Monday, January 31, 2022

"तडा"

 



 

लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी

पृष्ठे- २८६, मूूल्य- २८० रुपये


"तडा"! 

"तडा" मग तो एखाद्या वस्तूला जावो अगर नात्याला,  एकदा जर गेला तर परत सांधता येणं केवळ आणि केवळ अशक्यच! कितीही सांधण्याचा प्रयत्न केला तरी एक पुसटसं का असेना अंतर राहतंच.

एस. एल. भैरप्पा यांची याच नावाची, मराठी अनुवादित "तडा" ही कादंबरी नुकतीच वाचून पूर्ण झाली. 'स्त्री-स्वातंत्र्य आणि स्त्री-मुक्ती' यांचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून स्वतःसोबतच आपल्या जवळच्या लोकांचे आयुष्य उध्वस्त करणाऱ्या सुधारणावादी किंवा पुढारलेल्या स्त्रियांच्या मानसिकतेची विदारक कहाणी सांगणारी ही कादंबरी आहे! स्त्रियांच्या हक्कासाठी बनवलेल्या कायद्यांचा गैरवापर करून त्यांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करत असताना एखादा कर्तृत्ववान पुरुष कसा देशोधडीला लागू शकतो याची विदारक कहाणी म्हणजे ही कादंबरी "तडा"! भैरप्पांनी लिहिलेल्या "आवरण", "साक्षी", "उत्तरकांड", "परिशोध" आणि "पारखा" अशा एकाहून एक दर्जेदार कादंबऱ्या वाचून झाल्यानंतर त्यांची "तडा" ही कादंबरी खूप उत्साहाने मी वाचायला घेतली होती पण खरं सांगायचं झालं तर या कादंबरीने तशी थोडी निराशाच केली. याचं सर्वांत महत्त्वाचं आणि एकमेव कारण म्हणजे त्यांनी सरसकट एकाच नजरेतून सुधारणावादी स्त्रीकडे पाहण्याचा केलेला प्रयत्न! जो कोणत्याही सुज्ञ वाचकाला नक्कीच खटकणारा आहे. पण ही एक गोष्ट थोडी बाजूला ठेऊन जर "तडा" कडे पहायचं झालं तर एस. एल. भैरप्पांचा या कादंबरीतील विषय एक समाज म्हणून आज आपल्याला खूप विचार करायला लावणारा आहे. काही मूठभर स्त्रियांच्या अशा या विदारक मानसिकतेमुळे भारतीय समाजजीवनाला जाऊ पाहणारा "तडा" रोखण्याचे महत्व अधोरेखित करणारी ही कादंबरी आहे! कधी फ्लॅशबॅक तर कधी वर्तमानकाळातून पुढे सरकणाऱ्या या कादंबरीच्या प्रवासातून भारतातील स्त्रीमुक्तीवादी विचारांच्या तीन स्त्रिया आणि त्यांच्या स्वार्थी कारवायांनी होरपळलेले त्यांचे स्वकीय तसेच अमेरिकेतील स्त्री-मुक्तीचे चटके खाल्लेल्या नचिकेत या भारतीय तरुणाचं आयुष्य भैरप्पांनी आपल्या समोर आणलं आहे. स्त्री-मुक्तीवादी विचारांच्या कारवायांनी त्रस्त-हैराण झालेल्या पुरुषाची कहाणी या कादंबरीच्या माध्यमातून आपल्यासमोर आणत असताना भैरप्पांनी स्त्रियांच्या या विदारक मानसिकतेची अक्षरशः चिरफाड केली आहे. त्यामुळे भैरप्पांच्या इतरही कादंबर्‍यांप्रमाणे या कादंबरीनेही कन्नड साहित्य विश्वात आणलेलं वादळ साहजिकच होतं. परंतु तथाकथित स्त्रीमुक्तीचा भयानक चेहरा दाखवणारी ही कादंबरी कितीही विवादास्पद असली, तरीही त्यातील अनेक प्रसंगांनी काही क्षण का असेना वाचक भैरप्पांच्या या विचाराशी सहमत होतो हे नक्की! कादंबरीतील हे प्रसंग समाजातील काही मोजक्याच वर्गाशी निगडित असल्याने स्त्रीमुक्तीच्या या सापळ्यात अडकून आयुष्य पोळलं गेलेल्या लोकांची संख्या तशीही फार मोठी नाही पण तरीही पाश्चात्य देशांप्रमाणे आपल्या समाजातील हे बदलणारे चित्र आपण नाकारू शकत नाही. स्त्रियांसाठी असलेल्या कायद्यांचा वापर तत्कालीन परिस्थितीनुसार स्त्रियांनी नक्कीच केला पाहिजे पण त्यातून आपल्या मजबूत कुटुंबव्यवस्थेला आणि समाजव्यवस्थतेला हादरे बसून "तडा" जाणार नाही याचीही काळजी घेण्याची आज गरज आहे याची जाणीव भैरप्पांनी वाचकाला त्यांच्या या "तडा"मधून करून दिली आहे. ही कादंबरी आणखी एका गोष्टीचा वाचकाला विचार करायला लावते ती म्हणजे सदोष कायदा व्यवस्थेमुळे समाजातील संसारांना जाणारा "तडा" जर रोखायचा असेल तर स्त्रीमुक्ती, स्त्रियांचे स्वातंत्र्य आणि समाजव्यवस्था याबद्दलचा विचार बदलत्या काळाचे भान ठेवूनच झाला पाहिजे. कायद्याचा धाक असावा पण अतिरेक असू नये! संपूर्ण कादंबरीमधे जरी स्त्रियांच्या या विदारक मानसिकतेमुळे पोळल्या जाणाऱ्या पुरुषांचं चित्रण भैरप्पांनी केलेलं असलं तरी अशा गोष्टींचा आघात जितका पुरुषांना बसतो त्यापेक्षा जास्त स्त्रियांनाही बसतो आणि बसत आलाय हेदेखील कादंबरीच्या शेवटी वाचकाला पटवून देण्यात भैरप्पा यशस्वी झाले आहेत. इर्षेच्या आणि रागाच्या भरात कायद्याच्या जोरावर मोडलेला संसार काही काळानंतर पुरुषासोबतच स्त्रीलासुद्धा पश्चातापाच्या खाईत लोटून देतो हेच "तडा" मधून सांगण्याचा प्रयत्न भैरप्पांनी केला आहे. 

खास भैरप्पांच्या लेखनासाठी नक्कीच वाचावी अशी कादंबरी "तडा"!





संदीप प्रकाश जाधव


Sunday, January 23, 2022

"काहून"

 




लेखक : अभिषेक कुंभार

प्रकाशक : NEW ERA पब्लिशिंग हाऊस

पृष्ठे- २४४, मूूल्य- ३०० रुपये                                                                           


पुस्तकाचा परिचय देण्यापूर्वी लेखक अभिषेक कुंभार यांना मनापासून धन्यवाद द्यावसं वाटतं कारण वैयक्तिकरित्या तरी माझ्यासाठी मराठ्यांचा हा पराक्रम अपरिचितच होता, ज्याबद्दल कधी कोणाकडून ऐकलंदेखील नव्हतं असा इतिहासातील हा मराठ्यांचा पराक्रम कादंबरीरूपात वाचत असताना आलेला अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा असाच!!!


आता थोडंस पुस्तकाबद्दल.....

भारताचा इतिहास 'मराठ्यांच्या' उल्लेखाशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. अशक्यप्राय असणाऱ्या हिंदवी स्वराज्य निर्मितीपासून ते अटकेपार झेंडा रोवून अखंड हिंदुस्थानभर आपलं राज्य स्थापन करणाऱ्या मराठा साम्राज्याचा इतिहास अनंत पराक्रमांनी भरलेला आहे. पण 'दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा' असं अभिमानाने बोलणाऱ्या आपल्यापैकी किती लोकांना 'पानिपतच्या' महासंग्रामाशिवाय मराठ्यांचे इतर पराक्रम माहित आहेत ही शंकाच आहे. आपलं दुर्दैव असं की तुकड्या-तुकड्यांनी लिहिल्या गेलेल्या मराठ्यांच्या या इतिहासातील फारच कमी आणि ठराविक गोष्टीच आज आपल्याला माहित आहेत. एक वेळ अशी होती की मराठ्यांच्या सल्ल्याशिवाय आणि मध्यस्थीशिवाय हिंदुस्थानातील कोणत्याही संस्थानचे काम होत नसे, कोणतंही राजकारण पूर्णत्वास जात नसे पण परिस्थिती हळूहळू बदलत गेली आणि मराठ्यांच्या अधिपत्याखालील एक-एक संस्थान सातासमुद्रापारहून आलेल्या मूठभर ब्रिटिशांनी आपल्या टाचेखाली घेतले. साधारणपणे १८१८ च्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वराज्यातील जवळपास सर्वच किल्ले आपल्या ताब्यात घेतले. त्यांपैकीच एक किल्ला सिंहगड आणि त्याच्या पायथ्याशी असलेल्या 'कल्याण' या गावापासून या कादंबरीची कथा सुरू होते जी संपते तिथून शेकडो मैल दूर असणाऱ्या अफगाणिस्तानच्या सीमेवरील 'काहून' या ठिकाणी. एका अपरिचित ऐतिहासिक घटनेला कल्पनेची जोड देऊन पुस्तकबद्ध केलेला 'कल्याण'पासून ते 'काहून'पर्यंतचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी "काहून"! मातृभूमीपासून शेकडो मैल दूर जाऊन, अतिशय प्रतिकूल परिस्थितीत मराठ्यांनी दिलेला "काहूनचा" हा लढा २४३ पानांमधून अभिषेक कुंभार यांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर उभा केला आहे तो वाचत असताना अंगावर येणारा काटा आणि शिवरायांच्या त्या मावळ्यांच्या अतुल्य पराक्रमाने होणारा अभिमान अशा दुहेरी अनुभवातून जाणारा वाचक कादंबरीच्या शेवटी भावनिक होऊन जातो. "काहून" ही एक सत्य युद्धकथा आहे जिचा संदर्भ इंग्रजी पत्रव्यवहारात सापडतो. काहूनच्या या युद्धाची आठवण म्हणून पुण्यातील एका रोडला ब्रिटिशांकडून दिलं गेलेलं 'काहून रोड' हे नावच आपल्याला मराठ्यांच्या त्या अपरिचित पराक्रमाची उंची सांगून जातं. या ऐतिहासिक घटनेबद्दल अतिषय कमी संदर्भ आणि साहित्य उपलब्ध असतानादेखील अभिषेक कुंभार यांनी या युद्धातील मराठा वीरांचा पराक्रम अतिशय सविस्तरपणे त्यांच्या कादंबरीतून मांडला आहे. कथेत गरजेनुसार काही काल्पनिक पात्रांचा समावेश लेखकांनी केला असला तरी या पराक्रमात कुठेही अतिशयोक्ती होऊ दिलेली नाही. काहूनसारख्या ठिकाणी फक्त मराठेच लढाई करू शकतात असं ब्रिटिशांना का वाटत होतं याचं उत्तरही आपल्याला कादंबरी वाचत असताना मिळून जाते. मूठभर मराठी सैनिकांनी हजारो अफगाणी टोळीवाल्यांसोबत केलेला संघर्ष आपल्याला अलीकडेच येऊन गेलेल्या 'केसरी' या चित्रपटाची आठवण करून देतो. इंग्रजांकडून लढलेल्या शीख जवानांचे 'केसरी' मधील हे युद्ध झाले होते साधारणपणे १८९७ मध्ये पण मराठ्यांनी लढलेली 'काहून'ची ही लढाई त्याच्याही आधी ५० वर्षें म्हणजे १८४० मधे लढली गेली होती. "काहून"मधील मराठ्यांचं युद्ध हे फक्त अफगाण टोळीवाल्यांसोबत नव्हतं तर मातृभूमीपासून शेकडो मैल दूर येऊन समोर उभी ठाकलेली अतिशय प्रतिकूल नैसर्गिक परिस्थिती आणि नियती यांच्याशीदेखील होतं. मराठ्यांच्या याच धगधगत्या पराक्रमाची ही अपरिचित शौर्य गाथा म्हणजे "काहून"!

एक मोठं साम्राज्य म्हणून उदयास येत असताना ब्रिटिशांचा जागतिक राजकारणातील दबदबा वाढत होता आणि याच जागतिक राजकारणाचा भाग म्हणून त्यांच्याकडून आखली गेलेली अफगाणिस्तान मोहिम म्हणजे "काहून"मधील मराठ्यांच्या पराक्रमाची सुरुवात! मातृभूमीच्या रक्षणासाठी पानिपतच्या महासंग्रामात ज्या अहमदशाह अब्दाली सोबत मराठे प्राणपणाने लढले त्याच अहमदशाहचा नातू शाह शूजा याला अफगाणिस्तानच्या गादीवर बसवण्यासाठी ब्रिटिशांनी उघडलेली ही मोहिम! स्वराज्यनिर्मितीपूर्वी आणि नंतरही मराठी सैनिकांनी आपल्या पराक्रमाने अनेक लढाया गाजवल्या, शासनकर्ते बदलत गेले पण मराठा तलवार आपल्या पराक्रमाने येणाऱ्या प्रत्येक दुश्मनाला पाणी पाजतच राहिली. म्हणूनच मराठी सैनिकांची ही ताकद जाणून असणाऱ्या ब्रटिशांची खात्री झाली होती की अफगाणिस्तानची ही अतिशय कठीण कामगिरी फक्त आणि फक्त मराठेच करू शकतात आणि त्यासाठी ब्रिटिशांनी आपल्या "बॉम्बे रेजिमेंट" अर्थातच "मराठा लाईफ इन्फंट्री"च्या तुकडीवर ही मोहिम सोपवली. अफगाणिस्तानच्या या मोहिमेत "मराठा लाईफ इन्फंट्री"कडून गझनी किल्ल्याचा पाडाव झाल्यानंतर ब्रिटिशांनी अहमदशाह अब्दालीचा नातू शाह शूजाला अफगाणिस्तानच्या गादीवर बसवले. पुढे या म्हाताऱ्या शाह शुजाला मदत करता यावी तसेच तेथील राजकारणात आपलाही वचक राहिला पाहिजे या हेतूने अफगाणिस्तानात सैन्य ठेवणं गरजेचं आहे याची जाणीव ब्रिटिशांना झाली. त्यामुळे या कामासाठी अफगाणिस्तानात येणाऱ्या आपल्या सैन्यास परतीच्या मार्गावर विसावा मिळावा म्हणून एका ठाण्याची असणारी आवश्यकता लक्षात घेऊन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी बलुची टोळीवाल्यांच्या ताब्यात असणाऱ्या, अफगाणिस्तान सीमेवरील 'काहून' या गावाची निवड केली. गझनीचा पाडाव करताना सोबत असणाऱ्या मराठा सैनिकांच्या जीवावरच ही दुसरी "काहून" जिंकण्याची मोहिम आखली गेली. गझनी किल्ल्यापासून काहूनच्या गढी पर्यंतच्या मराठा सैन्याच्या खडतर प्रवासाचं लेखकांनी केलेलं वर्णन या मोहिमेत मराठ्यांच्यापुढे काय वाढून ठेवलं असेल याचा अंदाज देऊन जातं. उंचच उंच डोंगर, खोल दऱ्या, दिवसा आग ओकणारा सूर्य आणि रात्री हाडे गोठवणारी थंडी असा हा सैन्याचा प्रवास मजल-दरमजल करत "काहून"च्या गढीवर येऊन पोहचतो आणि सुरू होतो खरा संघर्ष! टोळीवाल्यांकडून "काहून"ची गढी तर सहजच ताब्यात येते पण मराठ्यांची खरी कसोटी लागते ती ही गढी राखण्यात! तब्बल ५ महिने अपुऱ्या अन्न, पाणी, दारुगोळा आणि मनुष्यबळाच्या जोरावर मराठे टोळीवाल्यांशी लढत राहतात. या ५ महिन्यांमध्ये युद्धाचे अनेक पदर अभिषेक कुंभार यांनी आपल्यासमोर उलगडून दाखवले आहेत. ५ महिने काहूनच्या पठारावर चाललेला हा थरार अंगावर शहारे आणतो. अखेर नाईलाजास्तव मराठ्यांना माघार घ्यावी लागते पण तोपर्यंत अफगाणी टोळ्यांमधे मराठ्यांच्या या शौर्याची अशी काही भीती पसरते की शेवटी होणाऱ्या तहात सर्व गोष्टी मराठ्यांच्या मनाप्रमाणेच पार पडतात आणि मातृभूमीपासून इतक्या दूर जाऊन दाखवलेल्या अतुल्य अशा पराक्रमानंतर सुरू होतो मराठ्यांचा काहून मधून परतीचा प्रवास! त्याच खडतर रस्त्यावरून!

