैवी घटना घडल्या. पहिली, कपटी औरंगजेबाने राजाराम राजांच्या अटकेची आणि वधाची खोटी अफवा उठवून कोणत्याही विरोधाशिवाय रायगडवर ताबा मिळवला आणि येसूबाई, शाहूराजे, जानकीबाई यांना जीव न घेण्याच्या बोलीवर ताब्यात घेतले. रायगड पडल्यानंतर स्वराज्यात फक्त विशाळगड हा एकच किल्ला शिल्लक राहिला. दुसरी दुर्दैवी गोष्ट म्हणजे ज्यांच्या जीवावर राजांनी जिंजीला जायचं एवढं मोठं धाडस केलं होतं ते हरजीराजे महाडिक आजाराने मरण पावले होते. तरीही अतिशय खडतर परिस्थितीत शांत चित्ताने राजकारण करुन, सैन्याची पुन्हा एकदा जमवाजमव करुन, दक्षिणेतील आजूबाजूच्या छोट्या राजांना आपल्याकडे वळवून, औरंगजेबासारख्या सामर्थ्यशाली शत्रूला समर्थपणे सामोरे जाऊन, त्याच्या तोडीस तोड राजकारण करून ज्या तडफेने राजाराम राजांनी स्वराज्य उभं केलं त्याला तोड नाही. अवघ्या २ किल्ल्यांपुरतं उरलेलं स्वराज्य पुन्हा २५० किल्ले जिंकून समृद्ध बनवलं. औरंगजेबाच्या ताब्यातील जवळपास सगळा मुलुख परत मिळवला. जिंजीतून पुन्हा एकदा महाराष्ट्रात येऊन साताऱ्याला राजधानी वसवली. उत्तर हिंदुस्तानात स्वाऱ्या करून औरंगजेबाला अक्षरशः हतबल करून सोडलं. मराठेशाहीला परत एकदा गतवैभव मिळवून दिले. हे सर्व केले फक्त ११ वर्षांच्या कारकिर्दीत. देवीच्या रोगाने अचानक आजारी पडून वयाच्या अवघ्या ३०व्या वर्षी सिंहगडावर अखेरचा श्वास घेण्यापूर्वी या छत्रपतींनी मराठेशाही पुन्हा मानाने उभी केली होती. छत्रपती राजाराम महाराजांची ही झळाझळती पण दुर्दैवाने दुर्लक्षित कारकीर्द डॉ. प्रमिला जरग यांनी "शिवपुत्र राजाराम" मधून वाचकांसमोर आणली आहे. तारीख-ए-महंमदी या समकालीन फारसी ग्रंथाचा लेखक छत्रपती राजारामांचा उल्लेख ‘कार्रोफर नमुदा’ (फारसी भाषेतील अर्थ 'बेडर हल्ले करणारा') असे करतो आणि या कादंबरीतील पानापानावर वाचकाला या शब्दांचा प्रत्यय येत राहतो.

आवर्जून वाचवी अशी कादंबरी.


"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये