Monday, December 28, 2020

"लुचाई"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


नारायण धारप यांच्याबद्दल फार आधी कुठेतर वाचलं होतं की " नारायण धारप हे एक असं रसायन आहे की ज्यांचं एक पुस्तक वाचलं तर इतरही पुस्तके वाचल्याशिवाय चैन पडत नाही, त्यांनी लिहिलेल्या भयकथा वाचनाचं व्यसनच लागून जाते." मीही सध्या अशाच काहीशा अनुभवातून जात आहे असंच म्हणावं लागेल कारण त्यांच्या "अघटित" आणि "चेटकीण" या दोन पुस्तकांनंतर "लुचाई" हे तिसरे पुस्तक  वाचून हातावेगळं केलं आणि लगेचच त्यांचं आणखी एखादं संग्रहित पुस्तक वाचण्याचा विचार मनात घोळूही लागला. आज बऱ्याच लेखकांचे अतिशय उत्कृष्ट असे गूढकथा संग्रह आणि कादंबऱ्या वाचायला उपलब्ध आहेत आणि मी त्यातील काही वाचले देखील आहेत पण ६० च्या दशकात लिहिल्या गेलेल्या नारायण धारप यांच्या लेखनाला आजही तोड नाही. माझ्यासारख्या आजच्या पिढीला जरी नारायण धारप हे नाव नवीन असले तरी आपल्या भयकथा - कादंबऱ्यांनी त्यांनी मराठी साहित्यविश्वाचा एक काळ गाजवला होता. नारायण धारप यांच्या प्रचंड कल्पनाशक्तीचा अंदाज त्यांचं पुस्तक वाचायला घेतलं की पाना-पानावर येत राहतो. त्यांच्या कल्पना विलक्षण असण्यासोबतच प्रचंड सुसंगत आणि शात्रीय पायावर आधारित वाटतात. कथेतील शब्द आणि वर्णन यांची अतिशयोक्ती कधीच वाटत नाही. शब्द साधेच पण जबरदस्त परिणामकारक. नारायण धारप यांची आजपर्यंत ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आणि त्यांपैकीच एक प्रचंड गाजलेली अतिशय गूढ, रहस्यमय, वाचत असताना अंगावर शहारे आणणारी, २७० पानांमध्ये भीतीचा अगदी जवळून अनुभव देणारी कादंबरी "लुचाई".

दुर्गापूर या गावात असणारा नाईकांचा वाडा आणि गोपाळ शंकर जावडेकर म्हणजेच जयदेव व्यास यांच्या भोवती फिरणारी या कादंबरीची कथा. भर उन्हात एक १२-१३ वर्षांचा मुलगा एका तरुणासोबत ओसाड पडलेल्या गावातील प्रत्येक घरात जाऊन ते घर पेटवून देऊन बाहेर पडत आहे आणि हे सर्व करत असताना कोणत्यातरी जबर अशा भीतीचा पगडासुद्धा त्यांच्या मनावर आहे, अशी एखाद्या भयपटाला शोभण्यासारखी या कादंबरीची सुरुवात. त्या पेटवलेल्या घरांचे वर्णन वाचता वाचता इथूनच एक कुतूहल मिश्रित भीती वाचकाला घेरायला चालू करते जी पुस्तक वाचून पूर्ण झाल्यानंतरसुद्धा बराच वेळ अपल्यासोबत राहते. त्यानंतर मग फ्लॅशबॅकमधे जाऊन जयदेवचा दुर्गापूरमधला भूतकाळ आणि वर्तमानकाळातील घटना यांना जोडत चालू होतो या कादंबरीचा रहस्यमय, भीतीदायक असा प्रवास. १९४८ च्या जाळपोळीनंतर आपल्या आजोबांसोबत दुर्गापूर सोडून मुंबईला गेलेला जयदेव जवळपास २२ वर्षांनी पुन्हा दुर्गापूरमध्ये येतो आणि त्याचदरम्यान काही गूढ घटनांची मालिका गावात चालू होते. गावातील एकामागून एक लोकांचे रहस्यमयरीत्या आजारी पडणे आणि शेवटी एखाद्या रस शोषून घेतल्यानंतर दिसणाऱ्या फळासारखे शरीर होऊन मरून जाणे अशी रोज एखादी तरी घटना जयदेवच्या आसपास घडायला चालू होते. दिवसा सूर्यप्रकाशात हसत खेळत राहणारे गाव दररोज अंधार पडल्यानंतर हळूहळू एका वेगळ्या जगाच्या स्वाधीन होण्यास सुरुवात होते. रोज सायंकाळनंतर कोण ना कोण त्या "लुचाई" चा शिकार व्हायला लागतो. "लुचाई" म्हणजे लुचने, गळ्यामध्ये लुचून रक्त शोषून घेणारी म्हणजेच "लुचाई". अतिशय अप्रतिम आणि खिळवून ठेवणाऱ्या कथेतून नारायण धारप यांनी लुचाई एकदम जिवंत आपल्या डोळ्यासमोर आणली आहे जे वाचताना अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. भितीने रक्त गोठून टाकणारा सैतानी नंगानाचच त्यांनी या कादंबरीतून आपल्यासमोर उभा केला आहे. नाईकांचा गूढ वाडा, शिंदेंचा पडका वाडा, गावातील बाग, स्मशानभूमी, गावाची वेस, एकनाथचं घर अशा एकामागून एक ठिकाणी प्रकट होणारी "लुचाई" आपल्या समोर पण येते की काय अशी नकळत एक भीती वाचकाला वाटावी इतकी भयानक पार्श्वभूमी धारप यांनी कथेला दिलेली आहे. जयदेव गावात आल्यानंतर सुरुवातीला १-२ लोकांना लुचणारी ती "लुचाई" हळूहळू संपूर्ण गावाला लुचते आणि मागे राहतात फक्त जयदेव, त्याचा मित्र डॉ. रामदास आणि १३ वर्षांचा गावातीलच एक मुलगा एकनाथ. या तिघांनी त्या अतिशय गूढ, रहस्यमय, भयानक घटनांचा लावलेला छडा आणि त्या वाईट शक्तीचा केलेला शेवट यांची थरारक कथा म्हणजेच ही कादंबरी "लुचाई". 

भयकथांची आवड असणाऱ्यांना नारायण धारप हे नाव आणि त्यांचे लेखन वेगळ्याने सांगायची आवश्यकता नक्कीच नाही पण इतरांनीसुद्धा एक वेगळं वाचन, एक वेगळा अनुभव म्हणून आवर्जून वाचावे अशा धारपांच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक "लुचाई".





संदीप प्रकाश जाधव



Tuesday, December 22, 2020

"साक्षी"

 



लेखक : डॉ. एस. एल. भैरप्पा

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

मराठी अनुवाद : सौ. उमा कुलकर्णी


एस. एल. भैरप्पा, एक अतिशय लोकप्रिय कन्नड कादंबरीकार. सौ. उमा कुलकर्णी यांनी अनुवादित केलेल्या त्यांच्या काही मराठी कादंबऱ्या अंचू, पर्व, अवेषण, आवरण, सार्थ, वंशवृक्ष या आणि बऱ्याच ज्या कन्नड इतक्याच मराठीमध्येसुद्धा खूप प्रसिद्धीस आल्या. त्यांच्या अशाच साहित्यांपैकी एक गाजलेलं आणि अतिशय उत्कृष्ट साहित्य म्हणजे त्यांची कादंबरी "साक्षी". "साक्षी" चा अर्थ खरं बोलणं, परंतु आज समाजात वावरत असताना एखाद्या साक्षीदाराकडून बोललं जाणारं खरं हे ते ज्या व्यक्तीसाठी बोललं जातं त्या व्यक्तीला त्याचा फायदा व्हावा अशाच प्रकारचं असतं. अगदी देवाशपथ खरं बोलेन असं म्हणून दिल्या गेलेल्या "साक्षी" या बऱ्याच वेळा खोट्याच असतात. परंतु तत्वज्ञानानुसार बोलायचं झालं तर "साक्षी" म्हणजे आपला अंतरात्मा आहे. ज्याचा संबंध मानवाच्या ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाशी आहे तसेच शरीरात असणाऱ्या आपल्या मन, बुद्धी आणि आत्म्याशी आहे. जेव्हा "साक्षी" च्या त्या स्तरापर्यंत एखादी व्यक्ती पोहोचते तेव्हा ती खोटं बोलूच शकत नाही. परंतु प्रत्येक व्यक्ती त्या स्तरापर्यंत पोहचू शकत नसल्याने बऱ्याच वेळा त्यांचा आपल्या अंतरात्म्याशी संघर्ष चालू होतो. हाच मानवी मनाचा संघर्ष आणि भाव-भावना डोळ्यासमोर ठेऊन लिहिली गेलेली तत्वज्ञानावर आधारित अशी ही कादंबरी "साक्षी".

परमेश्वरय्या या अतिशय सज्जन, गांधीवादी, कधीही खोटं न बोलणारा अशी समाजात ओळख असणाऱ्या व्यक्तीभोवती फिरणारी ही कादंबरी. खुनाच्या आरोपाखाली ज्याच्यावर खटला चालू असतो असा त्यांचा जावई मंजय्या त्यांना खोटा साक्षीदार म्हणून न्यायालयात येऊन त्याच्या बाजूने साक्ष देण्यासाठी विनंती करतो. परमेश्वरय्यांची समाजात असणारी प्रतिमा, त्यांच्या शब्दाला असणारा मान आपल्याला न्यायालयात निर्दोष सिद्ध करण्यास पुरेसा आहे हे ओळखून मंजय्या त्यांना भावनिक पातळीवर कात्रीत पकडतो. आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चढउतार, आईविना वाढलेल्या मुलीवर असणारे प्रेम आणि आपली तत्वनिष्ठा, समाजात असणारी आपली प्रतिमा या सर्वांमुळे द्विधा मनःस्थितीत असणारे परमेश्वरय्या अखेर न्यायालयात खोटी साक्ष देण्यासाठी तयार होतात. न्यायालयात उभे राहून देवाच्या साक्षीने खरे बोलायचे वचन देऊन ते खोटे बोलतात आणि त्यांच्या त्या एका "साक्षी" ने मंजय्याची खुनाच्या आरोपातून सुटका होते. परंतु आयुष्यभर तत्वनिष्ठ राहिलेले परमेश्वरय्या या घटनेनंतर मनातून खचून जातात, आपण दिलेल्या खोट्या साक्षीसाठी स्वतःला दोषी माननारे परमेश्वरय्या पश्चात्तापातून आत्महत्या करतात आणि यमसदनी पोहोचतात. यमसदनात चालू झालेल्या त्यांच्या निवाड्यापासून वेगळ्या वळणाने कादंबरीचा प्रवास चालू होतो जो बघता बघता वाचकाला घेरून टाकतो. यमसदनात यम आणि चित्रगुप्तापुढे उलगडत जाणारी परमेश्वरय्यांची कहाणी आपल्याला हेच सांगते की मनुष्याने आयुष्यात कितीही साक्षीभावाने राहण्याचा प्रयत्न केला तरीही काही प्रश्नांकडे इतक्या अलिप्तपणे पाहणं त्याला जमतंच असं नाही. धर्म, अर्थ आणि काम या तीन मार्गानी मोक्षापर्यंत नक्कीच जाता येईल परंतु यांपैकी एकाचाही जरी अतिरेक झाला तर व्यक्तिगत आयुष्यासोबतच कौटुंबिक आणि सामाजिक आयुष्यही ढवळून जाते हेच आपल्याला परमेश्वरय्यांची कथा वाचत असताना जाणवत राहते.

आपण आत्महत्या करण्याचा घेतलेला निर्णय चूक की बरोबर हे जाणून घेण्यासाठी पुढे यमधर्माच्या परवानगीने परमेश्वरय्यांना सूक्ष्मदेहाने पुन्हा भूतलावर पाठवण्यात येते आणि त्यांचा भोवताल "साक्षीभावाने" पाहण्यास सांगितलं जातं. पृथ्वीवर परत येऊन सत्याचा शोध घेत, जीवनाचं वास्तव पाहता पाहता शेवटी परमेश्वरय्याला पडणारा प्रश्न, "असत्याचं मूळ कोणतं? त्याला अंतच नाही का?" हा नकळत प्रत्येक मानवी मनात चाललेल्या संघर्षाचं प्रतिनिधित्व करतो. मानवी भाव-भावनांकडे अलिप्तपणे पाहिलं की आपल्या जाणिवांना खरे रुप मिळू शकते हे कादंबरी वाचत असताना जाणवत राहते. मानवी भाव-भावनांचा निरंतर संघर्ष दाखवणारी, यमलोक-यमधर्म-चित्रगुप्त यांच्यासमोर निवाड्यासाठी उभी राहिलेली ही कथा जितकी परमेश्वरय्या, नागप्पा आणि मंजय्याची आहे तितकीच ती या तिघांच्या सहवासात ग्रासलेल्या सावित्री, सत्यप्पा आणि रामकृष्ण यांचीही आहे. शेवटी नकळत ती वाचकाचीही होऊन जाते.

एस. एल. भैरप्पा यांच्या "साक्षी" ची कथा जरी चाकोरीबाहेरची असली तरी विषय नक्कीच वास्तवाकडे घेऊन जाणारा आहे. मानवी भाव-भावना आणि त्यांच्या निरंतर संघर्षाची जाणीव करून देणारी, आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी.





संदीप प्रकाश जाधव

Tuesday, December 15, 2020

"झोंबी"

 


लेखक : आनंद यादव

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


एखाद्याची आत्मकथा म्हणजे त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात आलेले वेगवेगळे अनुभव आणि त्यातून घडत गेलेलं त्याचं आयुष्य इतकी सरळ सोपी व्याख्या. बऱ्याच लोकांच्या प्रेरणादायी आत्मकथा मी आजपर्यंत वाचल्या, ज्या शक्यतो अतिशय खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी घडवलेलं त्यांचं आयुष्य आपल्यासमोर मांडत असतात. आनंद यादव यांची "झोंबी" वाचायला घेण्यापूर्वी  हिसुद्धा अशाच पठडीतील एक आत्मकथा असावी असा ग्रह मनात ठेवून वाचायला सुरुवात केली पण पु. ल. देशपांडेंची सुरुवातीची प्रस्तावना वाचल्यानंतरच लक्षात आले की आपण काहीतरी वेगळं, अतिशय उत्कृष्ट असं वाचायला हातात घेतलं आहे. सुरुवातीलाच पु. ल. देशपांडे म्हणतात की आनंद यादव ह्यांना साष्टांग दंडवतच घालायला हवा, कारण ह्या कथनात इतक्या भयंकर परिस्थितीतलं बालपण दाखवलंय ज्याची की आपण कल्पनाही करु शकत नाही. अतिशय हट्टी आणि कामचुकार वडील, आपल्या अकरा मुलांचा जीवाच्या आकांताने सांभाळ करुन संसार सावरणारी आई आणि भीषण दारिद्र्य ह्याचं खूपच विदारक शब्दचित्र लेखकाने चितारलंय. आनंद यादव यांनी हे सगळं स्वत: भोगलं असल्यामुळे त्यातला निखार वाचकाच्या अंगावर येतो. झोंबीचा शब्दशः अर्थ म्हणजे लढाई! दोघांमध्ये झालेली लढाई म्हणजेच "झोंबी". आनंद यादव यांची ही आत्मकथा म्हणजे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई आहे. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी "झोंबी".

आनंद यादव यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड पण ते ज्या समाजात रहायचे तिथे त्यांनी अशी आवड ठेवणं, स्वप्न बघणं म्हणजे जणू गुन्हाच. ज्या समाजात 'शाळा शिकणे' म्हणजे आपल्या कुळाला बट्टा लावणे असं मानलं जायचं त्या समाजात जन्माला येऊन आनंद यादव यांनी 'मॅट्रिक' पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं तेही घरी अठराविश्वे दारिद्र्य असताना. त्यांचा हा मॅट्रिकपर्यंतचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी "झोंबी". आनंद यादव यांच्या या कादंबरीत त्यांनी फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथा, हालच आहेत असे नाही तर अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे जवळून होणारे दर्शनसुद्धा आहे. लेखकाचे गाव, गावातील रितीरिवाज, गावाच्या आसपासचा निसर्ग, बापाचा आडमुठेपणा, आईचा होणारा अपरिमित छळ, लागोपाठ होणारी मुले, मुलांचे अपमृत्यू, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील प्रसंग, मास्तरांचे स्वभाव, तर्‍हा,गावातले उरूस, जत्रा, महात्मा गांधी यांच्या वधानंतर झालेली स्थिती या आणि अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्रण आहे. आपण विचारसुद्धा करू शकणार नाही अशा अतिशय हालाखीच्या परिस्थितीतदेखील आनंद यादव यांच्या मनातली शिक्षणाची ओढ काही कमी होत नाही. घरची परिस्थिती आणि वडिलांचा शाळेसाठी असणारा प्रखर विरोध यामुळे अर्धवट सोडावी लागणारी शाळा ते ज्या जिद्दीने मॅट्रिक पर्यंत पूर्ण करतात त्याला तोड नाही. त्या जिद्दीला आपल्या मेहनतीची जोड देऊन अगदी जीव जायची वेळ येईपर्यंत त्यांनी उपाशी पोटी वेगवेगळी कामे करून, वेळप्रसंगी चोरी करून आणि त्या आलेल्या पैशांत शाळेची पुस्तके विकत घेऊन, फी भरून, सोबतच आपल्या बरोबरीच्या मुलाची शिकवणी घेऊन, वेगवेगळ्या ठिकाणच्या शाळांमध्ये फिरून नकलांचे कार्यक्रम करून ते मॅट्रिक पर्यंत शिकतात. मुलगा शाळेत गेला तर शेतातली सगळी कामं आपल्यावर पडणार शिवाय शाळेसाठी पैसे नाहीत त्यामुळे वडिलांचा नेहमीच असणारा विरोध आणि त्या विरोधापायीच त्यांनी वडीलांचा खाल्लेला बेदम मार हे सर्व कादंबरीत वाचत असताना नकळत वाचकालाही लेखकाच्या वडिलांचा राग येऊ लागतो. कादंबरीमध्ये प्रत्येक पानावर वाचकाला अस्वस्थ करणारे प्रसंग आहेत पण मला सर्वात जास्त अस्वस्थ करून गेला तो आनंद यादव यांच्या मोठ्या बहिणीचा, अनसाचा तिच्या बाळंतपणात झालेला मृत्यू. 

लेखकाच्या घरात अकरा भावंडं, तीही अगदी एका पाठोपाठ एक झालेली त्यामुळे १-२ सोडले तर बाकी सगळी रोगट आणि अशक्त. घरात दोन्ही वेळेच्या जेवणाची भ्रांत त्यात भावंडांमध्ये मोठे असल्यामुळे आणि वडिलांच्या कामचुकारपणामुळे शेतातील सर्व कामे लेखकालाच करावी लागत. शेतकाम करुन शाळेत गेल्यामुळे कायम मळलेले कपडे, आंघोळीला, कपडे धुवायला साबण सुद्धा नाही. वह्या , पुस्तकं घ्यायला पण पैसे नाहीत. फी भरायला पैसे नाहीत. शेतातल्या कामामुळे नेहमीच शाळेत जायला होणारा उशीर आणि या सर्वामुळे शिक्षणाचे होणारे नुकसान! तरीही अगदी हट्टाने त्यांनी एक-एक वर्ष शिक्षण घेतलं. काही वेळेला शिक्षकांनी त्यांची परिस्थिती समजून त्यांना मदत केली तर काही वेळेला त्यांना मुद्दाम त्रासही दिला. मुळातच हुशार असल्यामुळे शाळा बुडाली तरी पाठांतराचे  वेगवेगळे प्रकार त्यांनी शोधून काढले. कामाच्या रगाड्यातही त्यांनी कविता, शब्दार्थ, प्रश्नोत्तरं चालूच ठेवले. इतकं सगळं सांभाळूनही ते शाळेत नेहमीच पहिला, दुसरा क्रमांक मिळवत राहिले. त्यांच्या शिक्षणाच्या वेडाला त्यांच्या वडीलांनी कधीच दाद दिली नाही पण शेवटी असह्य होऊन जेव्हा लेखक घर सोडून जातात तेव्हा त्यांच्या वडिलांनाही हार मानावीच लागली. मोठ्या कष्टाने वडिलांनी त्यांना एस.एस.सी. ची परिक्षा देण्याची परवानगी दिली आणि आनंद यादव यांनी त्या संधीचं सोनं केलं. "झोंबी" या कादंबरीमध्ये आनंद यादव यांनी एस.एस.सी. पर्यंतच केलेल्या संघर्षाचे चित्रण आहे. त्यामुळे कादंबरी वाचून झाल्यानंतर आनंद यादव यांचे पुढे काय झाले असेल? एस. एस. सी. नंतर त्यांनी पुढे काय केले असेल? एस. एस. सी. पास झाल्यानंतर त्यांच्या वडिलांची प्रतिक्रिया काय असेल? त्यांच्या भावंडांचे पुढे काय झाले असेल? असे एक ना अनेक प्रश्न वाचकांना पडतात आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला त्यांच्या यापुढील नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या पुस्तकांमध्ये मिळतील.

आनंद यादव यांची ही आत्मकथा वाचकाला प्रचंड अस्वस्थ तर करतेच पण शिक्षणाच्या बाबतीत आपण किती नशिबवान आहोत हे जाणून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी आहे.






संदीप प्रकाश जाधव

Monday, December 7, 2020

"नदीष्ट"

 


लेखक : मनोज बोरगावकर

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन


मनोज बोरगावकरांच्या "नदीष्ट" या कादंबरीबद्दल बरंच ऐकलं होतं आणि आज ती वाचायचा योग आला. कादंबरीचे नाव वाचून आणि मुखपृष्ठ पाहूनच आपण एक अंदाज बांधू शकतो की कादंबरीचा विषय हा नदीशी निगडीत असणार. नदीला केंद्रस्थानी ठेवून लिहिली गेलेली, अतिशय वेगळा आणि चाकोरीबाहेरचा विषय अगदी सहज, सुंदर भाषेत आपल्यासमोर घेऊन येणारी ही मनोज बोरगावकरांची कादंबरी. पूर्णपणे नदीच्या काठावर घडलेली, वेगवेगळ्या घटनांमधून, लोकांमधून उलगडत जाणारी "नदीष्ट" ही कादंबरी नदीची  विविध रूपे आणि नदीची संस्कृती टिपते. माणूस आणि नदी यांचं आदिम नातं लेखकाने या कादंबरीतून अधोरेखित केलं आहे. नदी आणि माणूस यांचा समांतर प्रवास म्हणजेच "नदीष्ट".

सतत १० वर्षे, दररोज न चुकता नदीला पोहायला जाणारा या कादंबरीचा नायक. आणि नायकाच्या याच दैनंदिन आयुष्यात त्याला नदीवर आणि नदीच्या आसपासच्या परिसरात भेटणारे लोक, त्यामधून त्याला येणारे नवनवीन अनुभव शिवाय नदीवर भेटणाऱ्या उपेक्षित लोकांच्या कहाण्या जाणून घेण्याचा नायकाचा प्रवास म्हणजेच ही कादंबरी. या कादंबरीचे वैशिष्ट्य म्हणजे नायकाच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक पात्राला नाव आहे पण नायकाला नाव नाही. आज आपण बर्‍याचदा आत्मकेंद्री आयुष्य जगत असतो आणि आपल्या आजुबाजुला काय घडतंय याचंही आपल्याला कधी-कधी भान नसते. आसपासच्या लोकांशी आपल्याला काहीच देणे घेणे नसते. बऱ्याचदा हेच आत्मकेंद्री वागणं आपल्यासारख्या मध्यमवर्गीय लोकांचा स्वभावच नाही तर जीवनशैलीच होऊन जाते. मात्र या कादंबरीचा नायक, आयुष्य जगत असताना नेहमीच एक माणूसपण सोबतीला ठेऊन राहतो त्यामुळे तो त्याला नदीवर भेटणाऱ्या उपेक्षित लोकांच्या कहाण्या जाणून घेतो. समाजाने ज्यांचे माणूसपण नाकारले अशा लोकांना माणूस म्हणून समजून घेतो. त्यांच्याशी माणूस म्हणून वागतो, बोलतो आणि त्यातून उलगडत गेलेल्या त्या उपेक्षित लोकांच्या दुःखाची ही गोष्ट आहे. या कादंबरीत आपल्याला सकिनाबी, कालुभैय्या, नदीवरील मंदिराचा पुजारी, बामनवाड, सगुणा, मालाडी, दादाराव, सर्पमित्र प्रसाद, भिकाजी ही पात्रे भेटतात.  या सगळ्यांची प्रत्येकाची एक वेगळी कहाणी आहे.  या सगळ्यांचं जगणं - त्यांचा भूतकाळ जाणून घेण्याचा नायकाने प्रयत्न केला आहे. कादंबरीतले अनेक प्रसंग, घटना ह्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात.  ही कादंबरी आपल्याला माणूसपणाचा नवा दृष्टीकोन आणि जगण्याचं भान देऊन, संवेदनशील बनवते. नायकाला नदी किनाऱ्यावर भेटलेले सगुणा हे तृतीयपंथी पात्र आणि भिकाजी हा भिकारी या दोघांचा संवेदनशील भूतकाळ नायकापुढे उलगडत जाताना मधेमधे मिळालेल्या इतर पात्रांच्या कथा आपल्याला बऱ्याच वेळा सुन्न करून जातात. सगुणाची कहाणी तर आपल्याला खूपच संवेदनशील बनवते. सगुणा ही  प्रस्थापित समाज व्यवस्थेकडून नाकारली गेलेली एक तृतीयपंथी व्यक्ती. सुरुवातीला जेव्हा ट्रेनमध्ये सगुणा भेटते तेव्हा तिच्याकडे तुच्छ नजरेने बघणाऱ्या, सगुणापासून दूर पळणाऱ्या नायकाला जेव्हा सगुणाचा भूतकाळ समजतो तेव्हा नकळत त्याला ती आणि तिच्या समाजाबद्दल आदर वाटायला लागतो. सगुणा आपली भळभळणारी जखम नायकापुढे धरत आपला भूतकाळ त्याच्या पुढ्यात ठेवते. जो वाचत असताना कोणत्याही संवेदनशील व्यक्तीच्या डोळ्यांच्या कडा नक्कीच ओलावतील. तृतीय पंथातील अनेक बारकावे लेखकाने अचूक टिपले आहेत. त्यांची जीवनशैली- भाषाशैली याचं अगदी यथार्थ दर्शन कादंबरीत होते. तृतीयपंथीयांचे  दैनंदिन शब्द लेखकाने कादंबरीत वापरले आहेत त्यामुळे लेखकाची संशोधन वृत्तीसुद्धा आपल्याला दिसून येते. या तृतीयपंथी लोकांविषयी आपल्या मनात अनेक प्रश्न असतात, त्याची उत्तरे आपल्याला या कादंबरीत नक्कीच मिळतात. तृतीयपंथीयामधील दीक्षा देण्याची प्रथा वाचताना तर अंगावर काटा येतो. तृतीयपंथीयांच्या व्यथा - वेदना यांचं दाहक आणि वास्तव चित्रण या कादंबरीत आहे.

सगुणाप्रमाणेच आणखीन एक संवेदनशील पात्र म्हणजे नायकाला रोज भेटणारा भिकारी "भिकाजी". भिकाजीच्या वागण्याबोलण्यातून तो जन्मजात भिकारी नाही हे लक्ष्यात आल्यानंतर नायकसोबतच वाचकालाही त्याच्या भूतकाळाबादद्दल कुतूहल निर्माण होते. कादंबरीतील भिकारी असलेला भिकाजी हा दारूच्या नशेत आपल्या तान्ह्या मुलीला जिवानिशी मारून टाकतो, त्यामुळे कादंबरी वाचताना सुरुवातीला भिकाजीचा तिरस्कार वाटत राहतो. त्याच्या हातून अनवधानाने झालेल्या बाळाच्या मृत्युसाठी भिकाजीला पंधरा वर्षाचा तुरुंगवास देखील होतो.  मात्र तो कायम स्वतःला अपराधी समजत राहतो. शिक्षा भोगून आल्यानंतर त्याचं भिकारी बनून गावोगावी फिरणं मनाला चटका लावून जाते. बाळाच्या मृत्युनंतर भिकाजीचं बदललेलं जगणं, त्याचं दुःख, अबोलवृत्ती, त्याला झालेला मांजराचा फोबिया या गोष्टी त्याच्याविषयी वाचकांच्या मनात सहानुभूती निर्माण करतात. नायकाला नदीवर पोहताना धडे देणारे दादाराव जेव्हा त्यांच्या आईच्या मरणाचा प्रसंग नायकाला सांगतात तेव्हा त्याच्यासोबतच आपणही भावूक होऊन जातो. तान्ह्या दादारावांनी मेलेल्या आईचे दूध पिण्याचा हा प्रसंग आपण वाचतो तेव्हा सुन्न व्हायला होतं. कादंबरीतील इतर पात्रे जसे नदीवर मासे पकडायला येणारा बामनवाड, त्याची नदीच्या व्हर्जिन जागेतील वाळूची कहाणी, मंदिराचा पुजारी, दररोज आपल्या म्हैशीना नदीवर घेऊन येणारे कालूभैय्या आणि त्याची प्रेयसी, पहाटे-पहाटे नदीवर अंघोळीसाठी येणारी भिकारीण सकिनाबी, नदीवर नायकाला अचानकच भेटलेला अगदी तरुण वयातला सर्पमित्र प्रसाद आणि त्याने तो लहान असताना पहिल्यांदाच नाग कसा पकडला याची सांगितलेली कहाणी  या सर्व गोष्टी आपल्यालाही नदी किनाऱ्यावर घेऊन जातात. कादंबरीत निसर्गातील अनेक सूक्ष्म बारकावे आले आहेत. माकडांच्या टोळी पासून ते मोरांच्या थव्यापर्यंत आणि आकाशाकडे एक डोळा करून नदीत पोहणाऱ्या माशांपासून ते खेकड्यापर्यंत सर्वच गोष्टींतील बारकावे लेखकाने अगदी अचूक टिपले आहेत. रोजच्या नदीवर येण्याने निसर्ग आणि निसर्गातील अनेक गोष्टी नायकाला कळल्या. लेखकाला निसर्गाने आणि नदीने समृद्ध केलं. लेखकाचा जीवनानुभव प्रचंड समृद्ध आहे, असं कादंबरी वाचताना आपल्या लक्षात येतं. शिवाय परिसरातील अनेक गोष्टींचे प्रचंड ताकतीने वर्णन केलं आहे, त्यामुळे ही कादंबरी वाचताना डोळ्यांसमोर अगदी हुबेहुब चित्र येतं, जणूकाही आपणच प्रत्यक्षच त्या घटनांचे साक्षीदार आहोत. 

वेगवेगळे लोक नदीकिनारी नायकाच्या आयुष्यात येत राहतात आणि ठराविक अंतराने आपल्या पुढच्या प्रवासाला निघून जातात. पण या छोट्याशा भेटीमध्ये स्वतःच्या भूतकाळातून नायकाला खूप काही शिकवून जातात, साध्या साध्या घटनांमधून जगण्याचं मोठं तत्वज्ञान शिकवून जातात. नायकाला भेटलेली सर्व पात्रे, नायकाने अनुभवलेले सर्व प्रसंग त्याच्याप्रमाणेच वाचकाच्या मनावरसुद्धा कोरली जातात.  कादंबरी वाचताना संपुच नये, असं वाटत राहतं. एक एक करून सर्व पात्रे निघून गेल्यानंतर शेवटी सगुणा जेव्हा निघून जाते तेव्हा कादंबरी संपली असं वाटतं पण नायक घाटाच्या पायऱ्या चढून वर येत असताना त्याला पायऱ्या उतरून नदीवर येणारा फकीर भेटतो आणि कादंबरीचा ओपन एंडेड शेवट होतो जो वाचकाला पुन्हा नव्याने जन्माला येणाऱ्या कथेचा विचार करायला भाग पाडतो.

चाकोरीबाहेरचा आणि वाचकाला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जाणारा विषय अनुभवण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखी कादंबरी "नदीष्ट".





संदीप प्रकाश जाधव




Monday, November 30, 2020

"संताजी"

 


लेखक : काका विधाते

प्रकाशक : प्रफुल्लता प्रकाशन


छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर बादशाह औरंगजेबाशी मराठ्यांनी सुरू केलेला स्वातंत्र्यसंग्राम हे स्वराज्याच्या इतिहासातील एक सोनेरी पान आहे. छत्रपती संभाजी महाराजांचे मोगलांकडून पकडले जाणे हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक काळा दिवस. संभाजी महाराजांना पकडून त्यांचा अतोनात छळ करून त्यांना मारल्यानंतर मराठे संपले, मराठयांचे स्वराज्य संपले अशा भ्रमात औरंगजेब राहू लागला. मराठयांचा राजा मारला गेला, रायगड पडला, येसूबाई आणि लहान शाहू महाराज मोगलांच्या हाती सापडले, अशा या कठीण काळात अनेक मोठ-मोठे मराठी सरदार मोगलांना जाऊन मिळाले त्यामुळे दख्खन जिंकून संपूर्ण हिंदुस्थानावर आपला अंमल प्रस्थापित करण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झाल्याच्या आनंदात दिल्लीकडे परत जायची स्वप्ने बघणाऱ्या औरंजेबाला आणि त्याच्या विशाल सागर सेनेला मराठ्यांनी आपली जिद्द आणि पराक्रमाच्या जोरावर पुढची २७ वर्षें लढत ठेवलं. बादशाह औरंगजेबाला त्याच्या मनसुब्यांसोबतच महाराष्ट्राच्या मातीत गाडून टाकलं. कोणतंही नेतृत्व नसणाऱ्या मराठ्यांकडून झालेला हा अफाट पराक्रम एखाद्या चमत्कारापेक्षा नक्कीच कमी नाही. मराठ्यांच्या या रणसंग्रामाचा विचार करताना एक व्यक्ती अशी आहे जिचे कर्तृत्व डावलून आपण पुढे जाऊच शकत नाही आणि ती म्हणजे "सेनापती संताजी घोरपडे". संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर विस्कटलेलं स्वराज्य पुन्हा नव्या जिद्दीने आणि जोमाने उभं करण्याचा चंग बांधून, औरंगजेबाच्या एकाहून एक सरस सरदारांना, त्यांच्या विशाल सेनेला अंगावर घेऊन त्यांना पळता भुई थोडी करणारा रणधुरंधर म्हणजे "सेनापती संताजी घोरपडे". शिवरायांच्या गनिमी काव्याच्या तंत्राचा अचूक आणि प्रभावीपणे वापर करून अपराजित, बलाढ्य समजल्या जाणाऱ्या मोगल सत्तेला त्यांनी जमिनीवर आणलं. परंतु या स्वातंत्र्यसंग्रामात अत्यंत प्रतिकूल आणि कठीण परिस्थितीत स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांना काय काय करावं लागलं? किती हाल सोसावे लागले? संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर राजाराम महाराज जिंजीच्या किल्ल्यात अडकून पडले, इतर राजकुटुंबावर लपून रहायची वेळ आली तेव्हा स्वामिनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ मराठी वीरांची मानसिकता काय असेल? रयतेची काय अवस्था झाली असेल? नेतृत्वाचा जरब नसल्यामुळे वाढत जाणारी अंतर्गत दुही आणि त्यामुळे स्वराज्याचं नेमकं काय नुकसान झालं? इतक्या बलाढ्य मोगल साम्राज्याला टक्कर देण्याची ताकत, जिद्द मूठभर मराठ्यांमधे कोठून आली? या आणि अशा बऱ्याच प्रश्नांची उत्तरे आपल्याला काका विधाते यांच्या "संताजी" या कादंबरीमधे मिळतील.

मराठ्यांच्या इतिहासात काही पराक्रमी, धाडसी, शूर वीरांची नावे सुवर्णाक्षरांनी नोंदवावी अशी आहेत आणि संताजी घोरपडे हे त्यातीलच एक नाव. म्हालोजी घोरपडे हे शिवरायांच्या स्वराज्यउभारणीच्या कार्यात सोबत असणारे एक मोठं नाव आणि त्यांच्याच ३ पुत्रांपैकी जेष्ठ पुत्र "संताजी". स्वराज्याच्या सैन्यात वडील मोठ्या हुद्द्यावर असूनही एका साध्या शिपायापासून संताजींनी आपला प्रवास सुरु केला. एकाहून एक सरस पराक्रम गाजवत शिपायापासून ते स्वराज्याच्या सेनापतीपर्यंतचा त्यांचा प्रवास कादंबरीत वाचत असताना आपल्याला अचंबित करून जातो. या शूर, रणधुरंधर सेनापतीचे चरित्र काका विधाते यांनी त्यांच्या "संताजी" या ८९२ पानांच्या कादंबरीतून आपल्यापुढे मांडलं आहे. संभाजी महाराजांना मुकर्रबखानाने संगमेश्वरात पकडले तेव्हा झालेल्या लढाईत संताजींचे वडील म्हालोजी कामी आले. शंभू राजांना तिथून सोडवण्याचा सर्वांनी आटोकाट प्रयत्न केला पण शेवटी आपण पूर्णपणे अडकलो आहोत याची जाणीव झाल्यानंतर संभाजी महाराजांनी संताजींना तिथून निघून जाण्याची आज्ञा केली आणि अखेरपर्यंत औरंगजेबाशी लढत राहून स्वराज्य राखण्याचा सल्ला त्यांना दिला. तिथून नाईलाजास्तव संताजी रायगडी आले पण आपण आपल्या राजाला वाचवू शकलो नाही ही सल शेवटपर्यंत त्यांच्या मनात राहिली. संभाजी राजे पकडले गेल्यानंतर त्यांच्या मनात बदल्याची ठिणगी उठली आणि औरंगजेबाने महाराजांना मारल्यानंतर त्याच ठिणगीने वणव्याचे रूप घेऊन अख्ख्या मोगलाईला होरपळून काढले. संताजींनी जेव्हा लाखो सैनिकांच्या छावणीत घुसून औरंगजेबालाच मारण्याचा धाडसी प्रयत्न केला तेव्हा त्या वणव्याचे चटके साक्षात आलमगीर औरंगजेबाला पण बसले. केवळ त्याचं नशीब बलवत्तर म्हणूनच तो वाचला. संगमेश्वर सोडताना महाराजांना मूकपणे दिलेला शब्द प्रमाण मानून संताजी शेवटच्या श्वासापर्यंत मोगलांशी लढत राहिले आणि शेवटी स्वकीयांच्याच राजकारणाचा बळी झाले. अंतर्गत दुही आणि राजकारण हे मराठ्यांच्या पाचवीलाच पुजलेले, त्यातून "संताजी" तरी कसे सुटणार. खेकड्याने चालण्याची काही लोकांची वृत्तीच शेवटी संताजींच्या अंतास कारण ठरली. परंतु कादंबरी वाचून झाल्यानंतर एक गोष्ट नक्कीच मान्य करावी लागेल ती म्हणजे भलेही मोगलांचा प्रत्यक्ष पराभव हा महाराणी ताराबाई, छत्रपती शाहू महाराज आणि पहिल्या बाजीरावांच्या कार्यकाळात झाला असला तरी औरंगजेबासहित मोगलांचे मोठ-मोठे सरदार आणि त्यांची बलाढ्य सेना यांचा मानसिक पराभव संताजींनी आधीच करून ठेवला होता.

काका विधाते यांनी बऱ्याच संशोधनातून आपल्याला माहीत नसलेलं संताजींचं आयुष्य या कादंबरीतून आपल्यासमोर आणलं आहे. संताजींचे बालपण, वैवाहिक आयुष्य, तरुणपणी सरसेनापती हंबीरराव मोहित्यांच्या तालमीत तयार होत असताना त्यांनी गाजवलेले मोठमोठे पराक्रम, संभाजी महाराजांसोबत त्यांनी लढलेल्या लढाया, स्वराज्यासाठी त्यांनी केलेला त्याग, स्वराज्य स्वतंत्र झालं पाहिजे यासाठीची त्यांची तळमळ - धडपड, मोठ-मोठ्या दौडा मारून गनिमी काव्याने त्यांनी केलेल्या असंख्य लढाया आणि त्यामुळे मोगलांमध्ये बसलेली त्यांची जबरदस्त दहशत, स्वकीय सरदार आणि कारभाऱ्यांसोबतच स्वतःच्या राजाचीसुद्धा साथ नसताना त्यांनी मोगलांविरुद्ध खेळलेले डावपेच, संताजींनी बादशाहकडे येऊन हवं ते आणि हवं तेवढं वतन घेऊन मोगली मनसबदार व्हावं म्हणून मोगल त्यांच्यासाठी पायघड्या अंथरून बसलेले असताना स्वकीयच त्यांच्या जीवावर उठले होते तरीही शंभू राजांना दिलेल्या वचनाखातर शेवटच्या श्वासापर्यंत स्वराज्याशी एकनिष्ठ राहून अखेरपर्यंत बादशाही बुडवण्यासाठीच केलेले त्यांचे प्रयत्न, या सर्व प्रवासात मोजक्याच स्वामिनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ लोकांची त्यांना मिळालेली साथ आणि शेवटी या स्वराज्याच्या वीर सेनापतीला डोंगरदाऱ्यांमधे लपत-छपत जगावं लागलेलं आयुष्य आणि तिथेच झालेला त्यांचा शेवट या सर्व गोष्टी आपल्याला या कादंबरीमधे अगदी विस्तृतपणे वाचायला मिळतील. सोबतच त्यावेळी दख्खनेत चालणारं मराठ्यांना अनुकूल आणि प्रतिकूल अशा दोन्ही प्रकारचं राजकारण, त्याची पार्श्वभूमी या सर्वांचं तपशीलवार वर्णनसुद्धा आपल्याला या कादंबरीमध्ये वाचायला मिळेल.

स्वराज्याच्या या सिंहाचा स्वकीयांकडूनच धोक्याने झालेला शेवट जरी मनाला चटका लावून जात असला तरी स्वराज्यनिष्ठा काय असते हे मोगलाईसोबतच अख्ख्या जगाला त्यांनी दाखवून दिले. प्रत्येक मराठी माणसाने आवर्जून वाचावी अशी काका विधाते यांची कादंबरी "संताजी".




संदीप प्रकाश जाधव




Sunday, November 22, 2020

"पांगिरा"

 


लेखक : विश्वास पाटील

प्रकाशक : राजहंस प्रकाशन


"पानिपत" या ऐतिहासिक कादंबरीमुळे घराघरात पोहचलेले लेखक विश्वास पाटील. कोणत्याही कादंबरीला नेहमीच लेखकाच्या कल्पनेची जोड असते आणि लेखकही इतिहासाला किंवा त्या विषयाला धक्का न लावता कादंबरीच्या माध्यमातून तो आपल्यापर्यंत पोहचवत असतात. पण विश्वास पाटलांची "पांगिरा" ही कादंबरी अशा काल्पनिकतेचा आधार घेऊन लिहिल्या गेलेल्या बऱ्याच कादंबऱ्यांना अपवाद आहे. त्याचं कारणही तसंच आहे, या कादंबरीचा विषयच असा आहे जो आपल्याला वास्तविकतेकडे घेऊन जातो. आपण नेहमी म्हणतो विकास झाला, प्रगती झाली पण म्हणजे नेमकं काय झालं? हे आजही कोणी ठामपणे नाही सांगू शकणार. अजूनही शेतकरी आहे त्याच जागी आहे, सामान्य कष्टकऱ्याचं आयुष्य आहे तिथेच राहिलं आहे. विकासाची गंगा शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या दारापर्यंत पोहचलीच नाही. शहरात राहून आपल्याला या गोष्टी कधी समजल्याच नाहीत आणि कधी समजणार पण नाहीत जोपर्यंत त्याचा अनुभव किंवा झळ आपल्याला बसत नाही. "पांगिरा" या कादंबरीच्या माध्यमातून शहरात राहणाऱ्या आपल्यासारख्या माणसांच्या डोळ्यांवरील विकासाच्या सुखाचं कातडं विश्वास पाटील अक्षरशः ओढून काढतात. ही कादंबरी म्हणजे पांगिरा आणि डोंगरवाडी या दोन गावांतील कहाणी आहे. पूर्ण गावच कादंबरीचा नायक आहे आणि याच नायकाभोवती फिरणारी हि कथा. भीषण दुष्काळ, वैराण जमीन आणि मने यांची व्यथा म्हणजे ही कादंबरी. ही केवळ एका माणसाची कथा किंवा व्यथा नाही. हे सामूहिक वास्तव आहे. म्हणूनच "पांगिरा" ही सामूहिक जाणिवांची कादंबरी आहे असे म्हटले तरी चुकीचे ठरू नये.

"पांगिरा" हे मांगोला तालुक्यातील एक सधन गाव. आणि त्याचीच धाकटी बहीण म्हणून ओळखले जाणारे "डोंगरवाडी". "पांगिरा" गावच्या सिदुबाच्या जत्रेपासून झालेली या कादंबरीची सुरुवात. एकरी शंभर टन ऊस काढणारे या गावातील शेतकरी. अगदी परंपरागत शेती करणारे हे गाव विकासाच्या नावाखाली गावामध्ये वीज आल्यानंतर कुस बदलायला चालू करते. वीज आल्यामुळे विहिरींवर बसवल्या गेलेल्या मोटारींमधून भरमसाठ पाण्याचा उपसा रात्रंदिवस चालू होतो. घरोघरी केल्या जाणाऱ्या उसाच्या शेतीमुळे लोकांकडे येणारा पैसा, त्यांची वाढती श्रीमंती, रंगीत माडीची घरे, ट्रॅक्टर यामुळे मांगोला तालुक्यातील वेगळेपण जाणवणारे हे गाव. गावात झालेल्या बदलाचा आणि तिथे केल्या जाणाऱ्या ऊस शेतीचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या कृषिसंशोधक शर्मा याने पाण्याच्या वापराविषयी दिलेल्या गंभीर सल्ल्याकडे दुर्लक्ष करून वाटचाल करणाऱ्या पांगिऱ्याची एका तपानंतर झालेली अवस्था आणि त्याचे वास्तविक दर्शन म्हणजेच ही कादंबरी "पांगिरा". या वाटचालीत झालेल्या अनेक छोट्या-मोठ्या घडामोडी विश्वास पाटील यांनी अतिशय सुंदर आणि तितक्याच वास्तववादी पद्धतीने आपल्यासमोर मांडल्या आहेत. जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांच्यामार्फत बऱ्याच सुधारणा गावाच्या वेशीवर धडकल्या. त्या सुधारणा लोकांपर्यंत पोहचवण्याच्या नावाखाली तयार झालेले, स्वतःची पोळी भाजून घेणारे राजकारणी गट आणि त्यांची आपापसांत होणारी जीवघेणी स्पर्धा यांचे अगदी विस्तृत वर्णन आपल्याला या कादंबरीत वाचायला मिळेल जे सर्व आजही बऱ्याच गावांमध्ये चालते. ऊस हे हमखास उत्पन्न मिळवून देणारे पीक गृहित धरून त्यासाठी केल्या जाणाऱ्या भरमसाठ पाणी वापराने गावातील पाणी पातळी हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते आणि गावकऱ्यांच्या डोळ्यावरील विकासाची झापड तसेच पांगिऱ्याचे पाणी कधीच अटणार नाही हा गावकऱ्यांचा फाजील आत्मविश्वास उडून जाईपर्यंत खूप उशीर होऊन जातो. फक्त एका तपापूर्वी एक सधन-समृद्ध असणारे हे "पांगिरा" गाव दुष्काळी गावांच्या यादीत सामील होते. लोकांची पाण्यासाठी वणवण सुरू होते, शेती हळूहळू ओस पडू लागतात आणि स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या लोकांवरसुद्धा रोजंदारीवर काम करायची वेळ येते. गावाच्या या १० वर्षांच्या प्रवासात गावाची झालेली वाताहत, गावाच्या गल्ली-गल्लीत चालणारे राजकारण, त्यामधे असणारे सत्ताधारी आणि विरोधक असे दोन गट, त्यांच्यातील एकमेकांवर केल्या जाणाऱ्या कुरघोडी, गावातील भोळ्या लोकांचा स्वतःच्या फायद्यासाठी राजकारणी लोकांनी केलेला वापर, ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत एकमेकांचे पाय ओढण्यासाठी खेळल्या जाणाऱ्या खेळी, सरकारी योजना तळागाळापर्यंत न पोहचवता त्या योजनेतून स्वतःचं उखळ पांढरे करून घेणारी राजकारणी आणि ठेकेदार, फोडाफोडीचे राजकारण आणि विकासाची स्वप्ने यांतून घराघरात चालू झालेल्या भांडणातून एकत्र कुटुंब पद्धतीला गेलेले तडे आणि नाईलाजास्तव या सर्वांमध्ये होरपळत जाणारा गरीब, अडाणी गावकरी यांचं अतिशय प्रखर आणि वास्तववादी वर्णन विश्वास पाटील यांनी या कादंबरीमधे केलेलं आहे. संपूर्ण गावच कादंबरीचा नायक असल्या कारणाने कोणत्याही एका पात्राला जास्त महत्त्व दिलेलं नाहीये पण तरीही विश्वास पाटलांच्या वास्तववादी लिखाणामुळे आणि त्या त्या घटनांमधून त्यांनी केलेल्या वातावरण निर्मितीमुळे अगदी सगळीच पात्रे आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात.

 दुष्काळी गावांच्या यादीत समावेश झाल्यानंतर वेगळ्याच मार्गाने पांगिऱ्याचा प्रवास चालू होतो. पाण्यासाठी आपापसांत होणारी रोजची भांडणे आणि याच कारणामुळे गावकऱ्यांकडून आपल्याच सख्ख्या लोकांचे पाडले जाणारे मुडदे, पांगिरा आणि डोंगरवाडी या बहिण-भाऊ समजल्या जाणाऱ्या गावांमध्ये झालेली जीवघेणी मारामारी वाचकाला जाणीव करून देतात की पाणी हा खरंच किती ज्वलंत प्रश्न आहे. गावाच्या या सर्व प्रवासात भरडला जातो तो सामान्य शेतकरी, पाण्याअभावी होणारी त्याची परवड, कसंही करून शेतात आलेलं पीक जगवण्याची त्याची धडपड, शेतीशिवाय दुसरे कोणतेही उपजीविकेचे साधन त्याच्याकडे नसल्यामुळे होणारे त्याचे हाल, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आयुष्याशी चालू असणारा त्याचा लढा कादंबरीमधे वाचताना नकळत आपल्या डोळ्यांच्या कडा ओल्या होऊन जातात. हाच शेतकरी दुष्काळ आणि पाण्याची कमतरता यांमुळे ऊस सोडून मग कमी पाण्यावर उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून कांद्याच्या शेतीकडे वळतो. गावच्या जवळच तालुक्याच्या ठिकाणी असणारी कांद्याची मोठी बाजारपेठ आणि उसाला चांगला पर्याय म्हणून हळूहळू सर्वच शेतकरी आपापल्या शेतात कांद्याचे पीक घेतात. कांदा हे पीक म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या जीवावर खेळलेला किती मोठा जुगार असतो हे ते पीक लागवड केल्यापासून ते बाजारपेठेत जाईपर्यंतच्या या कादंबरीतील प्रवासातून आपल्याला जाणवते. पण इथेही पांगिऱ्याच्या नशिबी दुःखच येते. कारण बाजारपेठेत पूर्ण तालुक्यातून आलेल्या विक्रमी कांद्याचा व्यापारी आपल्या सोयीप्रमाणे दर पाडून लिलाव चालू करतात आणि आधीच दुष्काळाने होरपळून गेलेला, पोटाला चिमटे काढून पिकवलेल्या कांद्याची अशी होणारी अवहेलना शांतपणे पाहणारा शेतकरी आपला संयम सोडतो. व्यापारी आणि शेतकऱ्यांमधे चालू झालेला दंगा पोलिसांच्या गोळीबारानेच थांबतो. चिखलाने - रक्ताने माखलेला कांदा, त्यावर निपचित पडलेले काही शेतकरी आणि शांत झालेली बाजारपेठ असा या कादंबरीचा शेवट. हा शेवट वाचून झाल्यानंतर काही वेळ आप सुन्न होऊन जातो आणि एक वाचक म्हणून विचार करायला भाग पडतो की नक्की चुकलं कुठं आणि कुणाचं. 

पाण्यासारख्या अतिशय ज्वलंत विषयाला हात घालत असताना विश्वास पाटील यांनी पुस्तकांमध्ये आणि सरकारी योजनांमध्ये "राजा" म्हणवणारा शेतकरी खऱ्या आयुष्यात कितीतरी संकटांना सामोरा जाऊन आपल्यासारख्या लाखो लोकांचे पोट कसं भरतो याची जाणीव आपल्याला त्यांच्या या "पांगिरा" कादंबरीतून करून दिली आहे. 

प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी वास्तववादी कादंबरी "पांगिरा".





संदीप प्रकाश जाधव

Monday, November 9, 2020

"बाजिंद"

 


लेखक : पै. गणेश मानुगडे

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


गुप्तचर विभाग आणि गुप्तचर विभागाचं काम हे सामान्य लोकांसाठी नेहमीच एक कुतूहलाचा विषय असतो. आज २१ व्या शतकात प्रत्येक देशाचा स्वतंत्र असा गुप्तचर विभाग आहे आणि अहोरात्र त्यांचे काम अतिशय गुप्त पध्दतीने चालूच असते. आज इस्त्रायलची मोसाद किंवा अमेरिकेची CIA या गुप्तचरसंस्था अतिशय प्रगत आणि शक्तिशाली समजल्या जातात, त्यांच्या कारवाया किती गुप्त आणि धाडसी असतात याचे गोडवे नेहमीच गायले जातात. पण जगाच्या इतिहासात असंही एक हेरखाते होतं ज्याच्या कामाचे कौतुक आजही अगदी ३५० वर्षांनंतरही केलं जातं आणि ज्याची काम करण्याची पद्धत आजही एक अभ्यासाचा विषय आहे ते म्हणजे छत्रपती शिवरायांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे हेरखाते. स्वराज्य उभारणीत जितका वाटा शिवरायांच्या आणि त्यांच्यासोबत मैदानात शत्रूसोबत लढणाऱ्या मावळ्यांच्या अफाट कर्तृत्वाचा होता तितकाच किंवा त्याहून थोडा जास्तच तो पडद्याआड राहून काम करणाऱ्या बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेरखात्याचासुद्धा होता असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरू नये. गुप्तहेरखात्याचा प्रमुख जितका कुशल, बुद्धिमान तितकेच ते गुप्तहेरखाते जास्त प्रभावी.  शिवरायांच्या याच प्रभावी गुप्तहेरखात्याचे प्रमुख असणारे बहिर्जी नाईक. शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेत गुप्तहेर म्हणून त्यांचा सहभाग असायचा. त्यात अफजलखानाचा वध, पन्हाळ्यावरून सुटका, शाहिस्तेखानाची बोटे तोडणे, पुरंदरचा वेढा किंवा सुरतेची लूट असो, अशा प्रत्येक प्रसंगात बहिर्जी नाईक महाराजांचे अर्धे काम पूर्ण करत असत. ह्या प्रत्येक घटनेत नाईकांनी शत्रूची इत्यंभूत माहिती महाराजांना दिली होती. महाराज बहिर्जींनी दिलेल्या सल्ल्यांचा विचार करून पाऊल टाकत असत यावरूनच आपण कल्पना करू शकतो बहिर्जी नाईकांबद्दल. कोणत्याही गुप्तहेर खात्याच्या कामाचे मूल्यमापन त्या कामाची गुप्तता आणि त्यानंतर मिळालेलं यश यावरून केलं जातं. आज आपण इतिहासात डोकावताना शिवरायांच्या सर्व मोहिमांत सहभागी असूनही बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांमार्फत झालेल्या कारवायांबद्दल खूपच कमी माहिती किंवा पुरावे आपल्याला उपलब्ध दिसतील आणि त्यामध्येच त्यांच्या कार्याची महती किती मोठी आहे याचा अंदाज आपण लावू शकतो कारण कोणत्याही प्रकारची आधुनिक साधने नसताना ३००० पेक्षाही जास्त गुप्तहेरांचे जाळे भारतभर विणने आणि तेही कमालीची गुप्तता पाळून ही खरंच अचंबित करणारी गोष्ट आहे. स्वराज्यनिर्मितीपासून शिवरायांसोबत असणारे बहिर्जी नाईक पावलापावलावर गनिमांचा वावर असूनसुद्धा एकदा देखील शत्रूला सापडू शकले नाहीत, यातच बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता व चातुर्य दिसुन येते. बरीच आधुनिक साधने असूनही जिथे आज माहितीची देवाणघेवाण करण्यात आपल्याकडून चूक होऊ शकते तिथे आपण फक्त कल्पनाच केलेली बरी की बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांनी त्याकाळी केलेलं कर्तृत्व किती अफाट आहे. शिवरायांच्या आणि संभाजी महाराजांच्या आयुष्यातील महत्वाच्या कारवायांमधील बहिर्जी नाईकांचा धावता उल्लेख सोडला तर त्यांच्याबद्दल फारच कमी लिहिलं गेलेलं आहे, त्यांपैकीच एक पै. गणेश मानुगडे यांनी लिहिलेली कादंबरी "बाजिंद".

"बाजिंद" ही रायगडाच्या पायथ्याशी टकमक टोकाखालच्या खोल दरीत, घनदाट जंगलात घडलेली, कल्पनेला इतिहासाची जोड देऊन लिहिलेली एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. टकमक टोकावरून दिली जाणारी कडेलोटाची शिक्षा आणि त्यानंतर पायथ्याशी असणाऱ्या धनगरवाडीतील लोकांच्या आयुष्यावर होणारा त्याचा परिणाम यातून जन्म घेणारी ही रहस्यकथा. धनगरवाडीचा कारभारी सखाराम आपल्या तीन विश्वासू साथीदारांसोबत टकमक टोकावरून होणाऱ्या कडेलोटासंधर्भात एक फिर्याद घेऊन रायगडावर शिवाजी महाराजांना भेटण्यासाठी जायला निघतो. घनदाट जंगलातील प्रवासात वाटेत त्यांना नाट्यमयरीत्या सामोरा आलेला खंडोजी हा बहिर्जी नाईकांचा चेला रायगडावर प्रवेश मिळवून देऊन शिवरायांची भेट घालून देण्याचं वचन देऊन त्यांना सोबत घेऊन जायला निघतो आणि इथून सुरुवात होते या रहस्यमय कथेची. त्यानंतर यशवंत माचीचा इतिहास, यशवंत माची स्वराज्यात सामील करून घेण्यासाठी बहिर्जी नाईकांनी उघडलेली एक धाडसी मोहीम, खंडोजी आणि सावित्रीची प्रेमकथा, शिर्के - कदंब यांचे वैर, बहिर्जी नाईकांनी शिर्क्यांवर केलेला हल्ला, चंद्रगडची कथा शिवाय बाजी आणि मुघल सरदार हुसेनखानची कथा, बाजीला अवगत असणारी जंगलातील पशू-पक्षांची भाषा, ती गूढ भाषा अवगत करण्याचं रहस्य यासोबत इतरही अनेक थरारक, धक्कादायक आणि नाट्यमय घटनांची वळणे घेत कादंबरी पुढे सरकत राहते. वाचकाला गुंतवून ठेऊन शेवटपर्यंत उत्कंठा ताणून धरणारी ही कादंबरी जशी बहिर्जी नाईकांच्या अफाट बुद्धीचातुर्याची साक्ष देते तशीच ती शिवरायांनी निर्माण केलेलं स्वराज्य हे सुराज्यही होतं हे पण आपल्याला दाखवून देते.

बहिर्जींनी त्यांच्या आयुष्यात केलेल्या हजारो कारवायांचा विचार करता या एका पुस्तकामधून बहिर्जी नाईक समजून घेणे निव्वळ अशक्य आहे पण तरीही गणेश मानुगडेंनी आपल्यासमोर मांडलेल्या या एका घटनेतून बहिर्जी नाईक आणि त्यांच्या गुप्तहेरांची त्या काळी म्हणजेच ३५० वर्षांपूर्वीची काम करण्याची पद्धत कशी होती याचा अंदाज आपण नक्कीच बांधू शकतो. युद्धाचा थरार, भावनांची गुंतागुंत, प्रखर राष्ट्रप्रेम या सर्वांतून साकार होणारी, बहिर्जी नाईकांच्या काम करण्याची पद्धत कशी होती हे जाणून घेण्यासाठी आवर्जून वाचण्यासारखी पै. गणेश मानुगडे यांची ही कादंबरी "बाजिंद".




संदीप प्रकाश जाधव


एखाद्या ऐतिहासिक ठिकाणाबद्दल वाचल्यानंतर किंवा जाणून घेतल्यानंतर लगेचच त्या ठिकाणाला भेट देण्याचा आलेला अनुभव हा नेहमीच शब्दांत न सांगता येण्यासारखा असतो. "बाजिंद" या कादंबरी वाचनानंतर आज (०८/११/२०२०) असाच योग आला स्वराज्याच्या गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक यांच्या समाधी दर्शनाचा. समाधी दर्शनानंतर जितका अभिमान वाटला तितकंच वाईटही वाटलं या ठिकाणाकडे झालेलं दुर्लक्ष पाहून. स्वराज्य उभारणीत महाराजांसोबत अतिशय महत्त्वाची भुमिका पार पाडणारा हा वीर शिलेदार त्याचे कर्तव्य पार पाडत असताना स्वतःच्या बुद्धीचातुर्याने नेहमीच दुश्मन लोकांच्या नजरेआड रहायचा पण स्वराज्य उभारणीत असणाऱ्या त्यांच्या अमुल्य योगदानानंतर त्यांना आज आपल्याच लोकांनी असे नजरेआड ठेवणं नक्कीच भूषणावह नाही. 







Sunday, November 1, 2020

"चेटकीण"

 




लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


आपल्या लिखाणाने एक काळ गाजवलेले लेखक नारायण धारप. मराठी साहित्यात रहस्यकथा आणि कादंबऱ्यांचे दालन समृध्द करणारे लेखक म्हणून त्यांची अशी एक वेगळी ओळख आहे. भीतीचा अनुभव घ्यायचा असेल तर नारायण धारप यांच्या भयकथा वाचन हा त्यासाठी सर्वात योग्य पर्याय ठरेल. भीतीने अंगावर शहारे येणे म्हणजे काय याची जाणीव धारपांच्या भयकथा वाचताना होते. एखादा अतिशय हॉरर चित्रपट पाहताना जितकी भीती आपल्याला वाटू शकते तितकीच किंबहुना त्याच्यातून थोडी जास्तच भीती धारपांच्या कथांमधून जाणवते आणि याचं कारण म्हणजे त्यांची कथा सांगण्याची पद्धत ज्याद्वारे वाचक त्यामध्ये हरवून जाऊन स्वतःला त्या वातावरणासोबत, त्या घटनांसोबत रिलेट करत राहतो. नारायण धारप यांचे "अघटित" हे मी वाचलेलं पहिलं पुस्तक आणि तो वाचनाचा अनुभवच इतका वेगळा, रोमांचक होता की नकळत त्यांच्या इतरही काही पुस्तकांची यादी बनून गेली. त्यांपैकीच एक अतिशय रहस्यमय आणि गूढतेने खच्चून भरलेली, २०८ पानांची छोटीशीच पण अगदी जवळून भीतीचा अनुभव देणारी कादंबरी "चेटकीण".

कोणत्याही भयकथेसाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे त्या कथेसाठीचे व्यासपीठ अर्थातच ते ठिकाण जिथे अशा कथा जन्म घेतात. आणि कोकण हे नेहमीच अशा कथांसाठी प्रसिद्ध आहे. तर इथेसुद्धा कथानकाची सुरुवात होते आजही रहस्य आणि गूढकथांसाठी ओळखल्या जाणाऱ्या कोकणातून. कोकणातील श्रीवर्धनजवळ, गजबजलेल्या वस्तीपासून दूर असणारी दांडेकरांची वाडी ही या कथेच्या केंद्रस्थानी आहे.  समुद्राला येणाऱ्या भरतीच्यावेळी जगापासून पूर्णपणे संपर्क तुटणारी अशी ही दांडेकरांची वाडी आणि तिथे असणारी दोन घरे. एक ज्यामध्ये गोविंदराव त्यांच्या आईच्या मृत्यूनंतरच्या विधीसाठी आपल्या कुटुंबासोबत रहायला येतात आणि एक जे वर्षांनुवर्षे बंद आहे. कथेची नायिका सोनाली अमेरिकेहून भारतात परतल्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वडिलोपार्जित वाडीमध्ये कुटुंबासोबत राहायला येते आणि इथून सुरू होतो या कादंबरीचा गूढ प्रवास. वाडीमध्ये पहिल्यांदाच आलेल्या सोनालीला त्या बंद घराबद्दल असणारे आकर्षण आणि तिच्या कुटुंबातील प्रत्येकाचे त्या घराबद्दल निघणारा कोणताही विषय टाळत राहणे सोनालीसोबतच एक वाचक म्हणून आपलीही उत्सुकता वाढवत राहते. आजीने लिहून ठेवलेला त्या बंद घराचा इतिहास आणि वर्षांनुवर्षे त्या वाडीवर आजीसोबत राहिलेल्या रखमाकडून मिळालेल्या माहितीतून हळूहळू त्या वास्तूबद्दल उलगडत जाणारी रहस्ये जी सोनालीसोबतच आपलंही कुतूहल वाढवत राहतात. त्या बंद वास्तूमध्ये असणारी एक गूढ शक्ती, तिचे वेगवेगळ्या रुपांमधे लोकांना दर्शन देऊन त्या वास्तूकडे आकर्षित करणे, त्या वास्तूत घडणाऱ्या मानवाच्या आकलनापलीकडच्या आणि आवाक्याबाहेरच्या घटना, या सर्वांचे चित्रण कादंबरीमध्ये वाचत असताना नकळत आपल्याही अंगावर शहारे येत राहतात. कथानकात पुढे काय होणार याची उत्सुकता कायम ठेवून अतिशय रहस्यमय आणि गूढ पद्धतीने पुढे सरकणारी या कादंबरीची कथा ज्यामध्ये भीतीच्या पाशात एखादी व्यक्ती कशी अडकते, तिला येणारे भयानक अनुभव आणि त्यातून भूत-पिशाच्च-क्रूर शक्ती या काल्पनिक जगाचे जाणवणारे अस्तित्व शिवाय दैवी शक्ती किंवा चमत्कारांनी त्यातून होणारी माणसाची सुटका याचे अतिशय रोमांचक वर्णन कादंबरीत आहे. शेवटी त्या गूढ आणि वाईट शक्तींपासून लोकांचे रक्षण करण्याची कला अनुवंशिकतेमुळे आजीकडून सोनालीकडे आल्याचे समजल्यानंतर सोनालीने घेतलेला एक धाडसी निर्णय कादंबरीचा शेवट करतो.

अतिशय चित्तथराक, रोमहर्षक, अकल्पित आणि गुढतेने खचाखच भरलेली, वाचकाला जागेवर खिळवून ठेवणारी, एखाद्या भयपटाला शोभणारी आवर्जून वाचण्यासारखी नारायण धारप यांची कादंबरी "चेटकीण".





संदीप प्रकाश जाधव

Sunday, October 25, 2020

"प्रतिपश्चंद्र"

 





लेखक : डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे

प्रकाशक : New Era Publishing House


फक्त "शिवाजी" हे नाव कधीही, कुठेही ऐकल्यानंतर किंवा वाचल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येणारी पहिली प्रतिमा एकच, आपल्या मनात येणारे पहिले विचार एकच ते म्हणजे "छत्रपती शिवाजी महाराज" यांचे. या नावात जादूच अशी आहे की आजही अगदी ३५० वर्षांनंतरसुद्धा त्यांच्याबद्दल काहीही लिहिलं गेलं तरी ते आपल्याला वाचण्याचा मोह होतोच, अगदी लहानपणापासून आपण त्यांच्या पराक्रमाच्या, शौर्याच्या गोष्टी ऐकत आलो असलो तरी आजही प्रत्येकवेळी त्या ऐकताना, वाचताना ऊर अभिमानाने भरून येतो. शिवरायांच्या नंतर आणि त्यांच्या आधीही अनेक राजे होऊन गेले पण त्यांपैकी किती राजे लोकांच्या आठवणीत आहेत हा एक प्रश्नच आहे. शिवरायांचं एक महान राजा म्हणून असणारं स्थान जितकं त्यांच्या पराक्रम आणि कर्तृत्वामुळे आहे तितकंच किंवा त्याहून थोडं जास्तच ते त्यांच्या चारित्र्यामुळे आहे. अशा या चारित्र्यसंपन्न, पराक्रमी, कर्तृत्ववान राजाच्या आयुष्यावर आजवर अनेक पुस्तके लिहीली गेली, अनेक रहस्यकथा, चित्रपट, कादंबऱ्या लोकांपर्यंत पोहचल्या आणि तरीही समुद्रातून कितीही काढून घेतले तरी कमी न होणाऱ्या पाण्यासारख्या त्यांच्या आयुष्यातील एक एक घटना, पराक्रम आजही लोकांसमोर येतच असतात. शिवरायांच्या आयुष्यात घडलेल्या अशाच एका घटनेचा संदर्भ घेऊन डॉ. प्रकाश कोयाडे यांनी लिहिलेली ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र". जरी शिवरायांच्या आयुष्यातील घडलेल्या एका घटनेची पार्श्वभूमी या पुस्तकाला असली तरी "प्रतिपश्चंद्र" हा काही इतिहास नाही तर इतिहासातील काही दुवे घेऊन रचलेली एक काल्पनिक रहस्यकथा आहे. इतिहासाला थोडाही धक्का न लावता लेखकाचा हा एक कल्पना अविष्कार आहे. "प्रतिपश्चंद्र" जशी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारीत आहे तशीच ती १३ व्या शतकापासून ते २१ व्या शतकाच्या कालखंडात आपल्या भारत भूमीवर घडलेल्या इतिहासाचे धागे पकडून त्याला कल्पनेची जोड देऊन  तयार झालेली एक रहस्यमय कादंबरी आहे. ही कादंबरी म्हणजे कहाणी आहे  छत्रपती  शिवरायांच्या ३२ मणी सुवर्ण सिंहासनाच्या थरारक, रोमांचक शोधाची आणि त्याबरोबरच  दक्षिण भारतातील विजयनगर साम्राज्याचा प्रचंड खजिना जो शिवाजी महाराजांनी संरक्षणाची हमी देऊन बहिर्जी नाईक आणि त्यांच्या शिलेदारांमार्फत ३५० वर्षें वाईट लोकांपासून सुरक्षित ठेवला त्या खजिन्यापर्यंत पोहचण्याचा थरारक, रोमांचक  प्रवास म्हणजे ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र".

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेरप्रमुख बहिर्जी नाईक यांनी राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे ३५० वर्षांपासून बाहेर येण्याची वाट पाहत आहे आणि ते रहस्य उलगडण्यासाठी केलेला थरारक प्रवास म्हणजे ही कादंबरी "प्रतिपश्चंद्र". विजयनगर साम्राज्याचा प्रचंड खजिना शोधण्यासाठी सुरू झालेला या कादंबरीचा प्रवास ४ दिवसानंतर त्या खजिन्यासोबतच शिवरायांच्या ३२ मण सुवर्णसिंहासनाच्या शोधाने संपतो. कोणत्याही रहस्यकादंबरीमध्ये वाचकाने हरवून जाण्यासाठी लेखकाकडून लिहिल्या जाणाऱ्या कथेला एक असं व्यासपीठ लागतं जिथे वाचत असताना वाचकांच्या मनामध्ये पानापानावर प्रश्नचिन्हांची एक साखळी उभी रहावी, वाचक त्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्नात असतानाच एक भांबावून सोडणारा धक्का बसावा आणि त्या धक्क्यातून बाहेर येण्याच्या आतच त्याच्यासमोर होणारा रहस्याचा उलगडा. डॉ. कोयाडे यांची अतिशय थरारक घटनांच्या मालिकेतून पुढे सरकणारी "प्रतिपश्चंद्र" ही कादंबरी म्हणजे अशी बरीच प्रशचिन्हे, रहस्ये आणि एकामागून एक बसणारे धक्के यांनी खचाखच भरलेलं एक व्यासपीठच आहे जिथे वाचक थक्क होऊन हरवून जातो.

डॉ. रवीकुमार हा या कथेचा नायक. कथेचा नायक एक हुशार तरुण, डॉक्टर, अतिशय श्रीमंत कुटुंबात जन्मलेला, अगदी मजेत आयुष्य जगणारा एक तरुण. नागपूरहून एका डॉक्टर परिषदेसाठी औरंगाबादला आपला मित्र आदित्यला सोबत घेऊन आलेला रवी एक दिवस अनपेक्षितपणे एका भोवऱ्यात अडकतो, कादंबरीच्या सुरुवातीलाच तो एका रहस्यात अडकतो पण एकटा नाही तर एक वाचक म्हणून आपल्याला सोबत घेऊनच. पुढे पानापानावर मिळणाऱ्या सांकेतिक संकेतांचे अर्थ शोधत रवीचा आदित्यसोबत एक थरारक प्रवास सुरु होतो आणि पुढच्या ४ दिवसांच्या या सर्व प्रवासात आपण एक वाचक म्हणून त्यांच्यासोबतच प्रवास करत राहतो, अगदी शेवटच्या पानापर्यंत. कारण अनपेक्षितपणे सुरू झालेल्या या प्रवासाचे रहस्य उलगडने जेवढी नायकाची गरज आहे तेवढीच एक वाचक म्हणून आपलीही होऊन जाते. या सर्व थरारक प्रवासासोबत पुढे सरकणाऱ्या या कथेमध्ये अधून मधून इतिहासात डोकावून तिथले संदर्भ देत असताना कोयाडे यांनी वाचक कुठेही न हरवता, त्याचा कुठेही गोंधळ न उडता तो कथेसोबतच जोडला राहील याची पुरेपूर काळजी घेतली आहे. या थरारक घटनांना असणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजावून सांगण्यासाठी इतिहासात डोकावत असताना बऱ्याच गोष्टींची अगदी सविस्तर माहितीसुद्धा लेखकाने कादंबरीमध्ये दिलेली आहे जसे भारतातील प्राचीन वैभव, विजयनगर साम्राज्य आणि त्यांचा इतिहास, हम्पी आणि त्याठिकाणची प्रसिद्ध स्थळे, प्राचीन गडकिल्ले, वेरुळच्या लेण्या, जगप्रसिद्ध कैलास मंदिर, चिंदबरम येथील नटराजाची मुर्ती, मुंबई - औरंगाबाद शहर, निळावंती ग्रंथ, ऐतिहासिक सांकेतिक भाषा, गौतम बुद्ध, प्राचीन शिल्पकला, घृष्णेश्वर मंदिर, शिवाजी महाराज वास्तू संग्रहालय, छत्रपती शिवाजी महाराजांची दक्षिणदिग्विजय मोहीम, महाराजांचे सुवर्णसिंहासन, बहिर्जी नाईक यांची बुद्धिमत्ता आणि बरंच काही. फक्त इतिहास व रहस्य या मध्ये अडकून न राहता एक सुंदर प्रवास वर्णनसुद्धा कादंबरीमध्ये आहे. यासोबतच नायकाला या थरारक प्रवासात साथ देणारे आदित्य, प्रियल, प्रशिक, ज्योती आणि सुर्यकांतराव यांची श्रद्धा, देव,भक्ती, आस्तिक - नास्तिक, ग्रह, तारे, ते अगदी विष्णूचा दशावतार आणि डार्विनच्या मानवाच्या उत्क्रांतीच्या सिद्धांतापर्यंत अगदी सोप्या भाषेत रवीसोबत होणारी चर्चा वाचकाच्या ज्ञानात नक्कीच भर घालते. नायकाला शेवटपर्यंत साथ देणारा त्याचा मित्र आदित्य आणि त्यांचे सवांद लाजवाब आहेत. कादंबरी वाचायला चालू केल्यानंतर पुढे काय होणार या उत्सुकतेमुळे ती पूर्ण वाचून झाल्याशिवाय खाली ठेवणे अवघड आहे.

शेवटी सापडलेल्या त्या अफाट खजिन्यात रवीला जेव्हा जरीकापडात गुंडाळलेली महाराजांची कवड्यांची माळ आणि भगवा नजरेस पडतो तेव्हा रवीसोबतच एक वाचक म्हणून अभिमानाने आपलाही ऊर भरून नाही आला तरच नवल. खजिन्यापाठोपाठ सापडलेल्या महाराजांच्या सुवर्णसिंहासनावर कवड्यांची माळ अर्पण करून होणारा या कथेचा शेवट. हातात पडलेल्या कवड्यांच्या माळेसमोर त्या अफाट खजिन्यालासुद्धा तुच्छ माननारा रवी हेच सिद्ध करतो की आज ३५० वर्षें होऊनपण महाराजांबद्दल असणारा अभिमान, आदर थोडाही कमी झालेला नाही. आणि याचे कारण म्हणजे, शिवनेरीहून सुरू होऊन रायगडावर शेवट झालेला तो केवळ शरीराचा प्रवास कधीच नव्हता. शिवराय हा एक विचारांचा प्रवास आहे ज्याचा शेवट कधीच नाही होऊ शकत.

मुरलीधर खैरनार यांच्या "शोध" या रहस्यमय कादंबरीनंतर वाचनात आलेली ही आणखी एक उत्कृष्ट कादंबरी. अतिशय उत्कंठावर्धक, रोमांचक, थरारक आणि वाचत असताना लागलेल्या आपल्या तंद्रीला धक्क्या मागून धक्के देत एक एक रहस्य उलगडत जाणारी आवर्जून वाचण्यासारखी डॉ. प्रकाश सूर्यकांत कोयाडे यांची ही रहस्यमय कादंबरी "प्रतिपश्चंद्र".





संदीप प्रकाश जाधव

Sunday, October 18, 2020

"राधेय"


लेखक : रणजित देसाई

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस


शिवाजी सावंत यांच्या "मृत्युंजय" या कादंबरीत मी कर्ण वाचला होता पण तरीही खूप लोकांकडून रणजित देसाईंच्या "राधेय" या कादंबरीबद्दल ऐकत-वाचत आल्याने आणि खासकरून pustakexpress.com मधे कादंबरीबद्दल वाचल्यानंतर "राधेय" वाचण्याचा मोह टाळता नाही आला आणि त्यामुळेच एक अतिशय दर्जेदार पुस्तक संग्रही आले.

मराठी साहित्यातील सर्वांना परिचित नाव रणजित देसाई. श्रीमानयोगी, लक्ष्यवेध, मेखमोगरी या पुस्तकांनंतर रणजित देसाईंच्या राधेय या कादंबरी वाचनाचा अनुभव शब्दांत न सांगता येण्यासारखा. त्यांचं कोणतंही पुस्तक वाचताना नकळतपणे वाचकाचे त्या काळात जाणे हे त्यांच्या लिखाणाचे वैशिष्ट्य. कादंबरीकार रणजित देसाईंची अशीच एक सुंदर कादंबरी "राधेय". दानशूर, शूरवीर अशी ख्याती असणाऱ्या कर्णाच्या आयुष्याचे अतिशय उत्कृष्ट वर्णन म्हणजे ही कादंबरी. कर्णाचे आचरण करायचं असेल तर कर्ण समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि कर्णाला समजून घेणं जितकं कठीण आहे तितकंच ते सोपंसुद्धा आहे. त्याचं कारण म्हणजे कर्णाची कथा जितकी ती कर्णाची तितकीच ती आपलीही, प्रत्येकाच्या मनात एक कर्ण दडलेला असतो. आणि तो समजून घेण्यासाठी महाभारताची पाने वाचण्याची गरज नाही. आपल्या मनाचीच चार पाने पालटली तर प्रत्येकाला स्वतःमध्ये एक कर्ण दिसेल. हीच गोष्ट डोळ्यासमोर ठेऊन रणजित देसाईंनी लिहिलेली ही एक अजरामर कादंबरी "राधेय". महाभारतातील उपेक्षित पात्रांपैकी एक पात्र म्हणजे कर्ण. ज्येष्ठ कौंतेय असूनही ज्याला आपले आयुष्य राधेय म्हणून जगावे लागले असा महारथी कर्ण. क्षत्रिय कुळातील असूनसुद्धा नियतीमुळे ज्याला नीच कुळातील वागणूक सहन करावी लागली असा हा कर्ण. साक्षात सुर्यपुत्र असूनही जो सूतपुत्र म्हणून लहानाचा मोठा झाला असा कर्ण . ज्याच्या कर्तुत्वापुढे साक्षात इंद्रालासुद्धा याचकांच्या रांगेत उभं राहावं लागलं असा श्रेष्ठ दानवीर. पांडवांसोबतच्या युद्धात मृत्यू डोळ्यासमोर असूनही ज्याने मैत्रीसाठी, निष्ठेसाठी मृत्यूला कवटाळले असा मित्र . कर्तृत्व आणि दातृत्व ज्याच्या ठायी ठायी वसलं आहे असा महापराक्रमी, दिग्विजयी राजा. अशा कर्णाची कथा म्हणा अथवा व्यथा म्हणजेच रणजित देसाईंची ही कादंबरी "राधेय".

कादंबरीची सुरुवात चंपानगरीत झालेल्या कृष्ण आणि कर्ण यांच्या भेटीपासून होते. नंतर पुढे महाभारतातील एक एक घटनांमधून उलगडत जाणारे कर्णाचे आयुष्य. द्रौपदी स्वयंवर , इंद्रप्रस्थ राज्याची स्थापना, राजसूय यज्ञ, कौरव-पांडवांचा द्यूत, द्रौपदी वस्त्रहरण, पांडवांचा वनवास अशा घटनांचा उल्लेख करत पुढे सरकणारे कथानक. कादंबरी कर्णाला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली असल्याने या सर्व घटनांचा कर्णाच्या आयुष्यावर कसा प्रभाव पडतो हे आपल्याला समजण्यापुरताच त्यांचा पसारा रणजित देसाईंनी मर्यादित ठेवला आहे. पण तरीही लेखक वाचकाला त्या काळात घेऊन जाण्यात कमालीचे यशस्वी झालेत. आयुष्यभर उपेक्षित राहिलेल्या कर्णाचा दातृत्व गुण जरी सर्वांना माहित असला तरी एक सुतपुत्र म्हणून जगताना त्याचा जीवन प्रवास किती खडतर, वेदनामय होता हे या कादंबरीमध्ये आपल्याला वाचायला मिळेल. सर्वश्रेष्ठ योद्धा असूनसुध्दा सुतपुत्र म्हणून पावला पावलावर सहन करावा लागणारा अपमान, जन्मतःच मातृप्रेमाला पारखा झाल्यामुळे आपल्या जन्माचे रहस्य माहीत नसल्याने त्याच्या मनाची होणारी अवस्था अशा अनेक गोष्टी वाचताना नकळतपणे आपणसुध्दा कर्णाच्या भूमिकेत जातो. आपण ज्येष्ठ कौंतेय आहोत हे कळल्यानंतर फक्त दुर्योधनासोबतच्या मैत्रिखातर, त्याच्याशी असलेल्या निष्ठेसाठी राधेय राहण्यात समाधान मानणाऱ्या, आपल्या दातृत्वाला धर्म मानून आपली कवच कुंडले देखील इंद्राला बहाल करणाऱ्या, कौरवांचा पराजय निश्चित आहे आणि होणाऱ्या युद्धात आपला मृत्यू अटळ आहे हे माहीत असुनसुद्धा खऱ्या अर्थाने वीर योध्यासारखा लढणारा कर्ण आपल्याला महाभारतातील सर्व पात्रांहून खूप मोठा, महान वाटायला लागतो. धर्म आणि अधर्मातील फरक बऱ्याच घटनांमधून उदाहरणासहित आपल्याला कादंबरीमध्ये वाचायला मिळेल. कादंबरीचा शेवट जसा जवळ येतो तसं नकळतपणे आपलं मन कर्णासाठी हळवे होते, काही काही घटना कादंबरीमध्ये वाचताना नकळतपणे डोळे भरून येतात.

कादंबरी वाचून झाल्यानंतर कितीतरी वेळ आपल्या डोक्यातून न जाणारी एक गोष्ट, कौरव-पांडवांचे युद्ध टाळण्यासाठी नात्यांची जी आठवण कृष्णाने, कुंतीने, भीष्माने कर्णाला करून दिली तीच आठवण तितक्याच सहजपणे पांडवांना का नाही करून दिली आणि जर ती करून दिली असती तर हे विनाशकारी युद्ध झाले असते का? कादंबरी वाचल्यानंतर आपले मन कर्णासाठी हळवे झाले नाही तर नवल. जन्मजात कुळाने नाही तर आपल्या कर्तृत्वाने स्वतःला सिद्ध करणारा कर्ण शेवटी आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवून जातो.

कादंबरीतील काही आवडलेली वाक्ये :

  • '‌या जगात अचानक असं काही घडत नाही. आपल्याला मागचा पुढचा संदर्भ माहीत नसतो, म्हणून ते अचानक भासतं'.
  • 'जिंकण्यानं, विजयानं पराक्रम सिद्ध होत नसतात. पराजय सोसण्यातही पराक्रम असतो'.
  • 'ढळलेली मनःशांती, हरवलेलं स्वप्न आणि गेलेला जीव प्रयत्नसाध्य नसतो'.
  • 'बसल्या जागी न्यायनीतीच्या वल्गना करून न्यायनीतीचा विस्तार होत नसतो. कैकवेळा त्याच बुरख्याखाली अनीती नांदत असते'.
  • 'जुगार आणि चारित्र्य या दोन अशा गोष्टी आहेत की यांत पाय टाकण्याआधी विचार करावा. नंतर पाय माघारी घेता येत नाही'.
  • 'कीर्तीचा अहंकार जिवंत असेपर्यंतच भोगता येतो'.
  • 'माणसं जातात, माघारी राहतं ते त्यांचं आसन. माणसानं एवढं कीर्तिवंत व्हावं की त्याच्या माघारी त्याचं आसन बराच काळ तसंच मोकळं राहावं'.
  • 'मर्यादेनं ज्ञात असलेलं ज्ञान माणसाला वरदायी ठरतं, पण अमर्यादेतून अवतरलेलं ज्ञान माणसाला विनाशाकडेच नेतं'.
  • 'मरणापेक्षा वृद्ध होत जाणं कठीण. मृत्यूबरोबर सारं संपून जातं. पण वृद्ध होत जाणं म्हणजे रोज काही ना काही त्याग करणं'.
  • 'धर्म, पांडित्य हे दुसऱ्यांना सांगायला सोपं, पण ते स्वतः आचरणात आणणं भारी क्लेशकारक'.
  • 'सारेच घाव लेपणानं बरे होत नसतात, काही घाव आयुष्याच्या अखेरपर्यंत तसेच राहतात'.
  • 'जीवनाचे बंध तोडता येतात तसे नियतीचे बंध तोडता येत नाहीत'.

कर्ण जाणून घेण्यासाठी, स्वतःतील कर्णाचा शोध घेण्यासाठी प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी रणजित देसाईंची कादंबरी "राधेय".





संदीप प्रकाश जाधव


Sunday, October 11, 2020

"घर हरवलेली माणसं"

 



लेखक : व. पु. काळे

प्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाऊस

वसंत पुरुषोत्तम काळे म्हणजेच व.पु.काळे. मराठी साहित्यविश्वात वपु या नावाने ओळखले जाणारे अजरामर लेखक व.पु. काळे. वपु हे नाव ऐकले नसणारा किंवा वपुंचे लेखन माहीत नसणारा मराठी साहित्यविश्वातील माणूस मिळणे तसा दुर्मिळच. आपल्या लिखाणातून जगण्याचं तत्त्वज्ञान सोप्या पण तितक्याच रंजक पद्धतीने लोकांना सांगणारे थोर साहित्यिक म्हणून व.पु.काळे यांचे असे एक वेगळे स्थान मराठी साहित्यविश्वात आहे. पेशाने आर्किटेक्ट असल्याने त्यांना शब्दांचे महाल बांधणारा लेखक म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. ४० वर्षांमध्ये ६० हून अधिक पुस्तके लिहिलेल्या वपुंच्या  पुस्तकांचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे लिखाण हे आपल्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या घटनांशी साधर्म्य दाखवणारे असते त्यामुळे वाचक त्यामध्ये हरवून जातो. बऱ्याच कथा कादंबऱ्या लिहिलेल्या वपुंची मी वाचलेली इतर पुस्तके "पार्टनर" आणि "वपुर्झा". ही दोन्ही पुस्तके वाचण्याचा अनुभवसुद्धा शब्दांत न सांगता येण्यासारखा. वाचता वाचता लाईफची फिलॉसॉफी शिकवणारे "पार्टनर" आणि कोणत्याही पानावरचे अगदी कोणतेही वाक्य वाचले तरी पुनःपुन्हा वाचण्याचा मोह न टाळता येणारे "वपुर्झा". वपुंच्या या आणि अशा अनेक पुस्तकांच्या पंगतीमधील आणखी एक सुंदर लेखन म्हणजे "घर हरवलेली माणसं". वपुंचे हे पुस्तक म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आयुष्यात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांचा एक कथासंग्रहच.

वपुंची कथा सांगण्याची पद्धत अतिशय भन्नाट आहे. आपण वाचन करता करता त्या कथांमध्ये अडकत जातो आणि आपले विचारचक्र सुरु होतच असते तोपर्यंतच ते आपल्याला कथेच्या शेवटी घेऊन येऊन ओपन एण्डेड, ओपन माईंडेड सोडून देतात आणि वाचक म्हणून आपण विचार करत राहतो की हे 'असे झाले असते तर' किंवा हे 'तसे झाले असते तर'. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच कथेत उतरल्यामुळे आपण नकळत त्या कथा रिलेट करत राहतो. "घर हरवलेली माणसं" या पुस्तकातील प्रत्येक कथासुद्धा याला अपवाद नाही. आपल्या आसपास राहणारे संसारी लोक आणि त्या संसारी स्त्री-पुरुषांना पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची उत्तरे शोधणाऱ्या किंवा एक वाचक म्हणून आपल्याला ते शोधायला भाग पडणाऱ्या अशा या पुस्तकातील कथा. रोजच्या जगण्यात दु:खाशिवाय काहीच नाही आणि पावलापावलावर ज्यांच्या स्वप्नांना तडे जाताहेत पण तरीसुध्दा जीवनातील कोडे सोडवण्याचा प्रयत्न करणारी माणसं या पुस्तकात आपल्याला वाचायला मिळतील. त्याचप्रमाणे जगणं हे फार शुल्लक मानून स्वतःच्या जगण्याची मनमानी करून इतरांच्या जगण्याला चरे पाडणारी माणसंसुद्धा या पुस्तकात आहेत. घराच्या प्रत्येक कोपऱ्यात एक आयुष्य असतं आणि हे ज्याला समजतं तो ते जगायचा, जपायचा प्रयत्न करत असतो. अशाच लोकांच्या कथा म्हणजे हे पुस्तक.  पुस्तकातील प्रत्येक कथेतील नायक किंवा नायिका दोन प्रकारच्या आयुष्याचे प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतील. एक ज्यामध्ये  ते आपल्या जगण्यासाठी जिवंत घर शोधताना दिसतात तर दुसरे ज्यामध्ये ते आपल्या संसाराची, घराची विण उसवू नये याकरिता जीवाचं रान करताना दिसतात. आपल्याला किती आयुष्य मिळेल हे जरी कोणी सांगू शकत नसले तरी प्रत्येक व्यक्तीची असणारी इच्छा म्हणजे जे काही आयुष्य वाट्याला आले आहे ते आनंदात जगता यावे अशाच लोकांना समोर ठेऊन लिहिलेल्या या पुस्तकातील कथा. पण असं आयुष्य जगायला घरपण असणारं घर असणं महत्वाचं आहे. जरी प्रत्येकाच्या वाट्याला असं घर येत नसलं तरी नियती त्याला ते शोधण्याचे बळ नक्कीच देत असते. काहींचा शोध पूर्ण होतो तर काही वपुंच्या या पुस्तकातील "घर हरवलेली माणसं" होऊन जातात.

पुस्तकातील काही आवडलेली वाक्ये :-

  • ‌'उमरभर जिंदा रहा मगर जिंदगी देखी नही'
  • ‌'ज्यांना शब्दातली शक्ती नाही समजली, त्यांच्या कहाण्या कारुण्याने भरल्या आहेत'
  • ‌'काहीतरी लपवायचं असलं म्हणजे फार हसावं लागतं'
  • ‌'माणसाला बळ देतं ते दुसरं माणूसच'
  • ‌'कागदाच्या आहारी गेलेली यंत्रणा, दारूच्या आहारी गेलेल्या माणसांपेक्षा भयाण. फार म्हणजे फार जपावं लागतं'
  • ‌'कायम दुःखाच्या सावटाखाली असणारी आपल्यापेक्षाही अधिक सुखी असतात'
  • 'माणसं अकारण घोळ माजवतात आणि मुळातच वेगानं संपणारं आयुष्य आणखी कमी करतात'
  • 'स्वार्थी आणि निष्क्रिय माणूस जास्त चांगलं तत्वज्ञान सांगू शकतो'
  • 'पुष्कळदा सुखाची लाट भरतीसारखी आपण बेसावध असताना चिंब करून टाकते. त्यातलं काय लुटायचं ह्याचं आकलन होण्यापूर्वी ती लाट ओहोटीप्रमाणे दूर गेलेली असते'

शेवटी पुस्तकातील सर्व कथा वाचून होणारी जाणीव, घर कितीही मोठं असो ते घर तेव्हाच बनतं जेव्हा त्या घराला घरपण देणारी माणसं त्या घरामध्ये राहत असतात. खास वपुंच्या लेखनासाठी आवर्जून वाचावे असे पुस्तक "घर हरवलेली माणसं".





संदीप प्रकाश जाधव

Sunday, October 4, 2020

"बलुतं"


                                                       

लेखक : दया पवार

प्रकाशक : ग्रंथाली प्रकाशन


मराठीतील लिहिले गेलेलं पहिलं दलित आत्मकथन म्हणजे  दया पवार यांचं हे पुस्तक "बलुतं". यानंतर बऱ्याच आत्मकथा लिहिल्या गेल्या पण १९७८ साली लिहिलेलं हे आत्मकथन दलित समाजाचे अतिशय खडतर जीवन आजही तितक्याच प्रखरपणे वाचकांसमोर घेऊन येते. पूर्वापार चालत आलेली जातीव्यवस्था, दारिद्र्य यांतून येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करत स्वतःचे असे वेगळे विश्व निर्माण करणाऱ्या 'दगडू मारुती पवार' म्हणजेच 'दया पवार' यांची ही वाचकाला आतून-बाहेरून हलवून सोडणारी आत्मकथा "बलुतं". आज एक कवी, साहित्यिक,  विचारवंत म्हणून लोकांमध्ये ओळखले जाणाऱ्या लेखकाचा दगडू पासून दया पर्यंतचा प्रवास म्हणजेच हे आत्मकथन "बलुतं".

जातीव्यस्थेमुळे म्हणा किंवा हिंदू समाजव्यवस्थेमुळे म्हणा जन्मतःच लेखकाच्या पदरी बांधलं गेलेलं हे दुःखाचं "बलुतं". महार जातीच्या आई-वडिलांच्या पोटी जन्म घेतला हा दगडूचा मुख्य अपराध. आपल्या देशात जातीचा एकप्रकारचा अदृश्य शिक्का आपल्या जन्मतःच बसलेला असतो. पु. ल. देशपांडेंनी लिहिल्याप्रमाणे " हिंदू धर्मात हा शिक्का पुसून दुसऱ्या जातीचा शिक्का उठवून घेण्याची हिंदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाचीही आज्ञा नाही. ब्राम्हणाला कायस्थ होता येत नाही आणि साळ्याला माळी. एकही वेद न येणाऱ्या ब्राम्हणाला सुद्धा कधी कधी ऋग्वेदी, यजुर्वेदी ब्राम्हण हा शिक्का बसला की तो मेल्यानंतरही कायम राहतो". हिंदू समाजात दलित वगळता इतर जातींचा शिक्का असलेल्या मुलाचे पूर्ण जीवन तितकेसे विद्रूप नाही होत पण जर अस्पृश्य जातीच्या आई-वडिलांच्यापोटी कोणी जन्माला आलाच तर सारे संपलेच असे समजावे. त्याचे किड्या-मुंगी सारखे जगावे लागणारे जीवन आणि वाचकाला पानापानावर अस्वस्थ करणाऱ्या घटना म्हणजे हे दया पवारांचे आत्मकथन "बलुतं".

अतिशय प्रखर अशा वास्तवाचे जवळून दर्शन घडवणारे हे दया पवारांचे आत्मकथन वाचताना मन सुन्न करून टाकणारी जाणीव म्हणजे दलित समाजाचे जीवन हे केवळ आर्थिक दारिद्र्यामुळे आलेले नसून आपली समाजव्यवस्थाच त्याला पूर्णपणे कारणीभूत आहे. फक्त दारिद्र्यामुळे आलेले आयुष्य सगळेच मध्यमवर्गीय जगत, सोसत असतात पण भयानक दारिद्र्यासोबतच आपल्या समाजव्यवस्थेने अस्पृश्यांवर जे हीनत्व लादलेले आहे त्याचा या आत्मकथनामुळे येणारा प्रत्यय वाचकाला हादरवून टाकतो. अस्पृश्यांना त्यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत आणि नंतर दहन असो वा दफन, पावलापावलावर दिली जाणारी जनावरापेक्षाही भयंकर वागणूक दयाच्या लेखणीतून वाचताना मन गलबलून जाते. स्पृश्य आणि अस्पृश्य जरी एकाच मानवजातीचा भाग असले तरी स्वतःला स्पृश्य समाजणाऱ्यांनी जातिव्यवस्थेच्या नावाखाली मारलेला अस्पृश्यतेचा शिक्का एखाद्याच्या आयुष्याच्या चिंध्या कसे करून टाकतो हे "दगडूच्या" या आत्मकथनातून "दयाने" आपल्याला दाखवून दिले आहे. अस्पृश्य हा शिक्का बसलेली व्यक्ती हा जणू काही माणूसच नाही असे समजून वागणाऱ्या "सुसंस्कृतपणाची" कीव करावी वाटते. खेड्यात आणि मुंबईत दोन्हीकडे लहानाचा मोठा झाल्यामुळे दोन्हीकडचे आयुष्य जगलेला हा दगडू, पण शहर असो वा खेडे दोन्हीकडे अस्पृश्यांना दिली जाणारी वागणूक कशी सारखीच आहे याची अनेक उदाहरणे पुस्तकात वाचत असताना वाचकाला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे एक माणूस म्हणून खेड्यापासून-शहरापर्यंत आपण केलेली प्रगती किती तकलादू आहे.

आपल्याला काल्पनिक वाटणाऱ्या कितीतरी घटना दगडूने अनुभवल्या आहेत याची काही उदाहरणे म्हणजे दारूच्या पूर्ण आहारी गेलेल्या दगडूच्या रसिक वडिलांकडून त्याला चोरीचा माल विकायचे शिक्षण मिळत असताना त्याच वेळी दगडू शाळेत 'बरे सत्य बोला' शिकत असतो. आणखी एक उदाहरण दगडूच्या जमनामावशीचे. देवाधर्माच्या नावाखाली दरिद्री आई-वडीलांनी यल्लमा देवीला वाहिलेल्या पोरांची पुढे वेश्या बाजारात विक्री होत असते आणि हेच आयुष्य जगणारी, वेश्याव्यवसाय करणारी दगडूची ही मावशी. वेश्याबाजारात पिंजऱ्यात बांधून ठेवलेल्या जमनामावशीचे दगडू साठी खाऊ हातात धरून त्याची वाट पाहणे, त्याच्यासोबत वेळ घालवून आपली वात्सल्याची भूक भागवणे आणि त्यानंतर बऱ्याच वर्षांनी तीच मावशी जेव्हा दयाला दादरच्या पुलाखाली भिकाऱ्यांच्या घोळक्यात भिक मागताना दिसते तेव्हा तिच्याशी साधा संवादही न करू शकणारा दया या घटना कितीही फिल्मी वाटल्या तरी लेखकांनी स्वतः अनुभवलेल्या आहेत. शिक्षणाशिवाय दलित समाजाची या सर्व जाचातून मुक्ती नाही होणार हे ओळखून आंबेडकरांनी दलितांसाठी शिक्षणसंस्था उभारल्या. बरेच दलित संघर्ष करून त्यातून शिक्षण घेऊन पुढे आले पण नंतर एक नवीनच पांढरपेशा दलित तयार झाला. जो आपल्याच अशिक्षित आणि पूर्णपणे दलित असणाऱ्या बांधवांपासून दूर जात गेला या नवीन वास्तवाचं दर्शन सुद्धा आपल्याला "बलुतं" मध्ये पाहायला मिळेल.

आपल्या विचित्र समाजव्यवस्थेविरुद्ध अतिशय चीड निर्माण करणारी या आत्मकथेतील एक घटना म्हणजे दयाला व्हेटर्नरी कॉलेजमध्ये क्लार्क-कम-लॅब-असिस्टंट म्हणून मिळालेली नोकरी. पूर्ण महाराष्ट्रातून येणाऱ्या आजारी जनावरांच्या शेणाचे नमुने वेगळे ठेऊन तपासणे, मेल्यानंतर त्यांची कातडी सोलने अशी कामे करण्यास कोणी उच्चवर्णीय तयार नसल्यामुळे दयाला मिळालेली ही नोकरी. त्यावेळी दयाला पडलेला प्रश्न 'इतके शिकून पण आपल्या वाट्याला हे वडिलोपार्जित कामच का यावे?' या नोकरीसोबतच आपले शिक्षण चालू ठेऊन दया पवार घडत गेले. आपल्यावरील अस्पृश्यतेचा शिक्का पुसण्याचा प्रयत्न म्हणून दलित चळवळीत भाग घेतला पण तिथेसुद्धा त्यांना थोड्याफार फरकाने वेगळ्या वागणुकीचे अनुभव येतच राहिले. पुढे १९९० साली पश्चिम रेल्वेतून सिनिअर ऑडितर या पदावरून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली.

अत्यंत साध्या शब्दांत लिहिलेली आणि वाचकाला हादरवून टाकणाऱ्या बऱ्याच घटनांनी भरलेली ही आत्मकथा आपल्याला वास्तवाचे जवळून दर्शन घडवून आणते. लेखकाचा "दगडूपासून" सुरू झालेला आणि "दयापर्यंत" येऊन संपलेला या आत्मकथनातील प्रवास वाचल्यानंतर आपण माणुसकीच्या आणखी जवळ जाऊन जगायचा नक्कीच विचार करतो. एक माणूस म्हणून वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडणारे दया पवारांचे आवर्जून वाचण्यासारखे हे आत्मकथन "बलुतं".




संदीप प्रकाश जाधव


Sunday, September 27, 2020

"अघटित"

 


लेखक : नारायण धारप

प्रकाशक : साकेत प्रकाशन


रहस्यकथा, भयकथा लेखनातील एक वजनदार नाव आणि ज्यांचे लेखन आवर्जून वाचावे अशा मोजक्याच लेखकांपैकी एक लेखक म्हणजे नारायण धारप. आपल्या खास लेखनशैलीने, रहस्यमय लेखनाने एक काळ गाजवणारे नारायण धारप. रहस्य कथांचा एक भाग बनून, पुढे काय होणार या उत्सुकतेने वाचक कथेमध्ये शेवटपर्यंत गुंतून राहील अशा रितीने लिहिलेल्या त्यांच्या थरारक कथा वाचकांना एक वेगळाच रोमांचक अनुभव देतात. त्यांच्या रहस्यकथा वाचल्यानंतर मनावर एक गडद सावट पडून वाटणारी भीती आणि तरीसुध्दा नवीन कथा वाचायची उत्सुकता हे त्यांच्या कथांचे वैशिष्ट्य. त्यांचे गाजलेले काही कथासंग्रह चंद्राची सावली, चेटकीण, अंधारयात्रा, लुचाई, काळी जोगीण, वेडा विश्वनाथ, मृत्यूजाल, विधाता आणि इतरही बरीच. धारपांच्या  भयकथांपासून प्रेरणा घेऊन निर्माण केलेला "तुंबाड" सिनेमा बऱ्याच लोकांनी पहिला असणार, त्या कथेच्या मंडणीवरुनच धारपांच्या कल्पनाशक्तीचा अंदाज आपण लावू शकतो. नारायण धारप यांच्या अशाच ७ दर्जेदार भयकथांचा संग्रह म्हणजे हे पुस्तक "अघटित".

माणसाचं जीवन खूप गुंतागुंतीनी भरलेलं आहे. आपल्या आयुष्यात कोणत्या क्षणी काय होईल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही. खरं तर आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही अचंबित करणा-या घटना घडत असतात ज्यांची आपण कधी कल्पनासुद्धा केलेली नसते. आपण काही तरी वेगळीच अपेक्षा करीत असतो आणि घडते नेमके त्याच्या उलटेच. वेगळं काही तरी करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू असतात आणि अचानकपणे असं एखादं वळण येतं, की आपण मांडलेला सारा डाव एका क्षणात विस्कटून जातो. काय होत आहे ते आपल्याला कळण्याच्या, ते आपण समजून घेण्याच्या आधीच सर्व काही घडून गेलेलं असतं. "हे असं कसं घडलं?" हा प्रश्न आपण आपल्यालाच आश्चर्यचकित होऊन विचारत राहतो. अशावेळी एकूण घटनाक्रमच आपल्या तर्काच्या पलीकडे जाणारा असतो. कशाचा म्हणून काही अंदाज करता येत नाही. विचार करून आपलं डोकं बधीर होऊन जातं आणि तरीही आपल्याला घडलेल्या घटनांचा काहीच मेळ लागत नाही. कारण त्या घटनाच अशा अकल्पित, अगम्य आणि आपल्या कल्पनेपलीकडच्या असतात. आपली विचारशक्ती जिथे संपते तिथून त्या घटना सुरू होत असतात. अशावेळी आपण सारेच त्या काळाच्या, नियतीच्या हातातील बाहुले होऊन जातो. शेवटी एका पातळीवर जाऊन आपण हे सत्य स्वीकारतो पण तरीही दुस-या पातळीवर मात्र आपण विचार करीत असतो, शोध घेत असतो, "हे असं कसं घडलं?" कारण ते सर्व अघटित असतं. अशा अनेक थरारक आणि रोमहर्षक असलेल्या अकल्पित, अघटित घटनांनी भरलेला नारायण धारप यांचा हा कथासंग्रह "अघटित".

७ कथांच्या या पुस्तकातील कथा वाचत असताना त्या थोड्याफार प्रमाणात एकाच प्रकारच्या जरी वाटत असल्या तरी प्रत्येक कथेची मांडणी वेगळी आहे, विषय वेगळा आहे जे वाचकाला कथेमध्ये बांधून ठेवतात. पुढे काय होईल हे अपेक्षित असूनसुद्धा पुस्तक हातातून सोडवत नाही. वाचकाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणाऱ्या अशा कथा. प्रत्येक कथेमध्ये असणारे नायक किंवा नायिका यांच्यासोबत घडणाऱ्या तर्कापालिकडच्या घटना आणि त्यातून निर्माण होणारे, अंगावर सरसरून काटा आणणारे भय वाचकांपर्यंत पोहचवताना धारपांनी कुठेही अतिशयोक्ती होणार नाही याचीही तितकीच काळजी घेऊन लिहिलेल्या या कथा. 

भयकथांची आवड असणाऱ्यांना नारायण धारप हे नाव आणि त्यांचे लेखन वेगळ्याने सांगायची आवश्यकता नाही पण इतरांनीसुद्धा एक वेगळं वाचन, एक वेगळा अनुभव म्हणून आवर्जून वाचावे अशा धारपांच्या पुस्तकांपैकी एक पुस्तक "अघटित".




संदीप प्रकाश जाधव




Sunday, September 20, 2020

"समांतर"

 



लेखक : सुहास शिरवळकर

प्रकाशक : दिलीपराज प्रकाशन


सुहास शिरवळकरांची "दुनियादारी" ही कादंबरी मी १४ वर्षांपूर्वी वाचली होती. चित्रपटाच्या माध्यमातून या कादंबरीची कथा बऱ्याच लोकांपर्यंत पोहचली, पण पुस्तकामध्ये कादंबरीरूपात सुशिंच्या लेखनातून उलगडत जाणारी "दुनियादारी" वाचण्याचा अनुभव खासच होता. आयुष्यात वाचलेली ही माझी पहिलीच कादंबरी आणि जिथून पुस्तक वाचनाला खरी गती मिळाली. त्यानंतर आजअखेर बऱ्याच लेखकांची पुस्तके वाचून झाली पण सुशिंचे एखादे पुस्तक वाचायचा योग इतक्या वर्षांनंतर पुन्हा आला तो "समांतर" या सुशिंच्या कादंबरीवर आधारीत वेब सिरिजमुळे. या वेब सिरीजची माध्यमांमध्ये जी चर्चा चालू होती त्यामुळे ती पाहण्याची खूप इच्छा होती पण "दुनियादारीच्या" असणाऱ्या अनुभवामुळे तो मोह टाळून मी पहिला पुस्तक वाचायचा निर्णय घेतला आणि तो निर्णय किती योग्य होता हे कादंबरी वाचनास सुरुवात केल्यानंतर जाणवले. आपल्या आयुष्यात भविष्यकाळात काय वाढून ठेवलंय याची कोणालाच कल्पना नसते पण तरीही अशी एकही व्यक्ती नाही सापडणार जीला आपले भविष्य जाणून घेण्याची इच्छा नसेल. याच इच्छेखातर आणि उत्सुकतेमुळे आपण कधी वर्तमानपत्रात तर कधी एखाद्या ज्योतिष्याकडे आपले भविष्य जाणून घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत असतो. याच विषयावर आधारीत सुहास शिरवळकरांनी लिहिलेली ही १९६ पानांची, वाचकाला एका वेगळ्याच जगात घेऊन जाणारी, भविष्याचा वेध घेणारी थरारक आणि रहस्यमयी कादंबरी "समांतर". 

नशिबाला कंटाळलेली एक व्यक्ती, कुमार महाजन हा या कादंबरीचा नायक. मुंबईमध्ये आपली पत्नी आणि मुलासोबत राहणारा तिशीतला एक मध्यमवर्गीय तरुण म्हणजे हा कुमार महाजन. आयुष्यात घडू नयेत अशा घडणाऱ्या घटना आणि आर्थिक विवंचनेत नेहमीच संघर्षमय जीवन जगावे लागणारा हा कुमार. त्याला या परिस्थितीला कंटाळलेला पाहून आणि त्याच्यावर असलेल्या प्रेमाखातर त्याचा कार्यालयीन मित्र वाफगावकर त्याला एका प्रसिद्ध ज्योतिष्याकडे येण्यासाठी आग्रह करतो. देवांवर आणि ज्योतिष्यावर विश्वास नसणारा कुमार मित्राच्या आग्रहास्तव ज्योतिष्याकडे जातो खरा पण त्यांनी त्याच्याबद्दल सांगितलेल्या काही अचूक गोष्टींमुळे त्याचा स्वामींवर विश्वास बसतो. पण कुमारचा हात पहायला घेताच स्वामी त्याला भविष्य सांगण्यास नकार देतात आणि अशा व्यक्तीचे नाव घेतात जे कुमारने पूर्वी कधीच ऐकलेलं नसतं. तीस वर्षांपूर्वी स्वामींकडे आलेला सुदर्शन चक्रपाणी आणि कुमार यांच्या भविष्यरेषा सारख्याच असल्याचं स्वामी कुमारला सांगतात. स्वामींनी अपले भविष्य सांगण्यास नकार दिल्याने चिडलेला कुमार दोन लोकांच्या हस्तरेषा समान असणं केवळ अशक्य आहे असं म्हणून तिथून बाहेर पडतो पण त्यानंतर त्याच्या आयुष्यात एकामागून एक घडणाऱ्या धक्कादायक गोष्टींमुळे अस्वस्थ होतो. स्वामींवर बसलेल्या विश्वासामुळे कुमार त्याचा मित्र वाफगावकरसोबत सुदर्शन चक्रपाणी बद्दल माहिती मिळवायला चालू करतो. शोध घेत असताना त्यांना कुमार आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडलेल्या समान गोष्टीबद्दल समजतं आणि इथेच कुमारला झालेली, अंगावर काटा आणणारी जाणीव म्हणजे सुदर्शन चक्रपाणीचा भूतकाळ हा कुमारचा भविष्यकाळ आहे. "समांतर" म्हणजे एकाचा भूतकाळ तो दुसऱ्याचा भविष्यकाळ ! इथून सुरुवात होते या कादंबरीच्या थरारक आणि रहस्यमयी प्रवासाची.

कुमारने त्याच्या कंपनीमध्ये केलेल्या अफरातफरीमुळे त्याच्या पन्हाळ्याला झालेल्या बदलीनंतर ही कथा एका वेगळ्या वळणावर जाऊन वेग पकडते. या दरम्यान सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडून गेलेल्या बऱ्याच घटनांची कुमारला मिळालेली माहिती आणि त्या सर्व घटनांचे कुमारच्या आयुष्यात घडत असणाऱ्या घटनांशी असणारे साधर्म्य यामुळे कथेचं गूढ वाढत जाते. आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींचं चक्रपाणीच्या भूतकाळाशी असणारं साधर्म्य कुमारला बेचैन करत राहतं आणि त्यातूनच तो सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटता यावं यासाठी पुन्हा एकदा जोमाने त्याचा शोध चालू करतो. चक्रपाणीच्या शोधात कुमारचा मध्यप्रदेशातील पालान हे छोटेसे गाव आणि तिथून रेतीमैदानातील चक्रपाणीच्या हवेलीपर्यंतचा प्रवास यांचं सुशिंनी केलेलं थरारक, रोमांचक  वर्णन वाचकाला कथेत गुंतवून ठेवते. पालानमध्ये जेव्हा कुमार सुदर्शन चक्रपाणीला प्रत्यक्ष भेटतो तेव्हाही त्याला त्याच्या आयुष्यात घडत असणाऱ्या आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात घडून गेलेल्या अनेक समांतर गोष्टींचा उलगडा होतो. कुमारला स्वतःचं भविष्य जाणून घेण्याची असणारी उत्सुकता आणि त्याने केलेल्या आग्रहामुळे चक्रपाणी त्याला आपण लिहिलेल्या डायरी वाचायला देतो पण त्यासाठीची असणारी अट म्हणजे कुमारला दररोज एकच पान वाचावं लागणार. डायरी मिळाल्यानंतर कुमारला स्वर्ग जणू दोन बोटे उरतो. पण नियती कोणाला चुकत नाही या उक्तीप्रमाणे चक्रपाणीच्या भूतकाळातील घटना कुमारच्या आयुष्यात घडत राहतात, भले त्या घडण्याचे कारण वेगळे असेल पण परिणाम तेच असतात जे चक्रपाणीने अनुभवलेले. डायरीतले प्रत्येक पान हे कुमारचा उद्याचा दिवस कसा आहे हे सांगत असतं, पण शेवट मात्र अधांतरीच असतो. सुदर्शन चक्रपाणीच्या भुतकाळात घडून गेलेल्या घटना आपल्या भविष्यकाळात घडू नयेत म्हणून कुमार काळजी घ्यायला सुरुवात करतो. तरीही मध्यंतरी त्याच्या आयुष्यात एक अशी घटना घडते की त्यामुळे त्याच्या पुढच्या आयुष्याला एक वेगळीच कलाटणी मिळते आणि ही कथा शेवटाकडे जायला लागते. कुमार महाजन भोवती फिरत राहणाऱ्या या कथेचा अतिशय अनपेक्षितरित्या होणारा शेवट वाचकाला धक्का देऊन जातो.

हातामध्ये डायऱ्यांच्या रुपात स्वतःचं भविष्य माहित असणारा कुमार महाजन भविष्यात होऊ घातलेल्या घटना टाळण्यात यशस्वी होतो की नाही हे आपल्याला कादंबरी वाचल्यावरच समजेल. वाचकाला कादंबरीमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतवून ठेवण्यात सुशिंनी प्रचंड यश मिळवलंय. रहस्यमय घटनांनी खचाखच भरलेली आणि वाचत असताना शेवट काय असेल या विचाराने सतत आपली उत्कंठा वाढवणारी आवर्जून वाचण्यासारखी  सुहास शिरवळकरांची ही कादंबरी "समांतर".



संदीप प्रकाश जाधव

Sunday, September 13, 2020

"धग"

 


लेखक : उद्धव ज. शेळके

प्रकाशक : पॉप्युलर प्रकाशन


स्त्री म्हणजे शक्ती, शुद्ध ऊर्जा यांचे मूर्त स्वरूप. या शक्तीची विशालता परिमाणापलीकडे आहे. मनात आणले तर एक स्त्री काय करू शकते याची शेकडो उदाहरणे अगदी हजारो वर्षांपूर्वीपासून सुद्धा आपल्याला मिळू शकतील. आजच्या युगातसुद्धा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत संघर्ष करून, स्वतःचं वेगळं असं अस्तिव निर्माण करून, ताठ मानेने समाजात वावरत असणाऱ्या बऱ्याच स्त्रियांची उदाहरणे आहेत. उद्धव शेळके यांची ही कादंबरी, "धग" म्हणजे अशाच एका सामान्य स्त्रीची असामान्य कहाणी आहे.

उद्धव शेळकेंनी १९६० साली लिहिलेल्या या कादंबरीची वास्तवता वाचकाला आजही जाणवत राहते. ही कादंबरी म्हणजे अमरावती जिल्ह्यातल्या एका शिंपी कुटुंबाची कहाणी. कादंबरीच्या केंद्रस्थानी आहे "कौतिक" नावाची शिंपीण. जरी कौतिकला केंद्रस्थानी ठेवून लिहिलेली ही कहाणी असली तरी सोबतच या कादंबरीतील इतर पात्रे जसे कौतिकचा भाऊ गोविंदा भाऊजय गंगा, तिची आई गोदूबाई, नवरा महादेव, त्यांची मुलं भीमा-नामा-यसोदी, सासरा रघुनाथ, शेजारणी सीता-सकीना आणि कासम सुद्धा तितकीच महत्वाची. अनेक चढ-उतारांनी भरलेली अशी ही कादंबरी. वर्‍हाडी भाषेत लिहिलेली ही कादंबरी सुरुवातीला थोडी कठीण वाटते, पण संदर्भातून पुढे सगळे स्पष्ट होत जाते. कौतिकचा नवरा महादेव तिच्या मानाने सगळ्याच बाबतीत कमी उत्साही. तो प्रयत्न करत नाही असं नाही, पण निरुत्साह आणि अपयशामुळे ढेपाळतो. त्याला शिवणकाम येत असतं पण त्यात मन रमत नाही. सुरुवातीला कौतिकच्या भावासोबत शिवणकाम करणारा महादेव अचानकच सर्व सोडून कुटुंबासह आपल्या मूळ गावी येतो आणि इथूनच चालू होते कौतिकची कहाणी. वावरात मोलमजूरी करण्याबाबत कंटाळा - कमीपणा वाटणारा महादेव आणि आपली २ मुले  भीमा-नामा यांना सोबत घेऊन चालू होते कौतिकची धडपड, स्वाभिमानाने जगण्यासाठी.

पूर्णतः ग्रामीण वातावरणातील या कादंबरीतून विदर्भातले दैनंदिन ग्रामीण जीवन उद्धव शेळकेंनी आपल्यासमोर मांडले आहे. कादंबरीच्या सुरुवातीला लहान असणारी तिची दोन मुलं - भीमा आणि नामा, शेवट होईपर्यंत मोठी होऊन आपापल्या परीने आयुष्य जगायला लागतात. भीमा गुंड बनतो, जे काय हवं ते हिसकावून घेतल्याशिवाय मिळत नाही हा धडा परिस्थितीच त्याला शिकवते. याउलट नामाला कोणतीही गोष्ट मनापासून शिकायची हौस असते आणि शेवटी परिस्थितीसोबत आपल्या आशा-अपेक्षांची तडजोड करायला तो शिकतो. कादंबरीमध्ये कौतिक केंद्रस्थानी असली तरी कादंबरीचे अंत:करण हा नामा आहे, हे वाचकाला हळूहळू उलगडत जातं. नामाच्या डोळ्यातूनच वाचक शेवटी वास्तवाकडे पाहतो. नकळतपणे जीवनाची जबाबदारी कौतिककडून नामाकडे सोपवली जाते. जातीव्यवस्थेमुळे पारंपरिकरित्या महादेवकडे आलेलं शिंपीपण या कुटुंबाला रोजगार आणि सामाजिक आधार देण्यात कमी पडते. पारंपारिक विद्या जोपासायचं आणि वारसा चालवायचं उत्तम साधन म्हणून जातसंस्थेच्या अस्तित्वाचं कारण आजही सांगितलं जातं पण ते किती तकलादू आहे हे या कुटुंबाची होणारी परवड वाचताना समजते आणि वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडते. महादेवाला ही विद्या त्याच्या वडिलांकडून कमीजास्त प्रमाणात मिळते, पण त्याच्या पुढच्या पिढीतला नामा मात्र दोन्हीकडे फसतो. ही पारंपारिक जातीची विद्या त्यांच्या जातसमूहातून तर त्याला मिळतच नाही, पण त्याला आधुनिक शाळेतील शिक्षणही गरिबीमुळे मिळत नाही. कथानकाच्या शेवटी गहाण ठेवलेलं मशीन परत आणताना त्याचं ओझं कौतिकला पेलवत नाही आणि तिच्या पाठीला जखम होते, जणू काही त्या सर्व पारंपारिक साच्यातल्या अपेक्षांखाली ती शेवटी कोसळते. पारंपारिक नात्यांचा कोणताच आधार उरत नाही आणि शेवटी सगळ्यांची फारकत होते. भीमा आणि महादेव भटकत राहतात आणि नामा-कौतिक हे दोघे सोबत राहूनही खर्‍या अर्थाने एकत्र राहत नाहीत.

कौतिकची आपला संसार उभारण्याची धडपड आणि जिद्द वाचून आपल्याला नवीन आशा मिळते. कितीही कठीण प्रसंगापुढे गुढघे न टेकता त्याला सामोरी जाणारी कौतिक वाचत असताना आपल्यालाही एक प्रकारची ऊर्जा देऊन जाते. भूतकाळात लिहीलेली ही संपूर्ण कादंबरी शेवटी मात्र वर्तमानकाळाचा वापर करून, जातीव्यवस्था आजही कायम असल्याचे बिंबवते. वाचकाला कमालीचे अस्वस्थ करून होणारा या कादंबरीचा शेवट.

एका सामान्य शिंपिणीची, परिस्थितीविरुद्ध तिने दिलेल्या लढ्याची ही कहाणी. कठोर वास्तवाचे दर्शन घडवणारी, आवर्जून वाचावी अशी उद्धव शेळकेंची कादंबरी "धग".




संदीप प्रकाश जाधव

Sunday, September 6, 2020

"घनगर्द"

 

लेखक : हृषीकेश गुप्ते

प्रकाशक : रोहन प्रकाशन


आजच्या घडीला ज्यांच्या भयकथा - गूढकथा आवर्जून वाचाव्यात असे आणि ज्यांच्या "दंशकाल" या कादंबरी वाचनानंतर माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक झालेले लेखक म्हणजे हृषीकेश गुप्ते. "दंशकाल" शिवाय त्यांची इतर पुस्तके "चौरंग", "दैत्यालय", "अंधारवारी", "कालनिर्णय", "हाकामारी", "काळजुगारी" सुद्धा खासच आहेत. भयकथा - गूढकथा या कल्पनेवर आधारित असतात आणि हृषीकेश गुप्ते यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची जबरदस्त कल्पनाशक्ती. पण कल्पनाशक्तीतून साकारलेल्या कथा या तेव्हाच परिणामकारक होतात जेव्हा त्यांची उत्कृष्ट मांडणी केली जाते. हृषीकेश गुप्तेनीं लिहिलेलं प्रत्येक पुस्तक आणि कथा परिणामकारक असण्याचं सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे त्या कथांची केलेली मांडणी, जी वाचकाला त्या घटना आपल्या डोळ्यासमोर उभ्या करते. याशिवाय काल्पनिक जरी असल्या तरी काही काही कथांमधून नकळत दिला जाणारा संदेश जो वाचकाला अंतर्मुख होण्यास भाग पाडतो. हृषीकेश गुप्ते यांच्या कल्पनेतून साकारलेल्या अशाच ५ वेगवेगळ्या रोमांचक आणि थरारक कथांचा हा कथासंग्रह म्हणजे "घनगर्द".

पहिली कथा "घनगर्द" फिरते नुकत्याच तारुण्यात प्रवेश केलेल्या गार्गी भोवती. कथेची सुरुवात होते माथेरानच्या डोंगरकड्यावरून, मंकी पॉइंटवरून एका माकडाच्या हल्ल्यात दरीमध्ये कोसळणारी गार्गी आणि तिला वाचवायला जाऊन तोल गेल्याने तिच्यासोबतच दरीत कोसळणारे तिचे वडिल या घटनेपासून. गार्गीला केंद्रस्थानी ठेवून भय आणि त्याच्या वेगवेगळ्या रुपांतून पुढे सरकणारे हे पहिल्या कथेचे कथानक. मंकी पॉइंटवरून दरीत पडताना वाटणारी मरणाची भीती, तारुण्यात प्रवेश करताना वाटणारी नैसर्गिक भीती, आई-वडिलांच्या सततच्या तणावपूर्ण नात्यामुळे वाटणारी भीती, एक मुलगी म्हणून समाजात वावरत असताना वाटणारी भीती अशा वेगवेगळ्या भीतीच्या छटांमधून उलगडत जाणारी ही पहिली कथा वाचताना हृषीकेश गुप्ते यांच्या लिखाणाचे वेगळेपण जाणवत राहते. डोंगरकड्यावरून खोल दरीत कोसळताना झाडाच्या फांद्यांमध्ये अडकलेल्या गार्गीला, त्या गर्द अंधारात खोल दरीमध्ये अधांतरी लटकत असताना फ्लॅशबॅकमधे आठवणाऱ्या काही घटना आणि त्या घटनांना जोडून येणारे भय यांचे अगदी अफलातून वर्णन या पहिल्या कथेत वाचायला मिळेल. यासर्वांबरोबरच आपल्यासोबत दरीत पडलेल्या वडिलांच्या आठवणीने वाटणारे भय, त्यांना शोधण्यासाठी गार्गीने त्या गर्द अंधारात केलेली धडपड, अर्धमेल्या अवस्थेत नजरेस पडलेल्या वडिलांना पाहून गार्गीची झालेली अवस्था, त्याच परिस्थितीत वडिलांशेजारी झोपून काढलेली रात्र आणि तिथून सुटका होईपर्यंत वडिलांचा झालेला मृत्यू हे सर्व कथेत मांडत असताना हृषीकेश गुप्ते यांनी ती घटनाच आपल्यापुढे उभी केली आहे. अगदी चंद्राच्या प्रकाशात पडलेली डोंगराची सावलीसुद्धा त्यांच्या शब्दरचनेमुळे आपल्या पुढ्यात येते. वडिलांचे छत्र हरवल्यानंतर आपल्या आयुष्यात अक्राळविक्राळ, भीतिदायक माणसांच्या "घनगर्द" जंगलाची झालेली सुरुवात आणि त्यातून  बाहेर पडण्याची वाट आता स्वतःलाच शोधावी लागणार या गार्गीला झालेल्या जाणीवेने झालेला या कथेचा शेवट.

दुसरी कथा "पावसात आला कोणी" ही फिरते एका लेखकाभोवती. वास्तव आणि कल्पना यांच्या एकत्रिकरणातून निर्माण होणारे भय आणि त्यातून पुढे सरकणारे असे या कथेचे कथानक. एका प्रतिभावान लेखकाच्या कल्पनांना अचानक लागलेला ब्रेक आणि त्यामुळे तब्बल ३ वर्षांहून अधिक काळ कोणतेच लिखान न झाल्याने त्याच्या मनाची होणारी घालमेल ही या कथेत भयाच्या केंद्रस्थानी आहे. एक दिवस अचानकच मुसळधार पावसात लेखकाच्या घरी आलेली एक व्यक्ती आणि त्याच्यासोबतच्या संवादातून उलघडत जाणारे रहस्य म्हणजे ही कथा. लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक पुस्तकाची कथा ही लेखकाने लिहिण्यापूर्वी, त्या कथेची कल्पना फार आधी मला सुचली होती आणि ती कल्पना लेखकाने चोरली असा दावा करणारी ही पावसात आलेली व्यक्ती. एखाद्याच्या डोक्यातील विचार किंवा कल्पना चोरता येणं निव्वळ अशक्य आहे असे म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीवर विश्वास न ठेवणाऱ्या लेखकला शेवटी त्या व्यक्तीसोबत झालेल्या संवादातून, त्याने दिलेल्या पुराव्यातून आपल्या कल्पनाशक्तीला ३ वर्षे ब्रेक कशामुळे लागला याचं लेखकाला मिळालेलं उत्तर म्हणजे ही कथा. सत्य आणि कल्पना यांचा परस्परांवर होणारा परिणाम किती खोलवर असतो याच्या जाणिवेसह झालेला या कथेचा शेवट.

तिसरी कथा "पानगळ" लिहिली गेलेय कोकणातील फुलवर्धन या गावातील देवधर वाड्याला केंद्रस्थानी ठेवून. कथा फिरते नाथा आणि त्याचा मित्र रघू यांच्याभोवती. या कथेतील भय हे नाथा आणि रघू यांनी लहानपणी नकळत केलेल्या अपराधाशी निगडित आहे. देवधर काकू आणि त्यांचा देवधर वाडा हा संपूर्ण गावासाठी एक भीतीयुक्त कुतूहलाचा विषय. याच देवधर वाड्यातील एका हापूस आंब्याच्या लहानपणी गंमत म्हणून केलेल्या चोरीमुळे नाथा आणि रघू यांच्या आयुष्याची कशी वाताहत होते याची ही एक थरारक कहाणी. आंब्याच्या चोरीनंतर एखाद्या "पानगळीप्रमाणे" नाथाच्या कुटुंबातील व्यक्तींच्या झालेल्या मृत्यूमुळे आपल्या आईसोबत फुलवर्धन सोडलेला नाथा पुढे २० वर्षे याच भीतीखाली जगला की आपल्या कुटुंबाची झालेली ही "पानगळ" म्हणजे देवधर काकूंनी दिलेल्या शापाचाच परिणाम. आणि याच भितीमुळे भिकेला लागून गावची वेस सुद्धा ओलांडू न शकलेला रघू. फ्लॅशबॅकमधे उलगडत जाणाऱ्या या कथेत नाथा आणि रघू जेव्हा लहानपणी पहिल्यांदाच देवधर वाड्यात जातात त्यावेळचे वाड्याच्या आतील आणि आजूबाजूच्या परिसराचे हृषीकेश गुप्ते यांनी केलेलं थरारक वर्णन एखाद्या हॉरर चित्रपटाचा प्रसंगच आपल्यासमोर उभा करते. पुढे तब्बल २० वर्षांनी देवधर वाड्यात हापूस बहरल्यानंतर रघूने नाथाला फुलवर्धनला बोलावून घेणे आणि दोघांच्याही आयुष्याची अशी वाताहत नेमकी का झाली याचा लागलेला शोध म्हणजे ही थरारक कहाणी.

चौथी कथा आहे "मुआवजा". या कथेतील भय फिरते गावाकडच्या उरुसामध्ये घडलेली एक घटना आणि सुखी आयुष्य जगायला मिळवण्यासाठी चुकते करावे लागणाऱ्या अज्ञात मोबदल्याभोवती. कथेचा नायक जो गावामध्ये वर्षानुवर्षे भरणाऱ्या उरुसामध्ये एका म्हाताऱ्याकडून स्वतःसाठी आयुष्यभराचे सुख मागून घेतो पण त्यासाठी असणारी अट म्हणजे त्या म्हाताऱ्याला द्यावा लागणारा मोबदला जो नायकासाठी अज्ञात असेल. मग तो कदाचित त्याने त्या म्हाताऱ्याकडे येण्यापूर्वीच चुकता केला असेल किंवा त्याला तो नंतरच्या आयुष्यात द्यावा लागेल. २१ वर्षे आपल्याला हवे तसे आयुष्य जगल्यानंतर तो मोबदला जाणून घेण्यासाठी नायक जेव्हा गावात परत येतो तेव्हा फ्लॅशबॅकमधे उलगडत जाणारे या कथेचे कथानक. पुस्तकातील बाकी कथांप्रमाणेच या कथेमधील पार्श्वभूमीचे वर्णनसुद्धा नायकासोबत घडलेल्या घटना आपल्या डोळ्यासमोर घेऊन येते. खासकरून हृषीकेश गुप्ते यांनी जे उरुसाचे अगदी अप्रतिम वर्णन कथेत केलेलं आहे ते ज्या वाचकांनी असा उरुस बालपणी अनुभवला आहे त्यांना त्याची नक्कीच आठवण करून देईल. २१ वर्षे तो अज्ञात "मुआवजा" काय असेल या भीतीमध्ये गेल्यानंतर, तो "मुआवजा" नेमका काय आहे हे जेव्हा नायकाला समजते तेव्हा त्या भीतीचे रूपांतर अधिकच भयानक चिंतेमध्ये होऊन संपणारी ही कथा. कथेतील म्हाताऱ्याच्या तोंडचे एक आवडलेलं वाक्य - " डोळ्यांतल्या पाण्यावरून दुःखाची, वा गालांवर उमललेल्या खळीवरून सुखाची कल्पना नाही करता येत. खरं दुःख जेव्हा वाट्याला येतं तेव्हा विंचवाच्या नांगीनं काळीज कुरतडतं आणि खरं सुख जेव्हा लाभतं तेव्हा जगण्याची मनीषाच संपते."

शेवटची पाचवी कथा आहे "रमलवाटा". थोड्याश्या वेगळ्या प्रकारचे भय आपल्यासमोर घेऊन येणारे या कथेचे कथानक. एका मोठ्या लेखकाभोती फिरणारी ही कथा. वास्तव आणि कल्पना या दोन्हींच्यामध्ये जो एक सामायिक प्रदेश असतो त्या प्रदेशात लेखकाच्या आयुष्यात घडलेली घटना म्हणजे ही कथा. भयकथा लेखनाने प्रसिद्धी मिळाल्यानंतर भयकथांचा मार्ग सोडून इतर लेखनाकडे वळलेला लेखक आणि त्यामुळे अर्ध्यावर सोडून दिलेल्या काही भयकथा यांतून जन्म घेणारे या कथेचे कथानक. वि.वि. दिवेकर नामक एका व्यक्तीचे एक चाहता म्हणून लेखकाच्या आयुष्यात आल्यानंतर सुरुवात होते या कथेची. "सांगितल्या नाहीत, तर कथा मरतात." असे म्हणणारा हा दिवेकर. कथेचा शेवट काय होणार याचा थोडासाही अंदाज न लागू देता वाचकाला एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाऊन संपलेली अशी ही कथा. दिवेकरांसोबत सुरुवातीला कुतूहल म्हणून लेखकाने चालू केलेली चर्चा नंतर त्याला भीतीकडे घेऊन जाते आणि एक विस्मयकारक शेवट करते. दिवेकर ही व्यक्ती कोण आणि ती लेखकाच्या आयुष्यात अचानकपणे का आली याच्या धक्कादायक शोधानंतर लेखकाचे पुन्हा भयकथा लेखनास सुरू करणे हा या कथेचा शेवट.

हृषीकेश गुप्ते यांनी या पुस्तकामध्ये लिहिलेल्या ५ कथा म्हणजे भय कथांची आवड असणाऱ्यांसाठी पंचपक्वानासारख्याच. हृषीकेश गुप्ते यांच्या खास शैलीतील लिखाणासाठी आवर्जून वाचावे असे हे पुस्तक "घनगर्द".




संदीप प्रकाश जाधव




"मंत्रावेगळा"

  लेखक : ना. सं. इनामदार प्रकाशक : कॉन्टिनेन्टल पब्लिकेशन पृष्ठे- ६५०, मूूल्य- ५०० रुपये