प्रत्येकाने वाचलीच पाहिजे अशी मराठ्यांची अपरिचित शौर्यगाथा "काहून"!





संदीप प्रकाश जाधव







Wednesday, January 19, 2022

"ईश्वर डॉट कॉम"

 


लेखक : विश्राम गुप्ते

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- २९१, मूूल्य- ३०० रुपये                                                                           


"ईश्वर डॉट कॉम"! पुस्तकाचं नाव आणि मुखपृष्ठ पाहूनच खरं तर हे पुस्तक मी विकत घेतलं होतं. मुखपृष्ठावरील शीर्षासनाच्या पवित्र्यातील तीन धर्माच्या तीन व्यक्ती आपलं या पुस्तकाबद्दलचं कुतूहल वाढवतात. डोकं घरीच ठेऊन एखादा चित्रपट पहायला चित्रपटगृहात जाणं आणि निखळ मनोरंजनाच्या आस्वादासोबतच अंतर्मुख होऊन काही गोष्टींचा नव्याने विचार करायला लागणं, असंच काहीसं होतं हे पुस्तक वाचून झाल्यानंतर. "ईश्वर डॉट कॉम" ही विश्राम गुप्ते यांची एक धमाल काल्पनिक कादंबरी! अगदी हसतखेळत आणि विनोदी अंगाने पुढे सरकणारी या कादंबरीची कथा जरी काल्पनिक असली तरी यातील विषय आज प्रत्येक माणसाने विचार केलाच पाहिजे असा आहे. आपल्या आसपासच घडणारी ही कथा पण त्यासाठी आवश्यकता आहे ती उघड्या डोळयांनी तिला पाहण्याची. देव, धर्म, संस्कृती आणि परंपरेच्या व्यापारीकरणात आज माणसाच्या हृदयातला ईश्वर हृदयातच हरवतो आहे. क्षणाक्षणाला प्रगती करत फक्त आणि फक्त पुढेच वाटचाल करणाऱ्या माणसाने थोडं थांबून मागं वळून बघण्याची आज गरज आहे. सध्या जरी हे आपल्याकडून होत नसलं तरी येणाऱ्या आधुनिक काळात तरी आपण 'विवेक हा तारणहार', 'समता हा ईश्वर' आणि 'प्रेम ही सर्वात टिकाऊ परंपरा' असते ही त्रिसूत्री मानणार आहोत का? निकोप समाजजीवन आणि विवेकशील नागरिकत्व डोळसपणे अंगात मुरवणार आहोत का? या प्रश्नांची उत्तरे लेखकांनी या कादंबरीच्या माध्यमातून आपल्याला शोधायला भाग पाडलं आहे. विश्राम गुप्ते यांच्या काल्पनिक जगात, अर्थातच 'देवनगरीत' आपल्याला ही कथा घेऊन जाते. 'देवनगरीत' राहणारे वेगवेगळ्या स्तरांवरचे लोक, त्यांचं आपापसातील मानसिक व भावनिक नातं, धर्म-संस्कृतीबद्दल असणारे त्यांचे विचार या सर्वांतून आकारास येणारं एक वैचारिक आणि सांस्कृतिक नाट्य असं थोडक्यात वर्णन या कादंबरीचं करता येईल. लेखकांच्या मते जिथे देवाची सत्ता चालते ती जागा म्हणजे 'देवनगरी'! विश्राम गुप्ते यांच्या कथेतील ही काल्पनिक 'देवनगरी' आहे भारत आणि सारे भारतीय आहेत या देवनगरीतील रहिवाशी! देव, धर्म, संस्कृती आणि परंपरांच्या नावाखाली आपल्या देशात म्हणजेच देवनगरीत होणाऱ्या व्यापारीकरणाच्या या धमाल विनोदी कथेत इतरही अनेक उपकथा जन्माला येतात ज्या आजच्या आपल्या देशातील वातावरणाशी मेळ तर खातातच पण सोबतच वाचकाला विचारात पाडतात. एकप्रकारे आजच्या समाजाची जी मानसिकता आहे तीच आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न गुप्ते यांनी विनोदाच्या माध्यमातून केला आहे. देवनगरीतील लोकांचा देव-धर्म या संकल्पनेवर असणारा टोकाचा विश्वास बऱ्याच ठिकाणी आपल्याला आजच्या आपल्या सामाजिक परिस्थितीच्या जवळ घेऊन जाणारा आहे. बऱ्याचशा घटना या आजच्या वातावरणाशी मिळत असल्याने एक समाज म्हणून आपला प्रवास आज कोणत्या दिशेला चालला आहे आणि त्याचा शेवट काय होऊ शकतो याचाही अंदाज वाचकाला येत राहतो. आज आपल्या देशात धर्म आणि संस्कृतीवरील खोट्या प्रेमाच्या नावाखाली जो नवीनच एक भयावह समाज तयार होऊ पाहतोय त्याचं प्रातिनिधिक स्वरूपातील, देवनगरीतील हे काल्पनिक पण सत्याच्या जवळ जाणारं चित्र म्हणजे विश्राम गुप्ते यांची कादंबरी "ईश्वर डॉट कॉम"!

आज जर आपण समाजाकडे डोळे उघडून पाहिले तर ढोबळमानाने तीन प्रकारचे लोक आपल्याला समाजात दिसतील एक 'जे पूर्णपणे नास्तिक आहेत ज्यांना धर्म आणि धर्मावर आधारित संकल्पनेवर अजिबात विश्वास नाही', दोन 'ज्यांना धर्म आणि धर्मापलिकडे काहीच दिसत नाही' आणि तीन 'जे देव-धर्म तर मानतात पण देवा-धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या कर्मकांडांवर ज्यांना संशय आहे'. भले मग हे तीनही गट कोणत्याही धर्माचे असोत कमीअधिक प्रमाणात प्रत्येक ठिकाणची वैचारिक पातळी ही सारखीच असल्याची आपल्याला जाणवेल. एक वाचक म्हणून विश्राम गुप्ते यांची ही कादंबरी आवडणं किंवा न आवडणं आपण समाजातील यांपैकी कोणत्या गटात मोडतो यावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. पण तरीही या सर्वांच्या पलिकडे जाऊन, तटस्थपणे जर आपण ही कादंबरी वाचली तर नक्कीच काहीतरी वेगळं वाचन केल्याचं समाधान देऊन जाते. देशातील आजच्या वातावरणातील संदर्भ सतत डोळ्यासमोर येत राहिल्याने कादंबरीची कथा अधिकच वाचनीय होऊन जाते. धर्म संकल्पना आणि आपले व्यवहार यावर आपण नक्कीच थोडा विचार करायला भाग पडतो.

एक वेगळं वाचन म्हणून नक्की वाचावी अशी कादंबरी "ईश्वर डॉट कॉम"!





संदीप प्रकाश जाधव


Tuesday, January 11, 2022

"झाडाझडती"

 


लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन

पृष्ठे- ४७३, मूूल्य- ४०० रुपये                                                                           


धरणं बांधल्यामुळे राज्याची प्रगती झाली, त्या धरणाच्या पाण्यावर शेती आणि इतर उद्योग करणाऱ्या लाखो लोकांचं आयुष्य सुधारलं, एकच नाही तर आपल्या पुढच्या अनेक पिढ्या सुखी राहतील अशी व्यवस्था अनेकांनी करून ठेवली ती फक्त त्या धरणाच्या पाण्यामुळे झालेल्या प्रगतीतूनच! पण त्या लोकांचं काय ज्यांच्या शेतजमिनीवर ही धरणे बांधली गेली? त्या लोकांचं काय जी शतकानुशतके निवांत वसलेल्या गावांमध्ये आपल्या पारंपरिक जाती, निष्ठा, सण, मूल्ये जपत सुखासमाधानाने राहत होती? त्या लोकांचं काय ज्यांच्या येणाऱ्या पुढच्या सगळ्याच पिढ्यांचं कधीच न भरून येणारं नुकसान केलं या धरणाने? त्या लोकांचं काय जे "धरणग्रस्त", "विस्थापित" या नावाखाली खरंतर कायमचे बेघरच झाले? धरणामुळे सुरू झालेल्या वीज निर्मितीतून संपूर्ण राज्य जिथे आज विजेच्या प्रकाशात लखलखत आहे तिथे ज्या लोकांच्या जमिनीवर, घरांवर नांगर फिरवून ही धरणे बांधली गेली ते लोक आजही अंधारातच आहेत. याच धरणग्रस्तांच्या जीवनावर बेतलेली, त्यांच्यावर झालेल्या आणि आजही होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडणारी, त्यांच्या वेदनेचा वेध घेणारी, वास्तववादी कादंबरी म्हणजे "झाडाझडती! कोणत्याही संवेदनशील वाचकाला अक्षरशः सुन्न करून सोडणारी ही कादंबरी वाचत असताना आपल्यातीलच काही लोकांच्या वाट्याला आलेलं आयुष्य पाहून मती गुंग होऊन जाते. पुस्तकाचं मुखपृष्ठ पाहूनच वाचकाला थोडी कल्पना येऊन जाते की विश्वास पाटलांची ही कादंबरी आपल्याला कोणत्या जगात घेऊन जाणारी आहे.  स्वतःच्या मुलासाठी साखर कारखाना काढता यावा आणि त्याला पाणी मिळावं म्हणून एक खासदार धरणाचा प्रस्ताव मांडतो. साध्या भोळ्या लोकांना आश्वासनाची साखर चारतो. या धरणामुळे काही गावं दुसर्‍या जागी विस्थापित होणार असतात. गावातील लोक या गोष्टिला विरोध करतात कारण पिढ्यान पिढ्या इथे राहिल्याने त्या मातीशी जडलेलं त्यांचं नातं! स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळलेल्या बागायती शेती, आंबा-पेरूच्या बागा! घाम गाळून उभं केलेलं स्वतःच घर! या गोष्टी सोडून जाणं त्यांना पटत नाही. पण शेवटी सरकारच्या जोरापुढे त्यांना माघार घ्यावीच लागते आणि सुरू होतो एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होणारा एक मन सुन्न करणारा प्रवास! या विस्थापित होऊ घातलेल्या गावांपैकीच एक गाव 'जांभळीगाव'. विश्वास पाटील यांनी जांभळीगावाला केंद्रस्थानी ठेवून ही कादंबरी जरी लिहिली असली तरी ही व्यथा आहे त्या सर्व धरणग्रस्तांच्या आयुष्याची जे देशाच्या कित्येक भागांत "धरणग्रस्त, "विस्थापित" म्हणून वर्षानुवर्षे धडपड करत आहेत समाजाच्या मुख्य प्रवाहात येऊन आपलं गेलेलं वैभव परत मिळवण्याची. याच लोकांच्या ससेहोलपटीची ही विश्वास पाटील यांची कादंबरी "झाडाझडती"!

कादंबरीची सुरुवात होते गोम्या कोळी आणि त्याचा हल्या(रेडा) यांच्यापसून. पखालितून हल्याच्या पाठीवर पाणी आणायचं आणि ते गावात लोकांच्या रांजणात भरून द्यायचं. त्यावर मिळणाऱ्या भाजी-भाकरीवर अगदी सुखात राहणारा गोम्या हे या कादंबरीतील पहिलं पात्र ज्याचं हे सहज, सुंदर जीवन धरणाच्या पाण्यात वाहून जातं. कादंबरी जसजशी पुढे सरकत जाते तसे जांभळी गावातील एक-एक पात्र आपल्यापुढे येऊ लागते. विश्वास पाटलांनी ज्या पद्धतीने या कादंबरीतील पात्रांना जिवंतपणा आणला आहे त्याला तोड नाही. वाचकाला ही कथा अशी काही घेरायला चालू करते की जणूकाही आपण त्या गावातील लोकांच्या व्यथा प्रत्यक्ष त्याठिकाणी उभं राहूनच अनुभवतोय आणि त्यामुळेच की काय कादंबरी वाचून झाल्यानंतर वाचक अक्षरशः सुन्न होऊन जातो हे नक्की! तर जांभळी हे एक साधेसे गाव. तिथले बहुतांश लोक अडाणी, भोळेभाबडे. फार संपन्न नसले तरी खाऊन पिऊन सुखी असलेले या गावातील लोक. अचानक एक दिवस जांभळी गावासह आजूबाजूच्या काही छोट्या खेड्यांची जमीन संपादित करून सरकार धरणाचा प्रकल्प घोषित करते. आता आपलं गावच धरणाखाली जाणार म्हणजे आपली जमीन, आपले घर, आपला परिसर आपले लोक या सर्वांना सोडून कुठल्यातरी परमुलुखात आयुष्याची घडी बसवायला जायला लागणार या एकाच विचाराने गावचे स्वास्थ्य बिघडायला चालू होते, लोक काळजीत पडतात. त्यांचं उरलेलं आयुष्य आणि पुढच्या सर्व पिढ्या एक "धरणग्रस्त", "विस्थापित" म्हणून जगायला भाग पडणार. का? कशासाठी? तर त्या धरणाच्या पाण्यावर इतरांचे मळे फुलवण्यासाठी, स्वतः अंधारात राहून इतरांना प्रकाश देण्यासाठी! एका धरणग्रस्त गावातूनच आपल्या नोकरीचा श्रीगणेशा करणारे जांभळी गावातीलच खैरमोडे गुरुजी या प्रकल्पाला विरोध करतात आणि लोकांनी याविरोधात आवाज उठवावा यासाठी प्रयत्न चालू करतात. कारण अशा धरणग्रस्त लोकांचे प्रश्न कसे वर्षानुवर्षे सुटत नाहीत, त्यांची अक्खी पिढी कशी या धरणामुळे बरबाद होते हे त्यांनी अगदी जवळून पाहिलेलं असतं. आपल्या गावाचे, गावातील लोकांचे असे होऊ नये यासाठी ते निर्धाराने विरोध करतात आणि एक चळवळच उभी करतात. धरण होणार हे निश्चित आहे हे गुरुजींना माहित असल्याने त्यांचा लढा असतो तो गावकऱ्यांच्या होणाऱ्या पुनर्वसनासाठी. आधी पुनर्वसन आणि मग धरण असा त्यांचा आग्रह असतो कारण सरकारचे प्राधान्य धरण बांधण्यास आहे आणि त्यानंतर पुनर्वसन कायमचं लटकत राहणार हे मागच्या किती तरी धरणांच्या बांधणीतून सिद्ध झालेलं असतं. या संघर्षात गुरुजी आणि त्यांची ही चळवळ काही मोजक्याच लोकांच्या विकासातील अडथळा ठरू लागते आणि त्याची परिणती गुरुजींना त्यांच्या सहकाऱ्यांसोबत होणाऱ्या तुरुंगवसात होते. पोलिसांच्या बंदोबस्तात धरणाचे काम सुरु होते. तरीही लोकांच्या भल्यासाठी गुरुजींचा या प्रकल्पाला विरोध चालूच राहतो. सरकारकडून आणि त्या जिल्ह्यातील खासदाराकडून गावातील लोकांना दररोज नव-नवी आमिषे दिली जातात. शेवटी योग्य पुनर्वसन आणि धरणग्रस्तांना नोकऱ्या या घोषणेनंतर गावकऱ्यांचा विरोध थोडा कमी होतो. त्यानंतर चालू होतो या प्रकल्पाचा नवीन अध्याय - "भूसंपादन"! भूसंपादन सुरु होते, सरकारी अधिकारी गावात येऊन जमिनी घरदार यांची मोजणी करून मुल्यमापन सुरु करतात आणि सुरुवात होते भ्रष्टाचाराला. गावातील सधन आणि राजकारणी लोकांकडून जेव्हा आपल्याच लोकांची एकप्रकारे लूट चालू होते तेव्हा खूप वाईट वाटतं. शेतकऱ्याचं कर्ज परस्पर कापून घेऊन सरकारकडून त्यांना पैसा मिळायला चालू होतो. अशाच एका भूसंपादनानंतर एका शेतकऱ्याला त्याच्या वडिलांचे कर्ज कापून, उरलेली रक्कम परस्पर अल्पबचत योजनेसाठी ठेऊन सरकारकडून शेवटी जेव्हा फक्त ५० रुपये हातात मिळतात तेव्हा या लोकांच्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवलं असेल याचा अंदाज न केलेलाच बरा. गावातल्या जमिनीचं मुल्यांकन, तिचा मोबदला, त्या गावातून नव्या गावात जाण्यासाठीची व्यवस्था, नव्या गावात जमिनी आणि घरासाठीच्या जागांचे वाटप, तिथे घर बांधण्यासाठी मिळणारी मदत, तिथल्या सुविधांची बांधकामे, या सगळ्या गोष्टीत फक्त घोटाळेच होत राहतात. या सर्वांत कारण नसताना भरडला जातो तो असा माणूस जो इतरांच्या सुखासाठी स्वतःच्या आयुष्याचं मातेरं करून घेतो. भ्रष्टाचारानंतरची या धरणग्रस्तांची ही ससेहोलपट इथेच संपत नाही. नव्या ठिकाणी ज्या जमिनी धरणग्रस्त लोकांना देण्यासाठी नोंद झालेल्या असतात त्या आपल्या जमिनी तेथील मूळ मालक काही न काही कारणाने काढून घ्यायला सुरुवात करतात, त्यासाठी कोर्टात सरकार विरुद्ध खटले दाखल करतात. याची परिणीती या धरणग्रस्तांचं पुनर्वसन लांबण्यात होते. शेवटी धरणग्रस्तांना निकृष्ट जमिनी मिळतात. राहण्यासाठी गावाबाहेर खराब जागा मिळते. ज्यांच्या त्यागामुळे आपल्या गावात धरणाचं पाणी आलं त्या लोकांनाच मिळणारी अशी वाईट वागणून पाहून मनाला चिरे पडतात. गुरुजींच्या नेतृत्वाखाली असणारा पुनर्वसनाच्या विरोधातील लढा त्यांच्या अखेरपर्यंत लढला जातो पण तरीही त्यांच्या पुढच्या पिढ्यांची "झाडाझडती" अखंड चालूच राहते.

धरणासारख्या गोष्टीचा हजारो लोकांच्या आयुष्यावर होणारा तितकाच मोठा परिणाम कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती न होऊ देता विश्वास पाटलांनी ज्या पद्धतीने आपल्यासमोर आणला आहे त्याला खरंच तोड नाही. मेलेल्या माणसाच्या टाळूवरील लोणी खाणारे राजकारणी, स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच लोकांना देशोधडीला लावणारे काही मोजकेच स्वार्थी लोक, अतिशय टोकाचा अन्याय होऊन सुद्धा आपल्यामुळे इतर लोकांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊन निर्वासित होऊन राहणारे 'धरणग्रस्त' अशा बऱ्याच गोष्टींमधून विश्वास पाटील यांनी वाचकाला अंतर्मुख केलं आहे. कादंबरी वाचून झाल्यानंतर आपल्या वाट्याला आलेल्या पाण्याच्या प्रत्येक थेंबासोबत अशा लाखो "धरणग्रस्तांचा" विचार नकळत आपल्या डोक्यात येत राहतो हेच या कादंबरीचं यश आहे. संग्रही घेऊन आवर्जून वाचवीच अशी वास्तववादी कादंबरी "झाडाझडती".





संदीप प्रकाश जाधव

Wednesday, January 5, 2022

"पॅपिलॉन"

 



लेखक : हेन्री शॅरीयर

प्रकाशक : श्रीराम बुक एजन्सी

मराठी अनुवाद : रवींद्र गुर्जर

पृष्ठे- ३८९, मूूल्य- ३५० रुपये


वाचन चालू केल्यापासून आजपर्यंत बऱ्याच प्रेरणादायी आत्मकथा वाचून काढल्या. बहुतांशी आत्मकथा किंवा आत्मचरित्रांमध्ये नेहमीच एक समान धागा असतो, तो म्हणजे  अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्तिमध्ये स्वतःला घडवून जगासमोर सिद्ध करणाऱ्या व्यक्तीमत्वांच्या आयुष्याचा प्रवास! माझ्या वाचनात आलेलं याचं सर्वांत चांगलं आणि अतिशय प्रेरणादायी उदाहरण म्हणजे 'आनंद यादव' यांचं आत्मचरित्र! "पॅपिलॉन" ही हेन्री शॅरीयर यांची आत्मचारित्रात्मक कादंबरी मात्र याला थोडी अपवाद आहे. या पुस्तकाबद्दल खूप काही ऐकल्यानंतर ते खरेदीही केलं पण एका गुन्हेगाराची आत्मकथा वाचावी की नको याच विचारात बरेच दिवस हे पुस्तक पडून होते. आज जेव्हा वाचून झालं तेव्हा जाणवलं की आत्मविश्वास, धाडस आणि बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो हे जवळून अनुभवायचं असेल तर प्रत्येकाने हे पुस्तक वाचलंच पाहिजे. "पॅपिलॉन"चा फ्रेंच भाषेतील अर्थ फुलपाखरु! हेन्री शॅरीयरचं हे गुन्हेगारी जगतातील टोपण नाव. तरुण वयात गुन्हेगारी जगतात येण्यापूर्वी शॅरीयर यांनी नौदलात काम केलं होतं नंतर पुढे मनुष्यवधाच्या खोट्या गुन्ह्यात अटक होऊन त्यांना फ्रान्सच्या न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा झाली. पंच आणि खोट्या साक्षीदारांमुळे हेन्री हा समाजाला कसा घातक आहे, त्याला समाजापासून दूरच ठेवणं कसं भल्याचं आहे हे न्यायालयात सिद्ध झाल्यानंतर गयानाच्या नरकासमान तुरुंगात हेन्रीची रवानगी झाली. आपल्यावर झालेल्या या अत्याचाराचा बदला घायचा या एकाच वेडापायी हेन्रीने  तुरूंगातून पळून जाण्यासाठी तब्बल ७ अयशस्वी प्रयत्न केले आणि ८ व्या प्रयत्नात तो यशस्वी झाला. या सुटकेच्या प्रवासात त्यांनी केलेली धडपड, हजारो मैलांचा थरारक समुद्रप्रवास आणि प्रत्येक अयशस्वी पलायनानंतर त्यावेळची त्यांच्या मनाची अवस्था याचा अतिशय रोमांचकारी अनुभव आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल. हेन्री शॅरीयर यांची ही आत्मकथा म्हणजे त्यांचा 'अटक ते मुक्ती' हा प्रवास आहे. तुरुंगातील वातावरण, तेथील कैदी, त्यांचे राहणीमान, त्यांची वर्तणूक या सर्वांतून एक वेगळं जगच त्यांनी अतिशय खुमासदार शैलीत आपल्या या आत्मचरित्रात्मक कादंबरीतून जगासमोर आणलं आहे. रवींद्र गुर्जर यांनी तितक्याच प्रभावीपणे याचा मराठी अनुवाद केला आहे जो वाचकाला शेवटपर्यंत हेन्रीच्या या थरारक प्रवासात गुंतवून ठेवतो. वाचनाला सुरुवात केल्यानंतर वाचक त्या कादंबरीत इतका हरवून जातो की त्याला काळ-वेळ कशाचेही भान राहत नाही. एकवेळ तर अशी येते की वाचक विसरूनच जातो की आपण एका गुन्हेगाराचा जीवनप्रवास वाचत आहोत. 'पॅपि' ने केलेले प्रयत्न, त्याचं नशीब, चिकाटी, संयम, चारित्र्य, प्रामाणिकपणा, सचोटी, संघभावना, जीवापाड प्रेम, मैत्री, त्याग, वचन या सर्वांतून गुन्हेगाराच्या आतमध्ये असणारा एक वेगळाच माणूस वाचकांसमोर उभा राहतो. फ्रान्समधे कैद्यांना मिळणारी अतिशय हीन वागणूक आणि त्यांच्यावर होणारा अत्याचार यांच्या वर्णनातून एका कैद्याचं आयुष्य किती भयंकर असू शकतं हेदेखील या आत्मकथेच्या माध्यमातून हेन्री यांनी लोकांसमोर आणलं आहे. तुरुंगवासातील या अंधःकारमय जगातून बाहेर पडण्यासाठी 'पॅपिने' केलेले तब्बल ७ प्रयत्न अयशस्वी होतात आणि या सातही प्रयत्नांमधील त्याचे अनुभव आपल्याला स्वातंत्र्याची किंमत शिकवून जातात. सुटकेच्या प्रयत्नांत 'पॅपि' ज्या विविध बेटांवर जातो तिथे भेटलेल्या लोकांबद्दल वाचताना कळतं की आपलं दुःख तर यांच्यापुढे खुपच क्षुल्लक आहे. अशा बेटांवरील बऱ्याच लोकांनी केवळ हेन्रीच्या स्वभावामुळे आणि त्याच्या प्रचंड आत्मविश्वासामुळे त्याला अनेक प्रकारे मदत केली. 'पॅपिने' देखील इतरांना दिलेला शब्द कधीच मोडला नाही. सुटकेच्या या सर्व प्रयत्नांत पॅपिची त्याच्या मित्रांसोबत अनेकवेळा ताटातुट झाली, काही मित्र कायमचे दुरावले गेले, काहींचा मृत्यु झाला परंतु त्यांच्यातील मैत्री कधीच तुटली नाही. या छोट्या-छोट्या गोष्टी वाचकाला खूप काही शिकवून जातात. पॅपिने सुटकेसाठी केलेल्या ८ व्या प्रयत्नात त्याच्या साथीदाराचा एका छोट्याशा चुकीमुळे होणारा मृत्यू आयुष्यात संयम किती महत्वाचा आहे हे नकळत आपल्याला सांगून जातो. पॅपिलॉन खरंच फुलपाखरासारखं आयुष्य जगला जे ही कादंबरी वाचत असताना पाना-पानावर जाणवत राहते. पॅपिलॉनच्या यशस्वी पलायनानंतरच्या आयुष्यावर बेतलेल्या "बँको" या कादंबरीबद्दल देखील आता खूप उत्सुकता वाढली आहे. पॅपिलॉनचा "बँको" मधील हा प्रवास देखील नक्कीच वाचण्यासारखा असणार यात शंकाच नाही.

शेवटी पॅपिलॉनने दिलेला आणखी एक चांगला संदेश - "अडचणींच्या काळात आपल्या मनात सतत वेगवेगळे विचार येत राहतात, सतत अपयशाची भीती वाटत राहते प्रत्येकवेळी आपल्या विचारांवर आपला ताबा असतोच असं नाही. त्यामुळे अशावेळी ते विचार दाबून टाकण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा त्या विचारांची दिशा बदलावी कारण प्रवाहाला थोपवणं हे अत्यंत कठीण असतं पण त्याला दिलेली योग्य दिशा माणसाचं आयुष्य बदलू शकतं." 

आत्मविश्वास, बळकट शरीरसंपदा आणि अशक्य वाटणार्‍या गोष्टी करण्याचं धाडस यांच्या जोरावर एक माणूस आयुष्यात किती प्रचंड साहस करू शकतो हे 'पॅपिलॉन' वरून समजेल. प्रत्येकाने संग्रही घेऊन आवर्जून वाचावं असं पुस्तक!





संदीप प्रकाश जाधव

"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये